Sunday, May 14, 2023

माझी आई....

 चौदा वर्षांपूर्वी, ६ डिसेंबर २००८ या दिवशी आमच्या आईने निरोप घेतला, आणि वडिलांच्या- दादांच्या- पाठोपाठ चार वर्षांनी तिनेही अज्ञाताचा प्रवास सुरू केला...

त्या दिवशीच्या या क्षणाची आठवण काळजात एक कळ उमटवून गेली...
... आणि ‘आई शोधताना’, तो, जुना लेख समोरही आला!
***
आई...
तब्बल दहा वर्षं या शब्दाचा कल्पनाविस्तार करण्याचा मी प्रयत्न करतोय. हजारो विचारांचे गुच्छ त्यासाठी आनंदाने समोर येऊन हात जोडून उभे राहात होते. “आम्हालाही वापर..” म्हणत!
पण काय होत होतं माहीत नाही. आपल्याकडे शब्दांचा पुरेसा साठा नाही, असंच सतत वाटत राहायचं.
आज, या क्षणालाही तसंच वाटतंय.
पण तरीही ठरवलं.
डोळे मिटून लिहायचं.
जमेल, आठवेल, सुचेल तसं लिहीत जायचं.
आणि शब्द संपले, की त्या क्षणी, तिथे थांबायचं.
तसंही, यावर लिहिताना, भल्याभल्यांना शब्द सापडत नाहीत. मग, आपलीही तशीच अवस्था झाली, तर शरमायचं काहीच कारण नाही.
असा विचार केला, आणि धीर आला.
बसलो लिहायला....

