Sunday, December 19, 2021

'उंच' आणि 'मोठा'!

 मला डोंगर, पर्वत आवडतात. लहानपणी, तरुणपणी आमच्या गावाच्या आसपासच्या कित्येक डोंगरांवर मी पायपीट केली आहे. ते नुसते डोंगर नाहीत. पर्वत आहेत. एका बाजूला निळाशार, अथांग पसरलेल्या समुद्राच्या लाटा छाताडावर झेलणारा पर्वत. कोकणातल्या सह्याद्रीच्या कडेकपारी आणि दऱ्याखोरी पायाखालून घालत पार शिखर गाठलं, की खाली चारही बाजूंना दिसणाऱ्या घनदाट जंगलातून जमिनीचा तांबडा तुकडा शोधावा लागायचा तेव्हा! ज्या जमिनीवरून चालताना डोक्यावरचं जे झाड महावृक्ष वाटायचं, ते झाड पर्वताच्या शिखरावरून न्याहाळताना हिरवळीतल्या गवताच्या पात्याएवढं दिसलं की उगीचच, शिखरावर उभे राहिलेले आपण खूप ग्रेट, भारी वगैरे आहोत असं वाटायला लागायचं, आणि पर्वत उतरून पाय रोजच्या जमिनीवर आले की मन भानावर यायचं. म्हणून, मला पर्वताच्या शिखरांवर चढायचा कंटाळा यायला लागला. मग मी पर्वताचे पायथे शोधू लागलो. आख्ख्या पर्वतावरून रोरावत उतरत, दगडाधोंड्यांवर वेड्यागत आदळत, धसमुसळेपणा करत पायथ्याकडे झेपावण्याचं वेड प्रपातांना का असतं ते उमगू लागलं.

कारण, पर्वताचा भव्यपणा पायथ्यावरूनच जाणवतो. शिखरावर उभं राहून खालच कस्पटासमान दिसणारं दृश्य न्याहाळताना, आपणास आपलं वाटणारं आभासी मोठेपण पायथ्यावर उभे राहून मान वर करताच गळून पडतं, आणि भव्यतेच्या पायाशी उभे राहिल्याने, आपण किती ‘कस्पट’ आहोत हे लक्षात येतं.आमच्या देवरुखजवळ बामणोली, मार्लेश्वर, अशा जागी गेलं, की भिंतीसारखे सरळसोट, आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे काळे पहाडी कडे आपल्याला आपली ओळख करून देतात, आणि या व्यापक विश्वातल्या किड्यामुंगीएवढीच आपली उंची आहे याची जाणीव जिवंत होऊन त्या पर्वतापुढे विनम्रपणे मान झुकते.

… म्हणून मला पर्वत आवडतात!!
Vijayk

Saturday, December 18, 2021

वाईन स्टेट...

 कोणत्याही नव्या गोष्टींची लोकांना सवय किंवा चटक लावायची असेल, तर अगोदर त्याचे इतर सर्व पर्याय नष्ट केले पाहिजेत. काही वेळा ही नवी गोष्ट कॉम्प्लिमेंटरी म्हणून घरोघरी मोफत वाटली पाहिजे, ती वापरण्याचे किंवा अनुभवण्याचे फायदे लोकांना सांगितले पाहिजेत. (आजच आमच्याकडे बिग बास्केट किंवा अशाच काहीतरी मार्केटिंगवालांचा प्रतिनिधी सर्वे करून गेला. जाताना त्यानेही मसाला छासचे ५० मिलिचे टेट्रापॅक फुकट दिले!) तर, असे करावे लागते. वर्तमानपत्रेही खप वगैरे वाढविण्यासाठी स्कीमबीम राबवतात. पूर्वी, म्हणजे कदाचित शंभरएक वरिषांपूर्वी, आपल्या आधीच्या पिढ्याही दूध वगैरे प्यायच्या. उन्हाबिन्हातून पायपीट करून घरी आलेल्याचे स्वागत माठातल्या थंड, लोणीदार ताकाने व्हायचे. चहा आला आणि त्याने या प्रथा व्यवस्थित मोडीत काढायला सुरुवात केली. चारपाच दशकांपूर्वी आमचे एक परिचित ब्रुक बॉंडचे एजंट होते, ते घरोघरी चहाची नवी सॅम्पल म्हणून जुन्याच चहाच्या नव्या पुड्या मोफत वाटायचे. वर्तमानपत्राच्या स्कीमचा एक उद्देश असतो. स्कीममधून दहा जणांनी पेपर सुरू केला तर स्कीम संपताना त्यापैकी चारपाच जण पेपर रिटेन करतात. त्या चहाच्या मोफत सॅम्पलचाही तसाच उद्देश असायचा. दहा घरांत सॅम्पल वाटली तर दोनतीन घरांतून पाव किलो, अर्धा किलो वगैरेची ऑर्डर मिळायची. अशा तऱ्हेने त्या एजंटाने चहाच्या विक्री व्यवसायात जम बसविला होता.

तर सांगायचा मुद्दा हा, की आता जर सरकारला लोकांनी घरोघरी वाईन प्यावी असे वाटत असेल तर फक्त किराणा दुकांनात ती विकायला परवानगी देणे पुरेसे नाही. जसे दुध आणि ताकाला चहाचा पर्याय उपलब्ध झाला, तसेच धोरण आखून वाईनची सवय लावावी लागेल. कदाचित वेगवेगळ्या ब्रॅंडसना आपली प्रॉडक्ट सॅम्पल्स वाटावी लागतील, सरकारला वाईन खरेदीसाठी प्रसंगी सबसिडी द्यावी लागेल आणि सरकारी कार्यालयांत वगैरे चहा देण्याऐवजी वाईन ऑफर करण्याचा फतवाही काढावा लागेल. फूटपाथवर आणि खाऊ गल्ल्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या चहाच्या टपऱ्या चालविणाऱ्या महाराजांना चहा विकणे सक्तीने बंद करून वाईन विक्रीची मुभा द्यावी लागेल. आणि मुख्य म्हणजे, शाळा महाविद्यालयांच्या कॅन्टीन्समधून चहा हद्दपार करून वाईन वाटायची योजना आखावी लागेल.
वाईनची लोकप्रियता वाढवली पाहिजे असे आपल्या राज्यातल्या एका जाणत्या नेत्याचे दहा वर्षांपासूनचे स्वप्न होते.
आता नवे सरकार त्यासाठी जोरदार पुढाकार घेत असताना जनतेने मागे राहणे चांगले नाही!
आपण वाईन कॅपिटल स्टेट ऑफ इंडिया म्हणून नावही कमावू शकतो. आपली ती क्षमता आहे याची खात्री बाळगा!

Thursday, December 16, 2021

विकासाचा अनुशेष

 समाजाचा मानसिक विकास असा शब्द दिसला की मनात वेगवेगळे विचार येतात. मुळात विकास म्हटले की आपल्या नजरेसमोर रस्ते, वीज, पाणी, धऱणे, उड्डाण पूल, रेल्वे, कारखाने आणि रोजगार देणाऱ्या यंत्रणांची निर्मिती असे सर्वसाधारण चित्र असताना, मानसिक विकासाच्या अंगाने विचार करणे हे मने जिवंत आणि सक्रिय असण्याचे लक्षण आहे असा विचार मनात येतो. काल काशी विश्वेश्वरधाम प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचे भाषण ऐकत मी खिडकीत बसलो होतो. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक नाला आहे. कधीकाळी ती नदी, खाडी असावी एवढे ऐसपैस पात्र आहे त्याचे. आम्ही या घरात राहायला आलो, तेव्हा ती वाहती नदीच होती. थंडीच्या दिवसांत पहाटे त्या पात्रातील पाण्यावर वाफांची वर्तुळे नृत्य करायची, आणि काठावर ध्यान करून बसलेले बगळे अचानक पाण्यात चोची बुडवून एखादा मासा गट्टम करायची. सकाळी उठून खिडकीबाहेर पाहिल्यावर दिसणाऱ्या या दृश्याला भुलून आम्ही हे घर घेतलं, तेव्हा भविष्याची जरादेखील शंका मनात डोकावली नव्हती. आता त्या नाल्यातून रसायनमिश्रित काळे पाणी वाहते. आता काठावर बगळे नाहीत, कावळे कलकलाट करत असतात. भरतीची वेळ सोडली, तर त्या नाल्यातलं ते प्रदूषित रसायन एकाच जागी संथ साचल्यागत स्वस्थ असतं. कधीतरी एखादा डंपर येतो, आणि त्या काळ्या पाण्यात ट्रकभर कचरा ओतला जातो. कुणीतरी रस्त्यावरून जाताजाता पुलावर थांबून कचरा किंवा टाकाऊ वस्तूंनी भरलेली प्लास्टिकची पिशवी फेकतं.  त्या संथ साचलेपणात थोडीशी खळबळ माजते. काही क्षण नाला ढवळला जातो, आणि पुन्हा साचलेलं काळं पाणी संथ होऊ लागतं. कचरा आणि टाकाऊ वस्तूंचे ढिगारे माजले की, ते काळं पाणी संकोचून काठाकडचा कोपऱ्यात जमा होऊ लागतं, तोवर पावसाळ्याची चाहूल सुरू होते. मग महापालिका नालेसफाई वगैरे कार्यक्रम हाती घेते आणि मोठमोठी पोकलेनसारखी यंत्रे काठावर धडधडू लागता. काळं पाणी ढवळून निघतं. आधी टाकलेला कचरा उचलण्याचा कार्यक्रम घाईघाईने पार पाडून गाड्या निघून जातात, आणि काळं पाणी उरलेला कचरा कवटाळत पुन्हा जागच्या जागी साचून स्वस्थ बसतं.

पंतप्रधानांचं भाषण ऐकताना खिडकीतून पुन्हा माझी नजर त्या नाल्यात साचलेल्या काळ्या पाण्यावर पडली. आता पाण्याचे कोणतेच गुण त्याच्या अंगी राहिलेले नाहीत. त्यामध्ये मासा शोधूनही सापडणार नाही, पण त्याच्या तेलकट तवंगावर किडे वळवळताना दिसतात. उन्हाची किरणं त्या तवंगावर पडली, की वळवळणाऱ्या किड्यांच्या हालचालींनी नाला अस्वस्थ चुळबुळताना दिसतो. कदाचित त्यातल्या रसायनालादेखील एकाच जागी साचल्याचा कंटाळा येत असावा...  

पंतप्रधाधानांच्या भाषणातील स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख कानावर पडला, तेव्हा मी किड्यांच्या वळवळण्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्या काळ्या डबक्याकडे पाहात होतो. मला अलीकडे ते पाहताना आनंद वगैरे होत नाही. आता तो नाला पुन्हा पहिल्यासारखा नदी होऊन नितळ पाण्याने वाहू लागणार नाही, याची मला पुरती खात्री असल्याने, नाल्याचे वास्तव मी मान्य केले आहे. नदीचा नाला होऊन पाण्याची जागा रसायनमिश्रित द्रवपदार्थांनी घेतली हा त्या नाल्याचा नव्हे, तर माणसाचाच दोष आहे, हे माहीत असूनही आपल्याला लाज का वाटली नाही असा विचारही मनात आला. त्याच वेळी स्वच्छ भारत मोहिमेचे काहीसे हसू देखील आले. स्वच्छता हा कोट्यवधी रुपये खर्चाचा सरकारी कार्यक्रम करावा लागतो, हा मानसिक विकासाच्या अनुशेषाचाच परिणाम आहे, हेही जाणवले, आणि विचार करत करत मन मागे गेले.

