Sunday, December 16, 2007

"इथे अग्निपंख फुलले होते'...

गावातल्या रस्त्याकडेचा मासळी बाजार फुलायला लागला आणि आसपासच्या झाडांवर पक्ष्यांचा वखवखलेला कलकलाट सुरू झाला. रात्रीच्या निवाऱ्यापुरती आणि पिलावळीच्या आसऱ्यासाठी काडीकाडी जोडून वाळल्या झाडांवर बांधलेली घरटी सोडून सगळे कावळे मासळी बाजाराकडे झेपावले. पलीकडच्या गल्लीतल्या अवाढव्य पसरलेल्या, जगण्याची आशा सोडलेल्या रुग्णाईत म्हाताऱ्यासारख्या चिंचेच्या झाडावरच्या बगळ्यांच्या थव्यांचे ध्यान मोडले आणि पांढुरके पंख पसरत घरट्यातल्या घरट्यात त्यांचा नाच सुरू झाला. नुकतीच जन्माला आलेली, भुकेली पिल्लं आपल्या आशाळभूत पारदर्शक चोची आयांच्या तोंडात खुपसून कलकलू लागली आणि बगळ्यांनी रात्रभराच्या मुक्कामात खालच्या रस्त्यावर घालून ठेवलेली "रांगोळी' पाहून रस्ता झाडणाऱ्या कचरावाल्यानं मान उंचावून वठलेल्या झाडावरच्या बगळ्यांच्या घरट्यांकडे पाहात नेहमीसारख्या दोनचार शिव्या हासडल्या. पुढच्याच मिनिटभरात आकाशात बगळ्यांची माळ फुलली आणि मासळी बाजाराच्या रस्त्यावर "पायउतार' झाली. बाजारातल्या फळकुटांवर खाऱ्या पाण्याचे फलकारे झेलत, जीव धरून तडफडणारे मासे बगळ्यांच्या लांबुडक्‍या चोचींकडे भयाण नजरेनं पाहात मृतप्राय झाले आणि नायलॉनच्या जाळीने बंद केलेल्या टोपलीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात एकमेकांना खाली खेचणारे खेकडे टोपलीच्या तळाशी जाऊन गपगार बसले...
आसपासच्या झाडांवर कधीपासून बसून तिरक्‍या नजरांनी बाजारातल्या ताज्या माशांचा वेध घेणाऱ्या कावळ्यांनी बगळ्यांचे थवे जमिनीवर उतरताच जोरदार कलकलाट केला आणि शेपट्या फुगवून उगीचच आसपास उंडारणाऱ्या मांजरांनी झाडांकडे पाहात नाके फुगवली. बगळे "ध्यानस्थ' झाले... कोळिणींच्या टोपल्यांमधली हत्यारे बाहेर आली आणि रेल्वे स्टेशनावर गाडी येताच फलाटावरच्या गर्दीची होते, तशी पळापळ करीत बगळे, कावळे आणि मांजरांनी कल्ला केला... माशांच्या "काटलेल्या' शेपट्यांचा एक ढिगारा रस्त्यावर फेकला गेला आणि कावळे, बगळे आणि मांजरे आपापसातले वैर विसरून त्यावर तुटून पडले. माशांच्या शेपट्या चोचीत पकडून मान उंचावत दुडदुडत पळणाऱ्या बगळ्यांचा आनंद पाहून कावळ्यांनीही झाडांवरूनच जोरदार "आवाज' दिला....
... उन्हं जमिनीवर उतरली आणि मासळी बाजारात माणसांचीही गर्दी सुरू झाली... भेदरलेल्या डोळ्यांनी मृत्यूची वाट पाहत फळकुटावरच्या फडफडणाऱ्या माशांकडे पाहाणाऱ्या जिभांना पाणी सुटले... आणि सृष्टीच्या अनादीकालापासून माणसाने रूढ केलेला "जीवो जीवस्य जीवनम' या "सिद्धान्ता'चा "सोहळा' सुरू झाला. कावळ्या-बगळ्यांची आणि मांजरांची गर्दी भेदरल्यागत बाजूला झाली आणि माणसांनी मासळी बाजाराचा ताबा घेतला...