------
“या घरात मनाला खूप शांति वाटते... इथे बनविलेल्या साध्या पदार्थालाही वेगळीच चव लागते...” काल दुपारी जेवताना वीणा, माझी बायको बोलून गेली, आणि माझं मन खूप मागे गेलं.
“एखादी वास्तू, आपल्या मनात उमटणाऱ्या भावनांनाही तथास्तु म्हणत असते”, असं आई म्हणायची.
ते वाक्य अचानक कानात घुमलं.
‘हा या वास्तूचा परिणाम आहे... इथे वावरणाऱ्या ऊर्जेचा हा प्रभाव आहे... या वास्तूत आईदादांच्या पाऊलखुणा आहेत...’ मी तिला म्हणालो.
आम्ही वास्तुशास्त्र वगैरे फारसं मानत नाही. (एका दक्षिणमुखी घरातही आम्ही चारपाच वर्षं आनंदाने राहिलोय!) पण घरातला पसारा आवरला, सगळ्या वस्तू घासूनपुसून जागच्या जागी ठेवल्या, म्हणजे, घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते, हा साधा अनुभव सगळ्यांसारखाच आम्हीही सहजपणे घेत असतो.
बऱ्याचदा, शनिवार-रविवारी आम्ही दोघं अंधेरीच्या घरी जायचो.
घर स्वच्छ करायचं, केरकचरा काढायचा, फरशा पुसायच्या, आणि एक मुक्काम करून पुन्हा बोरीवलीला परतायचं... असं अधूनमधून करतो.
तसं त्या दिवशी अंधेरीला आलो.
आल्याआल्या कामालाही लागलो.
फरशी पुसायला घेतली, आणि मला आईची आठवण आली.
दहा वर्षांपूर्वी आई गेली. दादांसोबत नव्या, आपल्याला माहीत नसलेल्या जगात, नवं आयुष्य जगायला...
दादा -माझे वडील-गेल्यानंतर चार वर्षं ती याच घरात राहायची.
आम्ही समोरच, रस्त्यापलीकडच्या बिल्डींगमध्ये राहायचो.
दररोज रात्री माझ्या मुलींपैकी कुणीतरी इथे यायचं. आजीच्या सोबतीला. झोपायला.
सकाळी मी यायचो. केरकचरा काढायचा, फरशा पुसायच्या...
आईला सारं स्वच्छ, टापटीप लागायचं.
एखाद्या दिवशी मी फरशी पुसली नाही, तरी घर फरशी पुसल्याविना राहायचं नाही. ती पुसायची. ते नको, म्हणून मी शक्यतो ते काम टाळायचो नाही.
.....
तशीच त्या दिवशी फरशी पुसायला घेतली, आणि अचानक आठवणींचा एक कढ मनात दाटून आला.
आई आत, बेडरूममध्ये आहे, असं उगीचच तीव्रपणे वाटून गेलं.
नंतर दिवसभर, त्या घरात वावरताना, आई आसपास आहे, असंच वाटत होतं.
इतक्या वर्षांत असं कधी झालं नव्हतं.
बोरीवलीला घरातल्या भिंतीवर एका बाजूला आईचा फोटो आहे. दररोज क्षणाक्षणाला तो फोटोतला चेहरा आईच्या असंख्य आठवणी जागवतो.
पण आई आसपास असल्याचा तो भास मात्र, कधीच झाला नव्हता.
म्हणून तर, इतक्या वर्षांत जे धाडस जमलंच नव्हतं, ते करायचं ठरवलं.
आईसंबंधी लिहायचं...
------
मग, मला माझ्या लहानपणापासूनची माझ्या आईची असंख्य रूपं आठवू लागली.
तरीही, लिहिताना हात अडखळतायतच!
प्रत्येकाचीच आई असते. तशीच माझी, आम्हा सहा भावंडांची आई.
या क्षणी, नजरेसमोरून भूतकाळाचा विस्कळीत पट सरकतो आहे. म्हणून मीसुद्धा, स्वतःला वर्तमानकाळातून मागे नेलंय.
आत्ता आपण या क्षणाचे नाही, असं स्वतःला बजावलं, आणि माझी नजर दरवाज्याकडे गेली.
...
समोर आई उभी आहे.
पाणावल्या डोळ्यांची.... हुंदका आवरणारी... मागे दादाही आहेत, तेही गदगदलेत... आम्ही सारे एका बाजूला उभे आहोत.
एकमेकांच्या मनातले कढ सावरत.
टॅक्सी आली, आणि मी एकेक बॅग खाली नेऊ लागलो. रमेशनं वाकून आईदादांना नमस्कार केला, आणि अनावर झालेले हुंदके फुटले.
आईनं चमचाभर दही रमेशच्या हातावर ठेवलं, आणि त्याला कुरवाळलं...