मुंबईच्या मध्यावरून मिठी नदी वाहते. तिला अजूनही नदी म्हणत असले, तरी तो आता असाच एक नाला  आहे. रसायनमिश्रित द्रवपदार्थ, कचरा आणि टाकाऊ म्हणून नकोसे झालेल्या झालेल्या असंख्य वस्तू पोटात घेणारे ते हक्काचे ठिकाण झाले आहे. मागे काही महिन्यांपूर्वी, मुंबईत वाझे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावर खंडणीवसुली प्रकरणी कारवाई सुरू झाल्यावर तर, या मिठीच्या पोटातून संगणक आणि महत्वाची माहिती असलेल्या हार्ड डिस्कस् देखील बाहेर काढल्या गेल्या होत्या. असंख्य गुन्ह्यांचे पुरावेदेखी या नाल्याच्या पोटात गडप झाले असल्याची वदंता आहे. तरीही पश्चिम उपनगरांतील अनेकजण उपनगरी गाड्यांतून येजा करताना सोबतच्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य वगैरे वस्तू गाडी पुलावर आली की भक्तिभावाने मिठी नदीत फेकतात, आणि नमस्कारही करतात. हेही मानसिकतेचेच एक रूप असते.

ते भाषण ऐकताना, स्वच्छ भारताच्या मुद्द्यापाठोपाठ मनात साचलेली ही काही दृश्ये जिवंत झाली, आणि स्वच्छता हे मानसिक विकासाचे पहिले लक्षण आहे, असा निष्कर्ष मी काढला. आजकाल मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी, रस्त्याकडेच्या भिंतींवर देवतांच्या वगैरे प्रतिमा रंगविल्या जातात. देवादिकांचे फोटोही लावले जातात. त्यांच्यासमोर कचरा वगैरे फेकण्याएवढा बेमुर्वतपणा माणसाच्या अंगी सरसकटपणे नसतो, असा त्यामागचा विचार असावा. पण स्वच्छतेचे महत्व सांगणाऱ्या एखाद्या होर्डींगच्या खालीच कचरापट्टी झालेलीही इथे पाहायला मिळते.

मानसिक विकासाचा अनुशेष भरून काढायला आपल्याला किती वर्षे लागणार, या विचाराने मनात काहूर माजते. पंतप्रधान मात्र, आपल्या प्रत्येक भाषणात स्वच्छ भारताचा मंत्र देतच असतात...


Thursday, December 9, 2021

भाव गिर गया...

   हे एक दृश्य आता किती काळ छळणार?

माहीत नाही!…
“भाव गिर गया, भाव गिर गया” असं ओरडत त्याने पिंजऱ्यात हात घातला.
एक कोंबडी पकडली.
तिचा कलकलाट आसपास घुमला…
पायावरच्या पंज्याच्या पकडीतून सुटण्यासाठी तिने
पंखांची
निष्फळ फडफडही केली.
ती ओरडतच होती.
त्याने बाजूच्याच एका प्लास्टिकच्या टबावर तिला धरले,
आणि
उजवा पंजा तिच्या मानेभोवती पिरगाळला गेला.
क्षणात ती फडफड, तो कलकलाट शांत, मृत झाला…
फटाफट कातडीवरची पिसं काढून
क्षणापूर्वीचा तो जिवंत जीव
निर्जीवपणे समोरच्या तारेवर टांगून
तो पुन्हा कर्कश्शपणे ओरडला,
“भाव गिर गया!”….
समोर दोनचारजण नोटा हातात धरून उभेच होते!!!




Thursday, December 2, 2021

आठवण

वळच चक्कर मारून येण्यासाठी बाहेर पडलो, पायात चप्पल अडकवली. जिन्याच्या दोनतीन पायऱ्या उतरल्यावर थबकलो.

मास्क लावायला विसरलो होतो.

पुन्हा मागे आलो.
कपाटातला स्वच्छ धुतलेला मास्क काढला…
… आणि त्या क्षणी थबकलो.
मास्क हातातच होता.
मिनिटभर मास्क पाहात राहिलो, आणि मन सुन्न झालं.
मग बाहेर जायचा बेत रहित केला.
कपाटात जेवढे मास्क होते ते सगळे एकत्र केले.
ते पांढरेस्वच्छ, कापडाचे मास्कही मला उगीचच विमनस्क वाटले.
गेल्या वर्षी, मे महिन्यात या मास्कस् चं एक पार्सल टपालाने घरी आलं होतं. तेव्हा ती वरोऱ्याच्या सरकारी रुग्णालयात करोनायोद्धा म्हणून दाखल झाली होती. एकएक जीव संकटातून बाहेर काढण्यासाठी, वाचवण्यासाठी जिवावर उदार होऊन करोनाला थोपविण्यासाठी आघाडी सांभाळत होती.
तेव्हा मी बाजारातले मास्क वापरायचं बंद केलं, आणि तेव्हापासून बाहेर पडताना एक मास्क खिशात आणि एक मुखावर घेऊन वावरत राहिलो.
प्रत्येक वेळीच, मास्क तोंडावर बांधताना तिची आठवण यायची. पुढे पाचसहा महिन्यांनी त्या आठवणींचे कढ येऊ लागले.
आनंदवनातील रुग्णांना त्या केरोनाकाळात तिने स्वावलंबनाचे आणि स्वयंपूर्णतेचे अनेक धडे दिले होते.
प्रचंड प्रमाणावर मास्कनिर्मिती हा त्यातलाच एक उपक्रम होता. तिथे तयार झालेले हजारो मास्क गावोगावी रवाना झाले होते.

असंख्य स्त्रीपुरुषांना, मुलांना या मास्कमुळे करोनापासून संरक्षक कवच मिळाले होते.
असंच एकदा व्हॉटसअपवर तिचा मेसेज आला, ‘पत्ता पाठवा!’
मी पाठवला.
पुढच्या आठवडाभरात माझ्या पत्त्यावरही ते मास्क दाखल झाले.
रोज ते वापरताना ती आठवायची.
आज तेच झालं, आणि नकळत एक विषण्ण सुस्कारा बाहेर पडला.
मुंबईत आली की ती खूपदा गप्पा मारायला, भेटायला लोकसत्ताच्या ऑफिसमधे यायची.
एकदा तर वेळ होता म्हणून तिने आमच्या मुंबईच्या टीमबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या, आणि मोकळं बोलायला मिळालं म्हणून मनापासून खुश झाली…
कितीतरी गप्पांमध्ये तिने आनंदवनात फुलवलेलं आनंदवन, तिचे ते वैशिष्ट्यपूर्ण जंगल, तिथले प्रकल्प, नव्या योजना… सांगताना तिचा उत्साह ओसंडून जायचा!
नंतर कधीतरी, काहीतरी निशब्द असा एक उद्विग्न मेसेज आला. एका बातमीमुळे ती खूप दुखावली होती.
रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला, वर्तमानपत्रे टाकून शिक्षण केले, वार लावून जेवत परिस्थितीवर मात केली, गरीबीशी झगडत मोठा झाला... असे काही प्रकार एखाद्याच्या मोठेपणाला झालर लावतात. असे करत मोठी झालेल्यांना समाज अधिक आदर देतो, ही जुनीच प्रथा आहे. कुणीच मोठी व्यक्तिमत्वे यातून बचावलेली नाहीत.
उलट, महान माणसांच्या पूर्वायुष्याकडून समाजाच्या याच जणू अपेक्षा असाव्यात इतका हा प्रकार मानसिकतेत भिनलेला आहे, ते योग्य नसले तरी पुसून टाकणे सोपे नाही असे वाटते.
पुढे काही दिवसांनी, ती गेल्याचीच बातमी झाली!
आज सकाळी कुणा मित्राच्या वॉलवर तिची आठवण जिवंत झाली.
आत्ता मास्क हाती घेतला, आणि तिचा बोलका, हसरा चेहरा डोळ्यांसमोर आला.
मग डोळे भरत गेले, आणि तो चेहरा धूसर धूसर होत, गडप झाला.
एक वर्ष उलटलंय.
शीतल करजगी-आमटे आता आपल्यात नाही.

Monday, November 29, 2021

प्रातःस्मरण मंत्र

 से अचानक काय घडले असावे, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या जाहिरातींचा सुळसुळाट सुरू झाला? खरे तर, असे म्हणतात की हालचाल, व्यायाम, नियमित आहार, सकारात्मक मानसिकता, चिंतामुक्त जीवन असे सारे काही सुरळीत असेल तर बद्धकोष्ठाची चिंता कमी असते. बद्धकोष्ठ हा पोटाचा, आतड्याचा विकार असला तरी त्याची कारणे पाहाता, तो एक मानसिक विकारही ठरू शकतो. बद्धकोष्ठामुळे बेचैनी, अस्वस्थता, चिडचीड वगैरे स्वाभाविक बदल संभवत असल्याने एका व्यक्तीचे बद्धकोष्ठ हे कौटुंबिक अस्वस्थता किंवा अशांततेचे कारण ठरू शकते.

