Friday, October 24, 2008

सहज सुचलं म्हणून...!

"...या उद्यानात उन्मळून पडलेल्या, वठलेल्या वृक्षांचे पुनर्वसन होईल. इथे ते नव्या पालवीने बहरतील'...
मुंबई महापालिकेच्या महापौर दालनात पत्रकारांशी बोलताना "राजकीय भाष्यकारा'च्या मिश्‍किल शैलीत, चेहऱ्यावरची मिश्‍किल हास्यरेषा न लपविता छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते... शिवसेनेची "मुलुखमैदान तोफ' असलेल्या छगन भुजबळ यांना महापौरपदी असताना अंधेरीच्या डी. एन. नगरमध्ये एका पडीक भूखंडावर एक अनोखे उद्यान उभारण्याचा ध्यास लागला होता. त्यासाठी ते अहोरात्र झटत होते. या उद्यानात बहरलेली झाडे, वेली असतील, संधिप्रकाशाला संगीताची साथ असेल, आणि मुख्य म्हणजे, मुंबईतील ज्या कलावंतांना महागड्या कलादालनांमध्ये प्रदर्शने भरविणे परवडत नाही, त्यांच्यासाठी एक खुले कलादालनही असेल, असा ध्यास त्यांनी घेतला होता... उद्यानाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी ते जातीने दिवसागणिक तेथे जात होते. उद्यानातीलच एका कृत्रिम टेकडीवर खास मागवून घेतलेले एक विशाल स्वयंभू "पाषाणशिल्प' त्यांनी उभे केले होते. अमिताभ बच्चनही ते शिल्प पाहून भारावला, असे भुजबळ तेव्हा प्रत्येकाला कौतुकाने सांगत असत...

सुमारे 18 वर्षांपूर्वीची ही हकीकत! छगन भुजबळ यांची 1989-90 मध्ये दुसऱ्यांदा मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती. या कालावधीत हे "कला प्रदर्शनी उद्यान' उभारण्याचे त्यांनी ठरविले. या उद्यानामुळे भुजबळांची महापौरपदाची कारकिर्द त्यांच्या रसिकतेचा पुरावा देत अधोरेखित होणार होती. सर्वत्र कला प्रदर्शनी उद्यानाचा बोलबाला होता. सारे काही गोड गोड होते.
... आणि याच गोडीमध्ये उद्यानातील टेकडीवरच्या त्या "पाषाणशिल्पा'ने मिठाचा खडा टाकला. "दर्शनी जागी बसविलेले दगडदेखील प्रेक्षणीय होतात', असा कडवट सूर सेनेतूनच उमटू लागला आणि उद्यानाच्या उद्‌घाटन समारंभात बाळासाहेबांच्या तशाच आशयाच्या वक्तव्यानंतर सारे वातावरण "कडवट' झाले. शिवसेनेतील भुजबळांचे वजन कमी झाल्याचे संकेत मिळू लागले. कला प्रदर्शनी उद्यानात जुन्या वृक्षांचे पुनर्वसन करण्याचे स्वप्न पूर्ण झालेच नाहीष उलट नंतर ते उद्यानच करपून गेले. राजकारणाबाहेर गेलेल्या एखाद्या जुन्या नेत्यासारखे दुर्लक्षित, एकाकी झाले. संगीताचे सूर तिथे घुमलेच नाहीत, आणि कलाकारांची कलाही तेथे फुललीच नाही.
त्यानंतर काही दिवसांतच नाट्यमय "जय महाराष्ट्र' करून भुजबळांनी शिवसेनेलाच दणका दिला आणि ते "कॉंग्रेसवासी' झाले. त्या काळात शिवसेनेशी "गद्दारी' करणे हे सामान्य शिवसैनिकाचे काम नव्हते. भुजबळांच्या या अचाट धाडसामुळे राज्याच्या सत्ताकारणातही छगन भुजबळ हे नाव आघाडीवर आले. त्या वेळी शिवसेनेत भुजबळांविषयी प्रचंड असंतोष माजलेला होता. "लखोबा लोखंडे' या नावाचा शिक्का भुजबळांच्या माथी बसला. पण त्याला प्रतिआव्हान देत, शिवसेनाप्रमुखांवरच राजकीय प्रत्याघात करण्याची हिमत दाखवून, खुद्द बाळासाहेबांचा "टी. बाळू' असा उल्लेख करीत सेनेच्याच मुशीत तयार झालेल्या भुजबळांनी सेनेचे आक्रमण परतवून लावले.
