Friday, March 21, 2008

मोगरा फुलला...

मोगरा फुलला...

आपल्या गावाच्या मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी आणि त्या नात्याचं कृण फेडण्यासाठी मुंबईत कारकुनी आणि सफाईकाम करणार्‍या चाकरमान्यांनी बघितलेलं गावच्या विकासाचं स्वप्नं साकारतं आणि गावकुसाच्या कितीतरी बाहेर,मुंबैची जीवनरेषा असलेल्या रेल्वेलायनीलगत एका इमारतीबाहेरच्या मलूल मातीत रुजलेला एक वेल बघताबघता फोफावत जातो... तो विस्तारतो आणि त्याला कृतकृत्यतेचा बहरही येतो... त्या बहराचा सुगंध आसमंत भारून टाकतो आणि त्यानं झपाटलेल्यांची एक शोधयात्रा सुरू होते... आसपासच्या अनोळखी कोलाहलात, ओळखीचा, आपलासा वाटणारा सूर कानावर पडला, की पलेपणाच्या, जवळीकीच्या जाणीवा अशाच फुलतात... माणूस जागा होतो... आणि त्या सुरांशी ओळख असलेल्या अनेक दुव्यांची एक साखळी सहज तयार होते...

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सजवळ नायर हॊस्पिटलच्या होस्टेलमध्ये त्या दिवशी अशीच एक साखळी गुंफली गेली होती... त्या साखळीचा प्रत्येक दुवा खरं तर एकमेकांशी फारसा परिचितही नव्हता. पण लाल मातीच्या प्रेमाच्या समान धाग्यानं त्यांना एकमेकांशी जोडलं होतं आणि त्या अपरिचित नात्याला कोकणच्या मातीत फुललेल्या आणि मुंबईच्या कलकलाटात फोफावलेल्या निरपेक्षभावाचा स्पर्श होता... जन्मदात्या मातीशी नातं जोडलेल्या चाकरमान्यांच्या कामातून आणि घामातून उमटलेला निरपेक्ष कर्तव्यभाव पाहून, आपणही त्या मातीशी नातं जोडावं, असा ध्यास घेतलेल्यांचं एक आगळं संमेलन तिथे साजरं होत होतं.... कुणाला कोकणच्या जादूभर्‍या हिरवाईची ओढ होती, तर कुणी त्या मातीच्या सेवेसाठी आसुसलेला होता... कुणाला त्या मातीशी नवं नातं जोडायचं होतं, तर कुणी बराच काळ दुरावलेलं नातं पुन्हा जोडणार होतं... कोकणातल्या अर्धशिक्षित, अविकसित आणि विकासाकडे डोळे लावून बसलेल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी करावं, अशी कुणाची इच्छा होती, तर कुणी त्यासाठी हातभार लावायच्या तयारीनिशीच दाखल झाला होता...

आपल्या अविकसित गावातल्या पुढच्या पिढीच्या डोळ्यातली स्वप्नं मुंबईतल्या नायर हॊस्पिटलात कारकुनी करणार्‍या चाकरमा्न्यांनी एकदा स्पष्टपणे वाचली आणि त्या वेळच्या अस्वस्थ जाणीवेच्या उद्रेकातून त्यातल्याच एकाच्या टेबलाभोवती दुपरच्या जेवणाच्या सुट्टीत लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ स्थापन झालं... ही गोष्ट जवळपास पंधरा वर्षांपूर्वीची... कोकणातल्या गावागावांची विकास मंडळं गिरण्गावात नाक्यानाक्यावर उभी आहेत. त्यात आण्खी एकाची भर पडली, असं त्या वेळी गावाकडच्यांना वाटलं... पण ह्या मंडळाचं रूपच वेगळं होतं... गावाच्या विकासासाठी स्वत:च्या खिशात हात घालणारी मोजकी मंडळी एकत्र आली होती... गावातल्या आणि गावोगावीच्या मुलांची शिक्षणाची भूक भागवण्यासाठी, त्यांच्या कपड्या-वह्यापुस्तकांच्या आणि शाळेच्या खर्चासाठी आपल्या तुटपुंज्या पगारातला काही हिस्सा न चुकता बाजूला काढणार्‍या आणि मुंबैतल्या आपल्या लहानश्या घरात रात्ररात्र जागून, गावाकडच्या अनोळखी पिढीसाठी स्वत:च्या हातांनी युनिफॊर्म शिवणार्‍या, वह्या-पुस्तकांचे गठ्ठे डोक्यावर घेऊन कोकणातल्या गावागावातल्या शाळेत स्वत:च्या हातांनी मुलांना वाटण्याकरिता स्वत:च्या खर्चानं कोकणात जाऊन पायपीट करणार्‍या, गरीब मुलांच्या अंगीचे गुण जाणून त्यांच्या भविष्याची हमी उचलणार्‍या आणि एवढे सारे करतानाही, स्वत:च्या नावाचा कुठेही गाजावाजादेखील होऊ नये, याची काळजी घेणार्‍या या मंडळाच्या कामाचा सुगंध आपोआपच कानाकोपर्‍यात पसरला...