जाहिरातींचाही हंगाम असतो. उदाहरणार्थ, एसी, पंखे, कूलर आदींच्या जाहिराती सुरू झाल्या की उन्हाळा येतो आणि ऊबदार कपड्यांच्या जाहिराती सुरू झाल्या, क्रीम वगैरे त्वचारक्षण उपायांच्या जाहिराती दिसू लागल्या की हिवाळा आला असे मानण्याची प्रथा असते. आता ज्याअर्थी बद्धकोष्ठावरील उपायाच्या जाहिराती वाढल्या आहेत त्याअर्थी हा विकार मोठ्या प्रमाणात फैलावला किवा फैलावत असावा असे मानण्यास वाव आहे. तसे असेल, तर सामाजिक अस्वस्थता किंवा नैराश्याची मुळे व्यक्तिगत बद्धकोष्ठतेतून उद्भवणाऱ्या मानसिक बेचैनीत दडलेली असू शकतात, याचा विचार व्हावयास हवा. आजकाल कोणत्याही अफवेतून किंवा गैरसमजातून किंवा केवळ राजकीय-अराजकीय हेतूनधूनही परस्परांवर चिखलफेक, मारामाऱ्या, वगैरे प्रकार होत असून अशा घटनांचे समाजवैज्ञानिक विश्लेषण करणाऱ्यांनी बद्धकोष्ठासारख्या विकाराचे कारण फारसे- नव्हे, मुळीच- विचारात घेतलेले दिसत नाही. त्यामुळे अशा घटनांवर नेमके इलाज होत नसल्याने त्या वाढत असाव्यात.
समाजात शांतता, सौहार्द, सामंजस्य टिकावे असे खरोखरीच वाटत असेल, राजकारणरहित हेतूतून समाज स्वस्थ राखायचा असेल, तर बद्धकोष्ठ होण्याची कारणे दूर करायला हवीत. करोना लाटेच्या काळात टाळेबंदी वगैरेमुळे माणसांना घरकोंबडेपण आले. बसल्या जागी लॅपटॉपादी माध्यमांतून जगाशी संपर्क ठेवण्यामुळे व्यायाम, शारीरिक हालचालींवर बंधने आली. एका बाजूला घरबसल्या काम करत असताना खाणे सुरूच राहिले, पण पचविणे अवघड होत गेले. त्यातच मान मोडून काम करताना प्रकृतीची हेळसांड सुरू झाली. ही कारणे बद्धकोष्ठतेस पोषक होती. पण तेव्हा अशा तक्रारी आढळल्या नाहीत. आता चलनवलन सुरू झाले, व्यायाम, चालणे आदींना मुभा मिळू लागली तर एकदम बद्धकोष्ठतेच्या जाहिराती दिसू लागल्या. या विसंगतीचाही समाजविज्ञानाधारे अभ्यास व्हावयास हवा. कारण पुढे जाऊन हा विकार अधिक वाढल्यास त्याचे सामाजिक परिणाम भोगावे लागण्याची भीती असू शकते.
टाळेबंदीच्या काळात सगळ्यांचेच हाल झाले, पण नाटक सिनेमावाल्यांना जास्तच झळ बसली. नटवर्य सुबोध भावे यांची भूमिका (मॉडेल म्हणून) असलेल्या, बद्धकोष्ठतेवरील जाहिरातीमुळे या विकारावर विस्ताराने विचार करावा असे वाटले. जेव्हा काहीही न करता घरात बसून चरणे एवढेच काम असते, तेव्हा हा विकार होत नाही, तर त्याची लक्षणे काही काळानंतर दिसतात, असे या जागिरातीवरून वाटते.
त्यामुळे, बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ‘पेट साफ तो रोग माफ’ अशी बद्धकोष्ठतेवरीलच एका औषधाच्या जाहिरातीची टॅगलाईन आहे. रेल्वेतून प्रवास करताना आपण ती पाहिली असेल. तिला लाईटली घेऊ नये. सकाळी त्या जाहिरातीचे प्रातस्मरण केल्यास समाजस्वास्थ्य चांगले राहून विकास साधतां येईल.
म्हणून लक्षात ठेवा, ‘लाख दुखोकी एक दवा’ हे सत्य फक्त बद्धकोष्ठावरील उपायासच लागू पडते.
कारण हा एक सामाजिक विकार होऊ शकतो.
पोट साफ हवेच, पण खाणेही माफक हवे. पचवायची ताकद असेल तेवढेच खा.
बद्धकोष्ठ टाळा!!

Friday, November 26, 2021

उबविलेल्या अंड्याची गोष्ट...

काटक्या गोळा करून बांधलेलं घरटं पूर्ण झालं, आणि पलीकडच्या झाडावरून कावळ्याची धावपळ न्याहाळत बसलेल्या कावळिणीने तोंडातून कर्कश्श आवाजही काढला. कावळ्याच्या तीक्ष्ण कानांनी तो टिपला. पिल्लांसाठी बनविलेल्या बेडवर कबुतरांच्या पिसांचा गालिचा अंथरून कावळ्याने फांदीवरच स्वतःभोवती एक गिरकी घेतली, आणि तो कावळिणीसमोर जाऊन बसला. कावळिणीने ते पाहिले, पण तोऱ्यात मान फिरवून ती उगीचच फुरंगटून बसली. मग कावळ्याने तिची मनधरणी केली. बऱ्याचदा काहीच कारण नसताना कावळिणीला राग यायचा, मग कावळा धावत येऊन तिची मनधरणी करायचा. हा संसार आपला दोघांचा आहे, दोघांनी मिळूनच तो चालवायला हवा, सारखा हट्टीपणा करून चालणार नाही असेही तिला समजावून सांगायचा. मग मोठ्या उपकाराच्या तोऱ्यात कावळीण संसारात पुन्हा सामील व्हायची. आता काही दिवसांनी नवीन पिल्ले जन्माला येतील, तोवर तिला कसलीही तोशीश लागू नये, असेही कावळ्याने ठरविले होते. तिचे हट्ट पूर्ण करायची त्याची तयारी असली, तरी अंडी उबविण्याचे काम तिलाच करावे लागणार आहे, हे कावळ्याला माहीत होते. कावळिणीला त्याचेच दुःख होते. याने तोऱ्यात मिरवायचे आणि आपण मात्र अंडी उबवत घरट्यात बसून राहायचे, या कल्पनेनेच कावळीण फणफणत असे. त्यामुळे घरी आल्यावर कावळिणीची समजूत काढायची, हाडकाचा तुकडा प्रेमाने तिला भरवायचा, आणि कावळीण खुश झाली की पुन्हा बाहेर पडायचे, असा कावळ्याचा दिनक्रम होता. आपला बराचसा वेळ कावळिणीची मनधरणी करण्यातच जातो, पण संसार करायचा तर आपणच थोडे सहन करायला हवे, हे त्याने ओळखले होते. म्हणूनच, आज घरटे बांधून पूर्ण झाल्यावर कावळ्याने तिच्या पंखात हलकेच चोच खुपसून तिला घरट्याच्या झाडाकडे येण्याची विनवणी केली. कावळिणीला तेच हवे होते. कावळ्याने आपल्यापुढे शेपटी टाकली, की तिला आनंद व्हायचा. आजही तिला बरे वाटले, आणि तिने त्या झाडावर झेप घेतली. फांदीवरच्या घरट्याकडे आधी दुरूनच पाहिले. बाहेरून ते ओबडधोबड दिसत असल्याने कावळिणीस ते आवडणार नाही, पण आतील सुखसोयी पाहून ती नक्कीच खुश होईल अशी कावळ्याची खात्री होती. एकदा घऱट्याभोवती गिरकी घेतली, आणि तिने आत डोकावून पाहिले. घरटे आतून सुंदर सजले होते. तिने मनातल्या मनात अंड्यांचा हिशेब केला. आपल्याला होणाऱ्या पिल्लांकरिता एवढे घरटे पुरेल ना, तेही मनात विचार करून नक्की केले, आणि कावळ्याकडे तिरक्या मानेने पाहात तिने टुणकन घरट्यात उडी मारली. कावळा सुखावला. त्याने एकदा तिच्या चोचीत चोच खुपसून आनंद व्यक्त केला, आणि तो उडाला. पण आता तिला राग आला नाही. अंडी घालण्याची वेळ जवळ आली होती. कावळिणीने घरट्यात बस्तान बसविले, आणि काही वेळातच घरट्याच्या मऊशार गादीवर चार अंडी घातली. आता पुढचे दिवस अंडी उबविण्यातच जाणार होते. पिल्ले बाहेर येईपर्यंत आता इथून हलायचे नाही, असे कावळ्यानेही तिला बजावले होते. बाहेर खूप शत्रू टपून बसलेले असतात, ते घऱट्यात घुसू शकतात, हे कावळ्याला माहीत होते. कावळिणीने मानेनेच होकार दिला, आणि अंडी उबविणे सुरू झाले. कावळीण कायम अंड्यांवर बसूनच होती. एकदा मात्र, पलीकडच्या झाडावर कावळ्यांचा कलकलाट वाढला, म्हणून तिने जागेवरूनच पाहिले. तिचा कावळोबाही कलकलाटात सामील होता. कावळिणीला काळजी वाटू लागली, आणि कावळ्यांच्या गर्दीत सामील होऊन तीही कलकलाट करू लागली. बऱ्याच दिवसांनी कलकलाट केल्याने, किती वेळ गेला ते तिला कळलेच नाही. ती भानावर आली तेव्हा तिला अंड्यांची आठवण झाली, आणि तिने झाडाकडे झेप घेतली. घरट्यात अंडी जिथल्या तिथे होती. पुन्हा अंडी उबविणे सुरू झाले. यथावकाश अंड्यातून पिल्ले बाहेर आली, आणि कावळिणीची लगबग वाढली. बाहेरून खाऊ आणून पिल्लांना भरविण्यात दिवस कधी संपतो तेच तिला कळेना झाले. पिल्ले दिवसागणिक वाढत होती. आता त्यांना पंख फुटले. आवाजही येऊ लागला. पिल्लांना उडायला शिकवायचे, असे ठरवून तिने रात्री पंखांच्या कुशीत पिल्लाना घेतले, आणि सारे कुटुंब झोपी गेले. मध्यरात्री अचानक कलकलाट सुरू झाला. पिल्लेही ओरडू लागली, आणि कावळीण चपापली. एका पिल्लाचा आवाज वेगळाच होता. आपण भलतेच अंडे उबविले हे तिच्या लक्षात आले. त्या दिवशी झाडावरच्या कलकलाटात सामील होण्यासाठी घरटे सोडले, तेवढ्यात कोकिळेने डाव साधला होता. पण आपलीच चूक होती, हे ओळखून कावळीण गप्प राहिली. आपल्या घरट्यात आपण उबविलेल्या अंड्यातली कोकिळा आता लोकांच्या कौतुकाचा विषय होणार आणि आपली पोरं मात्र कलकलत भटकत राहणार, या विचाराने कावळीण हैराण झाली. संध्याकाळी कावळा घरी आला, तेव्हा तिने कोकिळेच्या पिल्लाची गोष्ट कावळ्याला सांगितली. कावळा वरमला, आणि म्हणाला, काय करणार, आपलीच चूक होती ना... कोकिळेच्या पिल्लाने बाहेर झेप घेतली होती. पलीकडच्या झाडावरून गरट्याकडे पाहात कोकिळेने मंजुळ आवाजात कावळिणीला प्रेमाने साद घातली. कावळिणीने तिच्यावर झडप घालण्यासाठी पंख पसरले. मग कोकिळा दूर उडून गेली.

भविष्याचे अस्वस्थ वर्तमान!

 

मध्यंतरी माझ्या वाचनात एक बातमी आली. खरे म्हणजे, जवळपास दररोजच अशा बातम्या येतच असतात. पण या बातमीमुळे दररोजच्या अस्वस्थतेचा उद्रेक झाला, आणि आपल्या जगण्यापुढील हे मोठे आव्हान असूनही आपण रोजच्या चर्चांमध्ये त्यावर कधी फारसे बोलत नाही याचे मलाच आश्चर्य वाटले.

उत्तर प्रदेशातल्या कुठल्याशा गावात, एका सकाळी एक महिला फिरावयास गेली असताना रस्त्याकडेच्या एका कचरा कुंडीतून तिला एका बालकाच्या रडण्याचा केविलवाणा आवाज ऐकू आला, आणि ती कचरा कुंडीजवळ गेली. आता तो आवाज स्पष्ट झाला होता. या महिलेने कुंडीत डोकावून पाहिले. अगोदर तिला प्रचंड धक्का बसला. तिचे डोळे विस्फारले, आणि भीतीने तिने दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले. कुणाची तरी चाहूल लागल्यामुळे असेल, कचरा कुंडीतल्या त्या बाळाचं रडणं आणखीनच वाढलं होतं. मग ही महिला भानावर आली. कदाचित, तिच्यातली आई जागी झाली, आणि कचरा कुंडीत हात घालून त्या बाळाला अलगद उचलले. कुशीत घेतले. दुपट्यात व्यवस्थित गुंडाळलेल्या त्या बाळाने एकदा किलकिल्या नजरेनं त्या आईकडे पाहिले, आणि त्या क्षणी त्याचे रडणेही थांबले. एक गोंडस, गुटगुटीत पण दुर्दैवी जीव त्या क्षणी एका अनामिक मातेच्या कुशीत विसावला होता...