--- ------------- --------------
ताज्या हवेसाठी फेरफटका मारून घरी परतताना रोजच स्पष्ट दिसणारा हा सकाळचा "सोहळा' पाहताना मी आज मात्र अंतर्मुख झालो.
खोल समुद्रात जाऊन रात्रभर मासेमारी करणारे आणि सकाळी पडाव भरून किनाऱ्यावर उतरल्यानंतर ताजे मासे विकण्यासाठी बाजाराकडे धावणारे कोळी, आयत्या अन्नाची सोय साधण्यासाठी आसपासच्या झाडांवरच मुक्काम ठोकून सकाळी बाजाराकडे धाव घेणारे हे कावळे-बगळे आणि बाजाराच्याच फळकुटांच्या आसऱ्याने जगणारी असंख्य मांजरे, ताज्या, फडफडत्या माशांच्या खरेदीसाठी उडणारी गिऱ्हाईकांची झुंबड...
पोटाची खळगी भरणे...
निसर्ग हा एक चमत्कार आहे. सृष्टीचा तोल सावरण्यासाठी त्यानेच जीवनाचा हा "सिद्धान्त' रचला आणि माणसाने आपल्या अचाट निरीक्षणशक्तीने त्यावर आपला "स्वामित्वहक्क' प्रस्थापित केला. आपणच सृष्टीचे नियंते आहोत, अशी माणसाची समजूत झाली तेव्हापासून तो "शिकारी'च्या "खेळा'त रमू लागला. जीवसृष्टीचा तोल राखण्यासाठी निसर्गाने प्राणीमात्रांचा आहार-व्यवहार आखून दिला. यासाठीच, वाघ-सिंहांसारखे मांसाहारी पशू हरीण-सशांसारख्या कोवळ्या जिवांची शिकार करतात, आणि जंगलाच्या कायद्यानुसार त्यांची "लोकसंख्या' नियंत्रणात राहते. याच शिकारीतून उरल्यासुरल्या "अन्ना'वर ताव मारून काही प्राणी उदरनिर्वाह करतात, आणि त्यांच्या जगण्याची निसर्गतःच सोय होते. उरलेसुरले सांगाडे साफ करण्याचे काम करण्यासाठी निसर्गाने "गिधाडे' नावाचे सफाई कर्मचारी नियुक्त केले आहेत. या रचनेमुळे जीवसृष्टीतील प्राणीमांत्रांच्या संख्येचे नियंत्रण होते, असे म्हणतात...
मग आता निसर्गाच्या या रचनेला धक्का कुणी दिला?
कधीकाळी सा सृष्टीत जगणारे असंख्य जीव नामशेष का झाले?
अनेक निरुपद्रवी जीवांचे अस्तित्व संकटात का सापडले?
ेजंगलात दिमाखाने मिरविणाऱ्या शक्तिमान वाघांच्या संरक्षणासाठी सरकारी योजना का सुरू झाल्या?
निसर्गाचे सफाई कर्मचारी असलेली गिधाडे कुठे गायब झाली?
आपल्या आनंदी चिवचिवाटाने माणसाची मने प्रसन्न करणारी चिऊताई आज शोधावी का लागते?
... सिमेंटच्या जंगलाने व्यापलेल्या मुंबईच्या एका कोपऱ्यात आजही हिवाळ्याच्या हंगामात "अग्निपंखी' परदेशी पाहुणे दाखल होतात, आणि निसर्गप्रेमींच्या आनंदाला उधाण येते. एवढ्या गजबजाटातदेखील, या परदेशी पाहुण्यांना मुंबईतली ही प्रदूषित दलदल पिढ्यापिढ्यांनंतरही आपलीशी वाटते... कारण, दर वर्षी दाखल होणाऱ्या या रोहित पक्ष्यांपैकी अनेकांचा जन्मच इथल्याच दलदलीत झालेला असतो.