कोकणातल्या संगमेश्वरजवळच्या कुरधुंड्याचे मुल्ला मास्तर, आपल्या पंचक्रोशीतल्या सगळ्याच मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जातवाल्यांचा विरोध झुगारून उर्दू शाळेऐवजी मराठी शाळा सुरू करतात, आणि त्या पंचक्रोशीतली मुलं मुल्ला मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली `श्रीगणेशा' शिकतात... राजापूरजवळच्या खेड्यातून बहिणीच्या पाठीवरून तीन मैलावरच्या शाळेत येऊन दहावीच्या परिक्शेत चमकणारा ईशेद फर्नांडिस मंडळाच्या मदतीनं आपलं शिक्षण पूर्ण करतो, आणि नोकरीच्या पहिल्या पगाराचा चेक मंडळाकडे सुपूर्द करून कर्तव्यभावाचा एक आगळा आदर्श उभा करतो... कळस म्हणजे, या कामासाठी आपल्या तुटपुंज्या पगारातून एक्रकमी तीनशे रुपये महिन्याला बाजूला काढणे अवघड असल्याने, वर्षाचे `हप्ते' बांधून नायर हॊस्पिटलातली काही सफाइ कामगारही या कामातला भार शिरावर घेताना सुखावतात... `स्वार्थासाठी वाट्टेल ते' असे अघोषित ब्रीदवाक्य असलेल्या असंख्य विकास मंडळांच्या बुजबुजाटात, आपल्या दुबळ्या हातांनी पर्वताएवढं काम करणार्‍या या मंडळाची ओळख घरात पटली, आणि असंख्यांनी या कामासाठी खारीचा वाटा उचलायची तयारी सुरु केली... एकमेकांशी संपर्क झाला. मंडळाचे कार्यवाह मधुकर पवार यांच्याशी चर्चा करून परस्परांनी मुंबैत या स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं, आणि नायरच्या त्या सभागृहात हा सोहळा झाला... विकासासाठी भुकेलेल्या मातीनं मारलेली अनामिक हाक अनेक कानांपर्यंत पोहोचलेली होती...

या संमेलनात त्या दिवशी पुण्याच्या डॊ. रानडे होत्या, तळेगाव-दाभाड्याचे साने होते, नाशिकचे डॊ. गोयल होते, पालघरचे
जोशी होते, दिल्लीचे गणपुले वकील होते, आणि सोलापुरचे गवळी होते... चेंबुरचे पोतनीस होते, नाशिकच्या सुधा नाईक,
डॊ. महाशब्दे, अमरावतीचे सांडव, पुण्याच्या अरवंदेकर, रंजना नाइक, आणि असंख्यांनी या कामात भरभरून सहभागाची
तयारी दाखवली होती....