या बाळाचे करायचे काय, हा प्रश्न आता त्या मातेला पडू लागला होता. तरीही तिला ते बाळ पुन्हा कचरा कुंडीत फेकायचे नव्हते. तिने त्याला घरी आणून पोटभर दूध पाजले. भूक भागताच ते काही वेळातच शांत झोपले. पण ते बाळ बेवारस असल्याने त्याची खबर पोलिसांना द्यायला हवी, असे घरातील सर्वांनी सांगितल्याने तिने जड मनाने ते बाळ उचलले, आणि पोलीस ठाण्यात नेऊन दाखल केले. पुढच्या काही तासांतच ही बातमी गावात पसरली. कचरा कुंडीत फेकलेले एक बाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे हे कळताच अनेकजण ते बाळ पाहण्यासाठी गर्दी करू लागले. कचरा कुंडीत फेकले असले, तरी ते बाळ गोंडस होते. गुटगुटीत होते, आणि आसपासच्या जगाची ओळख नसल्याने, आपल्या नवख्या आणि अनोळखी आईच्या मायेचा स्पर्श झाल्याने सुखावून शांतपणे पहुडलेले होते. अनेकांना त्या बाळाला दत्तक घेण्याची इच्छा झाली. पण एखादे बेवारस मूल कुणाकडेही संगोपनासाठी सोपविण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात... ज्या महिलेला ते बाळ सापडले होते, तिने ते पोलिसांच्या हवाली केले, आणि ती जड मनाने घरी परतली...

ही बातमी इथे संपली. आता ती बातमी हा एक भौतिक भूतकाळ झाला आहे. पण खरे तर, ती एका भविष्याची सुरुवात आहे. भारताच्या भावी पिढीच्या एका धाग्याच्या भविष्याची सुरुवात.... अत्याचार, आईबापाविना जगताना जगण्याचा संघर्ष करणारी बालके, समाज ज्या कृत्याला गुन्हा समजतो, जे कृत्य करणे समाजाच्या दृष्टीने बेकायदा असते ती कृत्ये हेच ज्यांचे जगण्याचे साधन असते, अशी रस्त्यावर जन्मलेली, आणि रस्त्यावरच वाढणारी बेवारशी मुले, समाजातील विकृतींची शिक्षा भोगणारी मुले, कोणाच्या तरी चुकीची फळे भोगणारी, कुणा गुन्हेगारी टोळ्यांच्या संघटित धंद्यापायी अपंगत्वाचे ओझे वाहणारी मुले, अशी अनेक रूपे वेगवेगळ्या वेळी वाचलेल्या, ऐकलेल्या बातम्यांमधून समोर येऊ लागली, आणि ही बेचैनी आणखीनच वाढली...

देशाची भावी पिढी म्हणून ज्या पिढीकडे आपण पाहतो, त्या पिढीच्या वर्तमानाचा हा सुन्न करणारा कोपरा मला दिसू लागला. त्याला अनेक कंगोरे आहेत. सामाजिक समजुती, प्रथा, आर्थिक समस्या, चिंता, अशा अनेक बाजूंनी या समस्येला वेढले आहे, हे लक्षात आले. आपल्याच आसपासची स्थिती काय आहे हे पाहावयाचे मी ठरविले... मनाशीच थोडा आढावा घेत असताना, आणखी एक बातमी मला आठवली. ती वाचल्यावर काही प्रश्नही मनात उभे राहिले होते. म्हणून, बातमीची दुसरी बाजूही पाहायला हवी असा विचार मनात घोळू लागला. दत्तक विधानांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर अशी काहीशी ती बातमी होती. देश विदेशातील असंख्य दाम्पत्ये, स्वतःचे मूल नसल्याने अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्यासाठी आसुसलेले असतात.  अशा अनेक अभागी अनाथांना अशी मायेची सावली सापडली आहे, आणि त्यांचे भरकटलेले भविष्य स्थिरावलेदेखील आहे. पण, महाराष्ट्राला एक मोठी समस्या भीषणपणे भेडसावत आहे. दत्तक प्रकरणांत महाराष्ट्र आघाडीवर आहे, आणि महाराष्ट्रातील मुलींना दत्तक घेण्यासाठी पालक पुढे सरसावत आहेत, हे बदलत्या जाणीवांचे चांगले लक्षण असले, तरी महाराष्ट्रात बेवारस, अनाथ मुली आजही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, ही या चांगल्या बातमीची अस्वस्थ करणारी किनार आहे, असे मला वाटू लागले.

गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्रातील अनाथ, सोडून दिलेल्या किंवा बेवारस मुलांची संख्या देशातील अन्य राज्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे, असे काही अधिकृत आकडेवारीवरून दिसते. हे चित्र राज्यातील कौटुंबिक किंवा सामाजिक व्यवस्थेतील मुलींच्या आजच्या स्थितीचे – आणि मानसिकतेचेही- दर्शन घडविते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अनाथालयांची संख्याही मोठी असून तेथे मोठ्या प्रमाणावर मुले-मुली दत्तक घेण्यासाठी उपलब्ध असतात, असे या आकडेवारीवरून दिसते. या राज्यातून सर्वाधिक मुले दत्तक घेतली जातात, म्हणजे, या राज्यात दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनाथ, बेवारस, टाकून दिलेल्या मुलामुलींची संख्यादेखील सर्वाधिक आहे, असा याचा दुसरा, अस्वस्थ करणारा अर्थ!


देशाच्या कोणत्याही अनाथालयांतून दत्तक दिल्या गेलेल्या मुलामुलींपेक्षा महाराष्ट्रातून दत्तक दिल्या जाणाऱ्या बालकांची संख्या सातत्याने सर्वाधिक राहिली आहे, आणि त्यामध्येही मुलींची संख्या सर्वाधिक आहे. मुलांना दत्तक देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहेच, पण त्यातही, महाराष्ट्रातून सर्वाधिक मुली दत्तक घेतल्या जातात, असे या आकडेवारीवरून स्पष्ट होत असेल, तर ती महाराष्ट्राने अभिमानाने पाठ थोपटून घ्यावी अशी बाब नक्कीच नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक मुली बेवारशी होत आहेत, अनाथ होत आहेत, आणि आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी प्रेमळ पालकांच्या शोधात आहेत, हे चित्र विषण्ण करणारे आहे.

देशात मुलींना दत्तक घेण्याची मानसिकता वाढत असून मुलींचा सांभाळ करण्याची संस्कृती समाजात समाधानकारकपणे रुजत आहे, हे एक दिलासादायक वास्तव असले, तरी आजही मोठ्या प्रमाणात मुलींना पालकांच्या शोधात बेवारसपणे दिवस काढावे लागतात, ही या वास्तवाची दुखरी बाजू आहे. म्हणूनच, मुलांना दत्तक देण्यात महाराष्ट्राची आघाडी ही बातमी समाधानाची की चिंतेची याचा गांभीर्याने विचार करावयास हवा...

अंधारमय भविष्यात चाचपडणाऱ्या नवजात मुलींना मायेची पाखर शोधत अनाथालयात दिवस काढण्याची वेळ येणे दुर्दैवी तर आहेच, पण महाराष्ट्र त्यामध्ये आघाडीवर असणे हे त्याहूनही दुर्दैवी आहे.

Tuesday, November 23, 2021

मौनाची भाषा!

 


भावना व्यक्त करण्यासाठी भाषा महत्त्वाची नसते असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा आमच्या गप्पांच्या टोळक्यातला एकजण काहीच न बोलता अंतर्मुख झाल्यासारखा वाटला. तो काहीच का बोलत नाही हे पाहून मी त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव दिसत होते. माझा मुद्दा त्याला पटला असावा असे ते भाव पाहून मला वाटले, तेव्हा बाकीच्या सर्वांना गप्पांचा नवा मुद्दा मिळाला होता. आता भाषा आणि भावना यांवर गप्पा रंगणार हे मला माहीत होते. भाषा हे भावना व्यक्त करण्याचे केवळ एक साधन आहे, तिच्यासोबत भाव असतील, तर भाषेच्या माध्यमातून भावना व्यक्त करणे अधिक प्रभावी असते, असे कुणीतरी म्हणाले, आणि गप्प राहिलेल्या त्या मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताना त्याच्या मनातल्या भावना मला स्पष्टपणे वाचता आल्या. त्याला जे म्हणावयाचे होते, ते त्याने कोणतीही भाषा न वापरता, केवळ भावमुद्रेतून मांडले होते. मग मला आणखी एक मुद्दा सुचला. भाव व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज असतेच असे नाहीच, पण बोलता येण्याचीही फारशी गरज नसते. या जगात, माणूस हा बोलता येणारा बहुधा एकमेव प्राणी असावा. जसे दोन पायांवर चालता येणे हे माणसाचे एकमेव वैशिष्ट्य असते, तसे बोलता येणे हेही फक्त माणसाचेच वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. अन्य प्राण्यांना बोलता येत असले, तरी त्यांच्या बोलण्याची एक जागतिक भाषा असते. जगाच्या कोणत्याही प्रांतात गेलं, तरी गायीचे हंबरणे, कुत्र्याचे ओरडणे, सिंहाची डरकाळी किंवा सूर एकाच भाषेत आपल्या भावना व्यक्त करतात, आणि त्या प्राण्याच्या जमातीतील जगातील कोणत्याही भागातील प्राण्यास ती भाषा सहज समजते. माणसाच्या भावना मात्र, दर दहा मैलाच्या अंतरावर बदलणाऱ्या भाषेतून व्यक्त होतात. अशा वेळी, बदललेल्या भाषेतून व्यक्त होणाऱ्या भावना समजून घेण्यासाठी, आपल्याला भावमुद्रा वाचावी लागते, असे लक्षात आले, आणि जगात बोलल्या जाणाऱ्या असंख्य भाषांमध्ये आणखी एका भाषेची भर आपण घातली आहे की नाही हे शोधायचे मी ठरवले. ती भाषा म्हणजे, मौनाची भाषा’!...

