Friday, July 1, 2022

अप्रकाशित महाभारत...

 

अज्ञातवासात असताना पांडवांनी एका रात्रीत बांधून पूर्ण केलेल्या त्या देवळाविषयी आम्हाला प्रचंड उत्सुकता होती. त्यापोटीच एकदा आम्ही तिरिमिरीत पाठीस सॅक लावली आणि रातराणी पकडून पहाटेच्या सुमारास त्या आडगावात पोहोचलो. सूर्योदय होण्यापूर्वी हे मंदिर पूर्ण झाले नाही तर पांडवांच्या अज्ञातवासातील ठावठिकाणा जगजाहीर होईल, असे गुरुदेवांनी सांगितलेले असल्याने भीम, अर्जुनासह सर्वांनीच आपली शक्ती पणाला लावली होती. कळसाचा शेवटचा दगड बसवून झाला, आणि सभागारातील दगडी परातीखाली एक वस्तू लपवून भीमाने हात झटकले, तेव्हा त्याच्या बंधूंना शंका आलीच होती. तर, त्या परातीखालचे गूढ शोधण्याचा अनेकांनी अनेकवार प्रयत्न केला होता अशी दंतकथा असल्याने आम्हालाही तीच उत्सुकता होती. पहाटेपूर्वीच तेथे पोहोचल्याने आज ते शक्य होणार होते. टीममधल्या एका भीमकाय सहकाऱ्याने त्या प्रचंड दगडी परातीस हात घातला, आणि आश्चर्य म्हणजे, पिंजऱ्यातून मुक्ती मिळताच, मोक्षाच्या प्रतीक्षेत असलेल्या पोपटाच्या रूपातील राक्षसाने सदाचारी मनुष्यरूप घेऊन स्वर्गात प्रयाण करावे, त्याप्रमाणे त्या महाकाय परातीने आपल्याला सहजपणे उचलू दिले.
आतील दृश्य अंगावर आनंदाचा शहारा आणणारे होते. एका पुराणकालीन फाईलसदृश आवरणामध्ये निगुतीने गुंडाळून ठेवलेली काही भूर्जपत्रे आम्हांस दिसली. आता ती बाहेर काढून त्यावरील अगम्य लिपीचा अर्थ लावण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. आम्ही अनेक भाषातज्ज्ञांचे उंबरठे झिजविले, काहींना स्क्रीनशॉटस पाठविले. देवीदेवतांना आवाहन केले, आणि अखेर एक देवी प्रसन्न झाली. तिने आम्हास त्या मजकुराचा अर्थ उलगडून सांगितला...
... ‘महाभारत’ म्हणून जे महाकाव्य आपण वाचतो, ऐकतो, सांगतो, त्याचाच एक अप्रकाशित भाग आमच्या हाती लागला होता.
“तिकडे कुरुक्षेत्रावर रणकंदन माजले असताना आता पराभव स्पष्ट दिसू लागल्याने धृतराष्ट्र उद्विग्न होऊन महाली बसला असताना त्याची मनोवस्था पाहून कळवळलेल्या संजयाने त्याचे मन रिझविण्याचा निर्णय घेतला. त्याची मानसिक अवस्था काहीशी खराब असल्याने त्याच्यासमोर काही गीतमाला सादर करण्याचे त्याने ठरविले, आणि राजगायकांना त्यांच्या वाद्यांसह निमंत्रण धाडले. धृतराष्ट्राचे तिकडे लक्षच नव्हते. आपल्या आसनाशेजारच्या रिकाम्या सिंहासनाकडे पाहताना त्याच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. जणू आषाढाच्या पहिल्या दिवशीच मेघांनी धरतीवर समरसून बरसावे तसे त्याच्या डोळ्यातून भरभरून वाहणारे अश्रू पाहून संजयास भडभडून आले आणि त्याने काही केविलवाणी गाणी ऐकविण्याची सूचना राजगायकास केली. तबला, तंबोऱ्याने सूर जुळवून घेतले, आणि राजगायकाने संवादिनीवर हलकेच बोटे फिरविली...”