या दलदलीतले किडेमुंग्या खाऊन पोट भरण्यासाठीच ते फक्त दर वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून इथे येत असतील? की त्यांच्या जन्मभूमीची ओढ त्यांना नावर करीत असेल?...
आपल्या वंशजांनीही इथेच, आपल्याच जन्मभूमीत जन्म घ्यावा, अशी तर त्यांची इच्छा नसेल?... जंगलातल्या पशुपक्ष्यांची भाषा जाणण्याचे शास्त्र कधीकाळी माणसाला अवगत होते असे म्हणतात. आता तो माणूस अस्तित्वात नाही.....
पण, निसर्गानं प्राणिमात्रांचा समतोल राखण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा का कोलमडली?
कधीकाळी तळ्यांमध्ये, नदीच्या पात्रात आणि समुद्राकाठच्या दलदलीत बकध्यान करून बसणाऱ्या या बगळ्यांना आता मासळी बाजारातल्या, फास्ट फूडची सवय का लागली?
कावळेदेखील या मासळीला का चटावले?
एखादा गलेलठ्ठ उंदीर शेजारून जात असला, तरी डोळे मिटून स्वस्थ बसणाऱ्या मांजरालाही सिंमेटच्या जंगलातल्या "नागरीकरणा'चे वारे कशाने शिवले?...
---- ---------- -------------
माणसांच्या जगात संगणकयुग अवतरले, तेव्हा कामगार कपातीची कुऱ्हाड अनेक कुटुंबांवर कोसळली. अनेक कर्तीसवरती माणसे अचानक आलेली सक्तीची "व्हीआरएस' घेऊन घरी बसली, आणि कधीकाळी फक्त माणसांनी गजबजलेल्या अनेक कार्यालयांत फक्त संगणकाच्या कळपट्ट्यांचे खडखडाट घुमू लागले.... अनेक कामे करणारी एकच व्यवस्था अस्तित्वात आली, की तीच कामे करणाऱ्या असंख्य व्यवस्था निरुपयोगी ठरतात.
हा माणसाच्या वर्चस्वाखालच्या जगाचा नियम आहे.
माणसाच्या पूर्वजाला कधीकाळी शेपूट होते, असे म्हणतात.
तेव्हा तो चार पायांवर चालायचा. पुढचे दोन पाय हातासारखे वापरता येतात हे लक्षात आल्यावर माणूस स्वतःच्या दोन पायांवर उभा राहू लागला, तेव्हा त्याचे शेपूटही निरुपयोगी ठरत चालले.
प्राणीमात्रांचे नियमन करणाऱ्या निसर्गाच्या हे लक्षात आले, आणि माणसाचे निरुपयोगी शेपूट हळूहळू कमी कमी होत गेले...कालांतराने नष्ट झाले...
मानवसृष्टी प्रगत झाली...
ज्या गोष्टींची गरज राहात नाही, त्या गोष्टी निसर्गतःच नामशेष होऊ लागतात, हा निसर्गाचाही एक नियम!
आज माणूस इतका प्रगत झालाय...
म्हणूनच तर गिधाडे नामशेष झाली असतील?
पण चिऊताईंचे काय?
कधाकाळी घराघरातल्या लहानग्यांना खाऊपिऊ घालताना, "चिऊचा घास' आठवणीने भरवला जायचा...
आणि "चिऊ-माऊ' आणि "काऊ'चा सुद्धा घास घेतच कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या व्हायच्या...
आज घरांमधल्या लहानग्यांना मऊमऊ दुधभाताचे घास भरवले जातात?...
चिऊताईचा घास घेताना लहानग्याच्या दूधभाताने माखलेल्या चेहऱ्यावरच्या मिस्किल हास्यरेषा आज कुठे दिसतात?
लहानग्यांना घास भरवण्याच्या वेळी तेव्हा समोरच्या अंगणात "चिऊताई' बागडत असायची...
"चिऊताईचा घास' इतिहासजमा झाला म्हणून तर अंगणात बागडणाऱ्या चिऊताईचा चिवचिवाटही संपला नसेल?