या, मौनाच्या भाषेएवढी प्रभावी भाषा कोणतीच नाही, असे माझे मत आहे. मौनातून भावना व्यक्त करण्यासाठी प्रगाढ साधना करावी लागते. कारण भावना व्यक्त करण्याच्या या साधनास भाषा नसते. शिवाय, मौनातून भावना व्यक्त करण्यासाठी जेवढे कौशल्य लागते, तेवढेच कौशल्य मौनातून व्यक्त होणाऱ्या भावना वाचण्यासाठीही आवश्यक असते. ते सगळ्यांनाच साधत नसल्यामुळेच कदाचित मौनाच्या भाषेचा प्रसार मर्यादित राहिला असावा. ही भाषा फारशी कुणी वापरत नाहीत. ते बरेच आहे. उलट त्यामुळे या भाषेला वेगळे महत्त्वही आहे. म्हणूनच, काही विशिष्ट वेळी या भाषेचा वापर केला जातो. या भाषेतून बरेच काही बोलता येते, आणि  समोरच्यास ते थेट भिडते असा अनुभव जगाने घेतला आहे. त्यामुळेच विनोबाजींपासून अण्णा हजारेंपर्यंत अनेकांनी वेळोवेळी मौनाच्या भाषेतून आपले म्हणणे आग्रहीपणे मांडले, आणि ती भाषा उमगल्याने त्यांना जे म्हणावयाचे होते ते करणे संबंधितांना भाग पडले. मौनाच्या भाषेचा हा प्रभाव सिद्ध झाल्याने, विशेषतः राजकारण्यांच्या जगात ही भाषा अधिक लोकप्रिय होत गेली. कारण प्रसंग पाहून या भाषेचा वापर केल्यास तिचे तिहेरी फायदे होतात, हे या लोकांना अधिक चांगले कळले. अशा अनेक प्रसंगांत मौन पाळून महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देणे सोपे होते, हेही कळले, आणि, या मुद्द्यावर त्यांनी मौन पाळले, ही बातमीदेखील होऊ लागली. मग या पाळलेल्या मौनाचे अर्थ शोधण्याचा जो तो त्याच्या कुवतीनुसार प्रयत्न करू लागतो, आणि त्यातून आणखी नवे अर्थ निर्माण झाल्यास मौन पाळणारा गप्प राहिला, तरी समोरचे अनेकजण अनेक अर्थांनी त्या मौनावर भाष्य करणारी बडबड करू लागतात. सोयीस्कर मौन, सूचक मौन, असे मौनाचे काही प्रकार असतात. एखाद्या वादग्रस्त मुद्द्यावर भावना व्यक्त करण्यासाठी जेव्हा भाषा अडचणीची ठरते, तेव्हा सोयीस्कर मौन पाळले जाते, आणि एखाद्या महत्वाच्या परंतू न बोलणेच बरे असलेल्या मुद्द्यावर भाष्य करण्याएवजी जेव्हा शब्द अडचणीचे ठरतात, तेव्हा सूचक मौन पाले जाते. काही वेळा, राजकीय नेते पश्चात्तापाची भावना व्यक्त करण्यासाठी मौन धारण करतात, तर बऱ्याचदा मौनाला निषेधाचीही झालर लावली जाते. मौन हे अलीकडे आंदोलनाचेही साधन होऊ लागले आहे. आपल्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करूनही त्याची साधी दखलही घेतली जात नाही असे लक्षात आले, की मागण्यांसाठी संघर्ष करणारे समूह मौनव्रत आंदोलन करू लागतात. मग संबंधित यंत्रणेची तारांबळ उडते, आणि मौनातून व्यक्त होणाऱ्या भावना सर्वदूर पसरून एक दबावगटही तयार होतो. शोकभावना व्यक्त करण्यासाठी मौन पाळण्याची प्रथा तर सर्वत्रच असते.

भाषा आणि भावना या मुद्द्यावर तिकडे चर्चा रंगलेली असताना, माझ्या मनात मात्र मौनाचे रंग आकार घेऊ लागले होते. मी घरी आलो, तेव्हा वर्तमानपत्र येऊन पडले होते. मी ते उघडले, आणि पहिलीच बातमी वाचून मूक झालो. क्षणभर डोळे मिटले. हातातील वर्तमानपत्र तसेच उघडे राहिले आणि माझी नजर शून्यात कुठेतरी खिळली. ते पाहून माझ्या मुलीला शंका आली. आजही काहीतरी भयंकर घडले असणारअसे ती म्हणाली. माझ्या मौनाची भाषा व्यक्त झाली होती. नगरच्या रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने घेतलेल्या निष्पाप बळींची बातमी वाचताना माझ्या मुक्या मनात, गेल्या वर्षभरात आगीने घेतलेल्या बळींच्या आक्रोशाने रणकंदन माजविले होते. मौनाच्या भाषेला आवाज नसतो. ती शांतता असते. पण त्या शांततेचाही आवाज डोक्यात आणि मनात कल्लोळ माजवितो, हा नवा अनुभवही त्या वेळी मला आला...

Friday, November 5, 2021

मन देवाचा आहेर...

माणसाच्या प्रत्येक कृतीला विवेकाचे भान असले पाहिजे असे मानतात. कारण विवेकी विचाराचे नाते मनाशी असते. मन हा माणसाचा अजोड असा अदृश्य अवयव आहे. वाढत्या वयाचा आणि शारीरिक किंवा मानसिक वयाचा काही संबंध नसतो. जन्माला आल्या दिवसापासून वय वाढतच असतं. असं वय एका टप्प्याशी येऊन पोहोचलं, की नोकरदार माणूस ‘रिटायर’ होतो. नोकरीधंद्याच्या या काळात, नोकरी लागल्यानंतरची काही वर्षे, ‘किती वर्षे नोकरी झाली’ याचा हिशेब मांडला जातो. वय वाढू लागले, की, नोकरीची ‘किती वर्षे राहिली’, रिटायर कधी होणार याची गणितं करता करता दिवस पुढे सरकू लागतात. पुढे तो दिवस उजाडतो. नोकरीतून निवृत्त झालं, की रिटायर होऊन किती दिवस, महिने, वर्षे झाली याची गणती सुरू होते. असे हिशेब सुरू झाले, की ‘म्हातारपण’ आलं, असं म्हणतात. पण शरीराच्या या अवस्थेसोबत मनानेही त्या टप्प्यांचा हिशेब करत म्हातारपण मिरवायलाच हवे असे नाही. ज्यांची मने वाढत्या वयातही टवटवीत असतात, त्यांच्या शरीरावर, चेहऱ्यावर म्हातारपणाच्या कितीही सुरकुत्या दिसल्या, तरी मनावर तशी एकही रेषा उमटत नाही. अशा टवटवीत मनांचा एक विरंगुळा असतो. ‘स्मरणरंजन’!... तसेही प्रत्येकासच, वयाच्या कोणत्याही अवस्थेत स्मरणरंजन आवडतच असते. वर्तमानकाळात दिसणारे, अनुभवास येणारे अनेक प्रसंग नकळत भूतकाळात घेऊन जातात, आणि भूतकाळातील त्या प्रसंगाच्या हरवत चाललेल्या आठवणींना उजाळा मिळतो. हा उजाळा म्हणजे, कोमेजत्या मनाला टवटवी देणारा एक सुखद शिडकावा असतोच, पण कधीकधी त्या आठवणींच्या धाग्यांची एक सुंदर गुंफण करून नव्या पिढीला अविश्वसनीय वाटतील अशा कितीतरी कहाण्याही जन्म घेतात. त्याच्या नवलाईने नवी पिढीही हरखून जाऊ लागली, की गेल्या दिवसांच्या आनंदापासून पारखे झाल्याची हुरहूर छळू लागते. गेल्या काही वर्षांत, वयामुळे ज्येष्ठत्वाकडे जाऊ लागलेल्या पिढीच्या मनावर अशा हरवलेल्या भूतकाळाच्या आठवणींची दाटी अधिकच वाढू लागली आहे. भूतकाळात जे जे काही वेगळे अनुभवले, त्याची नवी रूपे पाहताना काहीतरी हरवत असल्याची खंत उमटू लागली आहे. हे एक सार्वत्रिक दुखणे होऊ पाहात आहे. व्यापारीकरणाचा प्रचंड प्रभाव हे बहुधा त्याचे कारण असावे. म्हणूनच, नव्या दमाने दर वर्षी येणाऱ्या दिवाळीतले जुने दिवस शोधण्याची एक केविलवाणी कसरत आजही अनेकजण करताना दिसतात. ‘आमच्या वेळची दिवाळी’... हा त्यांच्या भूतकाळ शोधण्याच्या प्रयत्नांचा धागा होऊन जातो, आणि नव्या दिवाळीशी जुन्या दिवाळीची सांगड घालत, निराश उसासे टाकले जातात. सणासुदीच्या प्रत्येक दिवसाचे ‘इव्हेन्टीकरण’ करणे हा धंदा वाढला, तेव्हापासून भूतकाळातल्या सणासुदीच्या आठवणींमध्ये रमण्याची, त्या स्मरणरंजनाची सवय वाढू लागली. लोकांच्या हाती खेळणारा पैसा चलनवलनात आणण्यासाठी किंवा काहीही करून सण साजरे करण्याच्या सवयी नेमक्या हेरून बाजारपेठांनी सणांना उत्सवाचे रूप दिले, आणि प्रत्येक सण हा ‘बाजारकेंद्रीत’ होऊ लागला. जी पिढी आज स्मरणरंजनात रमते, त्या पिढीच्या पूर्वरंगाच्या काळात, नवे कपडे, घरांना रंगरंगोटी, गोडधोडाचे पदार्थ, या गोष्टींना सणापुरते निमित्त असायचे. त्यामुळे त्या सणाला वेगळेपणाची झळाळी होती. आता नवे कपडे घेण्यासाठी सणाचे निमित्त गरजेचे राहिलेले नाही, आणि घरात गोडधोड पदार्थ करण्याची गरज बाजारपेठांनीच संपवून टाकली आहे. त्यामुळे, आता सणाचा उत्साह बाजारपेठांमधील गर्दीवरून मोजला जाऊ लागला. गर्दीने फुलणाऱ्या बाजारपेठा हे सणांच्या उत्साहाचे मोजमाप झाले, आणि घरातल्या खरेदीची रेलचेल हा आनंदाचा मापदंड ठरला. सण म्हणजे इव्हेन्ट झाले, आणि बाजारांनी सणांवर कब्जा केला.

असे झाले, की मन काम करू लागते. मनाचे वेगळेपण म्हणजे, भूतकाळाशीच त्याचे नाते अधिक जवळीकीचे असते. कोणत्याही क्षणी आठवणीतली कितीही मागच्या भूतकाळात पोहोचण्यासाठी मनाला क्षणार्धाचा अवधीदेखील पुरेसा होतो. याच मनाचे एक दुबळेपणही असते. भविष्याचा तंतोतंत वेध घेण्याची शक्ती मात्र मनाला मिळालेली नाही. तसे झाले असते, तर भूतकाळात रमण्याची मजाच संपून गेली असती, आणि भविष्याच्या काळजीनेच असंख्य मने पोखरली जात राहिली असती. मन, माणूस आणि निसर्ग यांच्या या आगळ्या नात्यामुळे माणसाचा भूतकाळ वर्तमानकाळातही आपली अशी एक जागा राखून राहिला आहे. विचारांचा आवेग आणि मनाचा वेग यांची सांगड घालायची सवय लागली, की वाढत्या वयाचा वेग ही समस्या राहात नाही. म्हणून मन जपले पाहिजे. आठवणींच्या अदृश्य कप्प्यात शिरण्याची अभूतपूर्व क्षमता त्याच्याकडेच असते. मन हा देवाने माणसाला दिलेला मौल्यवान आहेर आहे. मन हे विचारांचे घर, आणि कृतीचे आगर आहे, मन हा अथांग सागर आहे, मन हा देहाचा आरसा आहे. तो स्नेहाचा वारसाही आहे. कधीकधी मन अनावर होते, कधीकधी गरीब पामर होते, कधी मुकाट बसते, तर कधी मोकाट सुटते..