रमेशही गदगदून गेला. सगळी वास्तूच जणू गदगदली होती.
आपण कितीही खंबीर वगैरे समजत असलो, तरी एखादा क्षण असा येतोच. सारा कणखरपणा पुरता गळून पडतो. भावनांचा आवेग अनावर होतो, आणि स्वतःला खंबीर भासविण्याचे नकली प्रयत्न पार फसून जातात.
त्या क्षणी तसेच झाले होते.
रमेश पहिल्यांदा, अमेरिकेत जाण्यासाठी मुंबईतून निघाला, त्या रात्रीचा हा प्रसंग...
रमेश खाली उतरला.
----------
मी डोळे पुसून दरवाजाकडे पाहिलं.
पाठमोरी आई...
ती किचनकडे वळली. तिची पावलं जड झाली होती.
लहानपणी, मला संगमनेरहून आजोळी, साखरप्याला सुट्टीला पाठवतानाही तिचं असंच व्हायचं. पंधरावीस दिवसांसाठी आजोळी जायला मिळणार याचा आम्हाला एवढा आनंद होत असताना, ही रडते का, असं वाटायचं, तेव्हा आमच्या डोळ्यात पाण्याचं टिपूसही नसायचं. उलट, तिच्या रडण्याचीच गंमत वाटायची.
रमेश अमेरिकेला निघाला तेव्हा त्या अश्रूंचा अर्थ समजला.
त्याआधीच्या कितीतरी प्रसंगांत आई, वेगवेगळ्या अंगांनी उलगडतच होती, तरीही ती उमगणं, अवघडच आहे, हेही जाणवत होतं...
बहिणींची लग्न झाली, रमेश अमेरिकेला गेला, आणि मी मुंबईत आलो. संगमनेर-देवरूखचा संसार गुंडाळून उतारवयात आईदादा मुंबईला आमच्यासोबत आले.
तोवर दोघंही कधी मुंबईतही आले नव्हते. सगळं जगच नवीन.
गावाकडे रात्री आठ साडेआठ वाजता दिवस संपून चिडीचूप व्हायचं.
इथे मध्यरात्रीपर्यंतच्या दिवसाशी जुळवून घेताना, दोघांची जाम तारांबळ व्हायची.
तिकडे, संध्याकाळी साडेपाच सहा वाजता सगळी नोकरदार माणसं घरी परतलेली असायची.
इकडे मला घरी परतायला रात्रीचे अकरा, बारा, कधीकधी आणखीही उशीर व्हायचा...
मग दादांची तळमळ व्हायची.
किचनच्या खिडकीतून समोरचा रस्ता लांबवर दिसतो.
ते खिडकीतून रस्त्याकडे टक लावून उभे असायचे.
आईनं मात्र, माझं उशीरा घरी परतण्याचं रुटीन जमवून घेतलं होतं.
रात्री कितीही उशीर झाला, तरी जेवणाच्या ताटात एक तरी पदार्थ गरम असावा, याची ती काळजी घ्यायची.
रात्री आईला सांगावं असं काहीतरी माझ्याकडे दिवसभरातल्या भटकंतीतून जमा झालेलं असायचंच... ते सांगून झालं, की आमचा दिवस संपायचा. निजानीज व्हायची.
डोळा लागला, की रात्री कधीतरी हलक्या पावलांनी आत येऊन आई माझ्या अंगावर पांघरूण घालायची. मला जाग आलेली असायची. पण झोपेचं सोंग घेणंच मला जास्त आवडायचं.
लग्नाआधीची दोनचार वर्षं या अपरिमित सुखाचा ठेवा माझ्याकडे जमा झाला होता.
कॉलेजात असताना मला टायफॉईड झाला होता.
दिवसागणिक खंगत चाललो होतो. पोटात अन्नाचा कण नाही, आणि गोळ्यांची रिअँक्शन... अंथरुणावर असूनही, अंथरुण सपाट आहे असं वाटावं, इतका मी क्षीणक्षीण झालो होतो.
एका दिवशी डॉक्टरांनी मला तपासलं, आणि त्यांनी निराश होऊन हात हवेत उंचावले.
देवाची प्रार्थना करा... ते जडपणे म्हणाले.
मी अशक्त होतो, पण जाणिवा तल्लख होत्या.
त्या क्षणी मनाला काय वाटलं माहीत नाही, पण त्या वेळी आईनं माझ्या कुडीला घातलेल्या मिठीच्या स्पर्शानं काय वाटलं, ते मात्र आजही आठवलं.
मला देवाघरी जाण्यापासून रोखण्यासाठी आईनं जो काही संघर्ष केला, तेव्हाचं आईचं रूप आत्ता आठवलं.. डोक्यावरून फिरणाऱ्या त्या हाताच्या स्पर्शाची ऊब पुन्हा टवटवीत झाली..
