Monday, December 6, 2010

प्रश्न आणि उत्तर...

मला एक वाईट खोड आहे.
बसमध्ये बसलेली अनेक माणसं विंडो सीट मिळाली, की कानाला ईयरफोन लावतात, आणि मस्तपैकी डुलकी काढतात.
मी मात्र, खिडकी मिळाली की रस्त्यावरचा कोपरान कोपरा उगीचच न्याहाळत बसतो... आणि, कधीच नवीन काहीच पाहायला मिळत नाही.
मुंबईच्या नेहेमीच्या रस्त्यावर रोज नवीन काय दिसणार म्हणा...
तेच, फेरीवाल्यांनी पॅक केलेले फूटपाथ, एखाद्या मोकळ्या जागेत सुस्त पडलेलं एखादं गलेलठ्ठ कुत्रं, भरभरून वाहाणारी कचरा कुंडी, उघडीवाघडी पोरं, बाजूनं चालणार्‍या प्रत्येकाचं पुढे पडणारं प्रत्येक पाऊल न्याहाळणारा मोची, कळकट, लक्तरलेल्या कपड्यातला, अस्ताव्यस्त वाढलेल्या केसांचा, भयाण, शून्य नजरेनं आसपासच्या गर्दीसमोर आशाळभूतपणे हात पसरणारा एखादा भिकारी...
कुठेतरी, रस्त्याकडेच्या फूटपाथवर दोन झाडांना बांधून केलेला जुनाट साडीचा पाळणा, आणि त्याच्या पातळ, पारदर्शकपणातून दिसणारं, आपल्याशीच खेळणारं, हातपाय चोखत जगाच्या अस्तित्वाचीही जाण नसणारं एखादं तान्हं... त्याच्या बाजूला राखणदारासारखं पहारा देणारं भटकं कुत्र...
एखाद्या आडोशाला अंगाभोवती फाटकीतुटकी कापडं गुंडाळून सिगारेटच्या चांदीवरची पावडर हुंगणारं गर्दुल्यांचं टोळकं, नाहीतर, भर उन्हात, तर्र होऊन वाकडातिकडा पडलेला कुणीतरी दारुडा... त्याच्या शेजारी, संधीची वाट पाहात त्याच्या ’खिशा’वर नजर खिळवून बसलेला कुणीतरी गर्दुल्या, एखाद्या कोपर्‍यात, पान खाऊन रंगवलेल्या ओठांची, खाकी पावडरचा मेकप केलेली, काजळानं डोळे माखलेली आणि ’नकली सोन्या’नं अंगभर मढलेली, भडक साडीतली, तरुणपण हरवलेली, भिरभिरत्या नजरेनं ’गिर्‍हाईक’ शोधणारी कुणीतरी...
आणखीही कितीतरी... तेच तेच!!
... तरीही मी बसमधून प्रवास करताना हे सगळं न कंटाळता पाहात बसतो.
... कहीतरी, काहीतरी वेगळं, नवं दिसेल या आशेनं!
अजून तरी यापेक्षा वेगळं काही दिसलं नाही.
पण परवा मला यातलंच एक वेगळेपण चमकल्यासारखं दिसून गेलं...
... ही माणसं अशी कुत्र्यामांजरासारखी, दुसर्‍या जगातलं असल्यासारखी, का राहातात?
आपल्या, लिहित्यावाचत्यांच्या, नोकरीधंदेवालांच्या, घरदारवाल्यांच्या दुनियेशी त्यांचा काहीच संबंध का नसतो?
सध्या देशभर जनगणना- शिरगणती- सुरू आहे...
ही माणसं कोणाच्या खिजगणतीत तरी असतील?...
किती असतील अशी माणसं?...
कुणालाच माहीत नसेल. अगदी, रस्त्यावरच्यांसाठी ’समाजकार्य’ करणार्‍या एखाद्या ’एनजीओ’कडेही, याचं रेकॊर्ड नसेल...
पण, ती माणसं तसं हौसेनं नक्कीच राहात नसावीत.
अस्वच्छपणा, गलिच्छपणा, कुणाला स्वभावत: आवडत नाही. अगदी, कचराकुंडीजवळ जगणार्‍या त्या अस्तित्वहीनांनापण...
मी हे खात्रीनं सांगतोय...
... आता मी मुद्द्यावर येतो.
... त्या दिवशी बसमधून येताना, माझी ही खात्री झाली.
... अत्यंत फटके, कुठूनही उघडे पडलेले, रंगावर काळीकुट्ट पुटं चढून मूळचा रंग हरवलेले कपडे घातलेला, भुकेनं किंवा नशेनं, उभं राहण्याचं त्राण हरवलेला, हातापायांच्या केवळ काड्या झालेला... असाच भयाण, शून्य डोळ्यांचा एक मानवी जीव- त्याला माणूस म्हणणं मला शक्य होत नाहीये.- सिग्नलजवळ रस्त्याकडेला अशक्तपणे उभा होता...
बस थांबली, तसा त्यानं केविलवाणा चेहेरा करून हात पसरत दोनचार खिडक्यांशी भीक मागायचा प्रयत्न केला. पण नंतर तो बहुधा थकला असावा. निमूटपणे रस्त्याकडेला गेला...
माझं सवयीनुसार लक्ष होतंच.
त्यानं खांद्यावरचं एक मळकट फडकं हातात घेतलं... त्याचा बोळा केला, आणि तो खाली बसला.
त्या बोळ्यानं त्यानं जमिनीचा लहानसा तुकडा साफ केला...
धुळीचा एक कणही त्यानं तिथे राहू दिला नाही. मग थोडा मागं झुकला... मान वाकडी करून त्यानं ती स्वच्छ झालेली जागा न्याहाळली, आणि समाधानानं मान हलवत तो त्या स्वच्छ जमिनीवर टेकला...
... हेही दृष्य मी पहिल्यांदाच पाहिलं असेल असं नाही...
पण त्या वेळी मात्र, मी चमकलो.
कशाला हवी त्याला स्वच्छता?... तो स्वत: तर इतका गलिच्छ, मळलेला, मूळचा चेहेरादेखील धुळीनं हरवलेला होता.
तरीही बसायच्या जागेवर त्यानं लख्ख सफाई केली होती...
म्हणजे, त्याला स्वच्छता आवडत होती.
अस्वच्छतेचा त्यालाही तिटकारा होता...
पण, परिस्थितीनं त्याला तसं राहाणं भाग पाडलं असावं, हे स्वच्छ होतं...
मला त्याच्या त्या कृतीचं तेव्हा हसू आलं होतं... इतका मळकटलेला तो, बसण्यासाठी जागा साफ करतोय, ह्या विरोधाभासाचं हसू...
मी विचार करू लागलो... ह्या विरोधाभासाचाच.
उत्तर मिळालं... पण ते कश्या शब्दांत सांगायचं ते कळत नाहीये.
---------------------------

Sunday, December 5, 2010

लोककलेचा गारुडी...

... ‘जांभूळ आख्यानमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले, आपल्या अस्सल मराठमोळ्या शाहिरी बाजाच्या कलाकारीतून लोकसंगीताचा सुगंध देशभर पसरविणारे आणि ‘लोकसंगीताचे चालतेबोलते विद्यापीठ' म्हणून उभ्या महाराष्ट्राच्या आदराचे स्थान असलेले लोकशाहीर विठ्ठल गंगाराम उमप गेले...
क्लावंतांचं आयुष्यच खडतर असतं... वर्षानुवर्षे घरासाठी वणवण करणाèया या लोककलेच्या उपासकाला महाराष्ट्रात वयाच्या ८० व्या वर्षानंतर घर मिळाले, पण त्या घराचं सुख फार काळ त्यांना उपभोगता आलं नाही. १९३१ मध्ये मुंबईच्या एका चाळीत जन्मलेल्या, वयाच्या आठव्या वर्षीपासून कलागुण सादर करणाèया विठ्ठल उमप यांना कलेच्या उपासनेत कधी प्रोत्साहन मिळालं नाही.

‘नाचण्यापेक्षा शाळा शिक' हा वडिलांचा आग्रह मोडून त्यांना आपल्यातील कलाकार जोपासला आणि अथक परिश्रमाने जिवंतही ठेवला. म्हणूनच त्यांच्या ‘जांभूळ आख्यान'नं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं. लडिवाळ, मोहक हावभाव, नाजूक नेत्रकटाक्ष आणि देहभान हरपून द्रौपदीच्या मनाचं हळुवार स्पंदन रसिकांसमोर मांडणारे ‘जांभूळ आख्यान’ असो, ‘माझी मैना गावाकडं राहिलीङ्क म्हणणारा ठसकेबाज ‘छक्कड’ असो, ’तुमडी’ असो, ’नाखवा’ असो, नाही तर एका हाती तलवार आणि दुस-या हाती ढाल घेऊन बहिर्जी नाईक याचा मावळ्यांना दिलेला सांकेतिक संदेश असो... शाहीर उमप यांनी प्रत्येक क्षण जिवंतपणे रसिकांसमोर उभा केला...
राज्याच्या ग्रामीण भागातील लोककला आपल्या एकपात्री अभिनयाने जिवंत करणा-या लोकशाहीर उमप यांनी या जांभूळ आख्यानाचे ५०० हून अधिक प्रयोग केले, भारुड लोकप्रिय केले, आणि आपल्या ‘बोली’ आणि ‘देहबोली’तून लोककलेचा अस्सल बाज रसिकांना सादर केला. त्यांच्या मोजक्याच गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. पण प्रत्येक ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘फू बाई फू, ये दादा आवार ये, बाजीराव नाना हो बाजीराव नाना, फाटकी नोट मना घेवाची नाय, ही गाणी ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रत्येक सभा, समारंभास शोभा आणणारी ठरली...
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्यासाठी राज्यभर दौ-यामागून दौरे करणा-या शाहीर उमप यांनी एक हजारांहून जास्त गाणी गायली आणि अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या. खंडोबाचं लगीन, गाढवाचं लगीन या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. ‘टिंग्या’ या चित्रपटातील उल्लेखनीय भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला होता. आयर्लंडमधील कॉर्क येथील आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवातील पहिला पुरस्कार, श्याम बेनेगल यांची भारत एक खोज, जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. १९८९ मध्ये राजीव गांधी यांच्या ‘अपना उत्सव’मध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले. देश विदेशात त्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि नियोजन आयोगाच्या सांस्कृतिक व्यवहार विभागाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. लोककला जिवंत रहावी यासाठी तरुणांनी या परंपरेचा अभ्यास करावा असे आवाहन ते सातत्याने करीत राहिले. बदलत्या जगात जनतेच्या आवडी बदलत आहेत, आणि लोककलेची उपेक्षा होत आहे, ही त्यांची खंत होती. ही कला जिवंत राहावी, ही तळमळ लोकशाहीर उमप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली, आणि कलेची उपासना करतच शेवटचा श्वास घेतला.

Saturday, November 20, 2010

आपणच नालायक आहोत!!

’होऊन जाईल तुमचं काम... साडेआठ हजारात. पण कॅश द्या. चेक नको. परवाची वेळ घेऊन टाकतो. तासाभरात काम होऊन तुम्ही मोकळे’...
त्या ’एजंटा’नं समोर बसलेल्या जोडप्याला सांगितलं, आणि त्यातल्या नवर्‍याचा चेहेरा खुलला.
’म्हणजे रजा घ्यायला नको’... तो आनंदानं पुटपुटला.
दोघंही उठले, आणि बाहेर पडले. एजंटानं ड्रावर उघडून फ़ाईल बाहेर काढली आणि कॅलक्युलेटर काढून भरभरा काहीतरी आकडेमोड केली. दोन मिनिटांनी फाईल पुन्हा ठेवताना त्याच्या डोळ्यात समाधान साचले होते...
दोन दिवसांनंतर ठरल्याप्रमाणे ते जोडपं सकाळीच त्या ऒफिसात येऊन हजर झालं. बाहेरच्या खुर्च्या-बाकड्यांवर दाटीवाटीनं आधीच येउन बसलेली माणसं बघून त्यांनी एकमेकांकडे बघितलं. आपलं काम खरंच तासाभरात आटोपेल का अशी शंका दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यात स्पष्ट दिसली. पण ती झटक्यात पुसून टाकून दोघं जागा शोधू लागली. आणि दोन कोपरे रिकामे दिसले. दोघं बसली. एकमेकांपासून लांब... काहीच बोलताही येत नव्हतं.
असाच बराच वेळ गेला. अजून तो एजंट आलाच नव्हता... लांबूनच अस्वस्थ नजरेनं बायकोकडे पाहात नवरा मनगटावरच्या घड्याळात नजर टाकत होता. एकदोनदा त्यानं एजंटाचा मोबाइल नंबर फिरवला. आऊट ऑफ कव्हरेज एरिया... टेप संपायच्या आधीच त्यानं नंबर डिसकनेक्ट केला...
तासभर उलटून गेला. आता गर्दी आणखी वाढली होती... प्रत्येकासोबत एकेक एजंट दिसत होता. त्या एजंटांची आतबाहेर धावपळ सुरू झाली होती. काळ्या कागदांनी झाकलेल्या काचेच्या बंद दरवाजाआडच्या केबिनमध्ये तिथला ’साहेब’ बसला होता... पांढर्‍याशुभ्र कपड्यातला, पांढर्‍या बुटातला, गॉगल लावलेला, सोन्यानं मढलेला कुणीतरी धाडकन आत गेला आणि बाहेरची धावपळ थंडावली...
पाचेक मिनिटांत कुठल्यातरी हॉटेलचा पोर्‍या वर्तमानपत्राच्या कागदानं झाकलेला ट्रे घेऊन आत गेला.
’आत साहेब नाश्ता करतायत... वेळ लागणार’.... कुणीतरी एजंट त्याच्या शेजारी बसलेल्या अशाच एका ’ताटकळलेल्या’च्या कानाशी बोलला, आणि याचा चेहेरा पडला.
अजून याचा एजंट आलाच नव्हता... आता ऒफिसात फोन करून रजा टाकावी असं त्यानं ठरवलं.
सगळ्यांचं लक्ष त्या काळ्या कागदानं झाकलेल्या काचेच्या दरवाज्याकडे लागलं होतं... सगळं कसं शांतशांत, ठप्प होतं...
गर्दीही वाढतच होती... आता घामाच्या धारा पुसत तो बसल्या जागी चुळबुळत होता. मधुनच बाहेरच्या दरवाज्याकडे बघत होता. बायको लांब, समोरच्या कोपर्‍यातल्या एका बाकड्याच्या कोपर्‍यावर अंग चोरुन कशीबशी बसली होती. तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं...
अचानक तो एजंट त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. यानं काही न बोलता हातावरल्या घड्याळात बघितलं...
'सॊरी... ट्रॆफिकमधे अडकलो...’
यानं वर न बघताच मान हलवली. मुंबईत उशिरानं येणारा प्रत्येकजण हेच कारण सांगतो, हे त्याला माहित होतं.
मग एजंटानंही काळ्या कागदानं झाकलेल्या त्या काचेच्या दरवाजाकडे बघितलं... तेव्हढ्यात हॉटेलवाला पोर्‍या चहाची किटली घेऊन तिथून आत घुसला.
'आता साहेब नाश्ता करतायत... म्हणजे टाईम लागणार’... एजंट याच्या कानाशी पुटपुटला. त्याला हे मघाशीच माहीत झालं होतं. हा काहीच बोलला नाही.
... अर्ध्यापाऊण तासानंतर काळ्या कागदानं झाकलेल्या काचेचा दरवाजा उघडला, आणि तो पांढर्‍या कपड्यांतला, पांढरे बूट घातलेला, गॉगलवाला खिदळत बाहेर आला...
'संध्याकाळपर्यंत लाखभर तरी जमायला हवेत’...
- अर्धवट उघडलेल्या त्या दरवाजातून आलेले शब्द याच्या कानांनी टिपले, आणि तो चरफडला...
'सालं आपणच गांडू, नालायक आहोत...’ तो स्वत:शीच म्हणाला, आणि घाबरून त्यानं आजूबाजूला बघितलं... कुणी आपलं बोलणं ऐकलं नाही, हे लक्षात आल्यावर तो सावरला...
एजंटानं आपल्याकडून साडेआठ घेतलेत. त्यातले स्टॆम्पड्युटीचे शे-सवाशे गेले, एजंटाचं हजार दोन हजार कमिशन गेलं... बाकीचे पैसे?... कुठे जाणार?... पहिल्यांदाच त्याला हा प्रश्न पडला...
तो आणखीनच अस्वस्थ झाला.
'च्यायला, एवढे पैसे देऊनही आपल्याल्या ताटकळतच ठेवलंय... बाकीचे सगळेही पैसे मोजूनच ताटकळतायत. तरी सगळ्यांचे चेहरे लाचार... कसला स्वाभिमान.. कसली लोकशाही'... तो चरफडत होता..
ताडकन उठून तो येरझारा घालू लागला... मधेच एकदा काळ्या कागदानं झाकलेल्या काचेच्या दरवाजाजवळही गेला. एका लहानश्या फटीतून आत डोकावण्याचाही त्यानं प्रयत्न केला...
पण तेवढ्यात तिथल्या स्टुलावर बसलेल्या शिपायानं शुकशुक केलं, आणि ओशाळल्यासारखा हा मागे फिरला...
त्याचा एजंट कुठल्यातरी टेबलाशी जाऊन तिथल्या ’साहेबा’शी काहीतरी बोलत होता.
बायको बसली होती तिथल्या कोपर्‍यात जाऊन हा उभा राहिला.
एजंट त्याच्याजवळ गेला.
'बस, आता तासाभरात होऊनच जाईल आपलं काम... आता आपलाच नंबर.’ एजंट म्हणाला, आणि यानं उगीचच हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीतली कागदपत्रं चाचपली...
इतका वेळ खोळंबूनही साडेआठ हजार?’... पुन्हा हा प्रश्न याच्या डोक्यात सण्णकन शिरला, आणि त्यानं एजंटाला खुणेनंच बाहेर यायला सांगितलं.
दोघंही बाहेर आले.
'काय हो... एवढ्याशा कामासाठी तुम्ही साडेआठ हजार घेतलेत?’ त्यानं ताडकन विचारलं..
काय करणार, आतल्या साहेबाला, बाहेरच्या क्लार्कला, आणि त्या प्यूनला द्यायला लागतात...’ एजंटानं सहजपणे उत्तर दिलं...
'नाही द्यायचे त्यांना पैसे... त्यांचं कामच आहे ते...’ तो त्वेषानं म्हणाला.
'ठीक आहे... मग चला, निघुया’... एजंट शांतपणे म्हणाला.
'कुठे? आणि काम?’ ह्यानं विचारलं.
'आहो, पैसे द्यायचे नाहीत ना? मग काम कसं होणार? आज नाही आणि कधीच नाही'... एजंटानं ठामपणे सांगितलं...
'बघा... तुम्ही पैसे देणार नसाल, तर हे लोकं तुम्हाला उद्या यायला सांगतील... उद्या पुन्हा तुमचा वेळ जाणार. मग कागापत्रं तपासतील... काहीतरी कमी असेल. ते घेऊन पुन्हा दुस-या दिवशी बोलावतील... मग एखादी सही नसेल.. पुन्हा तुम्हाला परत पाठवतील... तिस-या दिवशी आणखी काहीतरी कमी काढतील.. पुन्हा खेपा... तुमच्याकडे किती रजा शिल्लक आहे?’ एजंटानं थेट याला विचारलं, आणि हा घाबरला...
अगतिकासारखा एजंटाकडे बघु लागला...
'त्यापेक्षा पैसे द्या... आजचा दिवसात काम होऊन जाईल... रजा वाया घालवून काम होईलच याची खात्री नाहीच... चला आत...’ हुकुम सोडल्यासारखा एजंट त्याला म्हणाला, आणि आत वळला.
ह्याची पावलंही त्याच्यापाठोपाठ आत वळली...
एखादा कोपरा बसण्यासाठी शोधू लागली.
आणि कोपरा मिळाला...
शेजारचा माणूस सरावल्यासारख्या शांतपणे पेपर वाचत होता...
यानं खुणेनंच त्याच्या मांडीवरचा दुसरा पेपर मागितला, आणि घडी उलगडली..
’स्वच्छ प्रशासनाची नव्या नेत्यांची ग्वाही...’
मोठ्या अक्षरांतला तो मथळा आपल्याकडे बघून खदाखदा हसतोय असा भास त्याला झाला.
त्यानं पेपर मिटला, आणि त्याची नजर वळली...
... काळ्या कागदांनी झाकलेल्या काचेच्या दरवाज्याकडे!!!
--------------------------------------------

Saturday, October 16, 2010

पांढरीशुभ्र माणुसकी !