Thursday, October 28, 2021

भाषा आणि भावना...

 


एखाद्या विषयाची चिंता किंवा काळजी वाटण्याचा एक हंगाम असतो. समजा, मनासारखा पावसाळा पार पडला आहे, सर्वत्र हिरवाईचे साम्राज्य पसरलेले आहे, आणि उभ्या शेतात पिके डोलू लागली आहेत. नद्या, नाले ओढे दुथडी भरून वाहात आहेत, परसदारीच्या विहिरीच्या पाण्याची पातळी मनासारखी वर आलेली आहे, असे सारे असताना, दुष्काळाची चिंता किंवा काळजी करणे दूरच, पण त्याचा विचारही मनाला शिवणार नसतो. म्हणजे, काळजीचे विषय काही कायम डोकी वर काढत नाहीत. साधारणतः काळ बघूनच काळजीची काजळी वाढत असते. म्हणूनच, सध्याच्या हंगामाशी सुसंगत असा काळजीचा कोणता विषय असावा असा एक विचार आज उगीचच माझ्या मनात आला. खरं तर, हे जगावेगळंच होतं. पण विचार आलाच आहे, तर त्याच्या खोलात जावं असं ठरवलं, आणि वेगवेगळ्या विषयांवर विचार करू लागलो. त्यासाठी कधीकधी बाह्य स्रोतांचा आधार घ्यावा लागतो. सध्या असे स्रोत एका क्लिकसरशी हात जोडून समोर उभे राहात असल्याने, केवळ गुगलवर एखादे अक्षर टाईप केले, तरी हजारो विषय समोर येतात. मी संगणकाच्या कळपट्टीवरचे एक बटन दाबले, आणि सर्च रिझल्ट पाहताना गंमत वाटली. आपण ज्यावर विचार करतो, एखादी समस्या कधी छळत असते, तेव्हा, एखादं  पुस्तक हाती घ्यावं, आणि कोणतंही पान उघडून एखादा परिच्छेद काळजीपूर्वक वाचावा. त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा, थोडी वैचारिक कसरत केली, तर त्यामध्ये आपल्याला भेडसावणाऱ्या समस्येचं उत्तर लपलेलं जाणवतं, असं मागे मला कुणीतरी सांगितलं होतं. तेव्हा मी ते करूनही पाहिलं होतं. समस्येचे उत्तर शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, पण दूरदूरचा काही अर्थ लावता आला, आणि समस्येशी त्याचा संबंध आहे हेही जाणवत गेलं. कधी वेळ असेल, तर तुम्हीही करून पाहा. उत्तर सापडेल असं नाही, पण विचाराला एक दिशा नक्की मिळेल. उत्तर शोधायची सवय लागेल. कदाचित खूप सवयीनंतर उत्तरही सापडेल. मला ज्याने हा उपाय सांगितला, त्याने मला ज्ञानेश्वरी उघडण्यास सांगितले होते. पण मी तुकोबारायांची गाथा उघडली, आणि जवळपास उत्तराच्या जवळ पोहोचलो. नंतर प्रयोग म्हणून, कोणतेही चांगले पुस्तक उघडून चाचपणी केली. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी होतो असं नाही, पण त्याची गंमत वाटते. मुख्य म्हणजे, वाचनात मन रमतं. ही त्याची जमेची बाजू.


पण आत्ता तो विषय नाही. तर मी एका कुठल्या तरी शब्दाच्या सुतावरून गुगलच्या मदतीने शोधाचा स्वर्ग गाठायचा प्रयत्न केला. सकाळीच वर्तमानपत्र वाचताना, साहित्य संमेलनाविषयीची बातमी समोर आली होती. आत्ता, जगभरातील भाषांविषयीची माहिती समोर आली. मग मी सकाळच्या बातमीशी या शोधाची संगती लावण्याचा प्रयत्न सुरू केला, आणि जमलं. हरएक साहित्य संमेलनात सहसा, ‘भाषेचं कसं होणार’ याची काळजी व्यक्त करणारे संवाद, परिसंवाद होत असतात. पहिले साहित्य संमेलनदेखील याच चिंतेपोटी आयोजित करण्यात आलं होतं, असं म्हणतात. त्यामुळे, सकाळी वाचलेली साहित्य संमेलनाची बातमी, आणि आत्ता सर्चमधून समोर आलेला भाषेचा मुद्दा, यांचं काहीतरी नातं नक्कीच होतं. जगभरात जवळपास साडेसहा हजार बोली भाषा आहेत, असं या सर्चमधून समोर आलं. त्यापैकी मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जगाच्या तुलनेत १.०८ टक्के आहे. म्हणजे, जगभरातील वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांमध्ये मराठी भाषकांची संख्या आजही ८३ दशलक्षांहून अधिक आहे. तरीही, मराठी भाषेचं कसं होणार, याची काळजी आपण वर्षानुवर्षे करतो आहोत. त्यावरून कुणा भाषातज्ज्ञाचं एक वाक्य आठवलं,  ‘भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते!’


...आपल्या गावाशेजारी एखादा डोंगर दगडाची खाण अंगावर घेऊन उभा असतो. कधीतरी त्यावर पहिली कुदळ पडते, मग पोकलेन, क्रशर येतात, आणि काही कळेपर्यंत तो डोंगर जमीनदोस्त होऊन तेथे गगनचुंबी इमारतीही उभ्या राहतात. हे डोळ्यादेखत घडूनही, हा बदल जाणवतच नाही. कारण, तो संथ असतो. बदलाचीही सवय होते, आणि बदल जाणवत नाही. भाषेचं तसंच असतं. कदाचित त्यामुळेच, बोलीभाषा टिकून असली तरी तिचं कसं होणार याची चिंता जागी ठेवावी लागत असणार. तरीही, ज्या काळजीमुळे मराठी काळाआड जात असल्याचे बोलले जाते, त्यालाच, काहीजण भाषासमृद्धी असेही म्हणतात. ज्याचा त्याचा भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. अनेकांना भाषा हे केवळ संवादाचे साधन वाटते. कारण तिची लिपी आणि उच्चार यांहून, त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना महत्वाच्या, असे अनेकांना वाटते.


तसं असेल, तर समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्या चित्रलिपीला, म्हणजे, ‘स्माईली’ला ‘भाषा’ म्हणून मान्यता मिळायला काय हरकत आहे? किंवा अनेकदा, विशेषतः राजकारणी नेते, काही बोलण्याऐवजी मौन पाळतात, आणि त्यातूनही अनेकांना अनेक अर्थ सापडतात. मग मौनाचीदेखील भाषा असतेच, असे मानायला काय हरकत आहे?... तसे असेल, तर मौनाच्या भाषेला जागतिक भाषा म्हणून मान्यता मिळायला काय हरकत आहे? कारण ही एक अशी भाषा आहे, ज्यामधून व्यक्त होणारे भाव, जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, तरी सारखेच असतात...

दै. पुण्यनगरी, २६ ऑक्टोबर २०२१

Tuesday, August 17, 2021

धर्म और राजधर्म

 "आज वोट की राजनीती के कारण हिंदू समाज को टुकडे में बांटने की कोशिश हो रही है. हम समता के पक्षधर है. जन्म और जाति के आधार पर कोई छोटा या बडा नही होना चाहिये. ईमानदारी से रोटी कमाना अच्छा है. प्रामाणिक तरीके से धन एकत्र करना अच्छा है. लेकिन ईमानदारी से रोटी कमाने का भाव तभी पैदा हो सकता है, जब ह्रदय मे विश्वास हो, कि मेरे स्वार्थ के अलावा भी कोई एक सत्ता है. मुझे उसमे विलीन होना है. यह शरीर तो नही रहेगा. सनातन की खोज का नाम धर्म है. अब वक्ता के नाते मेरा भी धर्म है की, मै अच्छी अच्छी बाते कहूँ और श्रोता के नाते आपका भी धर्म है कि आप मुझे शांति के साथ सुनें. लेकिन जिस देश मे लोकसभा मे सत्ता पक्ष के सदस्य अपने प्रधानमंत्री को सुनने से इन्कार कर दे, उसमे धर्म की कितनी रक्षा होगी यह कहना मुश्किल है."

-अटलबिहारी वाजपेयी, (संत रोहिदास चरित्र आणि वाड्मय ग्रंथ प्रकाशन समारंभप्रसंगीच्या भाषणातून, मुंबई)

Monday, August 16, 2021

लोकनेता!

 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य होते. त्याच्या भाषणात कधी काव्य दिसायचे, कधी राजकारण दिसायचे. कधी कनवाळू ममतेची झाक दिसायची तर कधी धारदार कठोरपणा दिसायचा. विद्वत्ता हा तर त्यांच्या वक्तृत्वाचा गाभाच होता. त्यांच्याही वक्तृत्वात शब्दांची सुंदर अनुप्रासयुक्त गुंफण असायची. ‘गंभीर’पणातही विश्वसनीय व आश्वस्त ‘खंबीर’पणा भरलेला असायचा. वाजपेयींच्या अशा बहुपेडी वक्तृत्वाला व्यासपीठाचे मात्र पुरेपूर भान असायचे. कोणत्या मंचावर वक्तृत्वाचा कोणता पदर अलगदपणे उलगडायचा याची त्यांना नेमकी जाण असायची. म्हणूनच, आपल्याला काय बोलायचे आहे यापेक्षा, काय बोलले म्हणजे श्रोत्यांना ते आपलेसे वाटेल हे ओळखून आपल्या भाषणास नेमकी वळणे देत आपले मत श्रोत्यांच्या गळी उतरविण्याचे कसब त्यांच्या शैलीत होते. म्हणूनच वाजपेयी हे यशस्वी व पक्षभेदांपलीकडचा ‘लोकनेता’ ठरले. त्यांच्या नेतृत्वाची कमान उंचावण्यात त्यांच्या विचारवंत वक्तृत्वाचा मोठा हिस्सा होता.

मात्र, ते पंतप्रधान झाले आणि त्यांच्या वक्तृत्वास प्रशासकीय शिष्टाचाराची बंधने आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी काय बोलायचे, आणि कितीही मनात असले, तरीही काय बोलायचे नाही, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयातील संबंधित यंत्रणेकडे गेला, आणि ‘पंतप्रधान वाजपेयी’ व ‘लोकनेता वाजपेयी’ यांच्यातील संघर्षात वाजपेयी नावाचा संवेदनशील कवीची, वक्त्याची आणि ‘माणसा’ची घुसमट होऊ लागली. एकदा अनौपचारिक गप्पांत त्यांची ही घुसमट त्यांनी बोलूनही दाखविली आहे.
पण पदाच्या जबाबदारीचे भान त्याहूनही कठोर आहे हे ओळखून वाजपेयींनी त्या जबाबदारीला महत्व दिले.
... म्हणून, अटलबिहारी वाजपेयी हे ‘लोकनेता’च राहिले!!
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
🙏

Tuesday, August 10, 2021

खाण्याची 'श्रावण'संहिता !