प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहाताही अनेकांना कोकणातल्या गावांच्या व्यथांची जाणीव झाली, आणि त्या पुसण्यासाठी हे हात सरसावले... डॊ. पोतनीसांच्या अमेरिकेतल्या मुलीनं तर कोकणातल्या अनेक अनोळखी गावांतल्या शाळांमधली स्वच्छतागृहांची गैरसोय ओळखून संडास बांधून द्यायची जबाबदारी उचलली... अशा १९ शाळांची यादी या सोहळ्यातच तयार झाली..

अंधेरीच्या कुलकर्णी बाई, रयत शिक्षण संस्थेतून शिक्षिका म्हणून रिटायर झाल्या आहेत. मेळाव्याच्या सुरुवातीलाच,स्वागत करणार्या मुलीनं, `कुंकू लावू का', असं विचारलं, तेव्हा क्षणभर त्या़चं वृद्ध मन भांबावलं... पण नंतर ठाम होकार देवून त्या पुढे झाल्या... या प्रश्नानं मला माझ्या स्त्री शक्तीची जाणीव करून दिली, असं सांगत त्यानी मेळाव्याला एक वेगळाच स्पर्श दिला, आणि, हातपाय हलताहेत तोवर आपण मंडळासाठी काहीतरी करत राहू, अशी ग्वाही देत, मुलांसाठी पुस्तकांच्या देणग्या गोळा करण्याचा संकल्पही त्यांनी सोडला... मंडळाचे कार्यवाह मधुकर पवार यांच्याशी संपर्क साधून देणग्या पाठवणारे अनेकजण त्या दिवशी हजर राहू शकले नव्हते. पण त्यांचा मदतीचा शब्द कामाची उभारी वाढवणारा होता... चेंबूरचे पोतनीस आणि व्हीलचेअरवरून आलेले त्यांचे वृद्ध मित्र धारप यांनी शाळांमध्ये वर्षभर पिण्याच्या स्वच्छ पाण्याची हमी घेतली... मंडळाने निवडलेल्या प्रत्येक शाळेत लिक्विड सोप आणि नळ देण्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. मुले आरोग्यसंपन्न होतील आणि विकासाची शक्ती आणखी वाढेल, एवढाच त्यामागचा निर्मळ हेतू...

मागच्या एका खेपेत, शाळांच्या बालवाड्यांमध्या काचेच्या कपाटात कुलुपाआड ठेवलेली खेळणी पाहून मधुकर पवार अस्वस्थ झाले होते... ही खेळणी जिल्हा परिषद वर्षातून एकदाच देते आणि लहान मुलं खेळताना ती मोडतात. मग पुन्हा मिळत नाहीत. म्हणून कपाटातली खेळणी काचेआडूनच आम्ही मुलांना दाखवतो, या शिक्षकांच्या उत्तरानं ते बेचैन झाले. खेळण्यांशी खेळणं हा तर चिमुकल्यांचा हक्क असतो. इथे तो हक्कच कुलुपबंद झाला होता... आम्ही मुलांसाठी खेळणी देऊ, पण पुढच्या वर्षी त्यातलं एकही खेळणं चांगलं राहता कामा नये... प्रत्येक खेळणं मोडलं, तरच पुढच्या वर्षी नवीन खेळणी मिळतील, अशी आगळी अट घालून मंडळ त्या बालवाड्यांना खेळणी पुरवणार, असं पवारांनी सांगितलं, तेव्हा टाळ्या वाजवणार्‍या प्रत्येक हाताला आपल्या चिमुकल्या हातांनी बालपणी हाताळलेल्या खेळण्यांच्या स्पर्शाची पुनराभूती होत असावी...

मंडळाच्या कामाला आता अनेक हात लाभले आहेत. आठ जोडप्यांनी या कामाला वाहून घ्यायचा संकल्प त्या मेळाव्यातच सोडला होता... मंडळाच्या कामाचा सुगंध आता आण्खी दूरवर पसरला असेल... त्याला मस्तीची मिजास चिकटू नये, याची काळजी घेत माणसं जोडायची, हा मंडळाचा नवा संकल्प आहे...