पांढरीशुभ्र माणुसकी
भर दुपारची, रणरणत्या उन्हाची वेळ! हायवेवर गाड्यांची तुरळक ये-जा सुरू होती. एक आलिशान मोटार भरधाव वेगात रस्त्यावरून पुढे आली आणि क्षणभरासाठी तिची गती मंदावली. रस्त्याकडेला थांबली. मागचा दरवाजा किलकिला उघडला. काहीतरी पांढरंशुभ्र बाजूच्या खड्ड्यात भिरकावलं गेलं. गाडीनं पुन्हा वेग घेतला आणि पुढच्या क्षणाला ती दिसेनाशीही झाली.
... रस्त्याकडेच्या त्या खड्ड्यातून वेदनांनी कळवळणारे आवाज येत होते.
खूप मागून, एक जुनाट मोटार जिवाच्या करारावर रस्ता कापत चालत होती. खड्ड्याजवळ येताच, ती मोटार थांबली. मागच्या सीटवरून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली. कळवळण्याचा आवाज आता मंद झाला होता. ती रस्त्याकडेला आली आणि तिनं वाकून खड्ड्यात बघितलं. तिच्या अंगावर सरसरून काटा आला होता. कानावर हात गच्च दाबत तिनं डोळे मिटले पण पुढच्या मिनिटभरात ती सावरली होती. खाली वाकून, जमिनीचा आधार घेत ती हळूहळू खड्ड्यात उतरली आणि ते, अगोदरच्या गाडीतून फेकलं गेलेलं, पांढरंशुभ्र, तिनं अलगद हातांनी कुरवाळलं. थोडीशी हालचाल जाणवली. मग मात्र तिनं वेळ घालवला नाही. जोर लावून ते तिनं उचललं आणि छातीशी धरून सावरत ती वरती आली. गाडीतून पाण्याची बाटली काढून तिनं एक धार त्याच्यावर सोडली आणि ती चरकली. दोन, गोंडस, शुभ्र केसाळ पामेरनियन कुत्री, एकमेकांना बांधून त्या निर्दयानं खड्ड्यात फेकली होती... जिवंत!
पाण्याची धार तोंडावर पडली पण एकानं डोळे मिटले... दुसरीच्या जिवाला थोडी धुगधुगी होती. केविलवण्या नजरेनं त्या जिवानं हिच्या डोळ्यात पाहिलं आणि एव्हाना निर्जीव झालेला एक जीव तिथेच सोडून, दुसरा धुगधुगता जीव सोबत घेऊन ती माघारी फिरली... सरळ घरी आली. मग औषधोपचार सुरू झाले. काही दिवसांनंतर तो जीव तगला. घरात आश्वस्तपणे वावरू लागला. पहिल्या दहाअकरांच्यात आणखी एकाची भर पडली होती. त्यापैकी कुणी लंगडं होतं, कुणी आंधळं होतं, कुणाला पायच नव्हता, तर कुणी आजारी होतं... पण सगळेजण तिच्यावर विश्वासून एकमेकांच्या सोबतीनं राहात होते.. प्रेमानं!
ह्या नव्या जिवालाही त्यांनी आपल्यात सामावून घेतलं.
~~~~~
मागे कधीतरी आमच्या पिंट्याला दत्तक द्यावं असा विचार मनात आला आणि मी फोनाफोनी सुरू केली. मुंबईतल्याच एका नावाजलेल्या प्राणिमित्र संस्थेत कुणाशीतरी बोललो. त्यांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. नाईलाजानं त्यांनी माझा नंबर लिहून घेतला. पुढच्या मिनिटात मला भराभर फोन सुरू झाले होते. त्यातला एक फोन, ह्या बाईंचा होता. शेजारच्याच उपनगरात राहाणारं एक गुजराती कुटुंब! आई, एक मुलगी, आणि दहाबारा कुत्री.. चारपाच मांजरं, चारदोन पक्षी... असा संसार. आमच्या पिंट्याला दत्तक घ्यायला ती तयार होती!
अर्थात तोवर मी निवळलो होतो. फोनवर बोलताबोलता तिनं आपल्या कुटुंबात दाखल झालेल्या एकेका सदस्याची कहाणी सांगायला सुरुवात केली...
आपण तिच्यासारखं ‘माणूस’ होऊ शकत नाही... पण निदान राक्षस तरी असता नये. मी तिची माफी मागितली आणि पिंट्याकडे पाहिलं. तो अतिशय विश्वासानं आणि प्रेमानं माझ्याकडे पाहात होता.
तेव्हापासूनच त्या कुटुंबाशी एक नवं, अव्यक्त नातं जडलं. कधीकधी त्या ‘माऊली’चा फोन येतो. असाच एक फोन झाला, तेव्हा तिनं तिच्या घरच्या त्या नव्या, पांढऱ्याशुभ्र पाहुण्याच्या आगमनाची ही कहाणी कळवळत सांगितली.
~~~~
अवतीभवतीच्या जगात रोज वावरताना, आसपासच्या गर्दीतलं हरवलेलं माणूसपण पावलापावलाला जाणवत जातं आणि इथे कुणालाच कुणाचं काहीच कसं वाटत नाही, असं वाटत राहतं.... पण, हीच गर्दी, जेव्हा ‘एकेरी’ होते, त्यातला प्रत्येकजण जेव्हा एकटा होतो, तेव्हा माणुसकीचे झरे अखंड जीवनाचा स्त्रोत ठरत आपापले वाहताना दिसतात. प्रत्येकजण हा काही ना काही आपापल्या परीनं इतरांसाठी करताना दिसतो. या गुजराती कुटुंबाने असाच एक अनुभव माझ्या झोळीत टाकला होता.. आणि मला माणुसकीचा धडादेखील दिला होता!

Saturday, October 2, 2010

पुण्य की प्रायश्चित्त?...

'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'...
... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला...
आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो.
पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला.
’वृद्धाश्रम’... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं. आणि माझा चेहेरा प्रश्नचिन्हांकित झाला.
हातातल्या वर्तमानपत्राची घडी उलगडून त्यातल्या एका पानावरच्या फोटोवर बोट ठेवत त्यानं तो पेपर जोरजोरात हलवला. मग मीच ते पान पकडलं, आणि नीट तो फोटो न्याहाळला.
... जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्त शंभरीच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचा फोटो होता.
’बघितलंत?...’ पुन्हा त्या फोटोवर बोट ठेऊन ते पान जोरजोरात हलवत त्यानं विचारलं.
मी फक्त होकार दिला. पण त्याचा तो प्रश्न आणि त्यानंच देऊन टाकलेलं ते उत्तर यांचा या फोटोशी काय संबंध ते मला कळलं नव्हतं.
... माझ्या तोंडावर उमटलेलं ते प्रश्नचिन्ह तसंच होतं.
’तुम्हाला सांगतो, आत्ताच मी एका वृद्धाश्रमात जाऊन आलो... माझं कुणीच नाहीये तिथे. पण’...
बोलतबोलता तो थांबला. रस्त्यावरून वाहाणार्‍या गर्दीकडे पाहात क्षणभर कुठेतरी हरवल्यासारखा गप्प झाला...
’अहो, खूप गर्दी झालीय तिथे. अ‍ॅडमिशनसाठी वेटिंगलिस्ट आहे...’ तो अस्वस्थ होता. मला ते जाणवू लागलं होतं.
मी काही न बोलता त्याचं बोलणं ऐकत होतो.
’... मला सांगा, वृद्धाश्रम चालवणं हे चांगलं काम, की वाईट?’... अचानक माझ्या डोळ्यात नजर खुपसून त्यानं विचारलं.
’ नक्कीच चांगलं’... मी लगेच उत्तरलो.
पण त्यानं नकारार्थी मान हलवली.
’नाही... अजिब्बात नाही.’ तो ठामपणे म्हणाला.
... ’अहो, तुमच्यासारखंच उत्तर मीही त्याला दिलं. माझीही अशीच समजूत होती. हे एक पुण्यकर्म आहे, असं माझं मत होतं. पण त्यान पार बदलून टाकलं ते...’
पुन्हा गर्दीकडे पाहात हरवलेल्या डोळ्यांनी तो काहीतरी टिपून घेत होता.
’तो म्हणाला, आम्ही काही पुण्य करत नाहीये... हे तर कुठल्यातरी पापाचं प्रायश्चित्त आहे...’ पुन्हा माझ्याकडे आरपार पाहात तो बोलला.
त्याचा अस्वस्थपणा सर्रकन माझ्या मेंदूत भिणभिणला... मी गोठल्यासारखा त्याच्या डोळ्यात पाहू लागलो.
तितक्यात बस आली. पण आम्ही दोघंही स्तब्ध, तिथेच उभे होतो. पाठीमागून आवाज यायला लागल्यावर मी त्याचा हात पकडला, आणि रांगेतून बाहेर पडलो. स्टॉपच्याच मागच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथल्या एका रिकाम्या टेबलवर जाऊन बसलो.

’काय झालं... कसलं पाप, काय म्हणाला तो... कोण होता तो...’ मी आडवेतिडवे प्रश्न विचारून टाकले, आणि त्यानं समोरच्या ग्लासातल्या पाण्याचा मोठ्ठा घोट घेतला.
... ’अहो, आज सुट्टी होती, म्हणून मी सहज जरा मुंबईबाहेर कुठेतरी जायचं ठरवलं. कुणीतरी त्या वृद्धाश्रमाबद्दल मागे सांगितलं होतं. मस्त स्पॉट आहे, छान निसर्ग आहे, असं कळलं, म्हणून तिकडे गेलो...’ तो आता शांतपणे सांगत होता. पण नजरेतली अस्वस्थता संपली नव्हती.
मी खुणेनंच चहाची ऑर्डर दिली, आणि पुढं झुकून त्याचं बोलणं ऐकू लागलो.
’सकाळी हा पेपर घेतला, आणि हा फोटो बघितला. म्हणूनच तिकडे जायचं नक्की केल... माणसं कशाला म्हातारी होईपर्यंत जगतात हो?’ पुन्हा त्यानं अस्वस्थ नजरेनं मला विचारलं.
मी काहीच बोलत नव्हतो. त्यालाही तशी काही अपेक्षा नव्हती.
’साठसत्तर म्हातारे आहेत तिथे... असेच, मुलांनी आणून सोडलेले... एका म्हातारीला तर, अक्कलकोटला नेतो असं सांगून मुलानं इथे आणून सोडलंय... बिचारी रोज वाट बघतेय. मुलगा येईल न्यायला म्हणून...’
’मी गेलो, तेव्हा ती हातात कपड्यांची पिशवी घट्ट पकडून उन्हात बाहेरच बसली होती... मला विचारलं, राजन आला का रे... मला काहीच कळलं नाही, म्हणून मी मॅनेजरला विचारलं आणि तिची हकीगत समजली...’ तो संथपणे बोलत होता.
आता मला त्याच्या अस्वस्थपणाचं मूळ सापडत होतं.
’राजन म्हणजे, त्या म्हातारीचा मुलगा... तिकडे विरारला मोठ्ठा बंगला आहे त्याचा. त्याचे वडील वारल्यावर ह्या बाइनं नोकरी करून मुलांना वाढवलं. मुलींना डोक्टर केलं, मुलाचं शिक्षण झाल्यावर बिझिनेस सुरू झाला, तरी ही नोकरी करतच राहिली. रिटायर झाली. पाचसहा हजारांची पेन्शन आहे. अक्कलकोट स्वामींची भक्त. परवा मुलगा म्हणाला, तुला अक्कलकोटला नेऊन आणतो, तर बिचारीनं हौसेनं कपडे भरले. आणि लहान मुलासारखी मुलाच्या गाडीत जाऊन बसली. मग मुलानं थेट इथे आणून सोडलं तिला’...
... सांगतासांगता त्याच्या आवाजातच पाणी दाटलंय असं मला वाटायला लागलं.
मी डोळे मिटले. छाती भरून आल्यासारखं झालं.
एक मोठ्ठा श्वास भरून घेतला, आणि त्याच्याकडे बघितलं.
’... अहो, जाताना त्यानं आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली माळही काढून घेतली हो..’ तो कळवळला.
’बिचारी दोन दिवसांपासून वाट पाहातेय मुलाची... आपल्याला त्यानं फसवलं हेही तिला कळत नाहीये. नव्वदीच्या त्या बाईला काय कळणार म्हणा... ’
... समोरचा चहा थंड झाला होता.
’मी तिच्याशी गप्पा मारल्या. मॅनेजर बाजूलाच होता. तेवढ्यात तिथे आणखीही दोनचारजणं आले. सगळ्यांशी बोललो. सगळ्यांच्याच अशाच कथा... म्हणून निघताना मॆनेजरच्या पाठीवर कौतुकानं हात फिरवला. म्हणालो, खुप चांगलं काम करताय तुम्ही... नाहीतर ह्यांचं काय झालं असतं कुणास ठाऊक... तर त्याच्या उत्तरानं मी आणखीनच हैराण झालो...’ तो माझ्याकडे अपेक्शेनं पाहात बोलला.
मी भुवया वर करून खुणेनंच त्याला ’काय’ म्हणून विचारलं.
’तो म्हणाला, कुणास ठाऊक.. आम्ही पुण्य करतोय, की कधी कुठल्या जन्मी केलेल्या अशाच पापाचं प्रायश्चित्त भोगतोय...’
..... माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. नकळत मी दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडलं.
’हेच केलं मीपण.. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर’... माझ्याकडे पाहात पुन्हा कळवळल्या स्वरात तो म्हणाला.
चहा तसाच टाकून आम्ही दोघही उठलो... पुन्हा स्टॊपवर आलो...
हातातली पेपराची घडी त्यानं घट्ट पकड्डली होती.
...’ आजच मी वाचलं, की शतायु लोकांची जगातली संख्या २०५० मधे १४ पट वाढणारे. म्हणजे, आज जगात दोन लाख पासष्ट हजार आहेत. ५० साली, सदतीस लाख होतील... भारतातही साठीच्या वरच्या लोकांची संख्या वाढतेय... आज आठ कोटी आहेत, आणखी १५ वर्षांनी १५ कोटी असणारेत... ’ बोलताबोलता तो थांबला.
... ’मग वृद्धाश्रमाची गरज वाढणार नाही का? 'तिथून निघालो, तेव्हा दोनचार जणं बाहेर थांबले होते... कुणाच्या बापाला आणायचं होतं, कुणी इथे बायकांची सोय आहे का म्हणून चौकशी करत होता...'
- तो म्हणाला, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले!

----------------------------------------------------

Monday, September 13, 2010

तेरावी रास !

माणसाच्या मेंदूचे काम कमी होत आहे की काय अशी शंका येण्यासारखी स्थिती अलीकडे सभोवती पसरली आहे. फोफावलेल्या विज्ञानवादावर विसंबून राहिल्यामुळे माणसाला मेंदूचा वापर करण्याची फारशी संधी राहिली नाही, की केवळ एका 'क्लिक'च्या जोरावर सारे जग संगणकाच्या पडद्यावर आणून उभे करण्याच्या अभूतपूर्व चमत्काराच्या यशाची धुंदी मेंदूत भिनली यापैकी नेमके कोणते कारण यामागे असावे, हे शोधण्याची तसदी माणसाने घेतलेली नसली, तरी मेंदूचा भार हलका करणारे शोध माणसासमोर हात जोडून उभे राहिल्याने माणसाला अप्रत्यक्षपणे बौद्धिक परावलंबित्व आले, ही बाब नाकारता येणार नाही. माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात, निरुपयोगी आणि बिनकामाचे अवयव गळून पडत गेले आणि अन्य पशुंपेक्षा वेगळे असे द्विपाद रूप माणसाला प्राप्त झाले. उत्क्रांतीचा टप्पा एखाद्या विशिष्ट काळापुरता मर्यादित नसतो. ती एक अविरत प्रक्रया असते. पण ती दिवसागणिक जाणवत नाही. कित्येक शतकांनंतर हे सूक्ष्म बदल स्पष्ट होत जातात. विज्ञानाला वेठीस घरून माणसाने साधलेल्या भौतिक प्रगतीमुळे उत्क्रांतीच्या वर्तमान टप्प्यात मात्र या बदलांचा वेग वाढत चालला असावा. भविष्य घडविण्यासाठी कर्तृत्व पेरावे लागते, हा विचार विसरून पुन्हा एकदा अवघे जग अज्ञातातून मिळणाऱ्या भविष्याच्या संकेतांकडे डोळे लावून बसले आहे. असे दृश्य हा या बदलांचाच एक परिणाम असावा. एका बाजूला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधण्याचा खटाटोप सुरू आहे, निसर्गाच्या मदतीशिवाय, विज्ञानाच्या साह्याने नवी जीवसृष्टी उभी करण्याचे प्रयोग आकाराला येत आहेत, मृत्यूचे गूढ संपविण्याचे संशोधन सुरू आहे, आणि दुसऱ्या बाजूला, भविष्याचा वेध घेण्यासाठी विज्ञानाच्या कसोटीला असंमत असलेल्या प्रयोगांनाही जगाची मान्यता मिळत आहे. हा अतर्क्यपणा आणि विसंगति हा या बदलांच्या प्रक्रियेतीलच अपरिहार्य टप्पा असू शकतो. म्हणूनच, याच विज्ञानवादी जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा विजेता जाणून घेण्यासाठी एखाद्या पॉलबाबाच्या अतींद्रिय शक्तीला साकडे घातले जाते. रस्त्याकडेच्या कुडमुड्याच्या पोटापाण्याचे साधन असलेला पिजऱ्यातला एखादा पोपटदेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निकालांवर भविष्यवाणी वर्तवू शकतो, आणि अवघे जग त्यामागे नादावून जाते. भौतिक सुखांची सारी साधने हाताशी उभी असताना आणि या साधनांचा वापर करून भविष्य घडविण्याची क्षमता असतानाही कधीकधी माणूस अशा परावलंबित्वाकडे का झुकतो, हे कोडे असले, तरी जनसमूहाची मानसिकता हे त्याचे ढोबळ उत्तर असू शकते. गर्दीचे मानसशास्त्र हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय असतो. या मानसशास्त्राला व्यक्तिगत मानसिकतेचे निकष लागू होत नसतात, असे दिसते. पॉलबाबाने टाकलेली भुरळ हादेखील जनसमूहाच्या मानसिकतेचाच एक परिणाम असू शकतो. कदाचित, आपापल्या बुद्धीच्या निकषावर पॉलबाबाचा भविष्यवेध ही हास्यास्पद घटना असू शकते. पण गर्दीच्या मानसिकतेपुढे व्यक्तिगत विचारशक्ती दडविण्याची मनोवृत्ती प्रबळ ठरते. पण या आधुनिक भविष्यवेत्त्यामुळे एक गोष्ट नक्की झाली आणि विज्ञानवादी जगात आता भविष्यवाणीलाही महत्व येण्याचे संकेत मात्र स्पष्ट झाले आहेत. भविष्याचा हा नवा फंडा जोरात असतानाच, आता माणसाच्या राशीला आणखी एक नवी रास येऊ घातली आहे. ही तेरावी 'भुजंगधारी रास' आता आकाशातील काल्पनिक पट्ट्यांचे आणखी विभाजन करून माणसाच्या भविष्यातील घडामोडींचीही वाटणी करणार आहे. गतिमान युगात काळाच्या वेगाने धावण्यातच दमछाक होणाऱ्या माणसाच्या मेंदूचे काम विज्ञानाच्या वाट्याला आल्याने कदाचित भविष्याचे निर्णय घेण्याची मेंदूची क्षमता संपुष्टात येऊ पाहात असेल. अशा वेळी, सहजपणे भविष्यवेध घेणाऱ्या कुणा अज्ञाताचा अदृश्य आधार मिळावा, यासाठी नकळत सुरू झालेला हा खटाटोप तर नसेल?