-------- --------------- ------------------
मुंबईच्या कुठल्या एका कोपऱ्यातल्या दलदलीत निर्धास्तपणे येणाऱ्या अग्निपंखी पाहुण्यांना माणसांच्या वर्चस्वाखालच्या कायद्याचा बडगा अगदी अलीकडे अनुभवायला मिळालाय...
कुठल्यातरी अनामिक आस्थेनं, आपला वंश वाढविण्याच्या नैसर्गिक ओढीनं इथं आलेल्या या रोहित पक्ष्यांवर अचानक माणसांच्या जगाच्या कायद्यामुळे वंशसंहार पाहण्याची वेळ आली. त्यांची भाषा जाणणारा माणूस आज अस्तित्वातच नाही.
उद्या याच दलदलीत सिमेंटची जंगले फोफावतील.
तेव्हा कधीतरी कुणी हताश निसर्गप्रेमी आठवणीत हरवून उद्विग्नपणे उद्‌गारेल,
"इथे अग्निपंख फुलले होते'...

Monday, December 3, 2007

निःश्‍वास

दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला. हवेतच हात झटकून तो ताजातवाना झाला, आणि त्याला भुकेची जाणीव झाली.
आईबाप आणि हरवलेल्या बहिणीची आठवण कायमची पुसून शंकर फलाटाकडे धावला आणि त्याने गर्दीसमोर हात पसरला. पुरसे पैसे जमताच स्टॉलवरून घेतलेल्या वडापावच्या चवीत तो हरवून गेला...
...त्या दिवसापासून शंकरला मुंबईच्या रेल्वे फलाटांचं वेड लागलं. फलाटावर उतरताच त्याच्याच वयाच्या एकदोन जणांशी शंकरनं दोस्तीचा हात पुढे केला आणि जगण्याच्या युक्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली. गर्दीसमोर हात पसरून झाले, की सात वर्षांचा शंकर रुळांवरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायच्या आणि त्या विकून येणाऱ्या पैशातून मित्रांबरोबर बिडी-सिगारेटच्या धुरात भूतकाळ विसरायचा. कधी भीक मिळाली नाही, तर पॉलिशच्या रिकाम्या डब्यांमधले "सोल्यूशन' ठसका लागेपर्यंत हुंगायचा आणि त्या नशेतच दिवसभर तहानभूक विसरायचा... कधी "व्हाईटनर' हुंगून त्यात बुडून जायचा... कधी हातात चार पैसे जास्त खुळखुळले, तर "गुटख्या'ची "पार्टी' करायचा, आणि रात्री पुलाखालच्या अड्ड्यावरची "हातभट्टी' झोकायचा...
"छत्रपती शिवाजी' टर्मिनस, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, दादर, वांद्रयाच्या फलाटावर देशाच्या चारी दिशांनी येणाऱ्या गाड्यांच्या गर्दीतून शंकरसारखी शेकडो मुलं रोज दाखल होतात, आणि मिनिटामिनिटाला उसळणारी बिनचेहऱ्याची गर्दी त्यांना सहज सामावून घेते... एवढ्या "मॅक्‍झिमम सिटी'ला रोज भर पडणाऱ्या अशा शे-दोनशे पोराटोरांच्या गर्दीनं काहीच फरक पडत नसतो. मुंबईच्या रस्त्यांवर, रेल्वे स्टेशनांवर, सिग्नलजवळ आणि फूटपाथवर असे हजारो शंकर वर्षानुवर्षे आपले अस्तित्वहीन आयुष्य ढकलताहेत. मुंबईच्या लोकसंख्येच्या आकडेवारीत त्यांना स्थान नाही. त्यांच्याजवळ "नागरिकत्वा'चा पुरावा नाही, आणि "माणूस' असल्याचाही दाखला नाही. "बाळाचा पहिला हक्क' असलेला "जन्माचा दाखला' नाही, आणि कोणत्याही मानवी संस्कृतीशी त्यांचं नातं नाही.