Saturday, March 15, 2008

दोन बाजू... क्षणाच्या!

....सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पाहात दाटीवाटीनं, एकमेकांशी लगट करत ताटकळलेल्या गाड्यांचे कर्कश हॊर्न वाजायला लागले आणि रस्ता ओलांडायच्या प्रयत्नातली गर्दी जागच्या जागी थबकली...
हुतात्मा चौकातला तो मैदानी रस्ता आता क्षणभरात गाड्यांच्या गर्दीखाली दिसेनासा होणार होता.
सिग्नलचा हिरवा बाण लकाकला आणि पलीकडच्या गाड्यांनी वेग घेतला.
पण नुकत्याच चार पायांवर चालायला लागलेल्या त्या इवल्या जिवाला त्याची जाणीवही नव्हती. धडपडत्या पायांनी तो जीव पलीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होता...
आणि अचानक गाड्यांचा ओघ सुरु झाला..
...एक निसटतं, केविल्वाणं म्यांव करून मांजराचं ते पिल्लू जागच्या जागीच दबून बसलं...
स्वत:च्या पायांवर चालण्याचा पहिलाच प्रसंग अनुभवताना त्याला माहीतही नसलेला मृत्यूचा नाच त्याच्या चोहोबाजूंनी सुरू झाला होता...
....सिग्नलच्या दिव्यातला हिरवा माणूस प्रकट व्हायची वाट पाहात रस्त्याच्या दोहोबाजूंना उभी असलेली गर्दी त्याकडे पाहात थिजली होती...
हुतात्मा चौकातल्या कारंज्याअडे पाठ करून कॆमे-यासमोर उभ्या असलेल्या त्या हसया डोळ्यांच्या विदेशी, गोया तरुणीचं लक्ष अचानक त्या मांजराच्या पिल्लाकडे गेलं आणि एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली... आपली दोन्ही कानशिलं तळव्यांखाली झाकून भयभरल्या नजरेनं ती रस्त्याच्या मधोमध, गाड्यांच्या गर्दीत अडकलेल्या त्या इवल्या पिल्लाकडे पाहात होती...
भोवतीच्या गर्दीत उमटलेलं थिजलेपण तिच्याही नजरेत उतरलं होतं....
... पुढच्या कुठल्याहि क्षणी आपल्याला ते अघटित पाहावं लागेल, अशी भीती आख्ख्या गर्दीत दाटली होती....
सिग्नल बंद व्हायच्या आत रस्ता पार करायच्या गडबडीतल्या गाड्या, पिल्लाजवळ येताच, आकांतानं कसरत करीत त्याला वाचवायचाही प्रयत्न करत होत्या... पिल्लाचा भयभरला आक्रोश त्या कर्णकर्कश आवाजात थिजून गेला होता...
...अचानक गर्दीतली एक झुकल्या वयाची महिला वाहनांच्या रहदारीची पर्वा करता रस्त्यावर घुसली... उजव्या हाताने गाड्यांना थाबायचा इशारा करीत ती पावलापावलानं त्या पिल्लाच्या दिशेनं पुढंपुढं सरकत होती...
आणि वाहनांचा वेगही मंदावला....
रस्त्यावरचा, वाहनांसाठीचा हिरवा सिग्नल सुरु असतानाही, गाड्यांनी ओसंडून वाहणारा तो रस्ता जागच्या जागी थबकला.
पलीकडच्या गर्दीला रस्ता क्रॊस करायचं भान नव्हतं....
रस्त्यावर दबून बसलेलं ते पिल्लू पुन्हा लडबडत्या पायांवर उभं राहिलं आणि मागं जावं, की पुढं, अशा संभ्रमात सापडल्यासारखं इकडंतिकडं पाहू लागलं...
एव्हाना ती महिला त्या पिल्लाजवळ पोहोचली होती...
मायेनं तिनं हात पुढे केला, आणि त्या पिल्लाला उचलून तिनं छातीशी धरलं... ते भेदरलेलं पिल्लूही, तिच्या कुशीत विसावलं होतं...
