Monday, November 29, 2021

प्रातःस्मरण मंत्र

 से अचानक काय घडले असावे, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या जाहिरातींचा सुळसुळाट सुरू झाला? खरे तर, असे म्हणतात की हालचाल, व्यायाम, नियमित आहार, सकारात्मक मानसिकता, चिंतामुक्त जीवन असे सारे काही सुरळीत असेल तर बद्धकोष्ठाची चिंता कमी असते. बद्धकोष्ठ हा पोटाचा, आतड्याचा विकार असला तरी त्याची कारणे पाहाता, तो एक मानसिक विकारही ठरू शकतो. बद्धकोष्ठामुळे बेचैनी, अस्वस्थता, चिडचीड वगैरे स्वाभाविक बदल संभवत असल्याने एका व्यक्तीचे बद्धकोष्ठ हे कौटुंबिक अस्वस्थता किंवा अशांततेचे कारण ठरू शकते.

जाहिरातींचाही हंगाम असतो. उदाहरणार्थ, एसी, पंखे, कूलर आदींच्या जाहिराती सुरू झाल्या की उन्हाळा येतो आणि ऊबदार कपड्यांच्या जाहिराती सुरू झाल्या, क्रीम वगैरे त्वचारक्षण उपायांच्या जाहिराती दिसू लागल्या की हिवाळा आला असे मानण्याची प्रथा असते. आता ज्याअर्थी बद्धकोष्ठावरील उपायाच्या जाहिराती वाढल्या आहेत त्याअर्थी हा विकार मोठ्या प्रमाणात फैलावला किवा फैलावत असावा असे मानण्यास वाव आहे. तसे असेल, तर सामाजिक अस्वस्थता किंवा नैराश्याची मुळे व्यक्तिगत बद्धकोष्ठतेतून उद्भवणाऱ्या मानसिक बेचैनीत दडलेली असू शकतात, याचा विचार व्हावयास हवा. आजकाल कोणत्याही अफवेतून किंवा गैरसमजातून किंवा केवळ राजकीय-अराजकीय हेतूनधूनही परस्परांवर चिखलफेक, मारामाऱ्या, वगैरे प्रकार होत असून अशा घटनांचे समाजवैज्ञानिक विश्लेषण करणाऱ्यांनी बद्धकोष्ठासारख्या विकाराचे कारण फारसे- नव्हे, मुळीच- विचारात घेतलेले दिसत नाही. त्यामुळे अशा घटनांवर नेमके इलाज होत नसल्याने त्या वाढत असाव्यात.
समाजात शांतता, सौहार्द, सामंजस्य टिकावे असे खरोखरीच वाटत असेल, राजकारणरहित हेतूतून समाज स्वस्थ राखायचा असेल, तर बद्धकोष्ठ होण्याची कारणे दूर करायला हवीत. करोना लाटेच्या काळात टाळेबंदी वगैरेमुळे माणसांना घरकोंबडेपण आले. बसल्या जागी लॅपटॉपादी माध्यमांतून जगाशी संपर्क ठेवण्यामुळे व्यायाम, शारीरिक हालचालींवर बंधने आली. एका बाजूला घरबसल्या काम करत असताना खाणे सुरूच राहिले, पण पचविणे अवघड होत गेले. त्यातच मान मोडून काम करताना प्रकृतीची हेळसांड सुरू झाली. ही कारणे बद्धकोष्ठतेस पोषक होती. पण तेव्हा अशा तक्रारी आढळल्या नाहीत. आता चलनवलन सुरू झाले, व्यायाम, चालणे आदींना मुभा मिळू लागली तर एकदम बद्धकोष्ठतेच्या जाहिराती दिसू लागल्या. या विसंगतीचाही समाजविज्ञानाधारे अभ्यास व्हावयास हवा. कारण पुढे जाऊन हा विकार अधिक वाढल्यास त्याचे सामाजिक परिणाम भोगावे लागण्याची भीती असू शकते.
टाळेबंदीच्या काळात सगळ्यांचेच हाल झाले, पण नाटक सिनेमावाल्यांना जास्तच झळ बसली. नटवर्य सुबोध भावे यांची भूमिका (मॉडेल म्हणून) असलेल्या, बद्धकोष्ठतेवरील जाहिरातीमुळे या विकारावर विस्ताराने विचार करावा असे वाटले. जेव्हा काहीही न करता घरात बसून चरणे एवढेच काम असते, तेव्हा हा विकार होत नाही, तर त्याची लक्षणे काही काळानंतर दिसतात, असे या जागिरातीवरून वाटते.
त्यामुळे, बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ‘पेट साफ तो रोग माफ’ अशी बद्धकोष्ठतेवरीलच एका औषधाच्या जाहिरातीची टॅगलाईन आहे. रेल्वेतून प्रवास करताना आपण ती पाहिली असेल. तिला लाईटली घेऊ नये. सकाळी त्या जाहिरातीचे प्रातस्मरण केल्यास समाजस्वास्थ्य चांगले राहून विकास साधतां येईल.
म्हणून लक्षात ठेवा, ‘लाख दुखोकी एक दवा’ हे सत्य फक्त बद्धकोष्ठावरील उपायासच लागू पडते.
कारण हा एक सामाजिक विकार होऊ शकतो.
पोट साफ हवेच, पण खाणेही माफक हवे. पचवायची ताकद असेल तेवढेच खा.
बद्धकोष्ठ टाळा!!