केवळ दोन पाय, दोन हात, कुठलीतरी भाषा, आणि मेलेलं, पण मानवी मन एवढीच "माणूसपणा'ची लक्षणं असलेली हजारो मुले "उद्याच्या अंधारा'त स्वतःला ढकलून देऊन वावरताहेत. मनच नसल्याने माणुसकी नाही आणि माणूसपणाशी संबंधच नसल्याने माणसाच्या सुखदुःखांशीही देणघेणं नाही, अशा या मुलांच्या व्यवहारांवर माणसांच्या जगानं गुन्हेगारीचा शिक्का मारला असला, तरी "गुन्हेगारी' या शब्दाचा अर्थ त्यांना मात्र माहीत नाही. कारण ते तर त्यांचं 'जगणं' आहे. हरपलेल्या भूतकाळासोबत अनेकांनी आपली नावंही पुसून टाकली आहेत, आणि "काळ्या धंद्यांचं भांडवल' म्हणून अनेकांनी नकळत आपल्या आयुष्य त्या दुनियेला निमूटपणे अर्पण केलं आहे. हातपाय तुटलेली, नजरा हरवलेली अपंग मुले म्हणजे कुणाच्या तरी "धंद्या'चं भांडवल असतं. जमलेला पैसा संध्याकाळी कुठल्यातरी भाईच्या हातात ठेवला तरच आपल्या पोटात काहीतरी पडेल या आशेनं ही मुलं गर्दीत "वळवळत' असतात. एखादा कुणीतरी "पाकीटमारी'चं "कसब' मिळवतो, आणि कधी पकडला गेला, तर तोंड बंद ठेवून अर्धमेला होईपर्यंत मारही खातो. कुणी फेरीवाल्यांच्या मालाला गिऱ्हाईक मिळवण्यासाठी जिवाच्या आकांतानं ओरडायचं काम पत्करतो, तर कुणी पाण्याचा धंदा करणाऱ्या टोळीत सामील होऊन रुळावरच्या बाटल्या स्टेशनवरच्या नळाखाली भरून गाडी सुटतासुटता गिऱ्हाईकाच्या गळ्यात मारून "गंडवायचा' धंदा स्वीकारतो. व्हाईटनर, सोल्यूशन आणि "पावडर'च्या नशेत बुडालेला कुणी नकळत स्वतःची किडनीदेखील गमावून बसतो आणि खंगत खंगत मरणाला कवटाळतो...
एखाद्या "नशीबवाना'स मात्र, अनपेक्षितपणे नव्या आयुष्याची, "माणसांच्या जगा'ची वाट सापडते...
सावत्र आईच्या माराच्या भीतीने आणि आपल्या हातून लहान बहीण हरवल्याच्या भयाने सातव्या वर्षीच रस्त्यावरच्या जगात दाखल झालेल्या शंकरला सुदैवाने पुन्हा "माणसांच्या जगा'ची वाट सापडली आहे. वाट चुकलेल्या मुलांना जगण्याचा अर्थ समजावून देणाऱ्या "समतोल फाऊंडेशन' नावाच्या एका संस्थेला आता सामाजिक जाणीवांची साथ मिळू लागली आहे. "भविष्य' आणि "आयुष्य' अशा शब्दांची ओळख व्हायच्या आधीच, कदाचित अपघातानेच रस्त्यांवर फेकल्या गेलेल्या मुलांच्या जीवनातील अंधार पुसण्यासाठी "समतोल'च्या मदतीला समाजातील "माणुसकी' अनेक हातांनी सरसावली आहे.