Monday, July 26, 2010

‘कट्टा’ !!

ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ मायबाप, निवविती ताप, हृदयाचा’ ... एका ओळीत वाचनसंस्कृतीचं माहात्म्य वर्णन करणारं हे वचन ग्रंथांचं महत्त्व सिद्ध करतं, तेव्हा ग्रंथप्रेमींना कृतकृत्य वाटत असेल. पुस्तकांच्या किंमतीचा विचारही न करता ती मिळवण्यासाठी वणवण करणारे पुस्तकभक्त पाहिले, की ‘वाचनापायी वाट्टेल ते’ करायची तयारी असलेल्या पुस्तकवेड्यांच्या वाचनभुकेला दाद द्यावीशी वाटते. एखाद्याकडे अमुक एक पुस्तक आहे, असं कळलं, की झपाटल्यासारखं होणारे पुस्तकप्रेमी पुस्तकविश्ववर दिसतात, तेव्हा वाचनसंस्कृतीच्या या पुजा-यांच्या पंक्तीत आपण खूप शेवटच्या पानावर आहोत, याची जाणीव होते. पण इथे वाचनभक्तीला आलेला महापूर पाहून ऊर भरून होते.. मग रिंगणात उतरावंसंही वाटू लागलं, आणि कदाचित, कळत नकळत खेचला गेलो. तरीही, पुस्तकांचा उभ्याउभ्या फडशा पाडावा, अशी मानसिकता कधी होईलसे मला वाटत नाही. पण कधी एखादे चांगले पुस्तक वाचावे, ते इतरांशी शेअर करावे, ही इथली कल्पना आणखी कशी विस्तारता येईल, यावर विचार व्हावासे वाटते. गावोगावी, वेगवेगळ्या शहरांत पसरलेल्या पुस्तकप्रेमींसाठी काही करता येईल का... संगणकाच्या पडद्यावर पुस्तक वाचण्यापेक्षा, हाताला होणारा पुस्तकांचा स्पर्श अधिक सुखावणारा असतो. तो अनुभव घेता यावा, असं काहीतरी इथे उभं राहावं, अशी अपेक्षा आहे. हाईड पार्कच्या धर्तीवर मुंबईत सुरु झालेल्या ‘अत्रे कट्ट्या’नं आता चांगलं मूळ धरलंय... नवनव्या विशयांवर चर्चा, भाषणं, वैचारिक देवाणघेवाण आणि कधी, पुस्तकं, संदर्भग्रंथांची देवाणघेवाणही होते. पुस्तकवेड्यांचा असा एखादा ‘कट्टा’ ठिकठिकाणी उभा राहिला तर?...
कल्पना कशी वाटते? कसा करता येईल हा कट्टा? काय असावं त्याचं स्वरूप? कोण चालवेल तो सातत्यानं? आपलं आणि कट्ट्याचं नातं काय असाव?...
चर्चा शक्य आहे. कदाचित आणखी एखादा चांगला उपक्रम उभा राहील.
... तुम्हाला काय वाटतं?

Friday, July 16, 2010

सेव्ह द बेबी गर्ल... आणि, सायलेंट ऑब्झर्व्हर!!

स्त्री भ्रूणहत्या ही एक चिंताजनक सामाजिक समस्या आहे. देशात अनेक राज्यांना या समस्येचा विळखा पडला आहे. समाजिक प्रतिष्टेच्या जुनाट कल्पना आता पुन्हा भीषणपणे डोके वर काढताहेत. `ऑनर किलिंग' ही त्यातूनच निर्माण झालेली एक नवी समस्या आहे. स्त्री भृणहत्या आणि ही नवी समस्या एकमेकांशी निगडीत आहेत. कारण, दोन्हींचे भविष्यातील परिणाम एकच आहेत. त्यामुळे, खरे तर, या दोन्ही समस्या एकाच वेळी डोळ्यासमोर ठेऊन हाताळायला हव्यात. उत्तरेकडचे ऑनर किलिंगचे लोण आता दक्शिणेतही पसरू लागले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचा आपला अभिमान असला, तरी, इथेही अनेक समजुती, प्रथा-परंपरांची जुनाट मुळे खोलवर जिवंत आहेत. कदाचित, त्यातून, भविष्यात अशा काही नव्या समस्या इथेही निर्माण होऊ शकतात. स्त्री भ्रूणहत्या ही खरे तर राज्यात उघडपणे दिसणारी समस्या नाही. तरीपण, अनेक जिल्ह्यांत स्त्रियांचे घटते प्रमाण ही एक चिंतेची बाब आहेच. प्रगत आणि समृद्ध अशा कोल्हापुर जिल्ह्यात, मुलींचे दर हजारी प्रमाण ८३९ इतके आहे. ऐतिहासिक पन्हाळा तालुक्यात तर मुलींचे प्रमाण आठशेपेक्षा कमी होते. गर्भलिंगनिदानावर बंदी असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते केले जाते. तसेच स्त्रीभ्रृण हत्याही केली जाते. जिल्ह्यातील सर्व सोनोग्रफी केंद्रे हेच या समस्येचे मूळ आहे, हेही उघडकीस आले. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत होती. कोल्हापुरच्या जिल्हा प्रशासनानेच हे खेदजनक वास्तव उघड केले आहे.
या समस्येला आळा घालण्यासाठी व स्त्रीभ्रृण हत्त्या रोखण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाने `सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम’ व `सायलेंट ऑब्झर्व्हर' हे उपक्रम सुरु केले आहेत. सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम या वेबसाईटला ही सर्व सोनोग्राफी केंद्र जोडली आहेत. जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना स्वतंत्र युजर नेम व पासवर्ड देण्यात आला आहे. सोनोग्राफी करण्यासाठी येणार्‍या प्रत्येक रुग्णाची माहिती दररोज वेबसाईटवर अपलोड करण्याची सक्ती सोनोग्राफी केंद्रांना करण्यात आली. त्यामुळे नियंत्रण कक्षाला दररोज जिल्ह्यात किती रुग्ण सोनोग्राफी करवून घेतात याची माहिती तर मिळू लागली, शिवाय किती गरोदर महिलांची सोनोग्राफी करण्यात आली याचीही माहिती नियंत्रण कक्षास कळत असल्यामुळे लिंग निदान करण्याचे धाडस कमी होऊ लागले आहे.
गेल्या काही महिन्यातच मुलींच्या जन्माचे प्रमाण सुधारत असल्याचे आढळून आले आहे. या उपक्रमाची दखल नॅसकॉम फौंडेशनने घेतली आहे. सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम ही वेबसाईट देशात सर्वोत्कृष्ठ वेबसाईट ठरली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक तर केलेच शिवाय हा उपक्रम देशभर राबविला जावा असे सांगितले. विधानपरिषदेमध्ये आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करुन राज्यस्तरावर हा उपक्रम राबविण्याचे सुतोवाच केले.
या उपक्रमाचाच पुढचा टप्पा म्हणजे सायलेंट ऑब्झर्व्हर... हा सायलेंट ऑब्झर्व्हर गर्भलिंग चिकित्सा करणार्‍या डॉक्टरांवर पाळत ठेवण्याबरोबरच त्यांच्या हातून नकळत जरी चोरी झाली तरी त्याची सचित्र नोंद आपल्या मेमरीमध्ये साठवून ठेवणार आहे.
सायलेंट ऑब्झर्व्हर एकदा सोनोग्राफी मशीनला जोडला की, या यंत्राचे काम सुरु होते. त्याचा मेंदू अगदी चोवीस तास सतर्क राहतो. डॉक्टराने सोनोग्राफी मशीन ऑन केल्यानंतर ते कसे वापरले, याच्या सर्व चलचित्रासह नोंदी सायलेंट ऑब्झर्व्हरमध्ये रेकॉर्ड होतात. मातेच्या गर्भातील मुलगा आहे की, मुलगी हे पाहण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचे चलचित्र मेमरीत रेकॉर्ड होते. यामुळे कोणीही डॉक्टर कितीही मोठय़ा रकमेची ऑफर मिळाली तरी लिंग चिकीत्सा करण्याचे धाडस मात्र करु शकणार नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील २३२ सोनोग्राफी केंद्रांना सायलेंट ऑब्झर्व्हर हे यंत्र बसविण्यात येणार आहे. पन्हाळा तालुक्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांत सायलेंट ऑब्झर्व्हर कार्यान्वित झाले असून एव्हाना जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांमध्ये सायलेंट ऑब्झर्व्हर कार्यान्वित झालेली असतील. पुढील पाच वर्षात या उपक्रमामुळे मुलींचे प्रमाण नैसर्गिक पातळीवर येण्यास मदत होईल, असा जिल्हा प्रशासनाचा विश्वास आहे... महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या पोर्टलवर याची अधिक माहिती आहे.

Tuesday, July 13, 2010

बाहावा !!

.....शेकडो छटांनी खुललेली हिरवाई, ... एक हिरवाकंच बाहावा, आणि पोपटी, झुलता गुलमोहोर...
बाहाव्यावर पिवळ्याजर्द फुलांची चादर चढते, अन उन्हाच्या झळांनी सोन्याची झळाळी येते...
डोकावणारी शर्मिली हिरवाई, मागे फुललेला लालकेशरी, पिवळ्या ठिपक्यांचा झुबकेदार गुलमोहोर...
------- -- --
आज पाऊस कधीचा कोसळतोय...
हिरवा बाहावा ओलाव्यानं जडावलाय...
भारावलेल्या फांद्या, आळसावल्यागत सुस्तावल्यात...
एखादी झुळूक येते, नकोनकोसं होत त्या इकडेतिकडे करतात,
...आधीच पावसाचा मारा, त्यात तो लंपट वारा...
नकोनकोसं होऊन ती फांदी जमिनीकडं झुकते...
हिरव्यागार पानांच्या जडावलेल्या झुबक्यांवरल्या झुलत्या पाण्याच्या थेंबात घुसळणारी
काळोख्या उजेडाची तिरीप तोल सावरता सावरता घरंगळते...
एक चमकता मोतिया जमिनीवर टपकून वाहत्या पाण्यात विरघळतो,
आणि दिसेनासा होतो...
शोधूशोधू करत फांद्या उगीचच झुलतात... चारदोन पातळशी पानंही, पाठोपाठ जमिनीकडं झेपावतात,
थेंब कधीच हरवून गेलेला असतो... पानं, पाण्यावर झुलत, विरघळलेल्या थेंबाला शोधत भरकटतात...
जडावललेला बहावा, हरवलेली पानं शोधत बसतो...
उदास उदास होतो...
फांदीवरली चिंब पाखरं चिडीचूप्प होतात,
पंखात चोच खुपसून अंगाला झटका देतात...
पंखात मुरलेला इवलासा पाऊस पुन्हा पानांवर ठिबकतो...
वार्‍यानं पळवलेला तो मोती परत पानावर येतो...
पानं पुन्हा मोहोरतात, झुलतात... झुल्यावरल्या झोक्यातला मोती पुन्हा झरंगळतो,
... आणि बाहावा उदास होतो...
--------------------------------------------

Saturday, July 10, 2010

सहज...

सहज...
मला वाटलं, म्हणून हे लिहितोय.
कदाचित तो विषय अकारण वाटेल. पण असे काही विषयही, विचार करायला लावतात.
... काल अगदी सहजपणे कानावर पडलेले ते शब्द ऐकून मलाही धक्का बसला आणि मी चमकून त्यांच्याकडे बघितलं.
ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर ते मस्त गप्पा मारत होते.
एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती.
आणि, बहुधा ते गुजराती असावेत.
कारण, त्यांच्यात ‘बिझीनेस’च्या ‘वार्ता’ चालल्या होत्या.
बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार... बोलताबोलता तो ब्यागेतून कसलेकसले हार्डवेअर कोम्पोनन्टस काढून शर्टाच्या बाहीला पुसून पुन्हा ठेवत होता...
एकीकडे त्यांच्या गप्पा सुरू होत्या. माझे कान कुतूहलानं त्यात खुपसले गेले होते.
विषय, मुलानं बिझीनेस कोणता करावा, हा होता.
आणि त्यांच्या संभाषणातही, सेचुरेसन, केस, बेन्क असे शब्द येत होते म्हणून, ते गुजरातीच होते, हे नक्की होतं
आसपासच्या गर्दीतल्या मराठी गप्पांमध्येही मी बर्‍याचदा कान खुपसले आहेत. पण बिझिनेसच्या गोष्टी फारच कमी वेळा कानावर पडल्यात.
तर, `कोम्पुटर'च्या धंद्यात आता `सेचुरेसन’ झाल्यानं, मुलानं दुसरा काहीतरी बिझिनेस करावा, असं त्या पित्याचं म्हणणं होतं... आणि त्या दुसर्‍या धंद्यावर विचार सुरू होता.
त्याचं शिक्षण आणि त्यांच्या विचारविनिमयातून पुढे येणारे पर्याय यांचा एकमेकांशी संबंध नाही, हेही लगेच लक्षात येत होते.
‘तू काँडोमकी दुकान खोल’... अचानक, चुटकी वाजवत बापानं मुलाला सुचवलं.
... इथेच मी चमकलो, आणि थेट त्यांच्यात डोळेही खुपसले...
तो मुलगा मंद हसत होता...
`लेकिन चलेगी?'... त्यानं गंभीरपणे विचारलं...
म्हणजे, हा पर्याय विचार करण्यासारखा आहे, हे त्याला पटलं असावं, हे त्याच्या सुरावरून जाणवत होतं.
‘क्यू नही?... बंबईमे इतने सारे लोग है... सबको यूस तो करना पडता है’... बापानं ‘लोजिक’ सांगितलं...
‘सब तरहके, सब ब्रांडके कोंडोम बेचनेका... अलग अलह प्राईसका... हरेकको परवडना चाहिये’.. तो पुढे विस्तारानं `टिप्स' देऊ लागला...
`लेकिन'... मुलगा मात्र, अजून संभ्रमात दिसत होता... मध्येच त्यानं माझ्याकडे पाहिलं.
त्या बापाची आयडिया मला एकदम पसंत पडलीच होती... माझ्या डोळ्यातली ती पसंतीची पावती त्या मुलाला जाणवली.
`पापा, ऐसा करे?... साथमें ‘पिल्स’भी बेंचे?'... पोरगा बापाच्या पुढे जाऊन कल्पनाशक्ती लढवू लागला होता..
आता बापाचे डोळे चमकले. त्यानं मुलाच्या पाठीवर चक्क जोरदार थाप मारली होती...
बिझिनेसच्या गप्पांपुढे, ते दोघं बाप-मुलाचं नातं विसरून गेले, आणि त्यांचं ‘बिझिनेस प्लॆनिंग’ सुरू झालं...
माझं स्टेशन आल्यावर मी उतरून गेलो...
पण या गप्पा मात्र, कानात घुमत राहिल्या...
... आणखी दोनचार वर्षांत मुंबैत फक्त कॊंडॊमचं दुकान सुरू झालेलं असणार, अशी माझी खात्री झाली होती.
... सरकारी योजना, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, या सर्वांनी प्रामाणिकपणे प्रसार केला, तर लोकसंख्येच्या विस्फोटाचे धोके समाजाने तोवर ओळखलेले असतील...
... म्हणजे, अशा दुकानाची गरज समाजालाच भासू लागलेली असेल.
त्या बापाच्या ‘द्रष्टे’पणाचे मला कौतुक वाटले...
बिझिनेसचे बाळकडू मिळवण्याचा जन्मसिद्ध हक्क त्यांनाच आहे, ह्याची मला खात्री पटली...
-------------
आणि, उद्याच ‘जागतिक लोकसंख्या दिन’ असल्यामुळे आजच हे नोंदवून ठेवावे, असं मला वाटलं...
उद्या कुठे असं दुकान दिसलंच, तर त्या ‘आयडिया’च्या जन्माचा मी एकमेव साक्षीदार होतो, हे तेव्हा सांगण्यात मजा नाही...
--------------
थोडे विषयांतर :
बिझीनेस हा मराठी माणसाचा पिंड नाही, हे एकदा माझा एक गुज्जू मित्र पटवून सांगण्याचा खूप प्रयत्न करत होता... मग, मी त्याला आठवतील तेवढी नावं सांगितली...
किर्लोस्कर, गरवारे, कल्याणी, पेंढारकर, जोग, अवर्सेकर, म्हैसकर...
आणि मग विचारांना खूप ताण देऊन एखाददुसरं नाव वाढवत राहिलो...
तरी तो त्याच्या म्हणण्यावर ठाम होता.
मग त्यानं मला एक किस्सा सांगितला.
तो खराच आहे, असा त्याचा दावा होता...
... एकदा एका मराठी माणसानं काहीतरी वेगळा बिझिनेस सुरू करायचं ठरवलं... बराच विचार केला, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले... जगभरातल्या त्या धंद्यातल्यांच्या ‘यशोगाथां’चे पारायण केले, ‘सप्लायर्स’शी पत्रव्यवहार केला, आणि, फायद्याचे आडाखे जुळताच, ऒर्डर नोंदवली.
... कुठल्याशा वेस्टर्न कंट्रीमधून त्यानं हजारोंच्या संख्येनं ‘डिझायनर’ ब्रा मागवल्या होत्या.
काही दिवसांतच त्याची कन्साईनमेंट आली, आणि तो भविश्याची सुंदर स्वप्ने रंगवूही लागला...
पण अंदाज फसला... वेस्टर्न साईझमुळे, इथल्या मार्केट मध्ये माल खपलाच नाही.
मग त्यानं आपली ही कहाणी एका गुजू मित्राला सांगितली, आणि त्या मित्रानं तो सगळा माल विकत घेतला...
हा मराठी माणूस, स्वत: सुटल्याच्या आणि तो फसल्याच्या आनंदात पुढे काय होणार यावर लक्ष ठेवून होता.
काही दिवसांनी पुन्हा ते भेटले... गुजू मित्रानं ह्याच्या तोंडात पेढा कोंबला, आणि याचा आ तसाच राहिला...
मग त्या मित्रानं, आपलं बिझिनेस सिक्रेटही ओपन केलं...
त्यानं तो माल घेतल्यानंतर, कुठल्यातरी मार्केटमध्ये टोप्यांच्या गाड्या सुरू केल्या... एका ईदला जोरदार विक्री झाली, आणि एक पार्ट संपून गेला... त्यातच सगळा पैसा वसूल झाला. मग ते ‘इंम्पोर्टेड’ इलेस्टिक आणि हूक त्याच धंद्यातल्या एका लोकल उत्पादकाला विकले... ते त्याचे प्रॊफिट होते..
त्यावर त्यानं गाडी घेतेली होती...
--- ह्यातला विनोदाचा, असभ्यपणाचा भाग सोडला, तरी बिझिनेस आणि मराठी माणूस यांच्या नात्याविषयी ते काय विचार करतात, हे विचार करण्यासारखं आहे...
...काय?
----------------------------------

Sunday, June 27, 2010

कदाचित...