Friday, November 26, 2021

उबविलेल्या अंड्याची गोष्ट...

काटक्या गोळा करून बांधलेलं घरटं पूर्ण झालं, आणि पलीकडच्या झाडावरून कावळ्याची धावपळ न्याहाळत बसलेल्या कावळिणीने तोंडातून कर्कश्श आवाजही काढला. कावळ्याच्या तीक्ष्ण कानांनी तो टिपला. पिल्लांसाठी बनविलेल्या बेडवर कबुतरांच्या पिसांचा गालिचा अंथरून कावळ्याने फांदीवरच स्वतःभोवती एक गिरकी घेतली, आणि तो कावळिणीसमोर जाऊन बसला. कावळिणीने ते पाहिले, पण तोऱ्यात मान फिरवून ती उगीचच फुरंगटून बसली. मग कावळ्याने तिची मनधरणी केली. बऱ्याचदा काहीच कारण नसताना कावळिणीला राग यायचा, मग कावळा धावत येऊन तिची मनधरणी करायचा. हा संसार आपला दोघांचा आहे, दोघांनी मिळूनच तो चालवायला हवा, सारखा हट्टीपणा करून चालणार नाही असेही तिला समजावून सांगायचा. मग मोठ्या उपकाराच्या तोऱ्यात कावळीण संसारात पुन्हा सामील व्हायची. आता काही दिवसांनी नवीन पिल्ले जन्माला येतील, तोवर तिला कसलीही तोशीश लागू नये, असेही कावळ्याने ठरविले होते. तिचे हट्ट पूर्ण करायची त्याची तयारी असली, तरी अंडी उबविण्याचे काम तिलाच करावे लागणार आहे, हे कावळ्याला माहीत होते. कावळिणीला त्याचेच दुःख होते. याने तोऱ्यात मिरवायचे आणि आपण मात्र अंडी उबवत घरट्यात बसून राहायचे, या कल्पनेनेच कावळीण फणफणत असे. त्यामुळे घरी आल्यावर कावळिणीची समजूत काढायची, हाडकाचा तुकडा प्रेमाने तिला भरवायचा, आणि कावळीण खुश झाली की पुन्हा बाहेर पडायचे, असा कावळ्याचा दिनक्रम होता. आपला बराचसा वेळ कावळिणीची मनधरणी करण्यातच जातो, पण संसार करायचा तर आपणच थोडे सहन करायला हवे, हे त्याने ओळखले होते. म्हणूनच, आज घरटे बांधून पूर्ण झाल्यावर कावळ्याने तिच्या पंखात हलकेच चोच खुपसून तिला घरट्याच्या झाडाकडे येण्याची विनवणी केली. कावळिणीला तेच हवे होते. कावळ्याने आपल्यापुढे शेपटी टाकली, की तिला आनंद व्हायचा. आजही तिला बरे वाटले, आणि तिने त्या झाडावर झेप घेतली. फांदीवरच्या घरट्याकडे आधी दुरूनच पाहिले. बाहेरून ते ओबडधोबड दिसत असल्याने कावळिणीस ते आवडणार नाही, पण आतील सुखसोयी पाहून ती नक्कीच खुश होईल अशी कावळ्याची खात्री होती. एकदा घऱट्याभोवती गिरकी घेतली, आणि तिने आत डोकावून पाहिले. घरटे आतून सुंदर सजले होते. तिने मनातल्या मनात अंड्यांचा हिशेब केला. आपल्याला होणाऱ्या पिल्लांकरिता एवढे घरटे पुरेल ना, तेही मनात विचार करून नक्की केले, आणि कावळ्याकडे तिरक्या मानेने पाहात तिने टुणकन