(आज आपण काही गीते समकालीन कवींची असल्याचे मानतो, पण त्याला धृतराष्ट्रकालीन पुराणकथांचा आधार आहे, हे आम्हास ती अगम्य लिपी उलगडताना जाणवले.)
तर, राजगायकाने सूर धरला, आणि पहिलेच गाणे आळविण्यास सुरुवात केली...
“भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...”
राजगायक गाणे गात होता, आणि धृतराष्ट्राच्या मिटल्या डोळ्यातून अश्रुधारा पाझरत होत्या. बाजूला बसलेली राणीही त्या क्षणी हळवी होऊन केविलवाणी झाली. मग धृतराष्ट्राने हलकेच चाचपडत अंदाज घेऊन तिचा हात हाती घेतला, आणि तिच्या दिशेने चेहरा फिरवून तो कुजबुजला, “मी पाहू शकत नसलो, तरी मला तुझी भाषा समजते आहे. माझ्या नशिबासोबतच तुझ्या या कोमल हातावरील भविष्यरेषा बोलणार हे विधिलिखितच आहे...”
राणीने हलकेच धृतराष्ट्राचा हात थोपटला. तिच्या पट्टी बांधलेल्या डोळ्यांतूनही अश्रुधारा वाहू लागल्या...
गायक गातच होता... “उद्या पहाटे कुठल्या वाटा, दुज्या गावचा वारा...”
धृतराष्ट्र पुन्हा कळवळला. त्याने बाजूच्या रिकाम्या, वंशपरंपरेने राजवाड्यात असलेल्या रिकाम्या सिंहासनाकडे पाहिले, आणि तो पुन्हा राणीच्या कानाशी कुजबुजला, “आपण हे जीव असे का जोडले?... आणि तरीही फुलण्याआधीच हे फूल दैवाने असे का बरे तोडले?...”
या प्रश्नाला राणीकडे उत्तर नव्हते. ती अधिकच केविलवाणी झाली होती.
गाणे संपत आले होते. राजगायकाने शेवटचे कडवे आळविण्यास सुरुवात केली, आणि अखेरची ओळ पुन्हा उच्चारली...
“वाऱ्यावरती विरून गेली, एक उदास विराणी...”
धृतराष्ट्राचे डोळे पाझरतच होते, आणि बाहेर आषाढाचा पाऊस अधिकच जोमाने बरसू लागला होता.
...त्या अगम्य लिपीवरील अनोळखी मजकुराचे शब्द जसेच्या तसे असेच नव्हते, पण त्यामागील भाव याच आशयाचे होते हे आम्हांस जाणवले, आणि हे भूर्जपत्र भीमाने का लपवून ठेवले असावे ही शंका आम्हास छळू लागली.
कदाचित, धृतराष्ट्राच्या हळव्या व्यक्तिमत्वाचा हा पदर त्याला भविष्यातील जगासमोर यावा अशी त्याची इच्छा नसावी, असा तात्पुरता निष्कर्ष आम्ही काढला, आणि महाभारतातील अप्रकाशित भाग हाती लागल्याच्या आनंदाने आरोळी ठोकून आम्ही त्याचे स्क्रीनशॉट पेपरवाल्यांना पाठवून दिले.
आज सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू असल्याचे टीव्हीवर पाहात आम्ही त्या आडगावातल्या मंदिराशेजारच्या चहाच्या टपरीवर वाफाळता चहा घेत बसलो आहोत...
पुण्य नगरी ०१/०७