... भारत भिका सावकार नावाच्या कुणीतरी परवा कधीतरी आत्महत्या केली.
दारूच्या नशेतच त्यानं स्वत:ला संपवलं, असं त्या बातमीत म्हटलं होतं. काय कारण असेल त्याच्या आत्महत्येमागचं?
कर्जबाजारीपणा?... बेकारी?... कौटुंबिक कलह?... की नुसती व्यसनाधीनता?...
... भारत भिका सावकार हा त्या दिवशी आत्महत्या करणारा एकटा नव्हता.
त्याच्या आधीच्या आठवड्यात, विदर्भात एका दिवशी, जवळपास दर तासाला एक आत्महत्या झाली होती...
तरीही, एकाच वर्तमानपत्राच्या डाव्या पानावर, एका न दिसणा-या कोपर्‍यात, भारत भिका सावकारच्या आत्महत्येची बातमी छापून आली होती...
भारत भिका सावकार हा कुणी प्रसिद्ध, नामवंत माणूस नसेल.
राज्याच्या एका कुठल्यातरी कोपर्‍यातल्या कुठल्याशा खेड्यातला एक दारुडा, व्यसनी तरूण असावा...
तरीही, त्यानं आत्महत्या केली, ही बातमी त्याच्या नावामुळे लक्षात राहिली...
... अलीकडे, वर्तमानपत्र उघडल्यावर, प्रत्येक पानावर आत्महत्येच्या बातम्या दिसतातच. कुणी कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ला संपवलेलं असतं, कुणी छळाला कंटाळून अखेर करून घेतलेली असते, तर कुणी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केलेली असते... कुणाचा प्रेमभंग, कुणाला धंद्यात खोट, कुणी वैफल्यग्रस्त, कुणी निराशेनं पछाडलेला, तर कुणामागे कसल्या तरी चिंतेचा, भीतीचा ससेमिरा...
दोनतीन महिन्यांपूर्वी, गोव्यात शंभर वर्षांच्या एका वॄद्धानं जगण्याला कंटाळून आत्महत्या केली...
एकीकडे, मृत्यूशी सेकंदासेकंदाचा झगडा देत जगण्याची धडपड सुरू, तर एखादा कुणी, जगण्याला कंटाळून मृत्यूला कवटाळतो...
कदाचित, शंभर वर्षांच्या आयुष्यातही, हाताला काहीच लागलं नसल्यानं तो निराश झाला असावा...
... किंवा, जगण्याची उमेद रहावी, असं काही आसपास नसतानाही, केवळ मरण येत नाही, म्हणून नाईलाजानं तो जगत असावा. आणि असह्य झाल्यावर, मरणाची वाट पाहून कंटाळल्यावर, त्यानं स्वत:च मरणाला जवळ केलं असाव.
... पण, शंभराव्या वर्षी, आत्महत्या करून मराव लागणं, हे त्याचं दुर्दैवच असणार.
भारत भिका सावकारला दारूचं व्यसन होतं, असं त्या बातमीत म्ह्टलं होतं...
... का लागलं असेल भारत भिका सावकारला दारूचं व्यसन?
त्याला आपल्या नावाची तर लाज वाटत नसेल?
आपला देश आर्थिक महासत्ता होतोय. भारताचं नाव जगाच्या नकाशावर दिवसागणिक ठळक होतंय...
आणि, त्या महान देशाचं नाव मिरवणारा तो भारत मात्र, केविलवाणं जिणं जगतोय...
त्याची खंत त्याला वाटली असेल?
की वडिलांच्या नावाची चीड त्याला पोखरत असेल?...
भिका सावकार!...
आपल्या नावापुढे बापानं एवढं विचित्र, भयाण वास्तव स्वत:च्या नाव आणि आडनावामुळे जोडून ठेवलंय, असं काहीतरी त्याला छळत असेल?...
भिका सावकारानं, त्याच्या बापानं तरी, त्याचं नाव ‘भारत’ का ठेवलं असेल?...
कदाचित आपल्या नावातला विरोधाभास आपला पोरगा पुसून टाकेल, असं त्याला वाटलं असेल?...
भिका सावकार कोण, तो काय करतो, हे काहीच त्या बातमीत नव्हतं...
पण भारत हा त्या भिका सावकाराचा मुलगा होता....
‘भिका’ आणि ‘सावकार’... भारतच्या नावापुढे लागलेली जणू दोन विशेषणं...
भारतच्या आत्महत्येमागे काय कारण असेल, ते माहीत नाही... त्याच्या व्यसनाधीनतेचं कारणही स्पष्ट नाही...
कदाचित, गरीबी हेच सगळ्याचं कारण असेल... त्या वेदनांतूनच त्याला नैराश्य आलं असेल... त्यातून आर्थिक विवंचना जन्माला आल्या असतील... मग तो आणखीनच वैफल्यग्रस्त झाला असेल...
... मग, कदाचित, कौटुंबिक कलहदेखील सुरू झाले असतील...
जगण्याच्या चिंतेनं कदाचित त्याला छळलं असेल...
... आणि तो व्यसनात बुडाला असेल.
कधीतरी, सगळंच असह्य होऊन त्यानं मरणाला कवटाळलं असेल...
----------- ------------- ------------
या जगात, दररोज तीन हजार व्यक्ती आत्महत्या करून जीवन संपवतात.
आणि, आत्महत्या करणारी प्रत्येक एक व्यक्ती, तशाच समस्येनं ग्रासलेल्या किमान २० जणांच्या मनात आत्मह्त्येचे विचार रुजवून जातो... म्हणजे, किमान २० जण त्यापाठोपाठ आत्महत्येचा प्रयत्न करतात.
वर्षागणिक दहा लाख लोक आत्महत्या करतात, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे.
दर एक लाख माणसांमागे, १६ जण आत्महत्या करतात...
... म्हणजे, या जगात, दर ४० सेकंदांनी एक आत्मह्त्या होते!!
गेल्या ५० वर्षांत, जगभरातील आत्महत्येचे प्रमाण, ६० टक्क्यांनी वाढल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे.
काही देशांत, आत्महत्या हे १५ ते ४४ वयोगटांतील मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरले आहे. १० ते २४ वयोगटांतील मृत्यूंमागेदेखील, आत्मह्त्या हे ठळक कारण होऊ पाहाते आहे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा एक निष्कर्ष आहे.
... हे आत्महत्यांमुळे होणार्‍या मृत्यूंचे विष्लेषण झाले.
आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यांची, परंतु मरण न येणार्‍यांची संख्या या आकडेवारीच्या २० पट जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
सन २००७ मध्ये, भारतातील एक लाख २२ हजार ६२७ लोकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. १९९७ ते २००७ या दहा वर्षांत, देशातील आत्महत्या २८ टक्क्यांनी वाढल्याचा राष्ट्रीय गुन्हे संशोधन संस्थेचा रिपोर्ट सांगतो. १९९७ मध्ये ९५ हजार ८२९ आत्महत्या झाल्या होत्या.
नंतरच्या दहा वर्षांत, लोकसंख्या १९ टक्क्यांनी वाढली, तर आत्महत्या आठ टक्क्यांनी वाढल्या...
सन २००७ च्या एका वर्षात, महाराष्ट्रात देशात सर्वाधिक, म्हणजे, १५ हजार १८४ आत्महत्या नोंदल्या गेल्या. २००५ ते २००७ या काळात, महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्तांच्या संख्येत पहिल्या क्रमांकाचे राज्य राहिले.
देशातील या वाढत्या आत्महत्यांमागे, २३.८ टक्के आत्महत्यांचे कारण कौटुंबिक समस्या हे होते, तर २२.३ टक्के आत्महत्या आजारपणाला कंटाळून झाल्या होत्या, असे हा अहवाल सांगतो. २.८ टक्क्यानी प्रेमप्रकरणांतून आयुष्य संपविले, तर २.७ टक्क्यांनी दिवाळखोरीमुळे आत्महत्या केल्या. २.६ टक्के आत्महत्या, हुंड्याच्या वादातून झाल्या.
गरीबी, व्यसनाधीनता, व्यावसायिक किंवा करियरमधील समस्यांमुळे होणार्‍या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे...
मात्र, सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागेल, या भीतीने आत्मह्त्या करण्याचे प्रमाण कमी होत आहे...
---- ---- -----
... भारत भिका सावकार यापैकी कुठल्या कारणाचा बळी ठरला असेल?
------------------------

Saturday, June 19, 2010

कोल्हापुरी तडका!!!

परवा कोल्हापूरला गेल्तो...
जाताना, प्रवासातच, आठवणींची जुळवाजुळव करून ठेवली होती...
कोल्हापुरात जायचं म्हटलं, की मला बर्‍याच वेळा `सत्यवादी' आठवतो...
ते तीनचार रंगाचे, उभे पट्टे असलेलं पहिलं पान, आणि त्यावरच्या मस्त मथळ्यांच्या बातम्या...
त्यातले खास कोल्हापुरी शब्द... ते आठवतच सकाळी कोल्हापुरात उतरलो.
रेस्ट हाऊसवर गेलो, आणि जस्ट फ्रेश होऊन भायेर पडलो.
मस्त पाऊस पडून गेल्ता... हवा बी लई गार!!
वाटेवर एका रिक्षाला हात केला, आणि आत बसत, `घुमीव' म्हणून सांगिटलं!
पयले घेटली, शिवाजी उद्यमनगरात...
फडतरेची मिसळ चापली.
ल्हानपनी, कोल्हापुरात आलो, की सकाळी अंबाबाईला जायचो.
ते आटवलं, आनि मिसळ संपताच अंबाबाईचं दर्शन घेटलं...
शनि अमावस्या म्हणून बाजूच्या शनीच्या देवळात गर्दी व्हती, म्हंताना अंबाबाईचं दर्शन लई `निवांत' झालं...
पुन्हा भायेर आलो, रिक्शात बसलो...
आमची रिक्षा निगाली...
मागं, एक खून खटला कोल्हापुरात लई गाजला व्हता, तवा, रिक्षाच्या मागं, `नाम्या बगतूस काय, घाल गोळी' असं कायतरी लिव्हलेलं वाचलं व्हतं...
आजपन आसं कायतरी बगायला मिळावं, म्हणून माजी नजर भायेर भिरभिरत व्हती.
म्हंताना रिक्षाच्या मीटरकडे लक्ष न्हवतं.
मदीच कवातरी, रिक्षावाला `सॉरी' म्हनला, आनि मी नुस्तं `हा' म्हनलो. म्हंताना त्यानं रिक्षा थांबिवली.
दोन मिन्टांनी कुनीतरी यून त्याच्या बाजूला कोपर्‍यात बसला, आनि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
मंग माजं कानबी तिकडंच लागलं. आटवनी जाग्या झाल्या, आनि मी आयकू लागलो...
... फीर फीर फिरलो, आनि धा-साडेधाला साने गुर्जीत आलो, आनि रिक्षा सोडली...
ब्यागेतून डायरी काहाडली, आनि, त्यांच्या गप्पांतले, कानात साटवलेले सगळे शब्द पयले लिहून काडले.
वरती झक्कपैकी मथळा टाकला...
कोल्हापुरी तडका!!!
- वांड
- भावा
- काटा किर्र
- जाग्यावर पलटी
- नाद खुळा
- शुन्य मिनीटात आवर
- रिक्षा फिरवू नकोस
- लई भारी
- जगात भारी
- नाद न्हाई करायचा
- निवांत
- तानुन दे
- इस्कटलेला
- डोक्यावर पडलायास का ???
- चक्कित जाळ
- आबा घुमिव !!!
- वडाप
- काय मर्दा
- तर्राट पळालास बघ
- काय गुढघ्यावर पडलास काय ??
- शाळा करायलास काय?
- ट्येमका लागलाय
- पेटलास की
- कीशात नाही आना, आणि मला बाजीराव म्हना..!
- चिरकुट
- घुमिव की पिट्टा!
- चहात दही !
- खटक्यावर बोट.. जाग्यावर पलटी !
- एकशरे काढ़लास काय ?
- आम्बा पाडला
- पुडया सोडू नकोस
.... लई झ्याक!!!

Friday, May 28, 2010

चिंतू-३

संध्याकाळी अंधेरीच्या रेल्वे स्टेशनावर उतरून जिना चढणार्‍या गर्दीत जिन्याच्या पायर्‍या दिसेनाश्या होतात, आणि एकेका पायरीने वर चढणार्‍या त्या गर्दीची डोकी, खालून, काळ्या लाटांसारखी हिंदकळताना दिसतात...
... मध्येच एका पायरीवर मात्र, या लाटा भोवयासारख्या दुभंगतात...
घाईघाईने जिने चढणारी ती पावले, मधल्याच एका पायरीशी थबकतात, आणि बाजूला होऊन पुढे सरकतात.
आपोआपच, त्या पायरीवर एक पोकळी तयार होते.
आणि लाटेतले प्रत्येक डोके खाली वळते...
... त्याला मात्र, त्या गर्दीचे, तिच्या दुभंगण्याचे आणि पुढे सरकण्याचे काहीही भान नसते.
हाताच्या तळव्यावर मावतील, एवढ्या लहान, खेळण्यातल्या दोनचार मोटारी त्याच्या पायांच्या चपळ हालचालींनी मिळणार्‍या वेगामुळे त्या मोकळ्या जागेतून इकडून तिकडे सरसरत असतात...
... आणि तो, त्या खेळात मस्त दंगलेला असतो.
गर्दीची पावलं क्षणभरासाठी थबकतात. कारण, त्या गर्दीची माणुसकी पायाशी असलेल्या त्या लहानग्याची काळजी घेत असते.
कुणीतरी खिशात हात घालून, त्या घाईतही, एखादं नाणं त्याच्यासमोर टाकतो, आणि पुढ्यातली पळती गाडी झटक्यात पायात पकडून थांबवत तो खाली वाकून तोंडानं ते नाणं उचलतो... खिशात टाकतो...
पुन्हा पायात गाड्या पकडून त्यांना वेगानं पळवण्याचा त्याचा खेळ सुरू होतो.
आपल्या पुढ्यात नाणं टाकणार्‍याकडे मान वर करून पाहाण्याचंही भान त्याला नसतं.
कदाचित, मान वर करेपर्यंत, गर्दीची दुसरी लाट आलेली असते, हे त्याला अनुभवानं माहीत झालेलं असावं.
तो पुन्हा आपल्या पुढ्यातल्या त्या गाड्या पळवायच्या खेळात रंगून जातो.
... अलीकडे तो रोज दिसत नाही.
तो जेमतेम साताआठ वर्षांचा असेल.
त्याला हात, म्हणजे, दंड, मनगटं, आणि पंजे नाहीत.
त्याचे पायच त्याचे हात आहेत.
उत्सुकता वाटावी, इतक्या सफाईनं तो आपल्या पायाच्या इवल्या तळव्यांनी पुढ्यातल्या खेळण्यातल्या मोटारी हाकत असतो.
... शरीराचा एखादा अवयव दुबळा किंवा निकामी असेल, तर काम करण्यास सक्षम असलेला दुसरा अवयव आणखी कार्यक्षमतेने काम करतो आणि दुबळ्या अवयवाची क्षमतेची उणीव भरून काढतो, असे म्हणतात. अपंगांना त्यांच्या दुबळेपणावर मात करण्याची शक्ती मिळावी, म्हणून कदाचित निसर्गच ही योजना करत असावा...
पायात पेन पकडून परीक्षेचे पेपर लिहिणार्‍या, तोडात ब्रश पकडून निसर्गाचे सुंदर रंग कागदावर उमटविणार्‍या, प्रकाशाच्या किरणांचे सौंदर्य कधीच न पाहू शकणार्‍या अनेक अपंगांच्या कर्तबगारीचं कौतुक धडधाकटांच्या दुनियेत होत असतं. अशा कौतुकामुळे त्या अपंगत्वालाही, जगण्याची नवी उमेद मिळते...
... आणि अपंगत्वावर मात करून कुणी एखादा एव्हरेस्टदेखील सर करून जातो...
----- ---------- ---------
पण धडधाकट, शरीराचे सगळे अवयव मजबूतपणे काम करण्याइतके ठाकठीक असतानाही, कधीकधी आपण अपंग, दुबळे होऊन जातो, तेव्हा निसर्ग आपल्याला ती सवलत देत नाही!!
... मग आपण कृत्रिम मदतनीसांचा सहारा घेतो.
आपल्या दुबळेपणावर मात करण्यासाठी, आजूबाजूला यंत्रांची दुनिया उभी करतो. आणि, ही दुनिया आपल्या सेवेसाठी हात जोडून उभी रहिली, की आपण आणखी दुबळे, परावलंबी, अपंग होऊन जातो...
... दहाबारा वर्षांपूर्वी, जेव्हा मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज नव्हती, तेव्हा सगळे फोन नंबर पटापट आठवायचे. गरजेपुरती फोन डिरेक्टरी मेंदूत सहज स्टोअर झालेली असायची.
आता मोबाईलमुळे, मेंदूतल्या डिरेक्टरीची पानं पिवळी पडलीत...
मेंदू वापरायची सवय यंत्रांमुळे कमी झाली, आणि आपणच यंत्र झालो.
यंत्र हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग झालाय.
... माझा एक मित्र, समोर बसून अगदी सहज बोलू लागला, तरी त्याचा डावा तळवा नकळत डाव्या कानावर जातो...
मध्येच कधीतरी तो भानावर येतो, आणि आपण मोबाईलवर बोलत नाहीये, हे लक्षात येऊन ओशाळून जातो...
आपण `यंत्रावलंबी' झालोय.
म्हणजे, अपंग होतोय?
... आपल्याला निसर्गानं दिलेलं शरीर, आपल्या कामाच्या गरजा भागवण्याकरता अपुरं पडतंय?
... माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात, नको असलेले, गरज नसलेले अवयव गळून पडत गेले, असं म्हणतात.
नाहीतर, आज आपल्यालाही शेपूट असती!!...
... आणि ज्या अवयवांची गरज वाढू लागली, ते आणखी ताकदवान होत गेले...
.. म्हणून माणसाचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा तल्लख होत गेला!!
... आता, पुढे काय होणार???...
आता मेंदूचा, हातांचा वापर कमी झालाय. यंत्रे आलीत...
शरीराकडून करून घ्याव्या लागणार्‍या अनेक कामांसाठी आपण यंत्रे तयार केलीत.
---- --------- --------
आत्ताच वाचलेल्या एका बातमीमुळे, हे सहज आठवून गेलं.
लंडनमधल्या, युनिवर्सिटी ऒफ रीडिंगमधल्या डॊ. मार्क गॆसन नावाच्या सायबरनेटिक्स एक्स्पर्टला कॊम्पुटर व्हायरसचा संसर्ग झालाय....!!!
संगणक विषाणूचा संसर्ग माणसाला होण्याचा जगातला हा पहिलाच प्रकार आहे! मार्क गॆसन हा संगणक विषाणूचा संसर्ग झालेला जगातला पहिला मानव ठरला आहे.
प्रयोगशाळेचे दरवाजे उघडण्याची सिक्युरिटी सिस्टीम असलेला प्रोग्राम सेट केलेली चिप मार्कने मनगटात बसवून घेतली होती. मोबाईल फोन त्याच्याव्यतिरिक्त दुसरा कुणीच चालू किंवा बंद करू शकणार नाही, असा प्रोग्रामही त्यात सेट केलेला होता.
एका नव्या प्रयोगाच्या हव्यासापोटी मार्कने म्हणे, या चिपमध्ये जाणूनबुजून व्हायरस घुसवला. नंतर त्यामुळे आपोआपच प्रयोगशाळेच्या सिक्युरिटी सिस्टीमवरही परिणाम झालाय.
कॊम्प्युटरच्या विषाणूचा संसर्ग माणसाला झाला...
(http://news.yahoo.com/s/livescience/20100526/sc_livescience/maninfectshimselfwithcomputervirus)
म्हणजे, कॊम्प्युटर हा माणसाच्या शरीराचा भाग होतोय??
बर्‍याच दिवसांनी,
.... पुन्हा ‘चिंतू’नं डोकं वर काढलंय...