घरट्यात उडी मारली. कावळा सुखावला. त्याने एकदा तिच्या चोचीत चोच खुपसून आनंद व्यक्त केला, आणि तो उडाला. पण आता तिला राग आला नाही. अंडी घालण्याची वेळ जवळ आली होती. कावळिणीने घरट्यात बस्तान बसविले, आणि काही वेळातच घरट्याच्या मऊशार गादीवर चार अंडी घातली. आता पुढचे दिवस अंडी उबविण्यातच जाणार होते. पिल्ले बाहेर येईपर्यंत आता इथून हलायचे नाही, असे कावळ्यानेही तिला बजावले होते. बाहेर खूप शत्रू टपून बसलेले असतात, ते घऱट्यात घुसू शकतात, हे कावळ्याला माहीत होते. कावळिणीने मानेनेच होकार दिला, आणि अंडी उबविणे सुरू झाले. कावळीण कायम अंड्यांवर बसूनच होती. एकदा मात्र, पलीकडच्या झाडावर कावळ्यांचा कलकलाट वाढला, म्हणून तिने जागेवरूनच पाहिले. तिचा कावळोबाही कलकलाटात सामील होता. कावळिणीला काळजी वाटू लागली, आणि कावळ्यांच्या गर्दीत सामील होऊन तीही कलकलाट करू लागली. बऱ्याच दिवसांनी कलकलाट केल्याने, किती वेळ गेला ते तिला कळलेच नाही. ती भानावर आली तेव्हा तिला अंड्यांची आठवण झाली, आणि तिने झाडाकडे झेप घेतली. घरट्यात अंडी जिथल्या तिथे होती. पुन्हा अंडी उबविणे सुरू झाले. यथावकाश अंड्यातून पिल्ले बाहेर आली, आणि कावळिणीची लगबग वाढली. बाहेरून खाऊ आणून पिल्लांना भरविण्यात दिवस कधी संपतो तेच तिला कळेना झाले. पिल्ले दिवसागणिक वाढत होती. आता त्यांना पंख फुटले. आवाजही येऊ लागला. पिल्लांना उडायला शिकवायचे, असे ठरवून तिने रात्री पंखांच्या कुशीत पिल्लाना घेतले, आणि सारे कुटुंब झोपी गेले. मध्यरात्री अचानक कलकलाट सुरू झाला. पिल्लेही ओरडू लागली, आणि कावळीण चपापली. एका पिल्लाचा आवाज वेगळाच होता. आपण भलतेच अंडे उबविले हे तिच्या लक्षात आले. त्या दिवशी झाडावरच्या कलकलाटात सामील होण्यासाठी घरटे सोडले, तेवढ्यात कोकिळेने डाव साधला होता. पण आपलीच चूक होती, हे ओळखून कावळीण गप्प राहिली. आपल्या घरट्यात आपण उबविलेल्या अंड्यातली कोकिळा आता लोकांच्या कौतुकाचा विषय होणार आणि आपली पोरं मात्र कलकलत भटकत राहणार, या विचाराने कावळीण हैराण झाली. संध्याकाळी कावळा घरी आला, तेव्हा तिने कोकिळेच्या पिल्लाची गोष्ट कावळ्याला सांगितली. कावळा वरमला, आणि म्हणाला, काय करणार, आपलीच चूक होती ना... कोकिळेच्या पिल्लाने बाहेर झेप घेतली होती. पलीकडच्या झाडावरून गरट्याकडे पाहात कोकिळेने मंजुळ आवाजात कावळिणीला प्रेमाने साद घातली. कावळिणीने तिच्यावर झडप घालण्यासाठी पंख पसरले. मग कोकिळा दूर उडून गेली.