जगण्यामरण्याच्या अंतराची जरादेखील जाणीव नसलेला एक जीव वाचवल्याचं समाधान त्या महिलेच्या डोळ्यांत उमटलं होतं...
त्या पिल्लाला कुशीत घेऊन ती महिला मागं परतली आणि रस्त्यावरच्या गाड्यांनी पुन्हा वेग घेतला...
एक असाहाय्य, जन्माला येताच या अफाट दुनियेत एकटा पडलेला एक जीव त्या क्षणाला तरी वाचला होता....
ते पिल्लू घेऊन ती महिला हुतात्मा चौकाजवळच्या पोलिस चौकीजवळ आली, आणि त्याच्या पाठीवर हलकेच गोंजारत तिनं ते पिल्लू पोलिस चौकीच्या दरवाज्याशी ठेवलं...
कायद्याचं रक्षण करणायाच्या हाती जणू तिनं त्या नवजात जिवाचं जीवनही सोपवलं होतं, आणि ती निर्धास्त झाली होती....
..... सिग्नलच्या खांबावरचा हिरवा माणूस दिसताच, गर्दीनं रस्ता ओलांडला....
अन थिजलेला तो क्षण संपून, नवा क्षण जिवंत झाला....
... नव्या गर्दीनं पहिल्या गर्दीची जागा घेतली, तेव्हा अगोदरच्या त्या क्षणाच्या खाणाखुणादेखील तिथे उरल्या नव्हत्या....
हस-या डोळ्यांची ती गोरी, विदेशी तरुणी अजून्ही तिच्या साथीदारासोबत तिथे उभीच होती...
गाड्यांच्या गर्दीत जिवंत झालेल्या माणुसकीच्या एका स्पर्शामुळे, जिवाची बाजी लावून जिवंत परतलेलं ते पिल्लू पोलिस चौकीच्या दाराशी निर्धास्त झाल्यांचं तिनं बघितलं, आणि तिच्या कानशिलावरचे भीतीनं थरथरणारे हात बाजूला झाले... डोळ्यातलं थिजलेपणही हळुहळू मावळलं, आणि नजर पुन्हा पहिल्यासारखी हसरी झाली...
एका स्वस्थ समाधानाची छटा चेहयावर उमटवत तिनं साथीदाराकडे पाहिलं... त्यानंही हळुवारपणे तिचा हात हातात घेऊन थोपटला...
घड्याळाच्या वेगाशीही सामना करत पळणाया गर्दीत हरवलेल्या माणुसकीच्या नकळतपणे झालेल्या दर्शनानं ते जोडपं भारावून गेलं होतं....
पाठीमागच्या उसळणाया कारंज्याकडे पहात त्यानं कॆमेरा बंद केला आणि हातात हात घालून ते दोघही रस्ता ओलांडू लागले...
पलीकडच्या फूटपाथवर येताच, फाटक्या, मळक्या कपड्यांतली, अस्ताव्यस्त जटांची आणि फक्तं नजरेतलं बालपण जिवंत असलेली दोनचार मुलं धावत त्यांच्यासमोर आली, आणि हात पसरून आशाळभूतपणे त्यांच्याकडे बघत राहिली...
तिच्या डोळ्यातलं मघाचं समाधान अजूनही टवटवीत होतं...
पर्समध्ये हात घालून तिनं दोनचार नोटा काढून त्या मुलांच्या हातावर ठेवल्या...
हातातले पैसे घट्ट पकडून क्षणात त्यांच्याकडे पाठ फिरवून पळालेल्या त्या मुलांचा पाठमोया आकतीकडे पाहाताना पुन्हा तिच्या डोळ्यातलं हास्य फुललं, आणि त्याच नजरेनं तिनं पुन्हा जोडीदाराकडे बघितलं...
भारतात आल्यावर कायकाय पाहायला, अनुभवायला मिळेल, याचा कधीकाळी केलेला गृहपाठ जणू त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता....
नेहेमीप्रमाणंच उजाडलेल्या आणि मावळलेल्या रोजच्यासारख्या त्या दिवशीचा तो क्षण अनुभवणाया गर्दीतल्या प्रत्येक साक्षीदाराच्या मनात तो कायम्चा अधोरेखित होऊन राहिलेला असेल...