---------------------------
http://zulelal.blogspot.com/search/?q=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82
---------------------

Wednesday, May 19, 2010

मैत्र प्रकाशकाचे...

आमच्या एका मित्राने अशाच एका सोशल साईटवर प्रकाशकाचा अनुभव शेअर करून इतरांना शहाणे केल्याने, आपणही लिहावे असे मला वाटू लागले. मी ते अनुभव वाचत गेलो, तेव्हा नावे बदलून त्यानं माझाच अनुभव लिहिलाय असं मला वाटलं. मग स्वानुभव शेअर करावा, असं वाटलं, आणि लिहायला घेतलं.
खरं तर हा खाजगी अनुभव म्हणून आजवर मनात असूनही यावर चर्चा टाळली होती. पण समदु:खींनाही दिलासा म्हणूनही हे लिहावंसं वाटलं... दु:ख वाटून घेतल्यानं हलकं होतं म्हणतात...
आमच्या मुंबई-ठाण्यातला एकजण 'साहित्यसेवे'च्या ध्यासानं प्रकाशन व्यवसायात उतरला, अशा समजुतीने मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटत होता. त्याच्या 'स्ट्रगल'च्या काळात, जमेल तेव्हढी मदत करावी म्हणून मी तसे केलेही. पुढेही अनेकदा त्याने हक्काने `सहकार्य' घेतले. आमचे खूप चांगले संबंध तयार झाले. संपर्कही वाढला. अगदी एकमेकांचे `परम मित्र' झालो. काही काळानंतर, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या एका लेखावरून अशाच विषयावर पुस्तक प्रसिद्ध करायची कल्पना त्याने सुचविली, आणि आम्ही कामाला लागलो. प्रकाशक माझा परम मित्र असल्याने, करार वगैरे करायचे मनातही आले नाही. आणि, प्रत्येक साप्ताहिक सुट्टीत प्रवास, भेटीगाठी करून मी पुस्तक लिहिले... मीच प्रयत्न करून एका साहित्यप्रेमी राजकीय नेत्यास त्याच्या हस्ते प्रकाशन करण्याची गळ घातली, आणि माझ्या पुस्तकासोबत त्याच्या आणखीही काही पुस्तकांचे प्रकाशन आमच्या या परम मित्राने करून/उरकून घेतले. पत्रकारितेतील व्यक्तिगत संबंधांमुळे, त्या प्रकाशन कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धीही मिळाली. नंतर बाजारात पुस्तक आले, आवडल्याची पावतीही असंख्य वाचकांकडून मिळत गेली... त्याचे समाधान खुप मोठे होते.
प्रकाशनाला एक वर्ष उलटत असताना, सहज मीच आमच्या प्रकाशक मित्राकडे सहज म्हणून पुस्तक `व्यवहारा'विषयी चौकशी केली. तोवर, मानधन या विषयावर प्रकाशकाने चकार शब्दही काढला नव्हता. माझ्या चौकशीमुळे त्याने (नाईलाजाने) मला एकूणच प्रकाशन आणि पुस्तकाचा निर्मिती, विक्री खर्च,, प्रक्रिया यावर माहिती दिली. आणि हा धंदा कसा `आतबट्ट्या'चा असतो, हे `पटवून्'ही दिले.
तोवर याबद्दल मिळालेली माहिती आणि आमच्या या परम मित्राने दिलेली माहिती यात एव्हढी तफावत होती, की प्रकाशन व्यवसाय म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या अशी माझी समजूत झाली, आणि मी मानधनाचा विचारच सोडून दिला. उलट त्या प्रकाशकाच्या नि:स्वार्थी साहित्यसेवेबद्दल माझा आदर द्विगुणित झाला.
नंतर कधीकधी या व्यवसायतल्या जाणकारांशी सहज होणार्‍या गप्पांमुळे, पुन्हा मी आमच्या प्रकाशकाजवळ आडूनाआडून विषय काडला, पण मानधनाची रक्कम मिळेल, असे त्यावरून अजिबात जाणवले नाहीच, उलट नको त्या चौकश्या करून आपणच चूक केली असं मला वाटत राहिलं. परदेशांत तर, प्रकाशकालाच पैसे देऊन पुस्तकं छापून घेतात वगैरे ऐकलं होतं... (आपल्याकडे लेखनावर उदरनिर्वाह करणारे लोक कसे जगत असतील, असा विचार मनात आल्यावर तर मानधनधनाची अपेक्षाच मनातून काढून टाकली- (प्रकाशक खुश)).
नंतर आमच्या त्या परम मित्राचा फोनवरचा संपर्कही हळूहळू रोडावत गेला.
त्याच्या कामासाठी मदत हवी असेल तर मात्र त्याचे फोन येत राहिले... मीही, मित्रत्वाच्या भावनेने शक्यतो सहकार्य करत राहिलो...
मानधन हा विषय संपला होता...
पण नंतर मला वेड्यात काढणारेही काहीजण भेटले.
शेवटी, निगरगट्टपणाने पुस्तकाच्या १०० प्रती मागून घेतल्या.
... निदान, कुणाकुणाला वेगवेगळ्या निमित्ताने कधीकधी द्याव्या लागणार्‍या भेटींसाठी तरी एक चांगली वस्तू झाली....!

Monday, May 17, 2010

धनाची पेटी.... ?

‘धवल क्रांती’ हा शब्द जिथे रूढ झाला, त्या गुजरातेच्या शेजारी, पंजाब, हरियाणामध्ये एक भीषण सामाजिक समस्या केव्हापासून थैमान घालते आहे. ती दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सामाजिक भान असलेल्या संघटना कधीपासून अक्षरश: झगडताहेत. पण होतेय उलटेच. या समस्येचे हातपाय देशभर पसरतायत. यातून एक भयावह भविष्य रुजते आहे, याची जाणीवही सगळ्यांना आहे. या समस्येवर पुरेशी जनजागृती झाली नाही, असेही नाही. कदाचित, ही समस्या इथे कधीतरी डोके वर काढणार, याची चाहूल आपल्या पूर्वजांनाही कित्येक वर्षांपूर्वी लागली असावी, म्हणूनच, तेव्हापासूनच या समस्येच्या जाणीव जागृतीला सुरुवात झाल्याचे पुरावे सापडतात. एकीकडे सामाजिक रूढींचा पगडा, आणि दुसरीकडे जाणीव जागृतीचे प्रयत्न... कदाचित, या संघर्षात, रूढी-विचारांनी प्रयत्नांवर मात केली, आणि अखेर, भूतकाळाने नोंदविलेली ही समस्या वर्तमानात जन्माला आलीच... आता भविष्यातही तिचे ओझे आपल्याला वाहावे लागणार आहे... कदाचित, ते इतके जड असेल, की आपल्याला ते पेलवणारदेखील नाही... आपण कोलमडून जाऊ... विस्कटून जाऊ, आणि नैराश्याचे भूत समाजाच्या मानगुटीवर बसेल...
... असे झाले, की एक स्थिती नक्की असते, हे इतिहासावरूनच वारंवार सिद्ध झाले आहे..
अराजक !...
... माणसांच्या मनावर जंगली, असंस्कृत, पाशवी वृत्तीचा पगडा, आणि, आत्मघात!!
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं अवघड असतं, असं म्हणतात... इथे तसंच होतंय.
कित्येक वर्षांपासून ह्या भविष्याचे भान द्यायचा प्रयत्न सुरू आहे, तरीही आपण जागे होत नाही, म्हणजे, हे झोपेचं निव्वळ सोंग आहे...
+++ +++ +++
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले... देशभरात सगळ्याच राज्यांची विधिमंडळ अधिवेशनेही याच काळात ‘संपन्न’ झाली. देशाच्या संसदेचे अधिवेशनही नुकतेच संपले...
या दरम्यान, सगळीकडे या समस्येवर ‘सोपस्कारापुरती’ चिंताही व्यक्त झाली, आणि या समस्येचे वास्तव सामोरे आणणारी सरकारी आकडेवारीही जाहीर झाली...
... ह्या आकडेवारीतला तथ्यांश लक्षात घेतला, तर, आज दर हजार पुरुषांमागे जवळपास साडेआठशे स्त्रिया असे प्रमाण आहे.
म्हणजे, आपल्या ‘विवाहसंस्कृती’ला आव्हान देणारी धोक्याची घंटा अजून वाजतेच आहे...
‘माणुसकी’च्या व्याख्येला काळीमा लावणारा भविष्यकाळ यातून डोकावतोच आहे...
उद्याच्या अंधाराचे सावट दाट होते आहे...
... हीच ती समस्या आहे.
आता ही समस्या लपून राहिलेली नाही. तरीही, रूढी-परंपरांचा पगडा आपली मानगूट सोडत नाहीये.
... मेल्यानंतर मुलाने अग्नि दिला नाही, तर आत्म्याला शांति मिळत नाही, असे म्हणतात... आजवर याच समजूतीमुळे अनेक आत्म्यांना स्वर्गप्राप्ती झाली असेल...
पण अनेक घरांच्या ‘कुलदीपकां’नी ही समजूत खुंटीला टांगली आहे...
म्हणून दक्षिणेकडे, केरळसारख्या श्रीमंत, सुशिक्षित राज्यात, मुलाने ‘गल्फ’मधून पाठविलेल्या भक्कम पैशांच्या पुंजीवर पश्चिमेकडे झुकलेली असंख्य जोडपी चांगल्या अर्जाच्या वृद्धाश्रमांत दक्षिणेकडे डोळे लावून ‘बोलावण्या’ची वाट पाहात जगताहेत...
मुलगाच हवा, ह्या समजुतीत, तीन दशकांपूर्वीच्या कुटुंब कल्याणाच्या धडक मोहिमेची भर पडल्यानंतर स्त्री-पुरुष लोकसंख्येतील विषमतेची समस्या आता चटके देऊ लागली आहे.
चीनमध्ये, लोकसंख्या नियंत्रणाच्या अशाच धडक मोहिमांनंतर आता युवकांपेक्षा वृद्धांची संख्या तिथे वाढली आहे, असे तेथील आकडेवारी सांगते...
भारतात, या मोहिमेला समजूत, रूढींची जोड मिळाल्याने, मुलगा झाला, की कुटुंब परिपूर्ण झाल्याचे समाधान लाखो कुटुंबानी मिरविले...
आता तेच समाधान समस्येच्या रूपने थैमान घालू लागले आहे...
... पण, कोणत्याही चुकीची दुरुस्ती होऊ शकते, असे प्रगत विद्न्यान आज अस्तित्वात आहे.
म्हणजे, संगणकाच्या भाषेत, एखादी कृती ‘अन-डू’ केली, की त्याची दुरुस्ती होते.
मुलगा हवाच, अशी समजूत रूढ करणार्‍या आपल्या संस्कृतीलादेखील आपल्या या चुकीची जाणीव झाली होती.
म्हणूनच, `बेटी म्हणजे धनाची पेटी' असा समजही रूढ करण्याचा प्रयत्न संस्कृतीने केला असावा. पण तो रुळला नाही...
हे आपल्या संस्कृतीचे कदाचित अपयश असेल...
+++ +++ +++
दोन वर्षांपूर्वी, ८ मार्च २००८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमिताने आखलेल्या एका सप्ताहाच्या समारोपाला, दिल्लीत महिला -बालकल्याण मंत्रालयाने स्त्री-भ्रूणहत्या या विषयावर एक परिषद आयोजित केली होती. स्त्री भ्रूणहत्येचे चिंताजनक वाढते प्रकार समाजाला कुठे घेऊन जातील, याचे एक भयंकर चित्र या परिषदेत पुन्हा मांडण्यात आले, आणि देशव्यापी जनजागृती करण्याचे पुन्हा एका ठरले. स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, करमणूक क्षेत्र, धार्मिक-अध्यात्मिक गुरू, वैद्यकीय व्यावसायिक, सर्वांनी या मोहिमेत झोकून द्यावे, अशी गरज तेथे पुन्हा उच्चारली गेली...
+ ग्रामीण भागापेक्षा, शहरी, सुशिक्षित भागात गर्भलिंग चाचणीचे प्रकार अधिक असल्याचे या परिषदेत अधिकृतपणे स्पष्ट झाले...
+ पंजाब, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली येथे स्त्री-पुरुष प्रमाणातील विषमता सर्वाधिक असल्याची माहितीही पुन्हा सामोरी आली...
+ अगोदर एक मुलगी असेल, तर दुसरी मुलगी होऊ देण्याची मानसिकता ४४ टक्के लोकांमध्ये नाही, हेही स्पष्ट झाले...
+ झपाट्याने घटत्या स्त्री-पुरुष प्रमाणातून, महिलांचा लैंगिक छळ, शोषण, अत्याचार, बलात्कार, छेडछाड, महिलांची तस्करी, आणि, महिलांना अनैतिक व्यवसायात ‘ढकलले’ जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली...
... या सर्वांतून, एक धोका पुन्हा समोर आला आहे.
समजा, देशात, दर एक हजार पुरुषांमागे सुमारे साडेआठशे स्त्रिया असे विषम प्रमाण राहिले, तर त्याचा अर्थ, दर एक हजार पुरुषांमागे, दीडशे पुरुषांना विवाह नाकारला जाईल...
... भारताची लोकसंख्या अब्जावधी असल्याने, विवाह नाकारल्या गेलेल्यांची संख्या काही कोटींमध्ये असेल...
कदाचित, या समस्येतून मानसिक आजार, विकार बळावतील, आणि संस्कृतीच्या चौकटीत त्यावर कोणताच उपाय नसेल... मग अनैतिकता हीच संस्कृती होईल...(?)
... या भविष्याची चाहूल आजच लागली आहे, तरीही आपण निर्धास्त आहोत..
का?
+++ +++ +++
... परवाच्या एका बातमीमुळे हे सगळं डोक्यात भिणभिणायला लागलं...
अहिंसेचे उपासक महात्मा गांधीजींच्या गुजरातेत, ‘धवल क्रांती’चा नारा घुमला, आणि दुग्धोत्पादनातून राज्याला समृद्धी येते, याचा सक्षात्कारही झाला. आता, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी गुजरात झपाटले आहे...
त्यासाठी गायींची संख्या वाढविली पाहिजे... म्हणजे, गायींची पैदास वाढविली पाहिजे...
त्यावर सरकारने एक उपाय शोधलाय.
गायींची गर्भलिंग चाचणी करण्याचा!!
यापुढे, गायीच्या पोटात मादीचा गर्भ असेल, तरच तो गर्भ जन्म घेईल...
नाहीतर?...
.... मागे, निवडणुकीच्या निमित्ताने रिपोर्टींग करण्यासाठी मी विदर्भात खेडोपाडी फिरलो... आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांच्या व्यथा ऐकल्या, अनुभवल्या...
पंतप्रधान पॆकेजमधून गायींचे वाटप झाले, तेव्हा ‘यंत्रणे’ने कालवडी काढून घेतल्या, आणि नर जातीची वासरे दुभत्या गायींसोबत वाटली...
आपल्या पोटचा जीव पैशाच्या लोभापायी हिरावून घेतल्या गेलेल्या त्या गाय़ीनी परकी बाळे जवळ केलीच नाहीत, आणि दूध द्यायचे नाकारले...
यातून दोन संकटे ओढवली...
एक म्हणजे, आत्म्हत्याग्रस्तांची कुटुंबे उपाशीच राहिली,
दुसरे, कित्येक गायी आपल्या पोटच्या बछड्यांपासून दुरावल्या...
यातून दुसरे काय होणार?...
तर, मूळ मुद्दा, गुजरातेत आता गाय-बैलांच्या जन्मदरातही जाणीवपूर्वक विषमता आणण्याचा प्रयोग होणार आहे...
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच राज्यात, माणसांच्या मुलींचा जन्म नाकारण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे...
इथे माणसाच्या मुलींना बंदी, आणि जनावरांच्या नरांना बंदी...
म्हणजे, जिथे गायी स्वीकरल्या, तिथे मुली मात्र नाकारल्या जातायत..
हा दुटप्पीपणा आला कुठून?
पैसा !!
माणसाने ‘बेटी ही धनाची पेटी’ हा समज माणसाच्या बाबतीत नाकारला, आणि जनावरांच्या बाबतीत स्वीकारला...
खरे?
---------------------------------------------------------
.

Saturday, May 15, 2010

कोकणातले ‘केरळ’...