 
बऱ्याच दिवसांपासून राजेंच्या मनात एक विचार घोळत होता. पण त्यावर निर्णय घ्यावा की नाही यावर त्यांचा निर्णय होत नव्हता. त्यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याशी विचारविनिमय केला, आपल्या मनातील विचार त्याच्याकडे बोलून दाखविला, आणि काय करावे हे सुचविण्यासही सुचविले. मग राजेंचा सहकारीही त्यावर विचार करू लागला. राजेंना कोणता सल्ला द्यावा हे त्यालाही कळत नव्हते. त्या रात्री, गटारीच्या निमित्ताने सारे मित्र एकत्र जमले असताना, त्याच्या मनातील त्या विचाराने उचल खाल्ली, आणि शेंगदाण्याचा बकाणा तोंडात कोंबून त्याने अडखळत बोलायला सुरुवात केली. सारे मित्र थबकले. आपले काम थांबवून त्यांनी मित्राचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न सुरू केला, आणि राजेंनी दिलेल्या अवघड कामगिरीचे वर्णन कसेबसे करून राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याने आपल्या मित्रांनाही निर्णयाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. मग गप्पांचा नूरच बदलून गेला. प्रत्येकजण उपाय शोधू लागला. विचारांच्या गोंधळात समोरचा सारा माल कधी फस्त झाला तेही कुणालाच कळले नाही. अखेर राजेंचा विश्वासू सहकारी गोंधळला. थोडेसे रागावूनच त्याने आपल्या मित्रांना फैलावर घेण्यास सुरुवात केली. एवढा साधा प्रश्नदेखील तुम्हाला सोडविता येत नसेल तर आपण मित्र म्हणून राहायच्या लायकीचे नाही, असेही त्याने अडखळत मित्रांना सुनावले, आणि अर्धवट डोळे मिटलेल्या अवस्थेत एका मित्राने बोट वर केले. तो आता काहीतरी बोलणार हे ओळखून राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याने सर्वांना हातानेच शांत राहण्याची खूण केली आणि डोळ्यांच्या इशाऱ्यानेच त्या मित्रास बोलण्याची परवानगी दिली. समोरच्या रिकाम्या प्लेटकडे पाहून उलट्या मनगटाने ओठ पुसत तो मित्र बोलू लागला, "उद्याच्या उद्या, सर्वांची बैठक बोलावून राजेंनी त्या विचाराची अंमलबजावणी केली पाहिजे. श्रावण सुरू होत असल्याने, खाण्यावर बंधने घातली पाहिजेत. खरे तर, श्रावण महिन्यात कडकडीत उपवास करायचे असतात, पण राजेंच्या सहकाऱ्यांना खाण्याची सवय असल्याने महिनाभर उपवास पाळणे शक्य होणार नाही. दुसरे म्हणजे, उपवास करणे हे काही धार्मिक व्रत वगैरे नसून, अति खाण्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींना आवर घालणे आवश्यक असते, हे राजेंनी साऱ्या सहकाऱ्यांस पटवून द्यायला हवे. अति खाण्याने अपचन होते, काही वेळा पित्त उसळते, आणि खाल्लेले पचविणे जड जाते. अशा वेळी, उपवास शक्य नसेल, तर, पचायला हलके व सहज जिरवता येईल एवढेच काही खावे. श्रावण महिन्यात सणासुदीच्या निमित्ताने, शक्यतो उपवासच करणे चांगले असते असे म्हणतात. आदल्या दिवशीपर्यंतची खाण्याची सवय मोडल्यास सहकारी नाराज होऊ शकतात. तसेच, अपचन झाल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नसल्याने, अपचन होईपर्यंत खाण्याची सवय सहजासहजी मोडताही येत नसते. अलीकडे राजेंच्या अनेक सहकाऱ्यांच्या खाण्याची मोठी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती, आणि कोण किती खातो याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. काही सहकाऱ्यांना तर उलटी करावयास लागल्याने, आता तरी खाण्याच्या सवयीवर बंधने घालणे गरजेचे आहे, हे राजेंनी सर्वांस समजावून सांगायला हवे. ज्यांनी भरपूर खाल्ले आहे, त्यांना खाऊ घालणारेच आता त्यांच्या भुकेचे वाभाडे काढू लागल्याने, खाऊ घालणाऱ्याकडे मागणी करताना संयम बाळगणेही गरजेचे झाले आहे. राजेंनी हे सारे आपल्या सहकाऱ्यांस समजावून सांगावे, व किमानपक्षी श्रावण महिन्यात तरी खाण्याची बंधने पाळण्याचे आवाहन करावे"...
मित्राने अर्धवट डोळे उघडून दिलेला हा कानमंत्र ऐकताच राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याचे डोळे खाडकन उघडले, आणि तो कसाबसा उठला. श्रावणात खाण्यासंबंधीची आचारसंहिता सहकाऱ्यांना आखून द्यावी, असा सल्ला राजेंना देण्यासाठी त्याने फोन उचलला. श्रावण सुरू होण्यास काही तासांचाच अवधी उरलेला असल्याने, गटारीचे औचित्य साधून उरलेला हात मारून घ्यावा आणि मगच सर्वांनी श्रावण पाळण्यास सुरुवात करावी, असा तोडगाही सुचविण्याचे त्याने ठरविले. राजेंनी फोन उचलला, आणि या विश्वासू सहकाऱ्याने आपला विचार राजेंसमोर मांडला. राजेंनी मान हलविली, आणि यावर काय निर्णय घ्यावा याचा विचार करत ते पलंगावर पहुडले...

Friday, July 30, 2021

'जंगली’ आणि ‘रानटी’!

 

... आणखी काही दिवसांतच तिच्या पोटातल्या बछड्यांना बाहेरचं जग दिसणार होतं... त्यांच्या जन्माचा सोहळा सुरक्षितपणे साजरा करता यावा म्हणून तिने एक मोक्याची जागाही हेरून ठेवली होती. अरुंद तोंडाची एक अंधारी गुहा... पोटात पिल्लं वाढतायत याची पहिली जाणीव झाली, तेव्हा याच गुहेच्या तोंडाशी लोळण घेत तिने आनंद साजरा केला आणि गुहेच्या अरुंद तोंडातून आत जाऊन पुन्हा एकदा गुहेची पाहणी केली. पिल्लांसाठी याच्यापेक्षा सुरक्षित जागा कोणती नाही याची खात्री करून घेण्यासाठी नंतरही दररोज ठरलेल्या वेळी ती त्या जागेवर यायची. दबक्या, सावध नजरेने आसपासचा कानोसा घ्यायची. परिसरातलं सारं जंगल, स्तब्ध होऊन तिच्या हालचाली न्याहाळत असायचं. झाडाच्या शेंड्यांवरली वानरं विस्फारल्या नजरेनं तिच्या हालचालींवर सावध नजर ठेवून जंगलाला इशारा देणारा एखादाच आवाज उमटवायची, आणि पुढचे पाय ताणून शरीराला लांबलचक आळस देत बेपर्वाईच्या आविर्भावात त्याकडे दुर्लक्ष करून ती गुहेत शिरायची... त्या दिवशीही तसेच झाले. ती आली, तिने आसपास पाहिले. जंगल नेहमीसारखं स्तब्ध होऊन तिच्या आगमनाचं मूक स्वागत करत होतं. मग फार वेळ न दवडता ती गुहेत शिरली. आता पिल्लांच्या जन्माला फार अवधी उरलेला नाही हे बहुधा तिच्या जडावलेल्या देहाला जाणवले होते. आता गुहेतच मुक्काम ठोकावा असा बहुधा तिचा विचार असावा. ती गुहेत शिरली, आणि गुहेतलाच एक कोपरा पकडून तिने अंग पसरले. आता तिला सुरक्षित वाटत होते. आपल्या पिल्लांना येथे कोणताच धोका नाही याचीही तिला खात्री झाली होती. आता पिल्लांचा जन्म होईपर्यंत बाहेरच पडायचं नाही, असंही बहुधा तिने ठरवलं असावं...
... तीच संधी साधून गुहेच्या तोंडाजवळ त्यांनी बांबूंचं जाळं लावलं. तिने कान टवकारले, डरकाळीही फोडली, आणि बाहेर शांतता पसरली. ती पुन्हा निर्धास्त झाली, आणि तिने डोळे मिटले. अचानक काही वेळानंतर ती खडबडून जागी झाली. बाहेर काहीतरी संकट आहे याचा तिच्या तीक्ष्ण नाकांना सुगावा लागला. गुहेचा आतला भाग धुराने भरून गेला होता. पोटातल्या पिल्लांना इजा होऊ नये म्हणून ती जडावलेल्या देहानिशी कशीबशी उठली, आणि बाहेर पडण्यासाठी धडपडू लागली. पण गुहेच्या तोंडाशी आग पसरली होती, आणि गुहेत धूर माजला होता. आता जगणं अवघड आहे हे जाणवून तिने एक अखेरची डरकाळीही फोडली. पण आग आणि धुराने त्या धमकीला जुमानलेच नाही. आता तिला श्वास घेणंही अवघड झालं होतं. पोटातल्या पिल्लांच्या विचाराने ती कासावीस झाली, त्यांना वाचविण्यास आता आपण असमर्थ आहोत याची जाणीव होऊन ती कळवळली, आणि तिने श्वास थांबविला... पुढच्या काही मिनिटांतच तिची हालचालही थंडावली, आणि एका गर्भवतीचा मृत्यू झाला...
यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागातील मुकुटबन नावाच्या जंगलक्षेत्रात दोनतीन महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली... पोटात चार बछडे असलेल्या त्या गरोदर वाघिणीलाही अशाच पद्धतीने माणसांनी ठार मारले होते. मूल होण्यासाठी गरोदर वाघिणीची शिकार करण्याचा अघोरी इलाज कुणीतरी सुचविला आणि त्यानंतर एका वाघिणीची तिच्या गर्भातील बछड्यांसह कोंडी करून हत्या करण्यात आली... तिच्या मृतदेहाचे पंजे कापून नेले, मिशांनाही कात्री लावून रानटी शिकारी पसार झाले...
ही घटना घडली त्याच्या जवळपास तीनचार आठवडे अगोदर, मार्च महिन्यात, देशातील वाघांची संख्या, संरक्षण, संवर्धन, वगैरे मुद्द्यांवर लोकसभेत गंभीर चर्चा झाली होती. वाघ वाचविण्याच्या सरकारी मोहिमा, रानटीपणाने होणाऱ्या वाघांच्या शिकारी आणि माणसापासून स्वतःस वाचविण्याची केविलवाणी धडपड करणारी वाघांची जमात असे एक विसंगत चित्र त्या चर्चेतून अस्पष्टपणे उमटलेही होते. एका बाजूला वाघांच्या अधिवासाची नवनवी क्षेत्रे निर्माण करण्याच्या सरकारी योजनांची माहिती पुढे येत असतानाच, वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूचे आकडे मात्र, वाघांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटवत होते. सन २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षांत देशात तब्बल ३०३ वाघांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ५५ वाघ एकट्या महाराष्ट्रातील होते.
जंगली वाघांच्या कथा ऐकत आणि ऐकवत माणसाच्या पिढ्या मोठ्या होतात. पण अशा क्रूर शिकारींच्या कहाण्या समोर येऊ लागल्या की, तर क्षुल्लक समजुतींपायी त्यांची शिकार करणारा माणूस तर रानटी आहे, असेच वाटू लागते. निराधार अंधश्रद्धांची शिकार होऊन वाघाला जेव्हा जगाचा निरोप घ्यावा लागतो, तेव्हा जंगली आणि रानटी यांमधील फरकाची रेषा गडदच होते.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करताना, माणसाच्या ‘रानटी’पणाची शिकार ठरलेल्या त्या उमद्या ‘जंगली’ प्राण्यांची क्षमा तरी आपण मागू शकतो ना?...

