Monday, December 6, 2010

प्रश्न आणि उत्तर...

मला एक वाईट खोड आहे.
बसमध्ये बसलेली अनेक माणसं विंडो सीट मिळाली, की कानाला ईयरफोन लावतात, आणि मस्तपैकी डुलकी काढतात.
मी मात्र, खिडकी मिळाली की रस्त्यावरचा कोपरान कोपरा उगीचच न्याहाळत बसतो... आणि, कधीच नवीन काहीच पाहायला मिळत नाही.
मुंबईच्या नेहेमीच्या रस्त्यावर रोज नवीन काय दिसणार म्हणा...
तेच, फेरीवाल्यांनी पॅक केलेले फूटपाथ, एखाद्या मोकळ्या जागेत सुस्त पडलेलं एखादं गलेलठ्ठ कुत्रं, भरभरून वाहाणारी कचरा कुंडी, उघडीवाघडी पोरं, बाजूनं चालणार्‍या प्रत्येकाचं पुढे पडणारं प्रत्येक पाऊल न्याहाळणारा मोची, कळकट, लक्तरलेल्या कपड्यातला, अस्ताव्यस्त वाढलेल्या केसांचा, भयाण, शून्य नजरेनं आसपासच्या गर्दीसमोर आशाळभूतपणे हात पसरणारा एखादा भिकारी...
कुठेतरी, रस्त्याकडेच्या फूटपाथवर दोन झाडांना बांधून केलेला जुनाट साडीचा पाळणा, आणि त्याच्या पातळ, पारदर्शकपणातून दिसणारं, आपल्याशीच खेळणारं, हातपाय चोखत जगाच्या अस्तित्वाचीही जाण नसणारं एखादं तान्हं... त्याच्या बाजूला राखणदारासारखं पहारा देणारं भटकं कुत्र...
एखाद्या आडोशाला अंगाभोवती फाटकीतुटकी कापडं गुंडाळून सिगारेटच्या चांदीवरची पावडर हुंगणारं गर्दुल्यांचं टोळकं, नाहीतर, भर उन्हात, तर्र होऊन वाकडातिकडा पडलेला कुणीतरी दारुडा... त्याच्या शेजारी, संधीची वाट पाहात त्याच्या ’खिशा’वर नजर खिळवून बसलेला कुणीतरी गर्दुल्या, एखाद्या कोपर्‍यात, पान खाऊन रंगवलेल्या ओठांची, खाकी पावडरचा मेकप केलेली, काजळानं डोळे माखलेली आणि ’नकली सोन्या’नं अंगभर मढलेली, भडक साडीतली, तरुणपण हरवलेली, भिरभिरत्या नजरेनं ’गिर्‍हाईक’ शोधणारी कुणीतरी...
आणखीही कितीतरी... तेच तेच!!
... तरीही मी बसमधून प्रवास करताना हे सगळं न कंटाळता पाहात बसतो.
... कहीतरी, काहीतरी वेगळं, नवं दिसेल या आशेनं!
अजून तरी यापेक्षा वेगळं काही दिसलं नाही.
पण परवा मला यातलंच एक वेगळेपण चमकल्यासारखं दिसून गेलं...
... ही माणसं अशी कुत्र्यामांजरासारखी, दुसर्‍या जगातलं असल्यासारखी, का राहातात?
आपल्या, लिहित्यावाचत्यांच्या, नोकरीधंदेवालांच्या, घरदारवाल्यांच्या दुनियेशी त्यांचा काहीच संबंध का नसतो?
सध्या देशभर जनगणना- शिरगणती- सुरू आहे...
ही माणसं कोणाच्या खिजगणतीत तरी असतील?...
किती असतील अशी माणसं?...
कुणालाच माहीत नसेल. अगदी, रस्त्यावरच्यांसाठी ’समाजकार्य’ करणार्‍या एखाद्या ’एनजीओ’कडेही, याचं रेकॊर्ड नसेल...
पण, ती माणसं तसं हौसेनं नक्कीच राहात नसावीत.
अस्वच्छपणा, गलिच्छपणा, कुणाला स्वभावत: आवडत नाही. अगदी, कचराकुंडीजवळ जगणार्‍या त्या अस्तित्वहीनांनापण...
मी हे खात्रीनं सांगतोय...
... आता मी मुद्द्यावर येतो.
... त्या दिवशी बसमधून येताना, माझी ही खात्री झाली.
... अत्यंत फटके, कुठूनही उघडे पडलेले, रंगावर काळीकुट्ट पुटं चढून मूळचा रंग हरवलेले कपडे घातलेला, भुकेनं किंवा नशेनं, उभं राहण्याचं त्राण हरवलेला, हातापायांच्या केवळ काड्या झालेला... असाच भयाण, शून्य डोळ्यांचा एक मानवी जीव- त्याला माणूस म्हणणं मला शक्य होत नाहीये.- सिग्नलजवळ रस्त्याकडेला अशक्तपणे उभा होता...
बस थांबली, तसा त्यानं केविलवाणा चेहेरा करून हात पसरत दोनचार खिडक्यांशी भीक मागायचा प्रयत्न केला. पण नंतर तो बहुधा थकला असावा. निमूटपणे रस्त्याकडेला गेला...
माझं सवयीनुसार लक्ष होतंच.
त्यानं खांद्यावरचं एक मळकट फडकं हातात घेतलं... त्याचा बोळा केला, आणि तो खाली बसला.
त्या बोळ्यानं त्यानं जमिनीचा लहानसा तुकडा साफ केला...
धुळीचा एक कणही त्यानं तिथे राहू दिला नाही. मग थोडा मागं झुकला... मान वाकडी करून त्यानं ती स्वच्छ झालेली जागा न्याहाळली, आणि समाधानानं मान हलवत तो त्या स्वच्छ जमिनीवर टेकला...
... हेही दृष्य मी पहिल्यांदाच पाहिलं असेल असं नाही...
पण त्या वेळी मात्र, मी चमकलो.
कशाला हवी त्याला स्वच्छता?... तो स्वत: तर इतका गलिच्छ, मळलेला, मूळचा चेहेरादेखील धुळीनं हरवलेला होता.
तरीही बसायच्या जागेवर त्यानं लख्ख सफाई केली होती...
म्हणजे, त्याला स्वच्छता आवडत होती.
अस्वच्छतेचा त्यालाही तिटकारा होता...
पण, परिस्थितीनं त्याला तसं राहाणं भाग पाडलं असावं, हे स्वच्छ होतं...
मला त्याच्या त्या कृतीचं तेव्हा हसू आलं होतं... इतका मळकटलेला तो, बसण्यासाठी जागा साफ करतोय, ह्या विरोधाभासाचं हसू...
मी विचार करू लागलो... ह्या विरोधाभासाचाच.
उत्तर मिळालं... पण ते कश्या शब्दांत सांगायचं ते कळत नाहीये.
---------------------------