मुंबईहून गोव्याकडे जाताना, संगमेश्वर ओलांडले, की एक मोठ्ठे वळण पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला `ओझरखोल' नावाचे गाव दिसते. टेकडीएवढ्या हिरव्यागार डोंगरावर, शाळेची एक बैठी इमारत आणि झाडांमध्ये लपलेली कौलारू, केंबळी घरे, उजवीकडे एक रोडावलेली खाडी आणि लहानसा डांबरी रस्ता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. माधवराव मुळ्ये यांचं हे गाव. इथल्या प्राथमिक शाळेला, माधवरावांचं नाव दिल्यामुळे अनेकांना हे माहीत झालंय. संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली, आणि पलीकडे माधवराव मुळ्यांचं ओझरखोल... गोळवलीत गुरुजींच्या वास्तूस्थानी काही विकास प्रकल्पही सुरू झालेत...
ओझरखोलातही, सहज उतरून थांबलं, की काहीतरी वेगळं सुरू झाल्याचा ‘वास’ येतो... मग वाटेवरच भेटणार्‍या कुणाशीही गप्पा मारतामारता त्या वेगळेपणाची ओळख होते, आणि हे आगळेपण बघितल्याशिवाय पुढे जायचं नाही, असं आपण आपोआपच ठरवूनही टाकतो.
अलीकडे गावागावांतल्या महिलांना स्वयंपूर्णतेचा आणि स्वयंसहाय्याचा एक नवा मंत्र मिळालाय. बचत गटांमुळे, महिलांचा आत्मविश्वासही वाढलाय. बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन पापड, लोणची, शेवया असे पदार्थ बनवून त्यांची विक्री करणे, या नेहेमीच्या रुळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा, काहीतरी वेगळं करावं, आणि आपल्या अंगीच्या कर्तृत्वालाही वाव द्यावा असं ओझरखोलातल्या महिला बचत गटानं ठरवलं, आणि खाडीकिनारीच्या या गावात एक नवी वाट रुळली... लौकिकार्थाच्या शिक्षणातूनच उत्कर्ष साधता येतो, या समजुतीमुळे घराबाहेर पडण्यासाठी बुजणार्‍या महिलांनी एक वेगळाच उद्योग सुरू केला, आणि ओझरखोलातल्या घरांना भक्कम आर्थिक आधार मिळाला... जिद्द, मेहनत व कल्पकतेच्या आधारे इथल्या महिला आता आपली नवी ओळख करुन देत आहेत. आजवर केवळ कौटुंबिक, धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार्‍या या महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटित झाल्या आहेत, आणि त्यांच्या ‘काथ्या’ उद्योगाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जवळपास सात वर्षापूर्वी ओझरखोलच्या महालक्ष्मी महिला बचत गटाची स्थापना झाली, आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून माहिती घेऊन या महिलांनी काथ्या उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. मग काही महिलांनी काथ्या उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. उद्योगासाठी अडीचतीन लाख रुपयांचे भांडवल आवश्यक होते. संगमेश्वरच्या बँक ऑफ इंडियाकडून दीड लाखाचे कर्ज व एक लाखाचे शासकीय अनुदान मिळवून ‘महालक्ष्मी’ने भांडवलाची उभारणी केली. महिलांच्या या आगळ्या धाडसाला दाद देण्यासाठी आणि, कौतुकापोटी, ओझरखोल ग्रामपंचायतीने वर्कशॉपची इमारत बांधून दिली, आणि कर्नाटकातील बंगळूरमधून काथ्या उद्योगासाठी लागणारी मशिनरी आणली गेली. ओझरखोलच्या आसपास काथ्या बनविण्यासाठी नारळाची सोडणे मुबलक प्रमाणात मिळतात. या नारळाच्या सोडणांपासून प्रथम काथ्या बनविला जातो. या काथ्यापासून सुंभ, पायपुसणी तयार केली जातात. या मालाला स्थानिक बाजारपेठेत चांगलीच मागणी आहे. तालुक्याच्या बाजारपेठेत ओझरखोलच्या महालक्ष्मी बचतगटाची पायपुसणी, सुंभ आणि ‘रश्शी’ येते, तेव्हा गिहाईकेदेखील, आवर्जून त्यांचीच खरेदी करतात. रत्नागिरीच्या बाजारातही, ओझरखोलची ही उत्पादने ‘फेमस’ झाली आहेत.
नारळाला ‘कल्पवृक्ष’ मानतात, हे कोकणी माणसाला पूर्वीपासून माहीत आहे. म्हणूनच, माजघर पडवीचं एखादं टुमदार दुपाखी चिरेबंदी घर बांधलं, की आंगणाच्या बाजूला, बेड्याशेजारी दोहोबाजूंना नारळाची रोपे लावली जातात... ‘परड्या’त आणखी जागा असली, तर दोनचार ‘कलमं’देखील लावली जातात, आणि ‘फळं’ येईपर्यंत कोकणातल्या त्या घरातला प्रत्येकजण झाडांची काळजी घेतो... केरळ, तामीळनाडूसारखा नारळाच्या बहुविध उपयोगांचा आजवर कोकणी माणसाने फारसा विचार केला नव्हता. आता मात्र, ‘मुंबैची मनिऒर्डर’ हेच आजवरचा जगण्याचे मुख्य साधन असल्याची मानसिकता कोकणातून पुसली जातेय. आता, मुंबईत शिकायला जाणाया मुलाबाळांना गावातून पैसे पाठवले जातायत... कोकण बदलतेय...
मेहनतीची किंमत कोकणाला उमगली आहे. म्हणूनच, केरळ, तामिळनाडूतला काथ्या उद्योगाने इथे मूळ धरले आहे... हा उद्योग नावारुपाला आणायचा, ही ओझरखोलच्या ‘महालक्ष्मी’ची जिद्द आहे.
-------------------------------------------------------

Saturday, May 8, 2010

'चटकदार' कोल्हापुरी चहा...

कोल्हापूर आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे नाते अतूट आहे. महाराजांनी त्या काळात कोल्हापूरच्या डोंगराळ भागात चहा, कॉफी, कोरुड, रेशीम किड्याचेही प्रयोग करुन पाहिले होते, असे म्हणतात..
महाराजांच्या याच जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील हुंबवली गावच्या सह्याद्रीच्या पठारावर श्री. टेकवडे नावाच्या एका प्रयोगशील शेतकर्‍याने ४० एकर जमिनीवर चहाचा मळा फुलविला आहे. महाराष्ट्रात चहा होऊ शकत नाही असा टी बोर्डाचा दावा होता. इथे तर चहाचा हिरवागार चहा मळा फुलला आहे, आणि उत्तरेकडील आसाम, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडूची चहामधील मक्तेदारी टेकवडेंनी मोडून काढली आहे. श्री. टेकवडे यांनी २००२ मध्ये चहाची लागवड केली आणि आंतरपिके म्हणून ऑस्ट्रेलियन बोन्मामिन या झाडाची लागवड करुन भरघोस उत्पादन घेतले आहे.
कष्ट आणि शेतकर्‍यांची इच्छाशक्ती असेल, तर चहाची मक्तेदारी आपण महाराष्ट्रात मोडून काढू शकतो, असे टेकवडे म्हणतात. कोल्हापूर परिसरात पाण्याचा निचरा होणारी डोंगराळ जमीन भरपूर आहे. अशा ठिकाणी हा चहाचा प्रयोग करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे यायला पाहिजे, असेही त्यांना वाटते.
निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थांनी युक्त, कॅल्शीयमचे प्रमाण कमी पण लोह आणि मॅगेनीज युक्त अशी जमीन असली तर चहाचे उत्पन्न चांगले येते. चहासाठी जमिनीतील जस्ताचे प्रमाणही महत्वाचे आहे. यासाठी मातीपरीक्षण होणे महत्वाचे आहे. झिंक सल्फेटच्या ४.४ किलो प्रती एकरच्या फवारणीमुळे जस्ताची कमतरता कमी करता येते.
जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ३० बाय ४५ सें. मी. खड्यात चहाची लागवड केली जाते. १.२ मीटर बाय १.२ मीटर अंतरावर लागवड केल्यास प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रोपांची लागवड करता येते. चहाची लागवड एकदाच करावी लागते. या बागेची आयुमर्यादा साधारणपणे ५० वर्षे आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वारंवार करावा लागत नाही. चहाच्या बागेसाठी सुरुवातीला पहिल्या तीन वर्षासाठी साधारणत: ७३ हजार ८७६ रुपये खर्च येतो. मात्र पहिल्या तीन वर्षात उत्पादन मिळत नाही. चौथ्या वर्षापासून पुढे एकरी ८ हजार ते १६ हजार किलो कच्ची पाने इतके उत्पन्न मिळू शकते. आंतरपीक म्हणून बागेत काळी मिरी, वेलदोडे, काजू, सुपारी अशी पिके तर चहा रोपांना सावली मिळावी म्हणून सिल्व्हर ओक, खैर अशी झाडे लावून उत्पन्न घेता येते.
नवीन काहीतरी करण्याच्या उर्मीपोटी श्री. टेकवडे यांनी हा प्रयोग केला. चहा लागवड त्यांनी यशस्वी करुन दाखवल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना रोजगारही मिळाला आहे. आसपासच्या शेतकर्‍यांनाही ते चहा लागवडीसाठी मार्गदर्शन करीत असतात. आपल्या बागेतच त्यांनी चहा प्रोसेसिंग युनिट उभारले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा या तालुक्यातही चहा होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी या क्षेत्रातही मुसंडी मारुन कोल्हापूरचे नाव चहा उत्पादनातही येईल या दृष्टीने प्रयत्न करावे अशी टेकावडेंची अपेक्षा आहे.
(सौजन्यः महान्यूज)

Thursday, May 6, 2010

'सामन्या'तून 'सामान्यां'कडे...

एक नवा विक्रम होतोय.
कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय.
काल सचिनने ट्विटिंग सुरू केले, आणि त्याच्या लाखो 'फॅन्स'मध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या.
त्याच्या फॉलोअर्सचा क्षणाक्षणाला वाढत जाणारा आकडा न्याहाळणे, हेदेखील कालचे मोठ्ठे 'सुख' होते.

संध्याकाळपर्यंतच्या जेमतेम १८ तासांत सचिनच्या चाहत्यांची झुंबड गर्दी ट्विटरवर उसळली होती. रात्री जवळ्पास एक लाखांचा आकडा ओलांडला...
शिवाजी पार्कच्या मैदानावर, तिथल्या मातीत हुंदडून मोठा झालेल्या सचिनच्या चाहत्यांची एक विशाल सभा ट्विटरवर भरली, आणि प्रत्येकाने आपले मन मोकळे करीत सचिनला शुभेच्छा दिल्या.
एवढी मोठी सभा, पण, कसलाही गोंगाट नाही.
खरंच, 'ट्विटर' हा 'सायलेन्स झोन' आहे... तरीही इथे लाखोंची गर्दी होते, आणि सगळे काही सुरळीत, शिस्तीत, आखीवपणे पार पडते.
सुखवणारे!...
वेलकम सचिन... तुझ्या सामान्यांच्यात येण्यामुळे, असंख्यांच्या भावनांना शब्द फुटतील...

Saturday, May 1, 2010

आपलाआपला इतिहास...


महाराष्ट्राचा मंगल कलश आला, त्याला आज ५० वर्षे झाली. महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला... व्यक्तीच्या आयुष्यात, ५० वर्षांचा काळ लोटला, की त्याच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा घ्यायची योग्य वेळ आली, असे समजतात. पन्नाशी उलटली, की आपण कुठे होतो, कुठे आलो, आणि कुठे पोहोचायचे याचे चिंतन आपोआपच सुरू होते. मागे वळून पाहिले जाते, आणि आपण स्वत:सोबत जोडल्या गेलेल्या भूतकाळाचे पदर उलगडू लागतो... ह्या आठवणीची साठवण, हा आपला ‘इतिहास’ असतो...
... प्रत्येकाच्याच वाटणीला त्याचात्याचा इतिहास आलेला असतो... एखाद्याच्या इतिहासाची पाने ‘सुवर्णाक्षरां’नी लिहिलेली असतात, तर काहीच्या पानांवर नुसतेच, ‘पांढ-यावर काळे’ झालेले असते... ती पाने उलगडताना कुणाला समाधान, आनंद मिळतो, तर कुणी खंतावून जातो... पण आपण कुठे होतो आणि कुठे आहोत, याचे भान मात्र हीच पाने देत असतात...
... महाराष्ट्र आज ५० वर्षांचा झाला... काही दशकांपूर्वी राजा बढे यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्र गीता’चे सूर आज राज्याच्या प्रत्येक कोप-यात घुमताहेत...
‘गर्जा महाराष्ट्र माझा...’ अनेक वृत्तपत्रांचे मथळेही याच शब्दांनी सजले...
हुतात्मा चौकात, स्वातंत्र्यसैनिकांनी ‘मातीच्या घागरी’तून राज्यभरातील नद्यांचे ‘एकपणाचे पाणी’ आणून ते हुतात्म्यांच्या स्मृतीचरणी वाहिले...
राज्याच्या प्रगतीचे पोवाडे गाणा-या सरकारी जाहिरातींनी प्रसारमाध्यमांचा ‘सुवर्णदिन’ साजरा झाला... कधीकाळी गिरण्यांच्या भोंग्यांनी जागा होणारा गिरणी कामगार, सवयीप्रमाणे सकाळी उठला, आणि घरासाठी, वारसांच्या नोक-य़ाच्या लढ्यासाठी बाहेर पडण्याऐवजी, ‘कामगार दिन’ साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला...
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असला, की ‘तिरंगे’ विकून चार पैशांची कमाई होते... आज ‘महाराष्ट्र दिनी’ झेंडे विकून पैसे मिळतील की नाही हे माहित नसल्याने, रस्त्यावरच्या पोरांनी सिग्नलवर नुसतीच भीक मागायला सुरुवात केली... पण, सुट्टी असल्यामुळे, बरेचसे सिग्नलही नुसतेच लुकलुकत होते... ‘रोजच्यासारखी’ कमाई झालीच नाही. फूटपाथवरच कुठेकुठे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘सत्यनारायणाच्या महापूजा’ साज-या झाल्या...
मराठी माणसानं आपापल्या घरातल्या ‘म्युझिक सिस्टीम’वर महाराष्ट्राचे पोवाडे वाजवले, आणि ‘सुवर्ण-महाराष्ट्रा’चा ‘लेझर-शो’ पाहाण्यासाठी उतावीळ होऊन संध्याकाळ्ची वाट पाहात घरी थांबला...
दुपारी घराघरातल्या टीव्हीवर, मराठी चित्रपटांचा आनंद अनेकांनी लुटला, तर काहींनी मराठी वर्तमानपत्रांच्या ‘महाराष्ट्रदिन विशेष’ पुरवण्या वाचून काढल्या... काहीनी, आवडलेल्या मजकूराची कात्रणे काढून, वहीत नीट चिकटवून ठेवली...
पुढेमागे, आपापल्या मुलांना, नातवंडांना महराष्ट्राचा इतिहास सांगताना, ‘रेफरन्स’ म्हणून उपयोगी पडतील, ह्या ‘दूरदृष्टी’ने !
... आज महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला. राज्याच्या इतिहासाची ५० पाने आज सगळीकडे वाचली गेली...

ही पाने ‘सोनेरी’ आहेत, असं म्हणतात. १९६० पासून आजपर्यंत, महाराष्ट्रानं फक्त ‘सुवर्णकाळ’च पाहिला, असं आजच्या ‘सेलिब्रेशन’ वरून वाटतंय...
खरं म्हणजे, राज्याचा आयुष्यात ५० वर्षांचा काळ म्हणजे काही, ‘इतिहास’ ठरावा इतका जुना काळ नाही...गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्रानं, अनेक चढ-उतारही पाहिलेत... असंख्य संकटे झेललीत... असंख्य डोळ्यांचे अश्रू अजूनही खळलेले नाहीत... काही संकटे निसर्गाने लादली, तर काहीना आपणच निमंत्रण दिले...
महाराष्ट्रावर बॊम्बस्फोटाच्या जखमा आहेत, गिरणी संपात उध्वस्त झालेल्या लालबाग-परळच्या कुटुंबाच्या वाताहातीच्या कहाण्या आहेत, मराठी-अमराठी वादातून भडकलेल्या हिंसाचाराच्या खुणा आहेत, दलित-सवर्ण संघर्षातून उमटलेल्या वेदना आहेत...
आणि कर्जबाजारीपणामुळे आत्मह्त्या करणा-या शेतक-यांच्या घरातले अश्रू आहेत...
भूकंपानं झालेली हानी अजूनही भरून न निघाल्यानं बेघर जिणं जगणा-या कुटुंबाचे भेदक वास्तव आहे, तर जातीय दंगलीत होरपळलेल्यांचं भेदरलेलं अस्तित्व आहे... नोक-यांच्या कॊलकडे वर्षानुवर्षे लागून राहिलेले लाखो डोळेदेखील महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचं कौतुक न्याहाळतायत...
चहूबाजूनी घुमणा-या पोवाडे-तुता-यांच्या निनादात, आणि सुवर्ण-सोहळ्याच्या धामधुमीत, ह्या वेदना-व्यथांची अक्षरे अदृश्य झाली आहेत.
विजेअभावी ग्रामीण महाराष्ट्रात अंधार दाटून राहिला आहे, आणि शेताला पाणी नसल्याने पिके कोरडी पडली आहेत...
शिवाजी महाराज, द्न्यानेश्वर-तुकाराम, शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाची पाने सोनेरी झाली आहेत... त्या चमकदार इतिहासामुळे, गेल्या ५० वर्षाच्या वाटचालीचे- ‘पांढ-यावरचे काळे’देखील झाकोळले, हे महाराष्ट्राचे सुदैव आहे...
... तरीही, ह्या संकटांच्या सावटातही, आपणच देशात सर्व आघाड्यांवर आघाडीवर आहोत...
कारण, बाकी सगळीकडे ह्यापेक्षाही मोठा ‘आनंदीआनंद’ भरून व्यापला आहे.
म्हणून महाराष्ट्राचं कौतुक केलंच पाहिजे.
महाराष्ट्राच्या मातीत दम आहे म्हणतात, ते उगीच नाही!!

Wednesday, April 28, 2010

घेतल्याशिवाय र्‍हाणार नाही !....