अनेकदा आई अनाकलनीय वाटायची. खूपदा कणखर व्हायची. ती अशी का हे कोडंच वाटायचं.
पुढे आमचा संसार सुरू झाला, मुली मोठ्या होऊ लागल्या, आणि काही प्रसंगांत भावनांना आवर घालावा लागतो, हे आईबाप म्हणून आमच्या लक्षात यायला लागलं, तेव्हा ते कोडं उलगडलं.
आईच्या कडवटपणाला, कठोरपणालाही मायेचीच ऊब असते, हे जाणवायला लागलं, आणि कडवट म्हणून मनात साठलेल्या अनुभवांना साखरेचा मुलामा चढला...
दादा गेल्यानंतर आई खूप एकटीएकटी झाली होती. नंतरची चार वर्षं ती अशीच, स्वमग्न राहायची. बहुधा ती अलिप्त होण्याचा प्रयत्न करत होती. ते जाणवायचं.
मग घरी सतत मी, किंवा मुली थांबू लागलो.
माझ्या मुलींच्या जन्मापासून त्यांच्यावर आजीच्या प्रेमाची पाखर घालणारी, त्यांना न्हाऊ-माखू घालणारी, त्यांच्यासाठी गाणी म्हणणारी, त्यांच्यावर कविता रचणारी, मुलींची आजी, अमेरिकेतल्या नातवासाठी- ऋषीसाठी- फोनवर मराठमोळी अंगाई गीते गाताना तल्लीन होणारी आज्जी आणि माझी आई, त्या चार वर्षांत खूपच वेगळी वाटू लागली. तिला एकटं राहणं जास्त पसंत असायचं, असं जाणवू लागलं.
एकदा कधीतरी त्याचा उलगडा झाला.
घरात नसलेल्या दादांशी तिचा संभाषण सुरू असायचं. एकटीच!...
जेवण, दुपारची विश्रांती, लहानसहान घरकाम, सारं काही करताना, दादा आसपास आहेत, असं समजूनच ती घरात वावरायची.
हे जाणवल्यावर काय करावं ते कळेना. तिला त्यामध्ये काहीतरी वेगळं समाधान मिळत असावं, असा विचारही मनात येत होता, पण हे काही मानसिकदृष्ट्या ठीक नाही, असंही वाटत होतं.
ती मात्र, मी आसपास असताना, आई म्हणूनच वावरत असायची.
तिच्या अखेरच्या दिवसांत ती खूप आजारी झाली. थायरॉईडचा विकार बळावला. आणि ती खंगत गेली.
त्या काळात मी एका पुस्तकासाठी प्रवास करत होतो. बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी जायला लागायचं.
मग आईची निसटती भेट, निसटतं बोलणं व्हायचं.
पण त्या आजारपणातही, माझं पुस्तकाचं काम कुठवर आलं, नवीन काय लिहिलं, नवीन कोण भेटलं, कसं वाटलं, याची चौकशी आई करायची, म्हणून नवीन शोधायचा हुरूप यायचा...
आज नवीन काय पाहिलं, लिहिलं, ते सांगितल्याशिवाय दिवस संपायचा नाही, ही आमची जुनी सवय होती. आईच्या आजारपणात तिनं ती मुद्दाम जपली.
तिला सांगण्यासाठी तरी, काहीतरी नवीन केलं पाहिजे, असं मला वाटावं, म्हणून...
म्हणून ते पुस्तकही माझ्याकडून लिहून झालं.
--- ****
माझ्या लहानपणापासून, तिच्या अखेरच्या क्षणापर्यंतची संपूर्ण आई मला आत्ता जशीच्या तशी आठवतेय. आत्ता ती बाजूला आहे, एवढा विश्वासही वाटतोय.
पण आख्खं जग वाचता आलं, आणि त्याचं तंतोतंत वर्णन करता आलं, तरी आई शब्दांत बांधता येणारच नाही, असंच वाटतंय.
आईच्या वर्णनासाठी आजवर ज्यांनी ज्यांनी जेवढं लिहिलंय, तेच सारे शब्द उधार घेऊन एकत्र करावेत, असंच वाटतंय.
आपल्याकडे शब्द नाहीत अशी जाणीव याआधी कधीही झाली नव्हती.
आत्ता ती झाली.
उधार घेऊनही शब्द अपुरे ठरावेत, असं जाणवायला लागलं.
आणि, एक लक्षात आलं.
यासाठी एवढं शब्दजंजाळ साठवणुकीचं काही कारणच नाही.
दोनच अक्षरं पुरेत... आई!
आणि, आपण आईविषयी लिहायचंय, म्हणून, त्याआधी आणखी दोन अक्षरं जोडावीत...
‘माझी आई!’
.