सेनेतील कटुता अशी शिगेला पोहोचलेली असतानाच, भुजबळांच्या मनात "सेनाप्रेमा'चा एक हळवा कोपरा सतत जपलेला होता. राज्यात प्रथमच शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली, तेव्हा भुजबळ विरोधी पक्षात होते. "वर्षा'वरच्या एका चहापानास हजेरी लावताना, काही आवडीचे पदार्थ दिसताच, "हवा हवाई' हा "परवली'चा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडला, आणि तो हळवा कोपरा आणखी नाजूक झाला... राज्यातील आणि देशातीलही मानाचे पद भूषविलेला शिवसेनेचा एक नेता नंतर कितीतरी वेळा त्या आठवणीने हळवा झालेला अनेकांनी पाहिला होता. भुजबळांविषयीच्या कटुतेतही, शिवसेनेमध्ये कुठेतरी एक "गोडवा' जपला जात होता. राजकीय अपरिहार्यतेपोटी त्यांनी बाळासाहेबांवर कारवाई करण्याचेही धाडस दाखविले. बाळासाहेबांवर टीका करतानादेखील, त्यांच्याविषयीचा भुजबळांचा आदर अनेक प्रसंगांतून व्यक्त झाला होता. सत्ताधारी पक्षाचे वजनदार नेते असताना, तेलगी प्रकरणात त्यांना मनस्ताप सोसावा लागला. डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातही त्यांना लक्ष्य केले गेले. उपमुख्यमंत्रीपदाची कारकिर्द संपल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा सातत्याने राजकीय क्षेत्रात होत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीआधीही, भुजबळ पक्षबाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहूनच महाराष्ट्रातील आणि देशभरातील "ओबीसी' ताकद एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
बरोब्बर एक वर्षापूर्वी, भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथे एका समारंभात गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, सुरूपसिंग नाईक आदी नेते एका व्यासपीठावर आले आणि राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याचे संकेत गडद झाले. ओबीसी नेत्यांची एक आघाडी आकार घेणार असे आडाखे बांधले जाऊ लागले. अलीकडेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बंडाच्या पवित्र्यानंतर पुन्हा भुजबळ, मुंडे आणि काही असंतुष्ट नेते एकत्र आले. राष्ट्रवादीच्या तंबूत आपण समाधानी नाही, हे दाखविण्याची संधी त्यांनी कधी सोडली नाही. भुजबळ नव्या पक्षाची स्थापना करणार, की एखाद्या प्रस्थापित पक्षाला बळ देणार, एवढाच मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे. राजकारणात उपेक्षा सहन करतानाही, आपण "बाप माणूस' आहोत, हे दाखविण्याची संधी मात्र वेगवेगळ्या शक्तिप्रदर्शनांतून ते साधत राहिले.
मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मुद्‌द्‌यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा भुजबळांच्या राजकारणाने "नाट्यमय वळण' घेतले आहे. बरोब्बर एक वर्षापूर्वी, ऑक्‍टोबर महिन्यातच, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून भुजबळांना दिलासा दिला होता. भुजबळांना आकाशापर्यंत उचलून धरणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आता मात्र त्यांची गरज संपली असून त्यांची उपेक्षा होत असल्याचे ठाकरे यांनी संपादकीय लिखाणात म्हटले होते. राजकारण गाजविणारी शिवसेनेची "मुलुखमैदान तोफ' अशी प्रशंसाही ठाकरे यांनी केली होती. भुजबळ सेनेत असते, तर त्यांची अशी उपेक्षा झाली नसती, असा "दिलासा'ही त्यांनी दिला होता...
...पुन्हा "हवा हवाई'चा परवलीचा शब्द सेनेच्या पहिल्या फळीत घुमेल?

Saturday, October 4, 2008

बाकडं...

लोकसभेत नोट फॊर व्होट’ प्रकरण झालं, तेव्हापासून बाकडं माझं डोकं पोखरतंय...
म्हणजे, प्रत्येक माणसाचा एकएक स्वभाव असतो. पण, तो त्याचा मूळचा स्वभाव नसतो. तो कुठे बसतो, त्यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो, असं त्या दिवशीपासून माझं ठाम मत झालंय.
कारण, त्या प्रकरणानंतरचा लालकृष्ण अडवाणींचा चेहेरा मला आजही जसाच्या तसा आठवतोय.
बाकड्याचा परिणाम. दुसरं काय?