"समतोल फाऊंडेशन'च्या, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र रेल्वे स्टेशनांवर ठिय्या मारून बाहेरगावांतून पळून मुंबईत आलेल्या मुलांची विस्कटलेली आयुष्ये सावरण्याचा संकल्प सोडला आणि या मुलांसाठी आशेचा किरण उगवला. अशा शेकडो मुलांचे "समतोल'शी नाते जुळले आहे. "समतोल'च्या "मनपरिवर्तन शिबिरा'त अनेक मुलं नव्या आयुष्याला सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. नशेबाजी, चोरी, भीक मागणे हेच ज्यांचे जीवन, अशा अनेकांना आता त्यापासून मुक्ती मिळाली आहे, आणि त्यांनी पुसलेला भूतकाळही पुन्हा जागा झाला आहे. माणसांच्या जगाबाहेर, रस्त्यावर जगणाऱ्या या मुलांची मेलेली मने पुन्हा "जिवंत' होऊ लागली आहेत...

दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरचं "घर' सातव्या वर्षीच सोडलेल्या शंकरला आज चौदाव्या वर्षी पुन्हा घराची ओढ लागली आहे, पण आता त्याच्या आईबापांचाच ठावाठिकाणा लागत नाही... "समतोल'ने अलीकडेच अशा काही मुलांच्या आईबापांशी संपर्क साधला आणि मूल हरवल्यामुळे विस्कटलेल्या अनेक संसारांमध्ये नवा उत्साह संचारला. "स्पर्श' करणाऱ्या एका क्षणाने काही जणांची ताटातूट संपविली आणि "समतोल'च्या आधाराने पुन्हा उभे राहिलेल्या अनेकांना पुन्हा आपापल्या घराची ओढ लागली. "शिबिरात मला रोज आंघोळ करायला मिळायची'... हे कुणा "शाहरूख'चे, इवल्या आयुष्यात कधीच न मिळालेल्या आनंदाच्या कल्पनांना शब्दरूप देणारे उद्‌गार "माणसांच्या जगा'ला अंतर्मुख करून सोडणारे आहेत...
समाजातील माणुसकीच्या आधारामुळे "समतोल'च्या कामाला आज दिशा मिळाली असली, तरी हे काम सोपे नाही. कायद्याच्या कचाट्याबरोबरच, या कामात "समतोल'ला सुरुवातीला काळ्या धंद्याच्या दुनियेच्या धाकालाही सामोरे जावे लागले. पण चांगल्या कामाची खात्री झाली, की आधाराचे हातही भक्कम होतात, याचा अनुभव या काळात "समतोल'ने घेतला आहे. आता रेल्वे स्टेशनवरच्या "कायद्याच्या रक्षकां'चाही पाठिंबा "समतोल'ला मिळाला आहे. त्यामुळे अशा मुलांना पुन्हा माणसांच्या जगात आणण्याचे काम सोपे झाले आहे. अनेक मुलांना न कळत्या वयातच स्वीकारलेले रस्त्यावरचे आयुष्यच आवडू लागते, आणि माणसांच्या जगात यायला ती राजी होत नाहीत. अशा मुलांमधले मन "जागे' करण्याचे काम ही संस्था करते. रस्त्यावरच्या मुलांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी अनुदाने मिळवून काम करणाऱ्या बिगरशासकीय संस्थांची- "एनजीओ'ची- मुंबईत कमतरता नाही. "समतोल'ला मात्र फक्त समाजातील संवेदनशीलतेचा आधार मिळाला आहे. "माणुसकीची शक्ती' समतोलच्या पाठीशी उभी आहे. या शक्तीच्या आधारावर आजवर अनेक चुकलेल्या, हरवलेल्या जिवांना आपल्या हरवलेल्या मायेची पाखर पुन्हा मिळाली. या पुनर्भेटीचा प्रत्येक क्षण हाच "समतोल'ला आधार देणाऱ्या शक्तीला नवे खतपाणी घालत असतो.वर्षानुवर्षे व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या माणसांच्या जगापासून दुरावलेल्या या मुलांच्या भविष्याच्या दिशा आता उजळल्या आहेत... अशा अनेक कोमेजत्या कळ्या आश्‍वस्त भविष्याच्या जाणीवांनी निःश्‍वास टाकू लागल्या आहेत...
("समतोल'चा संपर्क क्र.- ०२२- २५४५२६४४, ९१-९८९२९ ६११२४)