Friday, July 1, 2022

अप्रकाशित महाभारत...

 

अज्ञातवासात असताना पांडवांनी एका रात्रीत बांधून पूर्ण केलेल्या त्या देवळाविषयी आम्हाला प्रचंड उत्सुकता होती. त्यापोटीच एकदा आम्ही तिरिमिरीत पाठीस सॅक लावली आणि रातराणी पकडून पहाटेच्या सुमारास त्या आडगावात पोहोचलो. सूर्योदय होण्यापूर्वी हे मंदिर पूर्ण झाले नाही तर पांडवांच्या अज्ञातवासातील ठावठिकाणा जगजाहीर होईल, असे गुरुदेवांनी सांगितलेले असल्याने भीम, अर्जुनासह सर्वांनीच आपली शक्ती पणाला लावली होती. कळसाचा शेवटचा दगड बसवून झाला, आणि सभागारातील दगडी परातीखाली एक वस्तू लपवून भीमाने हात झटकले, तेव्हा त्याच्या बंधूंना शंका आलीच होती. तर, त्या परातीखालचे गूढ शोधण्याचा अनेकांनी अनेकवार प्रयत्न केला होता अशी दंतकथा असल्याने आम्हालाही तीच उत्सुकता होती. पहाटेपूर्वीच तेथे पोहोचल्याने आज ते शक्य होणार होते. टीममधल्या एका भीमकाय सहकाऱ्याने त्या प्रचंड दगडी परातीस हात घातला, आणि आश्चर्य म्हणजे, पिंजऱ्यातून मुक्ती मिळताच, मोक्षाच्या प्रतीक्षेत असलेल्या पोपटाच्या रूपातील राक्षसाने सदाचारी मनुष्यरूप घेऊन स्वर्गात प्रयाण करावे, त्याप्रमाणे त्या महाकाय परातीने आपल्याला सहजपणे उचलू दिले.
आतील दृश्य अंगावर आनंदाचा शहारा आणणारे होते. एका पुराणकालीन फाईलसदृश आवरणामध्ये निगुतीने गुंडाळून ठेवलेली काही भूर्जपत्रे आम्हांस दिसली. आता ती बाहेर काढून त्यावरील अगम्य लिपीचा अर्थ लावण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. आम्ही अनेक भाषातज्ज्ञांचे उंबरठे झिजविले, काहींना स्क्रीनशॉटस पाठविले. देवीदेवतांना आवाहन केले, आणि अखेर एक देवी प्रसन्न झाली. तिने आम्हास त्या मजकुराचा अर्थ उलगडून सांगितला...
... ‘महाभारत’ म्हणून जे महाकाव्य आपण वाचतो, ऐकतो, सांगतो, त्याचाच एक अप्रकाशित भाग आमच्या हाती लागला होता.
“तिकडे कुरुक्षेत्रावर रणकंदन माजले असताना आता पराभव स्पष्ट दिसू लागल्याने धृतराष्ट्र उद्विग्न होऊन महाली बसला असताना त्याची मनोवस्था पाहून कळवळलेल्या संजयाने त्याचे मन रिझविण्याचा निर्णय घेतला. त्याची मानसिक अवस्था काहीशी खराब असल्याने त्याच्यासमोर काही गीतमाला सादर करण्याचे त्याने ठरविले, आणि राजगायकांना त्यांच्या वाद्यांसह निमंत्रण धाडले. धृतराष्ट्राचे तिकडे लक्षच नव्हते. आपल्या आसनाशेजारच्या रिकाम्या सिंहासनाकडे पाहताना त्याच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. जणू आषाढाच्या पहिल्या दिवशीच मेघांनी धरतीवर समरसून बरसावे तसे त्याच्या डोळ्यातून भरभरून वाहणारे अश्रू पाहून संजयास भडभडून आले आणि त्याने काही केविलवाणी गाणी ऐकविण्याची सूचना राजगायकास केली. तबला, तंबोऱ्याने सूर जुळवून घेतले, आणि राजगायकाने संवादिनीवर हलकेच बोटे फिरविली...”
(आज आपण काही गीते समकालीन कवींची असल्याचे मानतो, पण त्याला धृतराष्ट्रकालीन पुराणकथांचा आधार आहे, हे आम्हास ती अगम्य लिपी उलगडताना जाणवले.)
तर, राजगायकाने सूर धरला, आणि पहिलेच गाणे आळविण्यास सुरुवात केली...
“भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...”
राजगायक गाणे गात होता, आणि धृतराष्ट्राच्या मिटल्या डोळ्यातून अश्रुधारा पाझरत होत्या. बाजूला बसलेली राणीही त्या क्षणी हळवी होऊन केविलवाणी झाली. मग धृतराष्ट्राने हलकेच चाचपडत अंदाज घेऊन तिचा हात हाती घेतला, आणि तिच्या दिशेने चेहरा फिरवून तो कुजबुजला, “मी पाहू शकत नसलो, तरी मला तुझी भाषा समजते आहे. माझ्या नशिबासोबतच तुझ्या या कोमल हातावरील भविष्यरेषा बोलणार हे विधिलिखितच आहे...”
राणीने हलकेच धृतराष्ट्राचा हात थोपटला. तिच्या पट्टी बांधलेल्या डोळ्यांतूनही अश्रुधारा वाहू लागल्या...
गायक गातच होता... “उद्या पहाटे कुठल्या वाटा, दुज्या गावचा वारा...”
धृतराष्ट्र पुन्हा कळवळला. त्याने बाजूच्या रिकाम्या, वंशपरंपरेने राजवाड्यात असलेल्या रिकाम्या सिंहासनाकडे पाहिले, आणि तो पुन्हा राणीच्या कानाशी कुजबुजला, “आपण हे जीव असे का जोडले?... आणि तरीही फुलण्याआधीच हे फूल दैवाने असे का बरे तोडले?...”
या प्रश्नाला राणीकडे उत्तर नव्हते. ती अधिकच केविलवाणी झाली होती.
गाणे संपत आले होते. राजगायकाने शेवटचे कडवे आळविण्यास सुरुवात केली, आणि अखेरची ओळ पुन्हा उच्चारली...
“वाऱ्यावरती विरून गेली, एक उदास विराणी...”
धृतराष्ट्राचे डोळे पाझरतच होते, आणि बाहेर आषाढाचा पाऊस अधिकच जोमाने बरसू लागला होता.
...त्या अगम्य लिपीवरील अनोळखी मजकुराचे शब्द जसेच्या तसे असेच नव्हते, पण त्यामागील भाव याच आशयाचे होते हे आम्हांस जाणवले, आणि हे भूर्जपत्र भीमाने का लपवून ठेवले असावे ही शंका आम्हास छळू लागली.
कदाचित, धृतराष्ट्राच्या हळव्या व्यक्तिमत्वाचा हा पदर त्याला भविष्यातील जगासमोर यावा अशी त्याची इच्छा नसावी, असा तात्पुरता निष्कर्ष आम्ही काढला, आणि महाभारतातील अप्रकाशित भाग हाती लागल्याच्या आनंदाने आरोळी ठोकून आम्ही त्याचे स्क्रीनशॉट पेपरवाल्यांना पाठवून दिले.
आज सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू असल्याचे टीव्हीवर पाहात आम्ही त्या आडगावातल्या मंदिराशेजारच्या चहाच्या टपरीवर वाफाळता चहा घेत बसलो आहोत...
पुण्य नगरी ०१/०७