लोकसभेत विरोधी बाकांवर बसलं, की आपोआपच व्यक्तिमत्वावर पराभूतपणाचा ओशाळा अंमल चढतो, अशी त्या दिवशीच्या त्यांच्या चेहे-यावरून माझी खात्री झालीय.
सत्ताधारी बाजूच्या, शेवटच्या रांगेतला, कधी सभागृहात तोंडही न उघडलेला, तो अनोळखी खासदार मात्र, त्या दिवशी कसा खुशीत दिसत होता?
बाकड्याचाच परिणाम!
तर, तेव्हापासून हे बाकडं माझ्या डोक्यात घर करून बसलंय.
आज त्यानं डोकं वर काढलं...
...‘मी जर वर्गात समोर बसलो, तर, मीपण पोरांसारखाच वागेन, अशी मला भीती वाटते’... पत्रकारितेच्या वर्गाला शिकवणाया माझ्या एका सहकार्यानं वैतागलेल्या सुरात मला सांगितलं, आणि मला राहवेना. काय झालं, ते कळल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं.
‘अरे, काय कलकलाट करतात ती मुलं... एवढी मोठी झाली, तरी, सारखं ‘गप्प बसा’ म्हणून दामटावं लागतं रे... त्यातली एकदोघं तर शिक्षक आहेत. नोकरी करतात. पण इथे आल्यावर, समोरच्या बाकांवर बसली, की मुलांसारखीच कलकल करतात. त्या बाकड्यांचाच गुण असला पाहिजे हा... ’ तो आणखीनच वैतागल्या सुरात बोलला, आणि विरोधी बाकावर सुन्न, पराभूत चेहेरा करून बसलेले अडवाणी माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागले.
आणखी काही दिवस मागे गेलो, तर देशाचे उपपंतप्रधान, खिल्ली उडवणा-या सुरात बोलणारे अडवाणी आठवले.
आणि, बाकडे हा माणसाच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारा महत्वाचा घटक आहे, ह्याबद्दल माझी खात्री झाली...
मागे एकदा चर्चगेटच्या एका कॊलेजात एका कार्यक्र्माला गेलो होतो, तेव्हा गर्दीमुळे खुर्ची मिळाली नाही म्हणून बाजूच्या रिकाम्या वर्गात एका बाकड्यावर बसून भाषणं ऐकत होतो. बसल्याबसल्या बाकड्याच्या पुस्तकं ठेवायच्या कप्प्यात हात फिरवला, आणि हाताला एक टाचणी लागली.
माझे कान बाजूच्या हॊलमधल्या भाषणाकडेच होते.
खूपच चांगलं बोलत होता तो वक्ता. मी तल्लीन होऊन ऐकत होतो...
भाषण संपलं, आणि टाळ्या वाजवण्यासाठी मी हात वर घेतला, तेव्हा हातातली ती टाचणी नकळत बाजूला ठेवली गेली.
हे सगळं अगदी सहजपणे घडत होतं...
टाळ्या वाजवून मी उठायच्या तयारीत होतो, तेव्हढ्यात माझं लक्ष त्या बाकड्याकडे गेलं.
भाषण ऐकताऐकता जुन्या सवयीनं आपलं काम केलं होतं.
हातातली टाचणी बाकड्यावर ‘चालली’ होती.
माझ्या थोड्याश्या वेळाच्या तिथं बसण्याच्या खाणाखुणा नकळतपणे बाकड्यावर नावानिशी उतरल्या होत्या.
शाळाकॊलेजात असताना मला बाकड्यावर नाव कोरायची सवय होती.
पण त्याला आता खूप वर्षं झालीत.
तरीही, त्या दिवशी कॊलेजचं बाकडं आयतं समोर आलं, आणि आपोआप नाव कोरलं गेलं.
माझ्या नकळत मी पुन्हा विद्यार्थी झालो होतो.
... बाकड्याचाच परिणाम!
हे आठवलं, आणि, ‘शाळेच्या बाकावर बसलो, तर आपण पुन्हा मूल होऊ’, ही त्याची भीती खरी ठरेल, अशी भीती मला वाटली.
त्याचे ते शब्द काही केल्या कानातून जात नव्हते.
तशातच मी स्टेशनवर आलो.
फलाटावर नेहेमीसारखीच तोबा गर्दी होती.
लांबूनच गाडी येताना दिसली आणि सगळी गर्दी सावज पकडायला शिकारी जसा सज्ज होतो, तशी झाली.