भविष्याचे अस्वस्थ वर्तमान!

 

मध्यंतरी माझ्या वाचनात एक बातमी आली. खरे म्हणजे, जवळपास दररोजच अशा बातम्या येतच असतात. पण या बातमीमुळे दररोजच्या अस्वस्थतेचा उद्रेक झाला, आणि आपल्या जगण्यापुढील हे मोठे आव्हान असूनही आपण रोजच्या चर्चांमध्ये त्यावर कधी फारसे बोलत नाही याचे मलाच आश्चर्य वाटले.

उत्तर प्रदेशातल्या कुठल्याशा गावात, एका सकाळी एक महिला फिरावयास गेली असताना रस्त्याकडेच्या एका कचरा कुंडीतून तिला एका बालकाच्या रडण्याचा केविलवाणा आवाज ऐकू आला, आणि ती कचरा कुंडीजवळ गेली. आता तो आवाज स्पष्ट झाला होता. या महिलेने कुंडीत डोकावून पाहिले. अगोदर तिला प्रचंड धक्का बसला. तिचे डोळे विस्फारले, आणि भीतीने तिने दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले. कुणाची तरी चाहूल लागल्यामुळे असेल, कचरा कुंडीतल्या त्या बाळाचं रडणं आणखीनच वाढलं होतं. मग ही महिला भानावर आली. कदाचित, तिच्यातली आई जागी झाली, आणि कचरा कुंडीत हात घालून त्या बाळाला अलगद उचलले. कुशीत घेतले. दुपट्यात व्यवस्थित गुंडाळलेल्या त्या बाळाने एकदा किलकिल्या नजरेनं त्या आईकडे पाहिले, आणि त्या क्षणी त्याचे रडणेही थांबले. एक गोंडस, गुटगुटीत पण दुर्दैवी जीव त्या क्षणी एका अनामिक मातेच्या कुशीत विसावला होता...

या बाळाचे करायचे काय, हा प्रश्न आता त्या मातेला पडू लागला होता. तरीही तिला ते बाळ पुन्हा कचरा कुंडीत फेकायचे नव्हते. तिने त्याला घरी आणून पोटभर दूध पाजले. भूक भागताच ते काही वेळातच शांत झोपले. पण ते बाळ बेवारस असल्याने त्याची खबर पोलिसांना द्यायला हवी, असे घरातील सर्वांनी सांगितल्याने तिने जड मनाने ते बाळ उचलले, आणि पोलीस ठाण्यात नेऊन दाखल केले. पुढच्या काही तासांतच ही बातमी गावात पसरली. कचरा कुंडीत फेकलेले एक बाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे हे कळताच अनेकजण ते बाळ पाहण्यासाठी गर्दी करू लागले. कचरा कुंडीत फेकले असले, तरी ते बाळ गोंडस होते. गुटगुटीत होते, आणि आसपासच्या जगाची ओळख नसल्याने, आपल्या नवख्या आणि अनोळखी आईच्या मायेचा स्पर्श झाल्याने सुखावून शांतपणे पहुडलेले होते. अनेकांना त्या बाळाला दत्तक घेण्याची इच्छा झाली. पण एखादे बेवारस मूल कुणाकडेही संगोपनासाठी सोपविण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात... ज्या महिलेला ते बाळ सापडले होते, तिने ते पोलिसांच्या हवाली केले, आणि ती जड मनाने घरी परतली...

ही बातमी इथे संपली. आता ती बातमी हा एक भौतिक भूतकाळ झाला आहे. पण खरे तर, ती एका भविष्याची सुरुवात आहे. भारताच्या भावी पिढीच्या एका धाग्याच्या भविष्याची सुरुवात.... अत्याचार, आईबापाविना जगताना जगण्याचा संघर्ष करणारी बालके, समाज ज्या कृत्याला गुन्हा समजतो, जे कृत्य करणे समाजाच्या दृष्टीने बेकायदा असते ती कृत्ये हेच ज्यांचे जगण्याचे साधन असते, अशी रस्त्यावर जन्मलेली, आणि रस्त्यावरच वाढणारी बेवारशी मुले, समाजातील विकृतींची शिक्षा भोगणारी मुले, कोणाच्या तरी चुकीची फळे भोगणारी, कुणा गुन्हेगारी टोळ्यांच्या संघटित धंद्यापायी अपंगत्वाचे ओझे वाहणारी मुले, अशी अनेक रूपे वेगवेगळ्या वेळी वाचलेल्या, ऐकलेल्या बातम्यांमधून समोर येऊ लागली, आणि ही बेचैनी आणखीनच वाढली...

देशाची भावी पिढी म्हणून ज्या पिढीकडे आपण पाहतो, त्या पिढीच्या वर्तमानाचा हा सुन्न करणारा कोपरा मला दिसू लागला. त्याला अनेक कंगोरे आहेत. सामाजिक समजुती, प्रथा, आर्थिक समस्या, चिंता, अशा अनेक बाजूंनी या समस्येला वेढले आहे, हे लक्षात आले. आपल्याच आसपासची स्थिती काय आहे हे पाहावयाचे मी ठरविले... मनाशीच थोडा आढावा घेत असताना, आणखी एक बातमी मला आठवली. ती वाचल्यावर काही प्रश्नही मनात उभे राहिले होते. म्हणून, बातमीची दुसरी बाजूही पाहायला हवी असा विचार मनात घोळू लागला. दत्तक विधानांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर अशी काहीशी ती बातमी होती. देश विदेशातील असंख्य दाम्पत्ये, स्वतःचे मूल नसल्याने अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्यासाठी आसुसलेले असतात.  अशा अनेक अभागी अनाथांना अशी मायेची सावली सापडली आहे, आणि त्यांचे भरकटलेले भविष्य स्थिरावलेदेखील आहे. पण, महाराष्ट्राला एक मोठी समस्या भीषणपणे भेडसावत आहे. दत्तक प्रकरणांत महाराष्ट्र आघाडीवर आहे, आणि महाराष्ट्रातील मुलींना दत्तक घेण्यासाठी पालक पुढे सरसावत आहेत, हे बदलत्या जाणीवांचे चांगले लक्षण असले, तरी महाराष्ट्रात बेवारस, अनाथ मुली आजही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, ही या चांगल्या बातमीची अस्वस्थ करणारी किनार आहे, असे मला वाटू लागले.

गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्रातील अनाथ, सोडून दिलेल्या किंवा बेवारस मुलांची संख्या देशातील अन्य राज्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे, असे काही अधिकृत आकडेवारीवरून दिसते. हे चित्र राज्यातील कौटुंबिक किंवा सामाजिक व्यवस्थेतील मुलींच्या आजच्या स्थितीचे – आणि मानसिकतेचेही- दर्शन घडविते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अनाथालयांची संख्याही मोठी असून तेथे मोठ्या प्रमाणावर मुले-मुली दत्तक घेण्यासाठी उपलब्ध असतात, असे या आकडेवारीवरून दिसते. या राज्यातून सर्वाधिक मुले दत्तक घेतली जातात, म्हणजे, या राज्यात दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनाथ, बेवारस, टाकून दिलेल्या मुलामुलींची संख्यादेखील सर्वाधिक आहे, असा याचा दुसरा, अस्वस्थ करणारा अर्थ!


देशाच्या कोणत्याही अनाथालयांतून दत्तक दिल्या गेलेल्या मुलामुलींपेक्षा महाराष्ट्रातून दत्तक दिल्या जाणाऱ्या बालकांची संख्या सातत्याने सर्वाधिक राहिली आहे, आणि त्यामध्येही मुलींची संख्या सर्वाधिक आहे. मुलांना दत्तक देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहेच, पण त्यातही, महाराष्ट्रातून सर्वाधिक मुली दत्तक घेतल्या जातात, असे या आकडेवारीवरून स्पष्ट होत असेल, तर ती महाराष्ट्राने अभिमानाने पाठ थोपटून घ्यावी अशी बाब नक्कीच नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक मुली बेवारशी होत आहेत, अनाथ होत आहेत, आणि आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी प्रेमळ पालकांच्या शोधात आहेत, हे चित्र विषण्ण करणारे आहे.

देशात मुलींना दत्तक घेण्याची मानसिकता वाढत असून मुलींचा सांभाळ करण्याची संस्कृती समाजात समाधानकारकपणे रुजत आहे, हे एक दिलासादायक वास्तव असले, तरी आजही मोठ्या प्रमाणात मुलींना पालकांच्या शोधात बेवारसपणे दिवस काढावे लागतात, ही या वास्तवाची दुखरी बाजू आहे. म्हणूनच, मुलांना दत्तक देण्यात महाराष्ट्राची आघाडी ही बातमी समाधानाची की चिंतेची याचा गांभीर्याने विचार करावयास हवा...

अंधारमय भविष्यात चाचपडणाऱ्या नवजात मुलींना मायेची पाखर शोधत अनाथालयात दिवस काढण्याची वेळ येणे दुर्दैवी तर आहेच, पण महाराष्ट्र त्यामध्ये आघाडीवर असणे हे त्याहूनही दुर्दैवी आहे.

Tuesday, November 23, 2021

मौनाची भाषा!

 