सत्ता-संघटनेच्या अस्तित्वाचा संघर्ष

 

शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या वाटचालीचे सक्रीय साक्षीदार असलेले माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या पहिल्या चार दशकांच्या वाटचालीवर एक प्रदीर्घ प्रबंध लिहिला. ‘शिवसेनाः काल, आज आणि उद्या’ या नावाने लिहिलेल्या सुमारे एक हजार पानांच्या या प्रबंधात, शिवसेनेचा भूतकाळ आणि सन २००७ पर्यंतचा सखोल तपशील मांडणाऱ्या जोशी यांनी शिवसेनेच्या भविष्यकाळावरचे भाष्य मात्र खुबीने टाळले. त्यावर त्यांनी समकालीन मान्यवरांची मते मांडली. जोशी यांनी २००७ नंतरच्या, म्हणजे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे सक्रिय झाल्यानंतरच्या भविष्याचे भाकित जाणीवपूर्वक टाळले असावे, असे दिसते. त्या प्रबंधग्रंथातील संदर्भ पाहता, आजची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना यांमध्ये मोठे अंतर असल्याचे आजच्या घडामोडींवरून पडताळता येते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू झालेली एक ज्वलंत चळवळ, गतिमान संघटना, आणि प्रभावी राजकीय पक्ष अशा विविध रूपांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटविणारा हा पक्ष सध्या एका वैचारिक संभ्रमावस्थेत सापडला असून सत्ता हेच या संभ्रमाचे कारण आहे, यात कोणाचेही दुमत असणार नाही. ‘हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे’, असे सांगत, १९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रखरतेने हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यानंतरच्या कायदेशीर कारवाईला प्रचंड विश्वासाने तोंड देऊन हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात रुजविला आणि नंतरच्या राजकारणात हाच मुद्दा राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी राहण्याकरिता महत्वाची भूमिका बजावली, त्याच हिंदुत्वावरून आज शिवसेनेत उभी फूट पडण्याची वेळ आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे हिंदू खोमेनी आहेत’, अशी टीका तेव्हा करणारे शरद पवार हे आजच्या शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत संकटमोचक बनले आहेत, आणि पवार यांच्या राजनीतीतूनच सत्ता आणि संघटना वाचविता येईल, असा सूर शिवसेनेच्या पहिल्या फळीतून उमटू लागला आहे. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते हे खरे आहे. त्यामुळे २०१९ मध्ये निवडणुकीत केलेली भाजपसोबतची नैसर्गिक युती आणि या युतीला मिळालेला जनादेश धुडकावून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी अवैधानिक ठरली नाही, तरी ती अनैसर्गिक होती, हे स्पष्ट आहे. या आघाडीनंतर मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणातील उद्धव ठाकरे यांचा सूर आणि गेल्या काही महिन्यांत उमटू लागलेला हिंदुत्वाचा सूर पाहता, ही कसरतही स्पष्ट जाणवते. ‘धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ केली ही शिवसेनेची चूक होती’, अशी स्पष्ट कबुली विधिमंडळात उद्धव ठाकरे यांनी दिली, तेव्हाच खरे तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या कडवट विचारांशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांच्या मनात पक्षाच्या नव्या वाटचालीविषयी शंकेची पाल चुकचुकली होती. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या संघर्षावरच अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याची भीतीही त्यांच्या मनात उमटली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा वाद संपुष्टात आल्यानंतर पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी येत असल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेने सावधपणे हिंदुत्वाचा उच्चार करण्यास सुरुवात केली, पण सरकार या नात्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या असंख्य प्रसंगातील भूमिका मात्र काहीशी तटस्थतेचीच राहिली. शिवसैनिकांच्या मनात याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या, पण ते व्यक्त होत नव्हते. ‘आमचे हिंदुत्व गदाधारी हिंदुत्व आहे’, अशी टाळीबाज वाक्ये सभांमधून फेकली जात होती, पण पालघरमध्ये साधूंच्या हत्याकांडासारख्या घटना घडल्यानंतर, बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाचे संस्कार झालेल्या शिवसैनिकाच्या मनात सत्ताधारी शिवसेनेकडून ज्या कृतीची अपेक्षा होती, तसे घडलेच नाही. आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही भूमिकांशी तडजोड करावी लागते. मात्र, हिंदुत्व हा ज्यांचा श्वास आहे, त्या शिवसेनेने हिंदुत्वाच्या भूमिकेशीच तडजोड केल्याचे दिसू लागल्यावर अस्वस्थ शिवसैनिकांची चलबिचल सुरू झाली. गेल्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भरविल्या गेलेल्या अजान स्पर्धा, हिंदु सण साजरे करण्यावरील बंधने आणि अन्य धर्मांच्या सणांबाबत घेतली गेलेली भूमिका, राम मंदिराच्या उभारणीकाळात शिवसेनेने उपस्थित केलेल्या शंका, कोरोनाकाळात हिंदु प्रार्थनास्थळांवर घातलेल्या निर्बंधांमुळे त्यावर उपजिविका करणाऱ्या कुटुंबांवर ओढवलेली आर्थिक ओढाताण, अशा अनेक मुद्द्यांवर बाळासाहेबांचा शिवसैनिक ठाकरे सरकारकडे अपेक्षेने पाहात होता. सध्याचे बंड हा अशाच अस्वस्थतेचा उद्रेक असावा.
काही दिवसांपूर्वी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत या नाराजीचा स्पष्ट इशारा शिवसेनेला मिळाला होता. विधानसभेत भाजपकडे असलेल्या ११३ मतांपेक्षा दहा मते जास्त मिळवून भाजपने राज्यसभेचे तीनही उमेदवार निवडून आणले, तेव्हाच सत्ताधारी आघाडीत सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत तर शिवसेनेतील नाराजांनी नेतृत्वाला थेट फुटीचा इशारा दिला. भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकही जादा मत नसतानाही सेनेच्याच एका उमेदवाराला पराभूत करून भाजपने बंडाची बीजे रुजविली. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणावर विसंबून शिवसेनेच्या नेतृत्वाने तिकडेही दुर्लक्ष केले. विधानसभेतील बहुमताच्या संख्याबळाचा प्रचंड विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांना भोवला. या घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेसा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बंडाची आखणी पूर्ण झाली होती. त्याची पूर्वतयारी म्हणून २१ जूनला विधानसभा उपाध्यक्षांविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावातडेही पुरेशा गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. कदाचित यापुढे शिवसेनेचे खरे दावेदार कोण या मुद्द्यावरून जेव्हा एकनाथ शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष सुरू होईल, तेव्हा ठाकरे गटाच्या बेफिकीरीचे परिणाम समोर येऊ लागतील.
या काळात सरकार म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडून असलेली शिवसैनिकाची अपेक्षा यांत अंतर पडल्यामुळे सध्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचा मोठा पेच उभा राहिला आहे. मुख्य म्हणजे, ज्यांनी बाळासाहेबांवर ‘हिंदू खोमेनी’ म्हणून टीका केली, त्या शरद पवार यांच्याकडेच आज शिवसेना संकटमोचक म्हणून पाहते आहे, हा काळाने घेतलेला विचित्र बदला असल्याची भावना आज बंडातून व्यक्त झाली आहे.

Friday, June 17, 2022

हिमालय आणि समुद्र

 