Sunday, December 5, 2010

लोककलेचा गारुडी...

... ‘जांभूळ आख्यानमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले, आपल्या अस्सल मराठमोळ्या शाहिरी बाजाच्या कलाकारीतून लोकसंगीताचा सुगंध देशभर पसरविणारे आणि ‘लोकसंगीताचे चालतेबोलते विद्यापीठ' म्हणून उभ्या महाराष्ट्राच्या आदराचे स्थान असलेले लोकशाहीर विठ्ठल गंगाराम उमप गेले...
क्लावंतांचं आयुष्यच खडतर असतं... वर्षानुवर्षे घरासाठी वणवण करणाèया या लोककलेच्या उपासकाला महाराष्ट्रात वयाच्या ८० व्या वर्षानंतर घर मिळाले, पण त्या घराचं सुख फार काळ त्यांना उपभोगता आलं नाही. १९३१ मध्ये मुंबईच्या एका चाळीत जन्मलेल्या, वयाच्या आठव्या वर्षीपासून कलागुण सादर करणाèया विठ्ठल उमप यांना कलेच्या उपासनेत कधी प्रोत्साहन मिळालं नाही.

‘नाचण्यापेक्षा शाळा शिक' हा वडिलांचा आग्रह मोडून त्यांना आपल्यातील कलाकार जोपासला आणि अथक परिश्रमाने जिवंतही ठेवला. म्हणूनच त्यांच्या ‘जांभूळ आख्यान'नं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं. लडिवाळ, मोहक हावभाव, नाजूक नेत्रकटाक्ष आणि देहभान हरपून द्रौपदीच्या मनाचं हळुवार स्पंदन रसिकांसमोर मांडणारे ‘जांभूळ आख्यान’ असो, ‘माझी मैना गावाकडं राहिलीङ्क म्हणणारा ठसकेबाज ‘छक्कड’ असो, ’तुमडी’ असो, ’नाखवा’ असो, नाही तर एका हाती तलवार आणि दुस-या हाती ढाल घेऊन बहिर्जी नाईक याचा मावळ्यांना दिलेला सांकेतिक संदेश असो... शाहीर उमप यांनी प्रत्येक क्षण जिवंतपणे रसिकांसमोर उभा केला...
राज्याच्या ग्रामीण भागातील लोककला आपल्या एकपात्री अभिनयाने जिवंत करणा-या लोकशाहीर उमप यांनी या जांभूळ आख्यानाचे ५०० हून अधिक प्रयोग केले, भारुड लोकप्रिय केले, आणि आपल्या ‘बोली’ आणि ‘देहबोली’तून लोककलेचा अस्सल बाज रसिकांना सादर केला. त्यांच्या मोजक्याच गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. पण प्रत्येक ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘फू बाई फू, ये दादा आवार ये, बाजीराव नाना हो बाजीराव नाना, फाटकी नोट मना घेवाची नाय, ही गाणी ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रत्येक सभा, समारंभास शोभा आणणारी ठरली...
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्यासाठी राज्यभर दौ-यामागून दौरे करणा-या शाहीर उमप यांनी एक हजारांहून जास्त गाणी गायली आणि अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या. खंडोबाचं लगीन, गाढवाचं लगीन या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. ‘टिंग्या’ या चित्रपटातील उल्लेखनीय भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला होता. आयर्लंडमधील कॉर्क येथील आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवातील पहिला पुरस्कार, श्याम बेनेगल यांची भारत एक खोज, जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. १९८९ मध्ये राजीव गांधी यांच्या ‘अपना उत्सव’मध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले. देश विदेशात त्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि नियोजन आयोगाच्या सांस्कृतिक व्यवहार विभागाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. लोककला जिवंत रहावी यासाठी तरुणांनी या परंपरेचा अभ्यास करावा असे आवाहन ते सातत्याने करीत राहिले. बदलत्या जगात जनतेच्या आवडी बदलत आहेत, आणि लोककलेची उपेक्षा होत आहे, ही त्यांची खंत होती. ही कला जिवंत राहावी, ही तळमळ लोकशाहीर उमप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली, आणि कलेची उपासना करतच शेवटचा श्वास घेतला.