भावना व्यक्त करण्यासाठी भाषा महत्त्वाची नसते असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा आमच्या गप्पांच्या टोळक्यातला एकजण काहीच न बोलता अंतर्मुख झाल्यासारखा वाटला. तो काहीच का बोलत नाही हे पाहून मी त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव दिसत होते. माझा मुद्दा त्याला पटला असावा असे ते भाव पाहून मला वाटले, तेव्हा बाकीच्या सर्वांना गप्पांचा नवा मुद्दा मिळाला होता. आता भाषा आणि भावना यांवर गप्पा रंगणार हे मला माहीत होते. भाषा हे भावना व्यक्त करण्याचे केवळ एक साधन आहे, तिच्यासोबत भाव असतील, तर भाषेच्या माध्यमातून भावना व्यक्त करणे अधिक प्रभावी असते, असे कुणीतरी म्हणाले, आणि गप्प राहिलेल्या त्या मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताना त्याच्या मनातल्या भावना मला स्पष्टपणे वाचता आल्या. त्याला जे म्हणावयाचे होते, ते त्याने कोणतीही भाषा न वापरता, केवळ भावमुद्रेतून मांडले होते. मग मला आणखी एक मुद्दा सुचला. भाव व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज असतेच असे नाहीच, पण बोलता येण्याचीही फारशी गरज नसते. या जगात, माणूस हा बोलता येणारा बहुधा एकमेव प्राणी असावा. जसे दोन पायांवर चालता येणे हे माणसाचे एकमेव वैशिष्ट्य असते, तसे बोलता येणे हेही फक्त माणसाचेच वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. अन्य प्राण्यांना बोलता येत असले, तरी त्यांच्या बोलण्याची एक जागतिक भाषा असते. जगाच्या कोणत्याही प्रांतात गेलं, तरी गायीचे हंबरणे, कुत्र्याचे ओरडणे, सिंहाची डरकाळी किंवा सूर एकाच भाषेत आपल्या भावना व्यक्त करतात, आणि त्या प्राण्याच्या जमातीतील जगातील कोणत्याही भागातील प्राण्यास ती भाषा सहज समजते. माणसाच्या भावना मात्र, दर दहा मैलाच्या अंतरावर बदलणाऱ्या भाषेतून व्यक्त होतात. अशा वेळी, बदललेल्या भाषेतून व्यक्त होणाऱ्या भावना समजून घेण्यासाठी, आपल्याला भावमुद्रा वाचावी लागते, असे लक्षात आले, आणि जगात बोलल्या जाणाऱ्या असंख्य भाषांमध्ये आणखी एका भाषेची भर आपण घातली आहे की नाही हे शोधायचे मी ठरवले. ती भाषा म्हणजे, मौनाची भाषा’!...

या, मौनाच्या भाषेएवढी प्रभावी भाषा कोणतीच नाही, असे माझे मत आहे. मौनातून भावना व्यक्त करण्यासाठी प्रगाढ साधना करावी लागते. कारण भावना व्यक्त करण्याच्या या साधनास भाषा नसते. शिवाय, मौनातून भावना व्यक्त करण्यासाठी जेवढे कौशल्य लागते, तेवढेच कौशल्य मौनातून व्यक्त होणाऱ्या भावना वाचण्यासाठीही आवश्यक असते. ते सगळ्यांनाच साधत नसल्यामुळेच कदाचित मौनाच्या भाषेचा प्रसार मर्यादित राहिला असावा. ही भाषा फारशी कुणी वापरत नाहीत. ते बरेच आहे. उलट त्यामुळे या भाषेला वेगळे महत्त्वही आहे. म्हणूनच, काही विशिष्ट वेळी या भाषेचा वापर केला जातो. या भाषेतून बरेच काही बोलता येते, आणि  समोरच्यास ते थेट भिडते असा अनुभव जगाने घेतला आहे. त्यामुळेच विनोबाजींपासून अण्णा हजारेंपर्यंत अनेकांनी वेळोवेळी मौनाच्या भाषेतून आपले म्हणणे आग्रहीपणे मांडले, आणि ती भाषा उमगल्याने त्यांना जे म्हणावयाचे होते ते करणे संबंधितांना भाग पडले. मौनाच्या भाषेचा हा प्रभाव सिद्ध झाल्याने, विशेषतः राजकारण्यांच्या जगात ही भाषा अधिक लोकप्रिय होत गेली. कारण प्रसंग पाहून या भाषेचा वापर केल्यास तिचे तिहेरी फायदे होतात, हे या लोकांना अधिक चांगले कळले. अशा अनेक प्रसंगांत मौन पाळून महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देणे सोपे होते, हेही कळले, आणि, या मुद्द्यावर त्यांनी मौन पाळले, ही बातमीदेखील होऊ लागली. मग या पाळलेल्या मौनाचे अर्थ शोधण्याचा जो तो त्याच्या कुवतीनुसार प्रयत्न करू लागतो, आणि त्यातून आणखी नवे अर्थ निर्माण झाल्यास मौन पाळणारा गप्प राहिला, तरी समोरचे अनेकजण अनेक अर्थांनी त्या मौनावर भाष्य करणारी बडबड करू लागतात. सोयीस्कर मौन, सूचक मौन, असे मौनाचे काही प्रकार असतात. एखाद्या वादग्रस्त मुद्द्यावर भावना व्यक्त करण्यासाठी जेव्हा भाषा अडचणीची ठरते, तेव्हा सोयीस्कर मौन पाळले जाते, आणि एखाद्या महत्वाच्या परंतू न बोलणेच बरे असलेल्या मुद्द्यावर भाष्य करण्याएवजी जेव्हा शब्द अडचणीचे ठरतात, तेव्हा सूचक मौन पाले जाते. काही वेळा, राजकीय नेते पश्चात्तापाची भावना व्यक्त करण्यासाठी मौन धारण करतात, तर बऱ्याचदा मौनाला निषेधाचीही झालर लावली जाते. मौन हे अलीकडे आंदोलनाचेही साधन होऊ लागले आहे. आपल्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करूनही त्याची साधी दखलही घेतली जात नाही असे लक्षात आले, की मागण्यांसाठी संघर्ष करणारे समूह मौनव्रत आंदोलन करू लागतात. मग संबंधित यंत्रणेची तारांबळ उडते, आणि मौनातून व्यक्त होणाऱ्या भावना सर्वदूर पसरून एक दबावगटही तयार होतो. शोकभावना व्यक्त करण्यासाठी मौन पाळण्याची प्रथा तर सर्वत्रच असते.