चि. मोरूस अनेक आशिर्वाद
मागे तुला पाठविलेल्या ई-पत्रावर तुझ्याकडून कोणतेच उत्तर आले नाही तेव्हाच तू त्यापेक्षा महत्त्वाच्या मोहिमेत व्यग्र असावास याचा मला अंदाज आला होता. म्हणून मीदेखील थोडे दिवस पत्रव्यवहाराला विश्रांती द्यावी असा विचार केला. मोरू, मला माहीत आहे की आजकाल पत्र वगैरे लिहिणे हा प्रकार तसा आऊटडेटेडच झाला असून व्हिडियो चॅट करून एकमेकांशी गप्पा मारून मन मोकळे करता येते. पण मला आपलं पत्र लिहिणं आवडत असल्याने मी काही माझी सवय मोडणार नाही. मध्यंतरी तू उत्तराखंडाच्या सहलीवर गेला होतास ते समजले. असे अधूनमधून देशातील इतर प्रांत पाहणे चांगलेच असते. त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते आणि विविधतेतील एकतेचेही दर्शन होते. तुला तसा काही अनुभव असल्यास प्रवास वर्णनाचे एखादे सविस्तर पत्र लिहून कळव. निसर्गाचे सौंदर्य अनुभवायलाही एक नजर असावी लागते. मागे एकदा आमच्या शेजारच्या नायगावकर काकांचा कुणीतरी मित्र निसर्ग पहायला कोकणात गेला होता, तर बसमधून जात असताना सगळीकडे दाट झाडी आडवी येत असल्याने निसर्ग नीट पाहाताच आला नाही असे त्याने काकांना सांगितल्यावर वाईट वाटले होते. तुला तिथला निसर्ग नीट पाहता आला असेल अशी आशा आहे. तिथे तू काढलेले फोटो मला आमच्या काशीने तुझ्या फेसबुक पेजवर उघडून दाखविले आणि खूप बरे वाटले. मोरू, काय गंमत आहे ना, की तिकडची माणसं हिमालयाच्या कुशीत राहातात, तर त्यांना इकडचा समुद्र पहायची ओढ लागते, आणि आपल्या लोकांना हिमालयाची भव्यता खुणावते. त्या निसर्गवेडापायी आपण तिकडे सहली काढतो, सफर करतो, आणि तिकडे कायम हिमालयाच्या सावलीत राहणाऱ्या लोकांना आपल्या समुद्राची गाज खुणावते. बाकी आपलं राज्य आणि उत्तराखंड सारखेच सुंदर आहेत असे आपले राज्यपाल परवा म्हणाले तेव्हा आपल्या राज्याच्या अभिमानाने माझा ऊर भरून आला होता. तरीही, उत्तराखंडासारखा हिमालय आपल्याकडे कुठे आहे असा विचार माझ्या मनात येत असतानाच राज्यपालांनीही तेव्हा तोच विचार बोलून दाखवला, आणि लगेच माझ्या मनात समुद्राच्या लाटा उचंबळून आल्या. पूर्वी असं म्हणायचे की, उंच हिमालय तुमचा अमुचा केवळ सह्यकडा… तर, तेव्हा हिमालयाच्या मदतीला नेहमी सह्याद्री धावून जायचा म्हणून तसे म्हणायची प्रथा पडली असली तरी आता हिमालयाच्या सौंदर्याची बरोबरी आपल्याकडच्या समुद्राच्या सौंदर्याशी झालेली पाहून बरे वाटले. तसेही अलीकडे आपल्या सह्याद्रीवर हिमालयाच्या मदतीला धावून जायची वेळ बऱ्याच वर्षात आलेली नसल्याने समुद्र आणि हिमालयाचीच तुलना योग्य असे मी मनाशी म्हणत असतानाच, आपल्या मनातील विचारच राज्यपालांनी बोलून दाखविल्याचा आनंदही वाटला. पण थोर लोकांचे विचार सारखेच असतात अशी काहीतरी इंग्रजी म्हण असल्याने त्या योगायोगाचे काही विशेष वाटले नाही. त्यामुळे असो… तुझ्या उत्तराखंडच्या फोटोवरून हे सगळे आठवले, एवढेच! तर मोरू, निसर्ग पाहाण्यासाठी आपण तिकडे जातो तसे तिकडची माणसंही निसर्ग पाहण्यासाठी इकडे येत असावीत. राज्यपालांची इकडे यायची फार इच्छा नव्हती असे त्यांनीच परवा सांगितले. पण हिमालयाच्या कुशीत वाढलेला माणूस आता समुद्राच्या सान्निध्यात राहातोय आणि इथल्या वातावरणात दूध साखरेसारखा विरघळून गेला हे पाहून बरे वाटले.
दूध साखरेवरून आठवले. हल्ली आम्ही अमूलचंच दूध आणतो. ते चांगलं असतं, असं म्हणतात. शिवाय पूरा इंडिया अमूल दूध पितो असंही जाहिरातीत ऐकलंय. परवा मी टीव्हीवर बातम्या पाहात बसलो होतो तेव्हाच आमच्या सौभाग्यवतीने समोर अमूलच्या दुधाचा ग्लास आणून ठेवला, आणि शेजारी साखरेचा डबा! ही साखर आपल्या राज्यातल्या कुठल्याशा सहकारी कारखान्यातच तयार झाली असली पाहिजे. ते मला का वाटतं ते मी नंतर कधीतरी सांगेन. तर, गुजरातमधल्या अमूलच्या दुधात आपल्याकडच्या कारखान्यात तयार झालेली साखर घालून मी चमच्याने ते ढवळले, तर अशी फक्कड चव लागली की सांगता सोय नाही. मी दूध पीत असतानाच समोर आपले मुख्यमंत्री गुजरात आणि महाराष्ट्राला दूधसाखरेची उपमा देत होते. तर हाही एक योगायोगच म्हणायचा. मोठी माणसं सारखाच विचार करतात हेच मला यावरून तुला सुचवावेसे वाटते. म्हणून, कधीतरी माझ्या पत्राला तू उत्तर द्यावेस, एवढीच अपेक्षा आहे.
कळावे, काय म्हणायचंय हे तुला कळलं असेलच!
तुझा
दादू
पुण्य नगरी १७-०६

Friday, May 6, 2022

वेताळ आणि वेताळ...