------------- ------------------------ ------------------------
--

नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष त्या सण्ध्याकाळपासूनच तरुणाईच्या उत्साहातून सांडत होता...
गेट-वेच्या समुद्रात सूर्य मावळला, आणि सरत्या वर्षासोबत संपणारी रात्र हळुहळू वर सरकू लागली...
गर्दीचे थवे रस्त्यावर उतरले... रस्ते फुलून गेले...
रात्रीच्या धुंदीची नशा गर्दीच्या डोळ्यात उतरू लागली...
नव्या वर्षाचं स्वागत आपापल्या परीनं करण्यासाठी प्रत्येकजण आतुरलेला होता...
लग्नानंतर लगेचच भारतात फिरायला आलेलं ते विदेशी जोडपंही, भारताच्या भूमीवरून नव्या वर्षाचं स्वागत करायाच्या कल्पनेनं थ्रिल होऊन बाहेरच्या गर्दीत मनापासून मिसळून गेलं होतं...
इथल्या मातीशी जुनं नातं असल्यानं, नवखेपणाची पुसटशी जाणीवही त्यांच्या हालचालीत नव्हती.
नव्या वर्षाच्या आगमनाची वर्दी देणारा तो क्षण अवतरला, आणि गर्दीचं भारावलेपण तिच्याही हालचालीत सहजपणे उतरलं...
त्या अपेक्षित जल्लोषात तीही अभावितपणे सामील झाली....
त्याच क्षणाला, भोवतीच्या गर्दीत क्ठेतरी, रात्रीची नशा अनावर होत होती...
दिवसाच्या उजेडात कुठे माणुसकीची झरे कुण्या असहाय जिवाला जगण्याची उमेद देत होते, आणि त्याच मातीत, रात्रीच्या अंधारात त्याच क्षणाची दुसरी बाजू काळीकुट्ट होऊन भेसूरपणे खदखदत होती....
माणुसकीचं अनोखं दर्शन घडवणारी,
एका नवजात जिवाला संकटातून वाचवण्यासाठी स्वत:चा जीव संकटात ढकलणारी,
माणसाच्या वंशाशी नातंही नसलेल्या कुणाच्या जिवावरचं संकट टळावं, म्हणून मनशक्ती पणाला लावणारी,
संवेदनशील गर्दीही, रात्रीच्या त्या काळ्या अंधारात मूढासारखी थिजून गेली...
एका मांजराच्या पिल्लाला संकटातून सोडवण्यासाठी एका हृदयातला माणुसकीचा झरा जिवंत झाला, तेव्हा त्या क्षणाच्या असंख्य साक्षीदारंनी किमान सुटकेचा नि:श्वास तरी टाकला...
आणि, संवेदनांच्या जागेपणाची साक्ष दिली होती...
त्या रात्री मात्र, गर्दीच्या संवेदना थिजून गेल्या....
आणि माणुसकी पुसून पशू पेटून उठला...

-------------- -------------------- ---------------------
हुतात्मा स्मारकाजवळ्च्या माणुसकीच्या दर्शनानं भारावलेलं ते जोडपं आजही आपल्या मायदेशात भारताचे गोडवे गात असेल...
आणि नववर्षाच्या स्वगताच्या काळ्या आठवणींचे चटकी सोसत कुणी एकजण अजूनही जळत असेल...
.... ....
क्षणाच्या या दोन बाजूंचा माझ्याभोवतीचा विळखा मात्र, दररोज घट्टघट्ट होत चाललाय...
आकाशाकडे पाहात ओरडावंसं वाटतंय, ’आम्हाला माफच करा’....
---------- ----------------------