Saturday, October 16, 2010

पांढरीशुभ्र माणुसकी !

पांढरीशुभ्र माणुसकी
भर दुपारची, रणरणत्या उन्हाची वेळ! हायवेवर गाड्यांची तुरळक ये-जा सुरू होती. एक आलिशान मोटार भरधाव वेगात रस्त्यावरून पुढे आली आणि क्षणभरासाठी तिची गती मंदावली. रस्त्याकडेला थांबली. मागचा दरवाजा किलकिला उघडला. काहीतरी पांढरंशुभ्र बाजूच्या खड्ड्यात भिरकावलं गेलं. गाडीनं पुन्हा वेग घेतला आणि पुढच्या क्षणाला ती दिसेनाशीही झाली.
... रस्त्याकडेच्या त्या खड्ड्यातून वेदनांनी कळवळणारे आवाज येत होते.
खूप मागून, एक जुनाट मोटार जिवाच्या करारावर रस्ता कापत चालत होती. खड्ड्याजवळ येताच, ती मोटार थांबली. मागच्या सीटवरून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली. कळवळण्याचा आवाज आता मंद झाला होता. ती रस्त्याकडेला आली आणि तिनं वाकून खड्ड्यात बघितलं. तिच्या अंगावर सरसरून काटा आला होता. कानावर हात गच्च दाबत तिनं डोळे मिटले पण पुढच्या मिनिटभरात ती सावरली होती. खाली वाकून, जमिनीचा आधार घेत ती हळूहळू खड्ड्यात उतरली आणि ते, अगोदरच्या गाडीतून फेकलं गेलेलं, पांढरंशुभ्र, तिनं अलगद हातांनी कुरवाळलं. थोडीशी हालचाल जाणवली. मग मात्र तिनं वेळ घालवला नाही. जोर लावून ते तिनं उचललं आणि छातीशी धरून सावरत ती वरती आली. गाडीतून पाण्याची बाटली काढून तिनं एक धार त्याच्यावर सोडली आणि ती चरकली. दोन, गोंडस, शुभ्र केसाळ पामेरनियन कुत्री, एकमेकांना बांधून त्या निर्दयानं खड्ड्यात फेकली होती... जिवंत!
पाण्याची धार तोंडावर पडली पण एकानं डोळे मिटले... दुसरीच्या जिवाला थोडी धुगधुगी होती. केविलवण्या नजरेनं त्या जिवानं हिच्या डोळ्यात पाहिलं आणि एव्हाना निर्जीव झालेला एक जीव तिथेच सोडून, दुसरा धुगधुगता जीव सोबत घेऊन ती माघारी फिरली... सरळ घरी आली. मग औषधोपचार सुरू झाले. काही दिवसांनंतर तो जीव तगला. घरात आश्वस्तपणे वावरू लागला. पहिल्या दहाअकरांच्यात आणखी एकाची भर पडली होती. त्यापैकी कुणी लंगडं होतं, कुणी आंधळं होतं, कुणाला पायच नव्हता, तर कुणी आजारी होतं... पण सगळेजण तिच्यावर विश्वासून एकमेकांच्या सोबतीनं राहात होते.. प्रेमानं!
ह्या नव्या जिवालाही त्यांनी आपल्यात सामावून घेतलं.
~~~~~
मागे कधीतरी आमच्या पिंट्याला दत्तक द्यावं असा विचार मनात आला आणि मी फोनाफोनी सुरू केली. मुंबईतल्याच एका नावाजलेल्या प्राणिमित्र संस्थेत कुणाशीतरी बोललो. त्यांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. नाईलाजानं त्यांनी माझा नंबर लिहून घेतला. पुढच्या मिनिटात मला भराभर फोन सुरू झाले होते. त्यातला एक फोन, ह्या बाईंचा होता. शेजारच्याच उपनगरात राहाणारं एक गुजराती कुटुंब! आई, एक मुलगी, आणि दहाबारा कुत्री.. चारपाच मांजरं, चारदोन पक्षी... असा संसार. आमच्या पिंट्याला दत्तक घ्यायला ती तयार होती!
अर्थात तोवर मी निवळलो होतो. फोनवर बोलताबोलता तिनं आपल्या कुटुंबात दाखल झालेल्या एकेका सदस्याची कहाणी सांगायला सुरुवात केली...
आपण तिच्यासारखं ‘माणूस’ होऊ शकत नाही... पण निदान राक्षस तरी असता नये. मी तिची माफी मागितली आणि पिंट्याकडे पाहिलं. तो अतिशय विश्वासानं आणि प्रेमानं माझ्याकडे पाहात होता.
तेव्हापासूनच त्या कुटुंबाशी एक नवं, अव्यक्त नातं जडलं. कधीकधी त्या ‘माऊली’चा फोन येतो. असाच एक फोन झाला, तेव्हा तिनं तिच्या घरच्या त्या नव्या, पांढऱ्याशुभ्र पाहुण्याच्या आगमनाची ही कहाणी कळवळत सांगितली.
~~~~
अवतीभवतीच्या जगात रोज वावरताना, आसपासच्या गर्दीतलं हरवलेलं माणूसपण पावलापावलाला जाणवत जातं आणि इथे कुणालाच कुणाचं काहीच कसं वाटत नाही, असं वाटत राहतं.... पण, हीच गर्दी, जेव्हा ‘एकेरी’ होते, त्यातला प्रत्येकजण जेव्हा एकटा होतो, तेव्हा माणुसकीचे झरे अखंड जीवनाचा स्त्रोत ठरत आपापले वाहताना दिसतात. प्रत्येकजण हा काही ना काही आपापल्या परीनं इतरांसाठी करताना दिसतो. या गुजराती कुटुंबाने असाच एक अनुभव माझ्या झोळीत टाकला होता.. आणि मला माणुसकीचा धडादेखील दिला होता!