 

दरबारात तातडीची बैठक बोलावल्यामुळे विक्रमादित्यास स्मशानात जाण्यास वेळच नव्हता. तिकडे झाडावर लोंबकळणाऱ्या प्रेताच्या मानगुटीवर बसून विक्रमादित्याची वाट पाहाणारा वेताळ वैतागून गेला. काय करावे याचा विचार करत असतानाच शेजारच्या झाडावरच्या वेताळाने त्याला हाक मारली. “कसला विचार करतो आहेस वेताळा?” असे विचारत पलीकडच्या झाडावरचा वेताळ उगीचच हसला, आणि हा वेताळ ओशाळला. “काही नाही रे, विक्रमादित्य आला तर त्याच्या खांद्यावरून निसटण्याकरिता कोणती नवी गोष्ट सांगावी याचा विचार करतोय...” वेताळ म्हणाला, आणि दोघेही नव्या गोष्टीवर विचार करू लागले. पलीकडच्या झाडावरच्या वेताळाने लगेचच गुगलवर गोष्टीचा शोध सुरू केला. पण विक्रमादित्यास सांगण्याजोगी व अडचणीचा प्रश्न विचारता येण्याजोगी गोष्ट त्याला सापडलीच नाही. अखेर वैतागून मोबाईल बंद करत असतानाच त्याच्या नजरेस एक बातमी पडली. ताबडतोब त्याने ती या वेताळासमोर धरली, आणि वेताळ खुश झाला. “ठरलं... हीच गोष्ट विक्रमादित्याला सांगायची. म्हणजे त्याला उत्तर देता येणारच नाही, आणि माहीत असूनही त्याने त्तर दिले नाही, तर आता तरी त्याच्या डोक्याची शंभर शकले होऊन त्याच्या पायाशी लोंबकळतील...” खदाखदा हसत वेताळ म्हणाला, आणि झाडावरच्या प्रेताच्या मानगुटीस विळखा घालून तो निवांत पहुडला...

 इकडे विक्रमादित्याच्या राज्यात काही तातडीच्या समस्या निर्माण झाल्याने काय करावे हे न सुचून त्याने विचारविनिमयासाठी बोलाविलेली जाणत्यांची बैठक आटोपली होती. कठीण प्रसंगी सगळेच आपल्यावर निर्णय सोपवून नामानिराळे राहात असल्याचा विक्रमादित्यास अगोदरपासूनच संशय होता. या बैठकीतही तेच झाले. विक्रमादित्याच्या डोक्याचा पुरता भुगा झाला होता. अखेर तिरिमिरीतच त्याने चढावा चढविल्या, तलवार कमरेला लावली, आणि स्मशानाचा रस्ता पकडला. वेताळाच्या गोष्टीतून काही उत्तर सापडले तर समस्येशी पडताळून पाहू असा विचार करत त्याने स्मशान गाठले.  त्याला येताना पाहून वेताळाला आनंद झाला. आता पुढचा काही वेळ मजेत जाणार होता. विक्रमादित्याने चढावा झाडाखाली काढून ठेवल्या, तलवार सावरत तो झाडावर चढला, आणि प्रेत खांद्यावर टाकून तो पुन्हा स्मशानाच्या दिशेने चालू लागताच, प्रेताच्या मानगुटीवर बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. “विक्रमा, तुझ्या हट्टाचे मला कौतुकही वाटते, आणि आता तर गंमतही वाटू लागली आहे. तुझ्यासमोरचा कोणताच प्रश्न तुला सोडविता येत नसल्याने तू हा उद्योग चालविला आहेस व उत्तर शोधत आहेस हे मला माहीत आहे. म्हणून आता मी तुला जी गोष्ट सांगतो ती ऐक. तुला उत्तर देता आले नाही, तर काय होणार ते तुला ठाऊकच आहे...” असे म्हणून वेताळाने गोष्ट सुरू केली.

 “विक्रमादित्या, ही गोष्ट नाही, तर तीनचार वर्षांपूर्वीचीच एक बातमी आहे. पुणे नावाच्या शहरात, एका झोपडपट्टीतील एक कोंबडा भल्या पहाटे बांग देत असे. त्यामुळे त्याच्या गरीब मालकास पहाटे लवकर जाग येऊन तो कामासाठी बाहेर पडत असे. आयत्या गजराची सोय असल्यामुळे त्याचे त्या कोंबड्यावर प्रेमही होते. पण शेजारच्या इमारतीतील एका महिलेस पहाटे कोंबड्याची बांग ऐकून त्रास होऊ लागला. भल्या पहाटे कानावर पडणारी त्याची बांग आपली झोपमोड करते आणि दिवस खराब जातो, अशी तक्रार घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली, आणि बांग देऊन झोपमोड करणाऱ्या कोंबड्यावर कारवाई करा अशी मागणी करणारा अर्जच तिने पोलिसांना दिला. ही बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आली, आणि पोलिसांची पंचाईत झाली. कोंबड्यावर कोणत्या कलमाखाली कारवाई करावी हे त्यांना सुचेना. त्यामुळे पोलिस संभ्रमात पडले. तर विक्रमादित्या, आता सांग पाहू, भल्या पहाटे बांग देऊन मालकास कामासाठी लवकर उठविणारा कोंबडा आणि शेजऱ्याची झोपमोड करणारा कोंबडा यापैकी कोणास तू न्याय देशील?”

 गोष्ट ऐकून विक्रम गोंधळला. विचारात पडला. आता पुन्हा राज्यातील जाणत्यांची बैठक घेतली पाहिजे, असे त्याने मनाशी ठरविले. इकडे वेताळ मात्र उत्तराची वाट पाहात होता. विक्रमादित्यास या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही याची खात्री होताच वेताळाने खांद्यावरील प्रेतासह पुन्हा झाडाकडे झेप घेतली, आणि तो फांदीला लटकून विक्रमादित्याकडे पाहात खदाखदा हसू लागला.