सत्ता-संघटनेच्या अस्तित्वाचा संघर्ष

 

शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या वाटचालीचे सक्रीय साक्षीदार असलेले माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या पहिल्या चार दशकांच्या वाटचालीवर एक प्रदीर्घ प्रबंध लिहिला. ‘शिवसेनाः काल, आज आणि उद्या’ या नावाने लिहिलेल्या सुमारे एक हजार पानांच्या या प्रबंधात, शिवसेनेचा भूतकाळ आणि सन २००७ पर्यंतचा सखोल तपशील मांडणाऱ्या जोशी यांनी शिवसेनेच्या भविष्यकाळावरचे भाष्य मात्र खुबीने टाळले. त्यावर त्यांनी समकालीन मान्यवरांची मते मांडली. जोशी यांनी २००७ नंतरच्या, म्हणजे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे सक्रिय झाल्यानंतरच्या भविष्याचे भाकित जाणीवपूर्वक टाळले असावे, असे दिसते. त्या प्रबंधग्रंथातील संदर्भ पाहता, आजची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना यांमध्ये मोठे अंतर असल्याचे आजच्या घडामोडींवरून पडताळता येते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू झालेली एक ज्वलंत चळवळ, गतिमान संघटना, आणि प्रभावी राजकीय पक्ष अशा विविध रूपांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटविणारा हा पक्ष सध्या एका वैचारिक संभ्रमावस्थेत सापडला असून सत्ता हेच या संभ्रमाचे कारण आहे, यात कोणाचेही दुमत असणार नाही. ‘हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे’, असे सांगत, १९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रखरतेने हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यानंतरच्या कायदेशीर कारवाईला प्रचंड विश्वासाने तोंड देऊन हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात रुजविला आणि नंतरच्या राजकारणात हाच मुद्दा राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी राहण्याकरिता महत्वाची भूमिका बजावली, त्याच हिंदुत्वावरून आज शिवसेनेत उभी फूट पडण्याची वेळ आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे हिंदू खोमेनी आहेत’, अशी टीका तेव्हा करणारे शरद पवार हे आजच्या शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत संकटमोचक बनले आहेत, आणि पवार यांच्या राजनीतीतूनच सत्ता आणि संघटना वाचविता येईल, असा सूर शिवसेनेच्या पहिल्या फळीतून उमटू लागला आहे. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते हे खरे आहे. त्यामुळे २०१९ मध्ये निवडणुकीत केलेली भाजपसोबतची नैसर्गिक युती आणि या युतीला मिळालेला जनादेश धुडकावून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी अवैधानिक ठरली नाही, तरी ती अनैसर्गिक होती, हे स्पष्ट आहे. या आघाडीनंतर मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणातील उद्धव ठाकरे यांचा सूर आणि गेल्या काही महिन्यांत उमटू लागलेला हिंदुत्वाचा सूर पाहता, ही कसरतही स्पष्ट जाणवते. ‘धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ केली ही शिवसेनेची चूक होती’, अशी स्पष्ट कबुली विधिमंडळात उद्धव ठाकरे यांनी दिली, तेव्हाच खरे तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या कडवट विचारांशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांच्या मनात पक्षाच्या नव्या वाटचालीविषयी शंकेची पाल चुकचुकली होती. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या संघर्षावरच अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याची भीतीही त्यांच्या मनात उमटली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा वाद संपुष्टात आल्यानंतर पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी येत असल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेने सावधपणे हिंदुत्वाचा उच्चार करण्यास सुरुवात केली, पण सरकार या नात्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या असंख्य प्रसंगातील भूमिका मात्र काहीशी तटस्थतेचीच राहिली. शिवसैनिकांच्या मनात याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या, पण ते व्यक्त होत नव्हते. ‘आमचे हिंदुत्व गदाधारी हिंदुत्व आहे’, अशी टाळीबाज वाक्ये सभांमधून फेकली जात होती, पण पालघरमध्ये साधूंच्या हत्याकांडासारख्या घटना घडल्यानंतर, बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाचे संस्कार झालेल्या शिवसैनिकाच्या मनात सत्ताधारी शिवसेनेकडून ज्या कृतीची अपेक्षा होती, तसे घडलेच नाही. आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही भूमिकांशी तडजोड करावी लागते. मात्र, हिंदुत्व हा ज्यांचा श्वास आहे, त्या शिवसेनेने हिंदुत्वाच्या भूमिकेशीच तडजोड केल्याचे दिसू लागल्यावर अस्वस्थ शिवसैनिकांची चलबिचल सुरू झाली. गेल्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भरविल्या गेलेल्या अजान स्पर्धा, हिंदु सण साजरे करण्यावरील बंधने आणि अन्य धर्मांच्या सणांबाबत घेतली गेलेली भूमिका, राम मंदिराच्या उभारणीकाळात शिवसेनेने उपस्थित केलेल्या शंका, कोरोनाकाळात हिंदु प्रार्थनास्थळांवर घातलेल्या निर्बंधांमुळे त्यावर उपजिविका करणाऱ्या कुटुंबांवर ओढवलेली आर्थिक ओढाताण, अशा अनेक मुद्द्यांवर बाळासाहेबांचा शिवसैनिक ठाकरे सरकारकडे अपेक्षेने पाहात होता. सध्याचे बंड हा अशाच अस्वस्थतेचा उद्रेक असावा.
काही दिवसांपूर्वी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत या नाराजीचा स्पष्ट इशारा शिवसेनेला मिळाला होता. विधानसभेत भाजपकडे असलेल्या ११३ मतांपेक्षा दहा मते जास्त मिळवून भाजपने राज्यसभेचे तीनही उमेदवार निवडून आणले, तेव्हाच सत्ताधारी आघाडीत सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत तर शिवसेनेतील नाराजांनी नेतृत्वाला थेट फुटीचा इशारा दिला. भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकही जादा मत नसतानाही सेनेच्याच एका उमेदवाराला पराभूत करून भाजपने बंडाची बीजे रुजविली. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणावर विसंबून शिवसेनेच्या नेतृत्वाने तिकडेही दुर्लक्ष केले. विधानसभेतील बहुमताच्या संख्याबळाचा प्रचंड विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांना भोवला. या घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेसा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बंडाची आखणी पूर्ण झाली होती. त्याची पूर्वतयारी म्हणून २१ जूनला विधानसभा उपाध्यक्षांविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावातडेही पुरेशा गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. कदाचित यापुढे शिवसेनेचे खरे दावेदार कोण या मुद्द्यावरून जेव्हा एकनाथ शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष सुरू होईल, तेव्हा ठाकरे गटाच्या बेफिकीरीचे परिणाम समोर येऊ लागतील.
या काळात सरकार म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडून असलेली शिवसैनिकाची अपेक्षा यांत अंतर पडल्यामुळे सध्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचा मोठा पेच उभा राहिला आहे. मुख्य म्हणजे, ज्यांनी बाळासाहेबांवर ‘हिंदू खोमेनी’ म्हणून टीका केली, त्या शरद पवार यांच्याकडेच आज शिवसेना संकटमोचक म्हणून पाहते आहे, हा काळाने घेतलेला विचित्र बदला असल्याची भावना आज बंडातून व्यक्त झाली आहे.