भाषा आणि भावना या मुद्द्यावर तिकडे चर्चा रंगलेली असताना, माझ्या मनात मात्र मौनाचे रंग आकार घेऊ लागले होते. मी घरी आलो, तेव्हा वर्तमानपत्र येऊन पडले होते. मी ते उघडले, आणि पहिलीच बातमी वाचून मूक झालो. क्षणभर डोळे मिटले. हातातील वर्तमानपत्र तसेच उघडे राहिले आणि माझी नजर शून्यात कुठेतरी खिळली. ते पाहून माझ्या मुलीला शंका आली. आजही काहीतरी भयंकर घडले असणारअसे ती म्हणाली. माझ्या मौनाची भाषा व्यक्त झाली होती. नगरच्या रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने घेतलेल्या निष्पाप बळींची बातमी वाचताना माझ्या मुक्या मनात, गेल्या वर्षभरात आगीने घेतलेल्या बळींच्या आक्रोशाने रणकंदन माजविले होते. मौनाच्या भाषेला आवाज नसतो. ती शांतता असते. पण त्या शांततेचाही आवाज डोक्यात आणि मनात कल्लोळ माजवितो, हा नवा अनुभवही त्या वेळी मला आला...

Friday, November 5, 2021

मन देवाचा आहेर...