पंधरा-वीस वर्षांपूर्वी, मुंबईच्या चर्चगेट स्टेशनातून बाहेर पडून मंत्रालयाच्या दिशेने चालायला सुरुवात केली, की समोरचा रस्ता अनेकदा पोलिसांच्या बॅरिकेडसनी बंद झालेला दिसायचा. सम्राट हॉटेल हे नाव त्या वेळी उभ्या महाराष्ट्राला वर्तमानपत्रांतून दिवसाआड एकदा तरी वाचायला मिळायचं. कारण या पोलिसी बॅरिकेडसचं आणि सम्राट हॉटेलचं त्या वेळी खूपच जवळचं नातं होतं... मग शेजारच्या फूटपाथवरून वाट काढत मंत्रालयाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली, की उभा महाराष्ट्र त्या रस्त्यावर उतरलाय, असं चित्र दिसायचं... छातीवर बिल्ले लावलेले आणि हातात कसलेसे झेंडे घेतलेली असंख्य माणसं गर्दी करून त्या बॅरिकेडसनी बंद केलेल्या रस्त्याच्या चौकोनी तुकड्यात खच्चून जमलेली असायची आणि दुसऱ्या टोकाला तात्पुरत्या उभ्या केलेल्या एका स्टेजवर कुणीतरी नेता, जिवाच्या आकांतानं भाषण करत असायचा... गर्दीचं त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष नसायचं... मोर्चाच्या निमित्तानं मुंबईत आलेली ती गर्दी, जमेल तेवढी जिवाची मुंबई करून घेण्यासाठी धडपडताना दिसायची... गर्दी विस्कळीत होतेय, असं वाटायला लागलं की, स्टेजवरचा नेता भाषण थांबवून, डाव्या हाताची मूठ गच्च वळून, हात उंचावत जोरदार घोषणा द्यायचा... 'कोण म्हणतो देणार नाही?'... ...आणि विस्कटलेली गर्दी लगेच भानावर यायची. बसल्या जागी किंवा जिथे असेल तिथे थांबून, प्रत्येकाचा हात मूठ वळून हवेत उंच व्हायचा आणि नेत्याच्या घोषणेला जोरदार प्रतिसाद घुमायचा. ...'घेतल्याशिवाय ऱ्हाणार नाही'. चर्चगेटसमोरचं हे दृश्य आज तिथून अदृश्य झालं आहे. एकेकाळी समोरच्या रस्त्यावर जमणारी हजारो अनोळखी चेहऱ्यांची गर्दी हरवली आहे. कारण, मंत्रालयावरील मोर्चासाठी कधीकाळी हक्काची असलेली ही जागा आता फक्त रहदारीसाठी खुली आहे... हक्काचे मोर्चे आता मंत्रालयापासून लांब, आझाद मैदानावरच्या एका कोपऱ्यात गोळा होतात... तिथे जिवाच्या आकांतानं, कितीही मोठ्या आवाजात घोषणा दिल्या, तरी रस्त्यावरच्या वाहत्या गर्दीच्या कोलाहलात, घोषणांचा तो आवाज बाहेरदेखील पोहोचत नाही. मंत्रालय तर तिथून आणखीनच दूर राहिले... हक्कासाठी, न्यायासाठी निघणाऱ्या त्या मोर्चांची संख्यादेखील अलीकडे रोडावत चालली आहे. मंत्रालयावर आलेला आझाद मैदानावरचा मोर्चा आजकाल मुंबईला जाणवतदेखील नाही... पण, जनतेच्या हक्कांची जाणीव जागी रहावी, आणि त्या नावाखाली आपले नेतृत्वही जिवंत रहावे, म्हणून मोर्चे निघतातच... त्यापैकी दोन-चारजण मंत्रालयात कुणा मंत्र्याची नाहीतर संबंधित अधिकाऱ्याची भेट घेतो, मागणीचं एखादं निवेदन सरकारला सादर करतो आणि विचार करण्याचे आश्वासन सरकारकडून मिळविल्यावर मोर्चा विसर्जित होतो. ...'घेतल्याशिवाय ऱ्हाणार नाय', ही घोषणा देत पुन्हा सगळे मोर्चेकरी आपापल्या गावी परततात. हक्काचा लढा त्या दिवशीपुरता संपलेला असतो. ...स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून असे असंख्य हक्क घटनेने आपल्याला बहाल केलेले असतात. आणि त्यापासून असंख्य लोक कायमचे वंचित राहिलेले असतात. असे काही हक्क आपल्याला मिळालेलेच आहेत, आणि ते बजावणे हाही आपला हक्क आहे, याची त्यांना जाणीवदेखील नसते. म्हणूनच, स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटून गेली तरी अनेकांना अक्षरओळखदेखील नसल्याने, हक्कांचीदेखील ओळख नसते. मतदान हा आपला हक्क आहे आणि ते ठरविणे हादेखील हक्क आहे, हेदेखील अनेकांना माहीत नसते. म्हणूनच, लोकशाहीचा सर्वोच्च आधारस्तंभ उभारताना, मतदान विकत घेण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. अनेकजण गरजेपोटी आणि अज्ञानापोटी हा हक्क विकतानाही दिसतात. तरीदेखील, या गोष्टीला घटनेच्या दृष्टीने हक्क असेच म्हटले जाते... अशा हक्कांच्या लांबलचक यादीत आता आणखी एका हक्काची भर पडली आहे... शिक्षणाचा हक्क ! +++ +++ जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असे बजावणारा नवा कायदा देशात अंमलात येतो आहे. त्यामुळे, पुढच्या पाच वर्षात या देशातल्या प्रत्येक मुलाला ताठ मानेने शाळेची पायरी चढावीच लागणार आहे. शिक्षण हा त्याचा हक्क असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात, नव्या क्रांतीचे वारे वाहू लागल्याने शिक्षणाच्या हक्कासाठी तरी आता मोर्चे काढावे लागणार नाहीत. याआधीही कधी शिक्षणासाठी मोर्चे निघालेच नव्हते. 'घेतल्याशिवाय राहाणार नाही', अशी जाणीवजागृतीदेखील त्यासाठी कुणी करत नव्हते. गावागावांच्या भिंतींवर घोषणा रंगविल्या, की शिक्षणप्रसाराचे 'मिशन' साजरे झालेले असायचे. ...'रीड इंडिया' नावाची एक मोहीम अगदी अलीकडेच देशात राबविण्यात आली होती. प्रत्येक गाव साक्षर असले पाहिजे आणि प्रत्येकाला अक्षरओळख असली पाहिजे, हा या मोहिमेचा गाभा होता. त्यासाठी गावोगावीच्या घरांच्या भिंती, रस्त्याकडेचे कठडे घोषणांनी रंगले होते. आमचा गाव आता वाचू शकतो, असे ती अक्षरे जगाला सांगत होती... पण प्रत्यक्षात मात्र गळतीमुळे शाळा ओस पडल्याचेच चित्र गावोगावी दिसायचे... आता शिक्षणाचा हक्क सरकारने बहाल केला आहे. त्यामुळे या घोषणांना खरा अर्थ प्राप्त झाला आहे... दशकापूर्वीचा भारत आणि दशकानंतरचा भारत यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या जमीन-अस्मानाचे अंतर दिसणार आहे. दशकानंतरच्या भारतात, शाळा पाहिलेली नाही, अक्षरांशी खेळलेला नाही आणि भविष्याची स्वप्ने रंगविताना शिक्षणाच्या अभावाने खंतावलेला असा कोणीही दिसणार नाही, अशी या नव्या कायद्याची अपेक्षा आहे. ...पण हा हक्क बजावण्याची मानसिकता ज्यांनी समाजात रुजवायची, त्यांच्यात मात्र, नव्या हक्कनिर्मितीमुळे आणखीनच उदासीनता दाटली आहे. अनेक राज्यांमधून निधीच्या नावाने नकारघंटांचा गजर सुरू झाला आहे आणि बालकांचा हा हक्क पुरविण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोऱ्यांमधला खडखडाट वाजू लागला आहे. नव्या हक्कासाठी लागणारा हजारो कोटींचा वाढीव निधी उभा कुठून करणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच असल्याने, राज्यांच्या नकारघंटा केंद्र सरकारच्या कानावर केवळ आदळत आहेत... तरीदेखील शिक्षणक्षेत्रात एक नवी पहाट उमलू पाहात आहे. देशात राष्ट्रीय साक्षरता प्रसार मोहिमेस प्रारंभ झाला, त्याला आता तब्बल २२ वर्षे लोटली आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती साक्षर झालीच पाहिजे हे त्या मोहिमेचे उद्दिष्ट होते. त्यावेळी गावागावात झपाटल्यासारखे प्रौढ शिक्षण वर्ग आणि साक्षरता प्रसार वर्ग सुरू झाले आणि कागदोपत्री अनेक जिल्हे संपूर्ण साक्षर झाले. ही मोहीम राबविण्यासाठी वर्षागणिक सरकारी कोट्यवधी रुपये तिजोरीतून उपसले गेले. १५ ते ३५ वयोटातील सर्वांना संपूर्ण साक्षर करण्याची एक कालबद्ध मोहीम आखली गेली. खरे म्हणजे, कालबद्ध हा शब्दच या मोहिमेमुळे कालबाह्य झाला. २००१ मधील जनगणनेच्या पाहणीनुसार, देशातील ३० कोटी जनता निरक्षरच राहिली होती. मग ८ सप्टेंबर २००९ रोजी, राष्ट्रीय साक्षरता दिनी, पुन्हा नवी साक्षरताप्रसार मोहीम सुरू करण्यात आली. समाजातील साक्षर-निरक्षर भेद संपविण्यासाठी आणि विशेषत: महिलावर्गातील साक्षरताप्रसारासाठी आखलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला, साक्षर भारत असे नामाभिधान मिळाले; पण त्यामुळे आणखी एक वास्तव नव्याने उजेडातही आले आहे. देशात आजही सात कोटी महिला आणि दहा कोटी पुरुषांना अक्षरओळखच नाही... आता प्रथम अक्षरओळख, मग साक्षरता आणि निरंतर शिक्षण असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी गावोगावी लोकशिक्षा केंद्रे सुरू होणार आहेत. तीन वर्षांचा नवा कालबद्ध कार्यक्रम पुन्हा आखण्यात आला आहे. तोवर शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणीही राज्याराज्यात सुरू झालेली असेल. हक्क बजावणारी पिढी शाळेत पाढे घोकू लागलेली असेल आणि देशात शिक्षणाचे सुधारित वारे वाहू लागलेले असतील. देशातील १४ टक्के शाळांमध्ये संगणक साक्षरतेचे वारे वाहात आहेत. चंदीगडमधील ८५ टक्के, दिल्लीतील ८० टक्के, तर केरळातील ९० टक्के शाळांमध्ये मुले संगणकावर काम करताना दिसताहेत. प्राथमिक पातळीवरच ही शैक्षणिक क्रांती यशस्वी झाली, तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची गरजदेखील वाढेल. येत्या दहा वर्षांत देशात २७ हजार नव्या उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांची गरज भासेल, असा अंदाज आहे. २९९ नवी विद्यापीठे आवश्यक आहेत, तर महाविद्यालयांच्या संख्येत १४ हजारांची भर पडणे गरजेचे आहे. ही नवी आकडेवारी शिक्षणप्रसाराच्या नव्या मोहिमांच्या अभूतपूर्व यशाचे भविष्यच अधोरेखित करणारी आहे. ...राज्यघटनेने दिलेल्या अनेक हक्कांसाठी आज देशातील सामान्य जनतेला झगडावे लागत आहे. हक्कांसाठी मोर्चे काढावे लागत आहेत. आणि समाजातील अनेक घटक हक्कांपासून कायमचे वंचितदेखील राहिले आहेत. शिक्षणाचा हक्क मिळाला असला तरी तो प्रत्येकाला बजावता यावा यासाठी राज्य सरकारांची सकारात्मक भूमिका आवश्यक आहे. निधीचे कारण पुढे करून आजच अनेक राज्यांनी नकारघंटा वाजविण्यास सुरुवात केली आहे. नकारघंटांचा हा गजर वाढत गेला, तर पुन्हा हक्कासाठी निघणाऱ्या मोर्चांच्या संख्येत आणखी एका मोर्चाची भर पडेल.... शाळा आहेत तर मुले नाहीत... सर्वशिक्षा अभियानाचा पहिला टप्पा कमालीचा यशस्वी ठरल्याने केंद्र सरकारची उमेद बळावली आहे. ही बळावलेली उमेदच, बालकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारला शक्ती देईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण शिक्षणाच्या हक्काच्या या अंमलबजावणीतील उणिवांची जाणीव तरी सरकारला झालेली आहे. गेल्या वर्षभरात दोन लाख ७० हजार नव्या शाळा सुरू झाल्या, तरी त्यानंतरही देशातील २१ हजार ४१९ गावांत शाळाच नव्हत्या. एक लाख ९३ हजार शाळांना पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आली, तरी आठ हजार ४२५ शाळांमध्ये ही सोय नव्हती. दोन लाख ६३ हजार शाळांना स्वच्छतागृहे बांधून मिळाली तरी त्यानंतरही ७१ हजार शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय नव्हती. देशभरातील शाळांमध्ये भरतीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भरदार प्रयत्न सुरू असताना, ५२ हजार शिक्षकांची कमतरता मात्र कायमच होती आणि तब्बल ८० लाख मुलांनी शाळेची पायरीदेखील ओलांडलेली नव्हती. तरीदेखील, गळतीचे भयानक प्रमाण हळूहळू कमी होत होते आणि नव्या नोंदणीचे प्रमाण वाढत होते. सरकारच्या प्रयत्नांना मिळणारा हा सकारात्मक प्रतिसाद समाजातील शिक्षणाची जाणीव जागी झाल्याची साक्ष देणारा ठरल्यामुळेच, शिक्षणाचा हक्क बहाल करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. अजूनही मुली शाळेच्या बाहेर? या नव्या वाटचालीत, शिक्षणातील मुलींच्या सहभागातील अभावावर मात करायची आहे. स्त्री शिक्षणाची क्रांतिकारी सुरुवात झाल्याला शतके लोटून गेल्यानंतरही अद्याप मुलींच्या शिक्षणाला समाजात दुय्यम स्थान दिले जात असल्याने मुलींचे शिक्षण हा या हक्क जागृतीचा पहिला टप्पा ठरणार आहे. सरकार आणि शिक्षणक्षेत्रासाठी हे एक मोठे आव्हान आहे. कारण, अजूनही शाळांच्या एकूण पटसंख्येत मुलींची टक्केवारी फारशी उंचावलेलीच नाही, तर शाळेत जाणाऱ्या मुलींपैकी २७ टक्के मुलींना प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पार करण्याआधीच शिक्षणाला रामराम ठोकून घरी बसावे लागत आहे. तरीदेखील शिक्षणप्रसाराच्या मोहिमांना धिम्या गतीने दिलासादायक यश मिळत असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. पाच वर्षांपूर्वी देशातील ग्रामीण भागातील एक कोटी ३५ लाख बालकांनी शाळा पाहिलेलीच नव्हती. पाच वर्षांच्या शिक्षणप्रसार मोहिमांमुळे, आता ग्रामीण भागातील शाळाबाह्य मुलांची संख्या ८१ लाखांपर्यंत घटली आहे. देशातील सात कोटी निरक्षरांना गेल्या वर्षअखेरीपर्यंत अक्षरओळख करून देण्यात आली, त्यापैकी सहा कोटी महिला आहेत. साक्षर भारत योजनेतून ग्रामीण भागात राबविलेल्या स्त्रीशिक्षण प्रसार मोहिमेसही अपेक्षित यश आल्याचे सरकारला वाटते. जात, धर्म, पंथ आणि लिंगभेदविरहित शिक्षण हा शिक्षणप्रसार मोहिमेचा गाभा असल्याचे वर्षानुवर्षे सांगितले जात असले तरी मागासवर्गीय जनता आणि स्त्तिया हा शिक्षणक्षेत्रातही उपेक्षित असलेला वर्ग आहे. दर्जेदार शिक्षणाच्या संज्ञेत या वर्गाला सामावून घेण्याची गरज आहे. माध्यान्ह भोजन, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये आदि योजना ग्रामीण भागातील या उपेक्षित वर्गासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या ठरल्या, तर शिक्षणाचा हक्क बजावण्याची जाणीव या वर्गातही रुजेल. सर्वांना शिकवायला शिक्षक कुठून आणणार? प्राथमिक पातळीवरून माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन पातळीवरील शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर भेदरहित आणि दर्जेदार शिक्षणक्रम ही सामाजिक गरज आहे. त्यासाठी विद्यासंपन्न शिक्षकवर्ग आवश्यक आहे. आज जागतिकीकरणामुळे व्यापारीकरण आणि औद्योगीकरणाच्या वेगवान वादळात, बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उच्चविद्याविभूषितांचा मोठा वर्ग तगड्या पगाराचे आमिष दाखवून ताब्यात घेतला आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील तुटपुंज्या पगाराची नोकरी उच्चशिक्षितांच्या दृष्टीने तुच्छतेची ठरली आहे. साहजिकच, शिक्षकांचा शैक्षणिक स्तरही जागतिक शिक्षणक्षेत्राशी स्पर्धा करण्याइतका सक्षम नाही, हे वास्तव आता सामोरे आले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तर शिक्षकांचाच कमालीचा तुटवडा असल्याचे विदारक चित्र भडकपणे उघड झाले आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये, शिक्षक म्हणून काम करण्याच्या किमान पात्रतेचा वर्गच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. शिक्षक निर्माण करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांचा अभाव हे तेथील तुटवड्याचे कारण आहे. यावरून दोन बाबी विदारकपणे स्पष्ट झाल्या आहेत. पहिली बाब म्हणजे, जेथे दर्जेदार आणि सुविधायुक्त शिक्षणाची सोय उपलब्ध आहे, तेथून बाहेर पडणारा उच्चशिक्षित वर्ग मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांकडे वळत आहे, तर दुसरीकडे शिक्षकी पेशासाठी आवश्यक असलेल्या किमान शिक्षणसुविधांपासूनदेखील तरुणांचा मोठा वर्ग वर्षानुवर्षे वंचित राहिला आहे. देशाच्या एका कोपऱ्यात एक आशादायी चित्र, तर दुसरीकडे कुठे अत्यंत निराशाजनक चित्र, असे दुहेरी वास्तव एकाच वेळी सामोरे आल्याने, शिक्षणाचा हक्क देशात सर्वांना सारख्याच प्रमाणात कसा बजावता येईल, हे एक मोठे प्रश्नचिन्ह घेऊनच नवा कायदा अस्तित्वात येतो आहे. +++++++++++++++++++++

Thursday, April 1, 2010

एकदा ‘रान’ पेटलं...

एकदा एक कवी, म्हणाला, मलापण ‘पद्मश्री’ हवी... आणि ‘रान’ उठलं. वयोमानामुळे भान सुटलं, म्हणालं.
तू ‘जनस्थान’ मिळव, नाही तर ‘ज्ञानपीठ’ मिळव.
तुझा राजकारणाशी संबंध काय? ‘मातोश्री’चा शेजारी, एवढाच ना तुझा पत्ता? पावसाच्या नावानं धो-धो कविता पाडल्यास, म्हणून ‘रानाशी नातं’ नाही जुळत... त्यासाठी, रानकळा सोसाव्या लागतात.
रानातल्या एअर कंडिशन्ड घरात, हुरड्याची कणसं चाखवत, ‘जाणत्या राजा’ला रानाचं कवतिक ऐकवावं लागतं... राजकारणाचं बोट धरून रानातल्या कविता कॊंक्रीटच्या जंगलात दिमाखात फिरू लागल्या, की पद्मश्री मागून चालत येते...
तुझ्या इमारतीच्या टीचभर अंगणात, आहे असं, माझ्यासारखं रान?
खिडकीच्या चौकोनी तुकड्यातनं दिसणारं पानगळीचं एखादं पिवळट झाड, हा तुझा निसर्ग...
त्याच चौकटीतून पडणारा पाऊस न्याहाळत तू ओळी ‘पाड’ल्यास, तेव्हा रानातलं ‘गाव’ हसत होतं... ‘कर’ म्हणालं, हवं ते.
...रानाचा ‘पापड’ मोडला नाही तेव्हा !
... पण पद्मश्री हवी म्हणालास, तेव्हा रानानं तुझी बुल्गानी बोलती बंद केली.
आणि ‘पानकळा’ उजळून गेल्या. अगदी, फुकटात... या उजेडाला का पैसे पडतात ?
अरे, हे रान मातीनं माखलं, त्यानं जुंधळ्यावर चांदणं पेरलं... रानाची गाज राजाला ऐकवली...
... पण, अंधाराच्या दारी उजेड पाठवायचा निरोप
सूर्यदेवाला दिला, तेव्हा त्याला कुठे माहीत होतं, खरा सूर्यदेव कोण आहे?
दिवा लावून दादांनी हातात ‘मेणबत्ती’ दिली, तेव्हा रानाच्या पानकळा त्याच मिणमिणाटात कोमेजल्यागत निपचीत पडल्या...
तेव्हा जुंधळ्यावर पेरलेलं चांदणं, कुत्सितासारखं हसत होतं...
अंधारात चाचपडणार्‍या घरावर निसर्गाची निष्पर्ण सावली नाचत होती...
कुणी ‘फोडणी’च्या चारोळ्यांची पार्टी केली,
कुणी नुस्तेच ‘फुटाणे’ चापले...
‘पद्मश्री’चा फोटो अंधारात लटकायला लागला, तेव्हा खर्‍या सूर्यदेवाची ओळख रानाला पटली.
अंधार पडला, की तो आकाशातला सूर्यसुद्धा, लपूनच बसतो... तो कुठून पाठवणार अंधारलेल्या दारात उजेडाचा कवडसा?
... पण हे चालणार नाही.
रान आता पेटून उठलंय... आता चांदण्याचा मिणमिण उजेड नकोय... रानाला लखलखाट हवाय... तो तर त्याचा हक्कच आहे...
कारण, रानालाच ‘पद्मश्रीचं कुंपण’ आहे...
(१ एप्रिल!!!)
----------------------------

Wednesday, March 31, 2010

दरवळ !...