Saturday, October 2, 2010

पुण्य की प्रायश्चित्त?...

'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'...
... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला...
आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो.
पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला.
’वृद्धाश्रम’... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं. आणि माझा चेहेरा प्रश्नचिन्हांकित झाला.
हातातल्या वर्तमानपत्राची घडी उलगडून त्यातल्या एका पानावरच्या फोटोवर बोट ठेवत त्यानं तो पेपर जोरजोरात हलवला. मग मीच ते पान पकडलं, आणि नीट तो फोटो न्याहाळला.
... जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्त शंभरीच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचा फोटो होता.
’बघितलंत?...’ पुन्हा त्या फोटोवर बोट ठेऊन ते पान जोरजोरात हलवत त्यानं विचारलं.
मी फक्त होकार दिला. पण त्याचा तो प्रश्न आणि त्यानंच देऊन टाकलेलं ते उत्तर यांचा या फोटोशी काय संबंध ते मला कळलं नव्हतं.
... माझ्या तोंडावर उमटलेलं ते प्रश्नचिन्ह तसंच होतं.
’तुम्हाला सांगतो, आत्ताच मी एका वृद्धाश्रमात जाऊन आलो... माझं कुणीच नाहीये तिथे. पण’...
बोलतबोलता तो थांबला. रस्त्यावरून वाहाणार्‍या गर्दीकडे पाहात क्षणभर कुठेतरी हरवल्यासारखा गप्प झाला...
’अहो, खूप गर्दी झालीय तिथे. अ‍ॅडमिशनसाठी वेटिंगलिस्ट आहे...’ तो अस्वस्थ होता. मला ते जाणवू लागलं होतं.
मी काही न बोलता त्याचं बोलणं ऐकत होतो.
’... मला सांगा, वृद्धाश्रम चालवणं हे चांगलं काम, की वाईट?’... अचानक माझ्या डोळ्यात नजर खुपसून त्यानं विचारलं.
’ नक्कीच चांगलं’... मी लगेच उत्तरलो.
पण त्यानं नकारार्थी मान हलवली.
’नाही... अजिब्बात नाही.’ तो ठामपणे म्हणाला.
... ’अहो, तुमच्यासारखंच उत्तर मीही त्याला दिलं. माझीही अशीच समजूत होती. हे एक पुण्यकर्म आहे, असं माझं मत होतं. पण त्यान पार बदलून टाकलं ते...’
पुन्हा गर्दीकडे पाहात हरवलेल्या डोळ्यांनी तो काहीतरी टिपून घेत होता.
’तो म्हणाला, आम्ही काही पुण्य करत नाहीये... हे तर कुठल्यातरी पापाचं प्रायश्चित्त आहे...’ पुन्हा माझ्याकडे आरपार पाहात तो बोलला.
त्याचा अस्वस्थपणा सर्रकन माझ्या मेंदूत भिणभिणला... मी गोठल्यासारखा त्याच्या डोळ्यात पाहू लागलो.
तितक्यात बस आली. पण आम्ही दोघंही स्तब्ध, तिथेच उभे होतो. पाठीमागून आवाज यायला लागल्यावर मी त्याचा हात पकडला, आणि रांगेतून बाहेर पडलो. स्टॉपच्याच मागच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथल्या एका रिकाम्या टेबलवर जाऊन बसलो.