माणसाच्या प्रत्येक कृतीला विवेकाचे भान असले पाहिजे असे मानतात. कारण विवेकी विचाराचे नाते मनाशी असते. मन हा माणसाचा अजोड असा अदृश्य अवयव आहे. वाढत्या वयाचा आणि शारीरिक किंवा मानसिक वयाचा काही संबंध नसतो. जन्माला आल्या दिवसापासून वय वाढतच असतं. असं वय एका टप्प्याशी येऊन पोहोचलं, की नोकरदार माणूस ‘रिटायर’ होतो. नोकरीधंद्याच्या या काळात, नोकरी लागल्यानंतरची काही वर्षे, ‘किती वर्षे नोकरी झाली’ याचा हिशेब मांडला जातो. वय वाढू लागले, की, नोकरीची ‘किती वर्षे राहिली’, रिटायर कधी होणार याची गणितं करता करता दिवस पुढे सरकू लागतात. पुढे तो दिवस उजाडतो. नोकरीतून निवृत्त झालं, की रिटायर होऊन किती दिवस, महिने, वर्षे झाली याची गणती सुरू होते. असे हिशेब सुरू झाले, की ‘म्हातारपण’ आलं, असं म्हणतात. पण शरीराच्या या अवस्थेसोबत मनानेही त्या टप्प्यांचा हिशेब करत म्हातारपण मिरवायलाच हवे असे नाही. ज्यांची मने वाढत्या वयातही टवटवीत असतात, त्यांच्या शरीरावर, चेहऱ्यावर म्हातारपणाच्या कितीही सुरकुत्या दिसल्या, तरी मनावर तशी एकही रेषा उमटत नाही. अशा टवटवीत मनांचा एक विरंगुळा असतो. ‘स्मरणरंजन’!... तसेही प्रत्येकासच, वयाच्या कोणत्याही अवस्थेत स्मरणरंजन आवडतच असते. वर्तमानकाळात दिसणारे, अनुभवास येणारे अनेक प्रसंग नकळत भूतकाळात घेऊन जातात, आणि भूतकाळातील त्या प्रसंगाच्या हरवत चाललेल्या आठवणींना उजाळा मिळतो. हा उजाळा म्हणजे, कोमेजत्या मनाला टवटवी देणारा एक सुखद शिडकावा असतोच, पण कधीकधी त्या आठवणींच्या धाग्यांची एक सुंदर गुंफण करून नव्या पिढीला अविश्वसनीय वाटतील अशा कितीतरी कहाण्याही जन्म घेतात. त्याच्या नवलाईने नवी पिढीही हरखून जाऊ लागली, की गेल्या दिवसांच्या आनंदापासून पारखे झाल्याची हुरहूर छळू लागते. गेल्या काही वर्षांत, वयामुळे ज्येष्ठत्वाकडे जाऊ लागलेल्या पिढीच्या मनावर अशा हरवलेल्या भूतकाळाच्या आठवणींची दाटी अधिकच वाढू लागली आहे. भूतकाळात जे जे काही वेगळे अनुभवले, त्याची नवी रूपे पाहताना काहीतरी हरवत असल्याची खंत उमटू लागली आहे. हे एक सार्वत्रिक दुखणे होऊ पाहात आहे. व्यापारीकरणाचा प्रचंड प्रभाव हे बहुधा त्याचे कारण असावे. म्हणूनच, नव्या दमाने दर वर्षी येणाऱ्या दिवाळीतले जुने दिवस शोधण्याची एक केविलवाणी कसरत आजही अनेकजण करताना दिसतात. ‘आमच्या वेळची दिवाळी’... हा त्यांच्या भूतकाळ शोधण्याच्या प्रयत्नांचा धागा होऊन जातो, आणि नव्या दिवाळीशी जुन्या दिवाळीची सांगड घालत, निराश उसासे टाकले जातात. सणासुदीच्या प्रत्येक दिवसाचे ‘इव्हेन्टीकरण’ करणे हा धंदा वाढला, तेव्हापासून भूतकाळातल्या सणासुदीच्या आठवणींमध्ये रमण्याची, त्या स्मरणरंजनाची सवय वाढू लागली. लोकांच्या हाती खेळणारा पैसा चलनवलनात आणण्यासाठी किंवा काहीही करून सण साजरे करण्याच्या सवयी नेमक्या हेरून बाजारपेठांनी सणांना उत्सवाचे रूप दिले, आणि प्रत्येक सण हा ‘बाजारकेंद्रीत’ होऊ लागला. जी पिढी आज स्मरणरंजनात रमते, त्या पिढीच्या पूर्वरंगाच्या काळात, नवे कपडे, घरांना रंगरंगोटी, गोडधोडाचे पदार्थ, या गोष्टींना सणापुरते निमित्त असायचे. त्यामुळे त्या सणाला वेगळेपणाची झळाळी होती. आता नवे कपडे घेण्यासाठी सणाचे निमित्त गरजेचे राहिलेले नाही, आणि घरात गोडधोड पदार्थ करण्याची गरज बाजारपेठांनीच संपवून टाकली आहे. त्यामुळे, आता सणाचा उत्साह बाजारपेठांमधील गर्दीवरून मोजला जाऊ लागला. गर्दीने फुलणाऱ्या बाजारपेठा हे सणांच्या उत्साहाचे मोजमाप झाले, आणि घरातल्या खरेदीची रेलचेल हा आनंदाचा मापदंड ठरला. सण म्हणजे इव्हेन्ट झाले, आणि बाजारांनी सणांवर कब्जा केला.

असे झाले, की मन काम करू लागते. मनाचे वेगळेपण म्हणजे, भूतकाळाशीच त्याचे नाते अधिक जवळीकीचे असते. कोणत्याही क्षणी आठवणीतली कितीही मागच्या भूतकाळात पोहोचण्यासाठी मनाला क्षणार्धाचा अवधीदेखील पुरेसा होतो. याच मनाचे एक दुबळेपणही असते. भविष्याचा तंतोतंत वेध घेण्याची शक्ती मात्र मनाला मिळालेली नाही. तसे झाले असते, तर भूतकाळात रमण्याची मजाच संपून गेली असती, आणि भविष्याच्या काळजीनेच असंख्य मने पोखरली जात राहिली असती. मन, माणूस आणि निसर्ग यांच्या या आगळ्या नात्यामुळे माणसाचा भूतकाळ वर्तमानकाळातही आपली अशी एक जागा राखून राहिला आहे. विचारांचा आवेग आणि मनाचा वेग यांची सांगड घालायची सवय लागली, की वाढत्या वयाचा वेग ही समस्या राहात नाही. म्हणून मन जपले पाहिजे. आठवणींच्या अदृश्य कप्प्यात शिरण्याची अभूतपूर्व क्षमता त्याच्याकडेच असते. मन हा देवाने माणसाला दिलेला मौल्यवान आहेर आहे. मन हे विचारांचे घर, आणि कृतीचे आगर आहे, मन हा अथांग सागर आहे, मन हा देहाचा आरसा आहे. तो स्नेहाचा वारसाही आहे. कधीकधी मन अनावर होते, कधीकधी गरीब पामर होते, कधी मुकाट बसते, तर कधी मोकाट सुटते..