Monday, June 28, 2021

राष्ट्रनीतीचा पांथस्थ!

 


प्रदीर्घ काळ परकीय राजसत्तेच्या अमलाखाली राहिलेल्या भारतीय समाजाच्या मानसिकतेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात तीन विचारधारा विकसित झाल्या. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारतीय जनतेस विकासाची, विद्येची वेगळी दृष्टी प्राप्त झाली असे मानणाऱ्या एका वर्गास ब्रिटीश राजवट ही गुलामगिरी असली तरी विकासाची संधी वाटत होती. ब्रिटीश विचारधारा, त्यांची शिक्षणपद्धती आणि राज्यकारभाराची रीत भारतासारख्या परंपरावादात गुरफटून नव्याच्या शोधापासून अलिप्त राहिलेल्या देशाकरिता अनुकरणीय आहे, असे मानणारा हा वर्ग होता. त्याच दरम्यान, भारताची संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची पुनर्स्थापना केल्याखेरीज समाजाचा विकास होणार नाही असे आग्रही प्रतिपादन करणारा दुसरा वर्गही होता. हा वर्ग विदेशी, विशेषतः युरोपीय जीवनशैलीचा कठोर टीकाकार आणि भारतीय संस्कृतीचा कट्टर पुरस्कर्ता होता. या वर्गाने संस्कृतीरक्षणाचा वसा घेऊन स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्याचे ध्येय जपले, तर तिसरा एक वर्ग जहाल क्रांतिकारी विचारसरणीतून व आंदोलनात्मक मार्गांनी स्वातंत्र्याचे लढे लढत होता. सहाजिकच, याच काळात अशा तीन वर्गांची राजकीय बैठक तयार होत गेली. डाव्या विचारधारेच्या अनुयायांनी साम्यवादी पक्षांची कास धरली, मध्यममार्गी विचारसरणीचे लोक काँग्रेससोबत राहिले, तर उजव्या, किंवा हिदुत्ववादी विचारांचे पाईक असलेल्यांनी हिंदु महासभेस जवळ केले.
स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या सुमारे पाऊणशे वर्षांच्या वाटचालीचे राजकीय दृष्टिकोनातून निरीक्षण केले तर असे आढळते की सत्ता आणि प्रतिनिधित्वाच्या स्तरावर या तीन वर्गांमध्ये कमीअधिक अंतर दिसत असले तरी देशाच्या संपूर्ण राजनीतीमध्ये मात्र या विचारांचेच अस्तित्व दखल घेण्याएवढे अधोरेखित होऊन राहिलेले आहे. डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी देशातील श्रमिक, मजूर, शेतकरी आणि वंचित समाजास आपल्यासोबत जोडण्याचे प्रयत्न केले, मात्र, देशातील परंपरावर अंधश्रद्धांचा शिक्का मारून त्या नष्ट करण्याच्या प्रयत्नांत डावे पक्ष फारसे यशस्वी ठरले नाहीत. कम्युनिस्ट पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले अनेकजण स्वातंत्र्यानंतर वैचारिक मतभेदांमुळे वेगळ्या चुली मांडून बसले. ब्रिटीश राजसत्तेशी संघर्ष करण्यासाठीच १८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसवर पहिल्या दोन दशकांत मध्यममार्गी व समन्वयवादी विचारांचे वर्चस्व होते. पुढे स्वदेशी आंदोलनाच्या रूपाने काँग्रेसला लढ्याचे एक प्रभावी अस्त्र हाती आले, आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनेही समाजातील मध्यमवर्गीय, वंचित गटांमध्ये आपले स्थान रुजविले. या देशाच्या परंपरांना धर्माचे अधिष्ठान आहे, देशाच्या समाजावर हिंदु धर्म आणि संस्कृतीचा पगडा आहे, त्यामुळे धार्मिक परंपरा आणि संस्कृतीला अव्हेरून व परंपरा पुसून कोणताच राजकीय पक्ष देश चालवू शकणार नाही, त्यामुळे हिंदुत्वाचे रक्षण करणे व परंपरांचा अभिमान जागृत ठेवणे ही गरज असल्याचे मानणाऱ्या हिंदुत्ववादी विचारसरणीस पोषक असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळातही सुरू होते. त्यातच, राजकीय लांगूलचालनाच्या प्रयत्नांमुळे देशात मुस्लिम लीगचा प्रभाव वाढू लागला होता. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमुळे हिंदुत्वाचा आणि हिंदु समाजसंघटनाचा विचार देशभर पसरू लागला. या विचारास होणारा राजकीय विरोध आणि त्यातून निर्माण होणारे संघर्षाचे प्रसंग टाळण्याकरिता, राजकीय मंचावर राजकारणाच्या माध्यमातूनच विरोधाची धार कमी करणे शक्य होईल या जाणिवेतून राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय संघ धुरिणांनी घेतला, आणि २१ ऑक्टोबर १९५१ या दिवशी दिल्लीतील एका प्रतिनिधी संमेलनात भारतीय जनसंघाची स्थापना करण्याचे जाहीर झाले. राजकीय मंचावर हिंदु राष्ट्रवादाचा, म्हणजे उजव्या विचारसरणीचा उदय झाला, आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष झाले. राष्ट्रवादी हिंदुत्वाच्या विचारास राजकीय दिशा देण्याची जबाबदारी संघाने जनसंघावर सोपविली, आणि हिंदुत्व रक्षणाचा झेंडा खांद्यावर घेऊन संघर्ष करणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जबाबदारीचे ते आव्हान स्वीकारले. जनसंघाच्या रूपाने राजकीय मंचावर हिंदुत्ववादी राष्ट्रनीतीचा विचार ठळक झाला.
स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत उजव्या, हिंदुत्ववादी पक्षांच्या पदरी निराशादायक निकाल पडले. स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षातून प्राप्त झालेल्या जनाधाराचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. त्या निवडणुकीत काँग्रेसला ३६३ जागांवर विजय मिळाला, तर जनसंघ जेमतेम तीन जागा मिळवू शकला. राजकीय लढाई मोठी आहे, जनाधार मिळविण्यासाठी महत्प्रयास करावे लागणार आहेत, याची जाणीव डॉ. मुखर्जींसह सर्वच नेत्यांना होती. मात्र, हिंदुत्वाच्या विचारानेच पक्षाला राजकीय बैठक द्यायची हा निर्धार पक्का होता. १९५३ मध्ये काश्मीर आंदोलनात डॉ. मुखर्जींच्या संशयास्पद मृत्यूमुळे जनसंघास मोठा धक्का बसला, पण डॉ. मुखर्जी यांनी जनसंघास दिलेल्या भारतीय राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे पुनरुत्थान या दोन विचारधारा मात्र पुढे भारतीय राजकारणात परिवर्तन घडवून आणण्याइतक्या सक्षम बनल्या. याच विचारांचा वारसा घेऊन पुढे पं. दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, पं. मौलिचंद्र शर्मा आदी नेत्यांनी जनसंघाची राजकीय विचारधारा जनमानसात रुजविण्यासाठी परिश्रम घेतले, आणि स्वातंत्र्यानंतर सुमारे तीन दशके देशावर असलेली काँग्रेसची पकड हळुहळू सैलावत गेली. आणीबाणीच्या काळात स्थापन झालेल्या जनता पार्टीच्या प्रयोगाने प्रस्थापित काँग्रेसला जोरदार झटका मिळाला. पुढे वैचारिक मतभेदातून जनता पार्टीमधून जनसंघास बाहेर पडावे लागले, आणि ६ एप्रिल १९८० या दिवशी संघ परिवारात भारतीय जनता पार्टी या नव्या नावाने जनसंघाचा नवा अवतार दाखल झाला. १९२५ ते १९५२ आणि १९५२ ते १९८० या तीन टप्प्यांत हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा विचार घेत धीराने वाटचाल करणारा भाजप आज सत्तेपर्यंत पोहोचला आहे, हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या त्यागाचा, द्रष्ट्या विचारांचा विजय म्हणावा लागेल. श्यामाप्रसादजींचे व्यक्तिमत्व, त्यांचे चिंतन, आणि ‘हिंदुत्व हेच भारतीयत्व’ हा त्यांचा विचार म्हणजे प्रखर हिंदुत्ववादाचे प्रतिबिंब आहे. जम्मू-काश्मीरच्या अलगतावादास खतपाणी घालणारे ३७० वे कलम रद्द करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास आपण तयार आहोत, असे तडाखेबंद भाषण २६ जून १९५२ रोजी त्यांनी संसदेत केले, आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू येथे झालेल्या विशाल मेळाव्यातही त्याच विचारांचा पुनरुच्चार केला. आपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ८ मे १९५३ रोजी त्यांनी जम्मू काश्मीरकडे प्रयाण केले, आणि त्यांना अटक झाली. तुरुंगात असतानाच २३ जून १९५३ रोजी त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला.
जातपात, धर्म, प्रांतभेदाच्या पलीकडे सर्वांकरिता जनसंघाची दारे खुली आहेत, असे डॉ. मुखर्जी यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले होते. भारताची संस्कृती आणि मूल्यांच्या प्रतिष्ठेतच भारताचे भविष्य सामावलेले आहे. जसे आपण धर्म, किंवा कायद्याचा आदर करतो, तसाच आदर भारतीय संस्कृतीचा केला पाहिजे, आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या भारतीय मूल्यांचे पालन केले पाहिजे, असे ते या भाषणात म्हणाले होते. जात, धर्म, विचार आदी भेदभावांपासून राजकारणाने अलिप्त राहिले पाहिजे, असा विशाल विचार मांडून देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या श्यामाप्रसादजींच्या स्वप्नातील भारतात हिंदु राष्ट्रवादाचा त्यांचा विचार पुढे नेत सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या विचारांनी आज अग्रस्थान मिळविले आहे, ही त्यांच्या तपश्चर्येचीच पुण्याई आहे. त्यामुळे, भारतीय राजकारणातील तेजस्वी सूर्य म्हणून डॉ. मुखर्जी यांच्या स्मृती कायमच तजेलदार राहतील..

प्रसिद्धी- दै. नवराष्ट्र