गाडी पुरते थांबायच्या आतच सगळ्या खिडक्या भरल्या होत्या...
गाडीच्या बाकावर खिडकीशी बसलेला प्रत्येकजण, पराक्रम गाजवल्याच्या विजयी मुद्रेनं थांबलेल्या गाडीत चढणा-या प्रत्येकाकडे पाहात होता.
मला बाकड्यावरची खिडकीची जागा पकडता आल्याने, मीही तेच करत होतो...
काही सेकंदातच गाडी ब-यापैकी भरली.
कुठेकुठे एखाददुसरी चौथी सीट शिल्लक होती.
जरा वेळात एक सुटाबुटातला माणूस डब्यात शिरला.
पॆसेजमधूनच त्यानं कुठे जागा आहे का, याचा अंदाज घेतला.
एक चौथी सीट रिकामी दिसताच त्याचा चेहेराही उजळला.
आणि बाकड्यावरच्या तिघांना सरकायला सांगून, जमा झालेल्या कोप-यावर तो कसाबसा टेकला.
गर्दी वाढतच होती.
गाडीनं शिट्टी दिली, आणि ती थोडीशी हलली, तेवढ्यात दोनचार जणांनी धावत येऊन गाडी पकडली, आणि सुटकेचा सुस्कारा टाकत तेही आत आले.
गर्दीतच तेही जागेचा अंदाज घेत होते.
अचानक त्यांचं लक्षं चौथ्या सीटवरच्या त्या सुटाबुटातल्या माणसाकडे गेले, आणि ते निमूटपणे मागे वळून पॆसेजमध्ये उभे राहिले.
त्या माणसानंही त्यांना पाहिलं होतं बहुधा.
त्याच्या ऒफिसातले, त्याच्या हाताखालचे लोक असावेत ते.
इतका वेळ चौथ्या सीटवरल्या कोप-यातही आनंदात बसलेल्या त्याचा चेहेरा एकदम उतरल्यासारखा झाला.
मिनिटभारानं तो तिथून उठला, आणि सरळ उभाच राहिला.
बाकड्यावरच्या कोप-याच्या जागेचा परिणाम.
मी बाकड्याचाच विचार करत होतो...
नुसतं बाकडंच नाही, तर त्यावर बसायला मिळालेली जागादेखील, माणसाचं व्यक्तिमत्व बदलून टाकते, याचा पुरावाच मला मिळाला.
...माझं स्टेशन येताच मी गाडीतून उतरलो आणि स्टेशनाबाहेर येउन बसच्या रांगेत उभा राहिलो...
एक बस सोडल्यावर नंतरच्या बसमध्ये बसायला जागा मिळाली.
बस भरली, तेव्हा उभ्यानं प्रवास करणारी, अगोदरच थकलीभागली माणसं मला आणखीनच केविलवाणी वाटत होती.
मी आजूबाजूच्या बसलेल्या लोकांवर सहज नजर फिरवली.
खिडकीत बसलेले, बाजूच्या प्रवाशापेक्षा जास्तं फ्रेश आहेत, असं मला उगीचच वाटलं.
बाकड्याचा परिणाम....!
मग बस चालत असताना मी वेगवेगळ्या ठिकाणची बाकडी आठवू लागलो.
मंत्रालयात मंत्र्याच्या दालनाबाहेच्या बाकड्यावर बसून, मंत्र्याच्या भेटीसाठी ताटकळणारी माणसं मला आठवली.
डॊक्टरच्या दवाखान्यात, आपला नंबर येण्याची वाट पाहात बाकड्यावर बसलेले पेशंट माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले.
कोर्टातल्या बाकड्यांवर बसलेल्या माणसांच्या मनावरचं दडपण त्याच्या चेहे-यावर उमटलंय, असं मला उगीचच दिसू लागलं.
...आणि, मंत्रालयातून, दवाखान्यातून, कोर्टातून आपापली कामं आटोपून घरी परतून, घरातल्या बाकड्यांवर बिन्धास्तपणे ऐसपैसपणे बसलेली माणसंही माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागली.
त्याच्या चेहे-यांअर ‘घरच्या बाकड्या’चा आत्मविश्वास झळकताना मला दिसत होता...
‘एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’... असा एक नाना पाटेकरचा डायलॊग असल्याचं कधीतरी ऐकलं होतं.
एक बाकडंसुद्धा भल्याभल्यांचा नक्षा उतरवतं... खरं की नाही?