’काय झालं... कसलं पाप, काय म्हणाला तो... कोण होता तो...’ मी आडवेतिडवे प्रश्न विचारून टाकले, आणि त्यानं समोरच्या ग्लासातल्या पाण्याचा मोठ्ठा घोट घेतला.
... ’अहो, आज सुट्टी होती, म्हणून मी सहज जरा मुंबईबाहेर कुठेतरी जायचं ठरवलं. कुणीतरी त्या वृद्धाश्रमाबद्दल मागे सांगितलं होतं. मस्त स्पॉट आहे, छान निसर्ग आहे, असं कळलं, म्हणून तिकडे गेलो...’ तो आता शांतपणे सांगत होता. पण नजरेतली अस्वस्थता संपली नव्हती.
मी खुणेनंच चहाची ऑर्डर दिली, आणि पुढं झुकून त्याचं बोलणं ऐकू लागलो.
’सकाळी हा पेपर घेतला, आणि हा फोटो बघितला. म्हणूनच तिकडे जायचं नक्की केल... माणसं कशाला म्हातारी होईपर्यंत जगतात हो?’ पुन्हा त्यानं अस्वस्थ नजरेनं मला विचारलं.
मी काहीच बोलत नव्हतो. त्यालाही तशी काही अपेक्षा नव्हती.
’साठसत्तर म्हातारे आहेत तिथे... असेच, मुलांनी आणून सोडलेले... एका म्हातारीला तर, अक्कलकोटला नेतो असं सांगून मुलानं इथे आणून सोडलंय... बिचारी रोज वाट बघतेय. मुलगा येईल न्यायला म्हणून...’
’मी गेलो, तेव्हा ती हातात कपड्यांची पिशवी घट्ट पकडून उन्हात बाहेरच बसली होती... मला विचारलं, राजन आला का रे... मला काहीच कळलं नाही, म्हणून मी मॅनेजरला विचारलं आणि तिची हकीगत समजली...’ तो संथपणे बोलत होता.
आता मला त्याच्या अस्वस्थपणाचं मूळ सापडत होतं.
’राजन म्हणजे, त्या म्हातारीचा मुलगा... तिकडे विरारला मोठ्ठा बंगला आहे त्याचा. त्याचे वडील वारल्यावर ह्या बाइनं नोकरी करून मुलांना वाढवलं. मुलींना डोक्टर केलं, मुलाचं शिक्षण झाल्यावर बिझिनेस सुरू झाला, तरी ही नोकरी करतच राहिली. रिटायर झाली. पाचसहा हजारांची पेन्शन आहे. अक्कलकोट स्वामींची भक्त. परवा मुलगा म्हणाला, तुला अक्कलकोटला नेऊन आणतो, तर बिचारीनं हौसेनं कपडे भरले. आणि लहान मुलासारखी मुलाच्या गाडीत जाऊन बसली. मग मुलानं थेट इथे आणून सोडलं तिला’...
... सांगतासांगता त्याच्या आवाजातच पाणी दाटलंय असं मला वाटायला लागलं.
मी डोळे मिटले. छाती भरून आल्यासारखं झालं.
एक मोठ्ठा श्वास भरून घेतला, आणि त्याच्याकडे बघितलं.
’... अहो, जाताना त्यानं आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली माळही काढून घेतली हो..’ तो कळवळला.
’बिचारी दोन दिवसांपासून वाट पाहातेय मुलाची... आपल्याला त्यानं फसवलं हेही तिला कळत नाहीये. नव्वदीच्या त्या बाईला काय कळणार म्हणा... ’
... समोरचा चहा थंड झाला होता.
’मी तिच्याशी गप्पा मारल्या. मॅनेजर बाजूलाच होता. तेवढ्यात तिथे आणखीही दोनचारजणं आले. सगळ्यांशी बोललो. सगळ्यांच्याच अशाच कथा... म्हणून निघताना मॆनेजरच्या पाठीवर कौतुकानं हात फिरवला. म्हणालो, खुप चांगलं काम करताय तुम्ही... नाहीतर ह्यांचं काय झालं असतं कुणास ठाऊक... तर त्याच्या उत्तरानं मी आणखीनच हैराण झालो...’ तो माझ्याकडे अपेक्शेनं पाहात बोलला.
मी भुवया वर करून खुणेनंच त्याला ’काय’ म्हणून विचारलं.
’तो म्हणाला, कुणास ठाऊक.. आम्ही पुण्य करतोय, की कधी कुठल्या जन्मी केलेल्या अशाच पापाचं प्रायश्चित्त भोगतोय...’
..... माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. नकळत मी दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडलं.
’हेच केलं मीपण.. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर’... माझ्याकडे पाहात पुन्हा कळवळल्या स्वरात तो म्हणाला.
चहा तसाच टाकून आम्ही दोघही उठलो... पुन्हा स्टॊपवर आलो...
हातातली पेपराची घडी त्यानं घट्ट पकड्डली होती.
...’ आजच मी वाचलं, की शतायु लोकांची जगातली संख्या २०५० मधे १४ पट वाढणारे. म्हणजे, आज जगात दोन लाख पासष्ट हजार आहेत. ५० साली, सदतीस लाख होतील... भारतातही साठीच्या वरच्या लोकांची संख्या वाढतेय... आज आठ कोटी आहेत, आणखी १५ वर्षांनी १५ कोटी असणारेत... ’ बोलताबोलता तो थांबला.
... ’मग वृद्धाश्रमाची गरज वाढणार नाही का? 'तिथून निघालो, तेव्हा दोनचार जणं बाहेर थांबले होते... कुणाच्या बापाला आणायचं होतं, कुणी इथे बायकांची सोय आहे का म्हणून चौकशी करत होता...'
- तो म्हणाला, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले!

----------------------------------------------------