... कॉम्प्युटरमधला `ई-मेल'चा `इनबॉक्स' भरून वाहू लागला, की, नको असलेले काही ई-मेल `डिलीट' करून टाकावे लागतात. मग ते पुरते पुसले जातात. पुन्हा उघडू म्हटलं, तरी सापडत नाहीत. कालांतराने, मेलबॉक्स पुन्हा वाहू लागतो, आणि पुन्हा तेच करावं लागतं... नको असलेले मेल पुसून टाकणं ! जेव्हढं हवं, तेव्हढंच मेमरीमध्ये ‘सेव्ह’ करून ठेवायची सोय कॉम्प्युटरमध्ये करताना, माणसाचा मेंदूच विज्ञानाच्या डोळ्यासमोर असावा...
पण मेंदूची बातच अलग असते...
तिथल्या ‘आठवणींच्या कप्प्या’तली, कुठलीच गोष्ट ‘डिलीट’ होत नाही, आणि पुसलीही जात नाही... कितीही नव्या आठवणींची भर या ‘इनबॉक्स’मध्ये केली, तरी तो ’ओव्हरफ्लो’ होत नाही...
पण, आठवणीच्या त्या कप्प्यात, आपल्या नकळत ‘सेव्ह’ होऊन राहिलेलं, काहीतरी, कुठल्यातरी निमित्तानं असं एक्दम चमकून बाहेर येतं, आणि आपणच चमकून जातो...
`नॉस्टाल्जिया'!...
आठवणीतून पार पुसली गेलेली ती गोष्ट त्या कप्प्यात अजूनही जागी आहे, ही जाणीवच मग मन सुखावून टाकते...
नुसती जागी असते नव्हे, ती तितकीच ताजीतवानीही असते... पुन्हा ती समोर आली, की मगच हे लक्षात येतं...
... आणि, नकळत, सहजपणे आपण आठवणींमध्ये रमून जातो.
भूतकाळातलं, ते पुसलंपुसलं वाटणारं इतकं ताजंताजं असतं, की आपलं आपणच थक्क व्हावं...
मग त्याला जोडले गेलेले आठवणींचे बाकीचे पदरही हळूच उलगडत जातात...
... काळाचा पडदा आपोआपच बाजूला होत जातो.
आणि वर्तमानच विसरायला होतं!
... लहानपणी एखाद्या गावात आपण राहिलेलो असतो, मोठेपणी, खूप वर्षांनी कधीतरी तिथे जायचा योग येतो. तेव्हा मनाची मोहोरलेली अवस्था अनुभवली नाही, असा कुणी असेल?
तिथल्या गल्लीबोळांतून फिरताना, लहानपण पुन्हा जागं होतं.. एखाद्या गल्लीतला एखादा दगडही आपल्याशी ओळखीच्या खाणाखुणा जाग्या करतो... अगदी, रस्त्यावरून चालताना, तेव्हा, आपल्या लहानपणी असलेल्या एखाद्या खड्ड्याच्या त्या जागेवरून आजही, आपला पाय सहजपणे उचलला जातो, आणि आपण चमकून खाली पाहातो...
खरंच, तो खड्डादेखील तिथेच असतो... आपल्याशी नजरानजर होताच तोही ओळखीचं हसतो.
... आणि आपल्याला जाणवतं, अरे, हे आपल्या आठवणीत होत?... तितकंच ताजं?...
---- ---- -----
... आज मला पुन्हा हे सगळं लख्खपणे अनुभवायला मिळालं.
तुम्हालाही तो अनुभव यावा, म्हणून ते लगेच लिहायला घेतलं
... लहानपणी बाजारपेठा आजच्यासारख्या देशी-विदेशी `व्हरायटीज'नी अशा खचाखच भरलेल्या नसायच्या... अगदी काडेपेटीसुध्दा, फक्त ‘विमको’चीच असायची.
आणि, सिग्रेट, पिवळा हत्ती, चारमिनार...
... गावातल्या शाळेत एसएससी झालं, की, कॉलेजसाठी शहर गाठावं लागायचं.. तेव्हाची ती पत्र्याची ‘ट्रंक’... आज नसेल, पण अजूनही लख्ख आठवते ना?...
त्या ट्रंकेतल्या एका ‘अपरिहार्य’ वस्तूनंच आज मला ‘नॉस्टाल्जिक’ केलं...
आजचा पेपर चाळताना, डाव्या पानावर एका कोपर्‍यातल्या एका चौकटीकडे माझं लक्ष गेलं...
‘मीना खाकी फेस पावडर’चे संस्थापक, मोरेश्वरकाका पोतदार यांच्या निधनाची जाहिरात होती...
आणि खाकी पावडरचा तो ‘पुडा’ एकदम मेंदूतल्या आठवणींच्या कप्प्यातून बाहेर आला...
तितकाच ताजातवाना...
नाकात तो वासही क्षणभर दरवळून गेला... तितकाच फ्रेश ! त्या पुड्यातली चिमूटभर पावडर तळव्यावर घेऊन दोन्ही तळवे एकमेकांवर घासताना जाणवणारा तो थोडासा खरखरीतपणाही पुन्हा जाणवला.
...आणि, मी नकळत दोन्ही तळवे चेहेर्‍यावर घासले... खराखरा...
एक क्षणभर एकदम ‘फ्रेश’ वाटून गेले...
कप्प्यातल्या कोपर्‍यातल्या, त्या पुसल्यापुसल्या वाटणार्‍या, पण टवटवीत, ताज्याताज्या असलेल्या आठवणीसारखेच!
काका पोतदार नावाचा कुणी ती खाकी पावडर तयार करायचे, ते आज समजले...
आणि तिचा दरवळ पुन्हा घुमला...
----------------

Wednesday, March 10, 2010

सूर्याची सावली...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'... एवढे तीनच शब्द तो बोलला, आणि दोन्ही बाजूंचं बोलणं जणू खुंटून गेलं. माझी झोप उडाली होती. 'काय?'... मी कसाबसा प्रश्न केला. 'आत्ता, तासाभरापूर्वी... मी आत्ताच चित्रकूटला फोनवर बोललो.' पलीकडून भाऊ म्हणाला, आणि फोन बंद झाला. बरोब्बर पाच वर्षांपूर्वी, २००४ च्या जानेवारीत भारतात आलो असताना चित्रकूटला गेलो होतो. अमेरिकेत गेल्यापासून नानाजींशी फोनवर खूपदा बोलणं व्हायचं. त्यांचा स्वर, पूर्वीइतकाच टवटवीत वाटायचा... पण त्या प्रत्यक्ष भेटीत नानाजी थोडे थकलेले वाटले. त्याच्या आदल्या वर्षीही मुंबईला आल्यावर मी नानाजींच्या भेटीसाठी चित्रकूट गाठले होते. तेव्हा वयाच्या ८८ व्या वर्षीही ते उत्साही होते. चित्रकूटच्या आसपासच्या खेड्यांमध्ये सुरू असलेलं काम पाहायला मी निघालो, तेव्हा नानाजी दरवाजात उभे होते. वर उन्ह तळपत होतं. मी जीपमध्ये बसलो, आणि नानाजी अचानक म्हणाले, 'थांब, मीपण येतो तुझ्याबरोबर'... मी काही म्हणेपर्यंत नानाजी गाडीतही बसले होते. चित्रकूटपासून २० किलोमीटरवरच्या एका गावातला प्रकल्प पाहताना नानाजींच्या डोळ्यातलं समाधान मला जाणवत होतं... पण त्याच्याच पुढच्या वर्षीच्या त्या भेटीत, नानाजींचं ८९ वर्षांचं शरीर फारशी साथ देत नसावं, असं मला उगीचच वाटून गेलं. 'नानाजी, तुम्ही थकलात'... मी अस्वस्थपणे बोलून गेलो. गेल्या ३५ वर्षांतल्या थेट आणि अप्रत्यक्ष सहवासातली सगळी माया आपल्या संथ डोळ्यांनी पुन्हा माझ्यावर उधळली, आणि ते फक्त हसले. 'रमेश, आणखी पाच वर्षं मला काही होणार नाही... अजून दोन प्रकल्प पूर्ण व्हायचेत'... बसल्या जागेवरूनच दूरवर कुठेतरी पाहत नानाजी म्हणाले. ... आज नानाजी गेल्याच बातमी कळली, आणि मला नानाजींचं ते वाक्य स्पष्ट आठवलं. मी सहज तारखेचा हिशेब केला. ...त्या संवादाला पाच वर्षं पूर्ण झाली होती. ...१९७७ सालच्या सत्तापरिवर्तनाच्या काळात अनपेक्षितपणे माझा नानाजींच्या विश्वात प्रवेश झाला. संगमनेरच्या कॉलेजातून बाहेर पडल्यानंतर मुंबईत दाखल होऊन इंडियन एक्स्प्रेसमध्ये रिपोर्टर म्हणून मी नोकरीला लागलो होतो. एका रात्रपाळीनंतर तिथल्याच टेबलावर झोपलो असताना कानाशेजारचा फोन वाजला, आणि बातमीदाराच्या 'पहिल्या व्रता'ची जाणीव होऊन मी तो उचलला. 'कोई रिपोर्टर है उधर?'... पलीकडून विचारलं गेलं. मी त्रासलो होतो. पण उत्तर दिलं. 'हां, मै रिपोर्टर हूँ... आप कौन?'... 'मै रामनाथ गोयंका बोल रहा हूँ... उपर आओ. नानाजी देशमुख यहाँपर आये हुए है, उनका इंटरव्ह्यू करो'... इंडियन एक्स्प्रेसच्या प्रत्यक्ष मालकाचाच आदेश ! पाचदहा मिनिटांतच मी तयार होऊन एक्स्प्रेस टॉवरच्या पेंट हाऊसमध्ये दाखल झालो. आजपर्यंत केवळ बातमीत वाचलेले, फोटोत पाहिलेले नानाजी समोर बसलेले होते. पुढच्या काही मिनिटांतच माझा नवखेपणा संपला. मुलाखत झाली, आणि दुसऱ्या दिवशीच्या इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्तामध्ये ती प्रसिद्ध झाली. मी घरी अंक चाळले, तेव्हा उगीचच धडधड वाढली होती. संध्याकाळी पुन्हा रात्रपाळीला आलो, तेव्हा टेबलावर माझ्यासाठी एक चिठ्ठी होती- 'मुलाखतीबद्दल धन्यवाद, नाना देशमुख'... नंतर पुन्हा महिनाभरानंतर वीरेन शहा यांचा फोन आला. नानाजी त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते. मी त्यांना भेटायला नरीमन पॉईंटच्या मुकंद आयर्नच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. ...आणि एक नवं वळण मला नानाजींच्या जवळ घेऊन गेलं. त्या दिवशी नानाजींनी मला त्यांच्याबरोबर काम करावं असं सुचवलं, आणि मी गडबडलो. वीरेन शहांकडे पाहिलं. त्यांचे डोळे कौतुकानं भरले होते... 'अभी सोचो मत... नानाजी अगर मुझे ड्राईव्हर बनाकर ले जाते, तो भी मै तैयार हूं'... वीरेन शहा म्हणाले, आणि माझी तयारी झाली. दुसऱ्याच दिवशी मी दिल्लीत, 'दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या भव्य इमारतीत सहाव्या मजल्यावर नानाजींच्या खोलीत भारतीय बैठकीवर त्यांच्यासोबत कामाची आखणी करत होतो. त्या भेटीत नानाजी मला नीट उमगले. एक कौटुंबिक स्नेहाचा धागा तिथे सापडला, आणि आपण एका 'सूर्याच्या सावली'खाली आलो आहोत, या जाणिवेनं मला धन्य धन्य झालं... मी गोंडा जिल्ह्यातील नानाजींच्या प्रकल्पावर दाखल झालो. माझ्यासारखे आणखीही काही पदवीधर या प्रकल्पावर झोकून देऊन काम करत होते. प्रत्येकाला १५ लहान खेडी वाटून दिली होती. गांधीजींच्या स्वप्नातला स्वयंपूर्ण भारत निर्माण करण्याचा पहिला प्रयोग या खेड्यांमधून सुरू होणार होता. नंतरच्या दिवसांत नानाजींची असंख्य रूपं मला फार जवळून पाहायला मिळाली. चौधरी चरणसिंहांना सुनावणारे नानाजी, संस्थेच्या कामातले अडथळे केवळ एका फोनवर सहज दूर करणारे नानाजी, जेआरडी टाटांना आपल्या रचनात्मक कामाचं महत्त्व पटवून देणारे नानाजी, सत्तेतल्या भल्याभल्यांना खडे बोल सुनावून कापरं भरवणारे नानाजी, जयप्रकाशजींची सेवा करणारे नानाजी, राजकारणातले चाणक्य नानाजी, पोलादी पुरुष नानाजी, इंदिरा गांधींच्या नजरेतले खतरनाक नानाजी, संध्याकाळी प्रकल्पावरच्या एखाद्या गावातल्या शेतकऱ्याच्या घरात घोंगडीवर बसून स्नेहानं त्यांच्याशी गप्पा मारणारे नानाजी, आणि रात्री आपल्या खोलीत परतल्यावर जमिनीवरच्या लहानशा गादीवर पहुडताच निरागसतेने झोपी जाणारे नानाजी... ...एकदा नानाजी काही कामानिमित्त आठदहा दिवस बाहेर जाणार होते. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला बोलावलं. 'रमेश, एक महत्त्वाचं काम आहे. हे पत्र तातडीने रामनरेश यादवांना मिळायला हवं. तू स्वत: ते त्यांना नेऊन दे'... पत्राची घडी पाकिटात बंद करून ते माझ्या हातात देऊन नानाजींनी सांगितलं, आणि मी मान हलवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच नानाजी प्रवासाला निघाले होते. मी उठलो, आणि लखनऊला जाण्यासाठी रेल्वे तिकीट किंवा विमानाचं बुकिंग मिळतं का याची चौकशी सुरू केली. पण त्या दिवशी रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट मिळालंच नाही. विमानाचं तिकीटही मिळालं नाही. तो दिवस तसाच गेला. नानाजींनी दिलेलं ते पत्र खिशात व्यवस्थित आहे ना, हे मात्र मी वारंवार पाहत होतो. महत्त्वाचं पत्र आहे, असं त्यांनीच सांगितलं होतं. दोन दिवसांनंतरचं रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट मिळालं, आणि मी लखनऊला गेलो. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री रामनरेश यादव भेटलेच नाहीत. ते त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाहेर कुठे होते. मी पत्र तसंच सांभाळत परतलो. नानाजींनी परत आल्यानंतर पहिला प्रश्न मला त्या पत्राविषयीच केला, आणि मी जसं घडलं, तसं सांगून टाकलं. तेव्हाही आपल्या संथ नजरेनं, आणि संयत स्वरांत नानाजींनी मला कामाचं महत्त्व पटवून दिलं होतं. 'आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडताना, पहिल्या वर्गाचा रेल्वे प्रवास किंवा विमानप्रवासाचा विचार करण्याऐवजी रेल्वेत उभ्याने प्रवास करून तू पोहोचला असतास, तर मला बरं वाटलं असतं.' एवढंच ते म्हणाले. आणि तो प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. नानाजींच्या चित्रकूट प्रकल्पाची तेव्हा नुकतीच उभारणी सुरू होती. पाच वर्षांपूर्वी मी तिथे गेलो, तेव्हा साहजिकच माझी नजर विस्फारली होती. सकाळी चित्रकूटच्या रेल्वेस्थानकावर उतरलो. नानाजी नाश्त्याला माझी वाट पाहत थांबलेच होते. जुन्या मंदिरालगतच्या एका जुन्याच घरात नानाजींचं कार्यालय आणि घर वसलं होतं. पाठीमागे मंदाकिनी नदीचा घाट आणि समोर गर्द पर्वतरांगा... आसपास मैलोन्मैल पसरलेला चित्रकूटचा हिरवागार चमत्कार... नानाजींच्या कर्तृत्वातून हे नंदनवन उभं राहिलं होतं. वास्तुकलेचा अप्रतिम नमुना ठरलेल्या देखण्या इमारती, हिरवाईनं तरारलेले बगीचे, संथ, आश्वस्त तलाव, कारंजी... नानाजींच्या कल्पकतेतून उभ्या राहिलेल्या या नंदनवनात नानाजींचं नाव, फोटो किंवा पुतळा कुठेही नव्हता... एका बाजूला सुसज्ज असं आयुर्वेदिक आरोग्यधाम, दुसरीकडे विशाल भूभागावर उभं राहिलेलं उद्यमीता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाला, गुरुकुल, दंतचिकित्सा इस्पितळ, ग्रंथालय, मातृसदन, गोशाळा आणि आधुनिक शेतीचे असंख्य प्रयोग अनुभवणारी शेकडो एकर शेतजमीन, उद्याने, नौकाविहार आणि चित्रकुटाचा उद्धार करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं जीवनमूल्यदर्शन घडविणारं राम दर्शन... शेकडो एकर जमिनीवरची ही निर्मिती सामान्य माणसाच्या जीवनाला स्पर्श करणारी आहे. दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानववाद आणि महात्मा गांधींचं अंत्योदयाचं स्वप्न इथे हातात हात घालून एकत्र नांदतं आहे. ३५ वर्षांपूर्वी नानाजींच्या डोळ्यात दिसणारं स्वप्न इथे अवतरलेलं मी अनुभवत होतो... त्यांच्या अथक आत्मविश्वासातून एक दिव्य काम उभं राहिलं होतं, आणि त्याचा साक्षीदार व्हायचं भाग्य मला मिळालं होतं. ... माझं लग्न ठरलं, तेव्हा नानाजींनी पालकत्वाची जबाबदारी घेतली. निमंत्रणपत्तिकेवर 'आरएसव्हीपी' म्हणून नानाजींनी स्वत:चं नाव घातलं होतं, आणि माझ्या वडिलांच्या बरोबरीने लग्नाला येणाऱ्यांचं ते आतिथ्य करत होते... नानाजींसारखा एक सूर्य माझ्यावर सावली धरून वावरतोय, याचा मला गेली ३५ वर्षं अभिमान वाटत राहिला.. परवा ती सावली संपली. -रमेश

Tuesday, February 2, 2010

चार वर्षांत ६९ धाडी...

अन्न व औषधी द्रव्ये हे खाते सामान्यजनांच्या जीवनाशी निगडीत असून त्यांना अन्न आणि औषधे या दोन्ही वस्तू भेसळमुक्त मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी राज्य शासन अन्न भेसळ औषधी द्रव्ये व सौदर्य प्रसाधनाच्या कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करणार आहे. या खात्याच्या माध्यमातून अन्न व औषधाची गुणवत्ता राखण्याचे काम प्रशासनातील अधिकारी प्रभावीपणे करत आहेत. याविषयी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री मनोहर नाईक यांनी `महान्यूज'या राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या `पोर्टल’ला दिलेली माहिती :

अन्न निरीक्षक लोकांना अन्न देणार्‍या आस्थापनांची नियमितपणे तपासणी करून तेथील अन्न पदार्थांचे नमुने परिक्षणासाठी पाठवितात. अन्न विषबाधा प्रकरणांचीही या विभागामार्फतच चौकशी करण्यात येते कोणताही विनापरवाना अन्न उद्योग घटक तसेच भेसळयुक्त पदार्थ शोधून कामे आदी कामेही या विभागाला करावी लागतात मग जनसामान्यांशी निगडीत दूध भेसळ असो किंवा अन्न भेसळ असो ती नियंत्रित आणण्यासाठी अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे भेसळखोरांमध्ये जरब निर्माण झाली आहे असे मला वाटते.

महाराष्ट्राच्या विविध न्यायालयात या कायद्यांतर्गत दहा हजारांच्यावर खटले प्रलंबित असून त्याचा लवकरच निपटारा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे खात्याचा पाठपुरावा चालू आहे. ऍलोपॅथीक, आयुर्वेदीक, होमीओपाथी आणि युनानी आदी औषधांची आणि सौदर्य प्रसाधनाची गुणवत्ता तपासण्याचे कामही अन्न निरिक्षक करीत असतात. औषधाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन त्यांची चाचणी करण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठवून त्याची नियमितपणे अंमलबजावणी केली जाते. गेल्या चार वर्षात सुमारे २७ हजार १३८ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यातील २६३५ नमुने अप्रमाणित म्हणून घोषित करण्यात आले आहेत, तर २०२८ प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली ६०७ प्रकरणी न्यायालयात खटले दाखल केले आहेत.

माझ्या विभागाचा गुप्तवार्ता विभागही सातत्याने पाळत ठेवून भेसळयुक्त अन्न, तेल व सौंदर्य प्रसाधने या उद्योगावर लक्ष ठेवून असतो. या विभागाने गेल्या चार वर्षात ६९ धाडी टाकून २ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. माझ्या नियंत्रणाखालील हा विभाग यापुढेही अत्यंत दक्ष राहून जनतेला शुद्ध अन्नधान्य, तेल, सौंदर्यप्रसाधने मिळतील यासाठी सतत प्रयत्नशील राहील अशी मी ग्वाही देतो.

(‘महान्यूज’च्या सौजन्याने....)