Monday, March 30, 2020

इम्युनिटी

तळव्याएवढ्या
स्क्रीनवर फिरणारं
पांढरं धुरकट चक्र
अदृश्याचा पाठलाग करत
वेग वाढवू लागतं,
डाव्या कोपऱ्यातली
फोरजीची अक्षरं
दमछाक होऊन
टाकू लागतात धापा
गुपचूप, लपूनछपून...
‘फोर’च्या कोपऱ्यातून
उमटतात विषण्ण उसासे
भिजल्या अक्षराच्या डोळ्यात
वाहत जातो एक अश्रू...
हात जोडून म्हणतो,
माफ कर,
घरघर लागलीय...
शेवटी प्रश्न ‘इम्युनिटी’चा आहे...
तुमची वीजदेखील आता
‘ग्रीन’ राहिलेली नाही...
कोळशाच्या राखेची पुटं
अंगावर घेत वाहताना
आमचीही फुफ्फुसं
काजळीनं भरलीत खचाखच...
पण
थोडे प्रोटीन्स मिळाले तर
आम्हीही पुन्हा होऊ
‘फोरजी’ शक्तीमान...

पळवून लावू त्या फिरत्या चक्राला
‘बफरिंग झोन’च्या पलीकडे!

‘चांगुलपणा’चा शोध...

लोकप्रभा’त प्रसिद्ध झालेला एक जुना लेख.

***


‘इंटरनेट’मुळे एक बरं झालंय. एखादा संदर्भ, एखादी गोष्ट, सहज सापडत नसेल, तर ‘सर्च इंजिन’वर जायचं. मग लगेच त्या शब्दाचे सारे संदर्भ समोर येऊन उभे राहतात.
थोडक्यात, ‘शोध सोपा झाला!’
हे माहीत असल्यामुळेच, हा लेख लिहिण्याआधी सहज एका सर्च इंजिनवर एक शब्द टाईप केला... ‘चांगुलपणा’!
शेकडो रिझल्टस समोर आले. पण पाहिजे तो संदर्भ त्यातून शोधण्यासाठीही खूपच मेहनत करावी लागली. इतकी, की इंटरनेटच्या सर्च इंजिनवरूनही चांगुलपणा हरवत चालला आहे की काय, अशी शंका येऊ लागली. काही संदर्भ आढळले. ‘आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका’… ‘तुम्ही चांगुलपणा दाखवलात तरच आम्हीही चांगुलपणा दाखवू’ असे काही मथळे असलेला मजकूर मात्र लगेचच पुढे आला, आणि चांगुलपणा शोधावाच लागणार असे नक्की वाटू लागले.
तसा शोध सुरू असतानाच वर्तमानपत्राच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक बातमी दिसली, आणि चांगुलपणा जिवंत आहे, याची खात्री पटली. तो शोधावा लागत असला, तरी तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही, त्याचे अस्तित्व भक्कम आहे, असेही जाणवू लागले.
मग त्या बातमीशी तुलना करणारे काही जुने प्रसंग, जुने अनुभवही मनात जागे होऊ लागले.
… लोकल गाडी स्टेशनवर थांबण्याआधी रिकामी झाली होती. मी मोबाईलमधले पुस्तक वाचत असल्याने मला स्टेशन आल्याचे जरा उशीराच लक्षात आले. फर्स्टक्लासचा तो डबा जवळपास रिकामा होता. समोरच्या बाकावर, माझ्यासारखाच, उशीरा लक्षात आलेला एकजण होता. मी उतरताना सहज वर बघितलं. एका चकचकीत कागदात पॅक केलेला बॉक्स असलेली प्लास्टिकची पिशवी कुणीतरी रॆंकवर विसरून गेला होता. मी बाजूच्या त्या माणसाला विचारलं.
'ये आपका है?'
त्याची नसल्यामुळे तातडीनं तो 'नाही' म्हणाला. पण लगेचच त्याचं लक्ष त्या पिशवीवर खिळलं.
मी उतरलो. मागे बघितलं.
तो माणूस डब्यात रेंगाळला होता.
थोडं पुढे जाऊन मी थांबून बघू लागलो.
तो माणूस उतरला, तेव्हा त्याच्या हातात ती पिशवी होती!
... बहुधा मी उतरायची किंवा मूळ मालक येतो की काय याची वाट पहात तो रेंगाळला होता.
तो फलाटावर उतरून चालू लागला, आणि काही अंतरावर उभा असलेल्या मला त्यानं पाहिलं. झटक्यात मागे वळून उलट्या दिशेनं झपाझप चालत तो दिसेनासा झाला होता!
... दुसऱ्या दिवशी वाचलेल्या एका बातमीमुळे तो प्रसंग पुन्हा आठवला.
पुण्याच्या एका भंगारवाल्यानं, हिराबागेतील एका उच्चभ्रू घरातलं एक जुनं कपाट विकत घेतलं.
ते विकून चार पैसे नफा मिळणार म्हणून तो खुश होता.
या धंद्यातून होणाऱ्या पाचसहा हजाराच्या कमाईतून त्याचं कुटुंब कसंबसं जगत होतं. बायको जेवणाचे डबे बनवून संसाराला हातभार लावायची, दोन मुलगे जमेल तशी मजुरी करायची. मुलगी शाळेत शिकत होती. खेळात नाव कमवायचं तिचं स्वप्न होतं.
तिच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्जही त्याच तुटपुंज्या कमाईतून तो नेमानं फेडत होता.
आपल्या वाटणीला आलेलं आयुष्य ते कुटुंब आनंदानं आणि प्रामाणिकपणाने जगत होतं.
ते कपाट विकून या वेळी हाताशी चार पैसे जास्त मिळणार होते.
त्यानं ते कपाट घरी आणलं, आणि विकण्याआधी स्वच्छ करण्याकरीता उघडलं. आत एक लॉकर होता. त्यानं तो उघडला.
एक जुनी पिशवी आत होती. त्यानं ती काढून उघडली, आणि त्याचे डोळे विस्फारले. नकळत दोन्ही हातांचे तळवे गालांवर आले.
काही वेळ फक्त तो त्या पिशवीत पाहात होता.
... आत सोन्याचे दागिने होते!
त्यानं भानावर येऊन पुन्हा पिशवी उचलली. जड होती. किलोभर तरी वजन होतं.
क्षणभरच, अनेक विचार मनात येऊन गेले.
आख्खं भविष्य एका सुखद वळणावर येऊन थांबल्याचा भासही त्याला झाला.
पुढचा क्षण त्याचं आयुष्य बदलण्यासाठी समोर हात जोडून जणू उभा होता.
त्यानं मिनिटभर डोळे मिटले, आणि लहानपणी आईवडिलांच्या तोंडून ऐकलेल्या संतांच्या गोष्टी त्याला आठवल्या. पंढरीच्या वारीला जाणारे वारकरी आठवले...
... आणि पिशवीला घट्ट गाठ मारून तो पुन्हा हिराबागेतील त्या घरी गेला.
दार वाजवून मालकाच्या -आपण त्यांना पेंडसे म्हणू- हाती त्यानं ती पिशवी सोपवली.
पेंडशांनी ती उघडली.
आता त्यांचे डोळे विस्फारले होते. तोंडाचा आ झाला होता. त्यांना काही बोलायलाच सुचत नव्हते. अचानक समोर उभं राहिलेलं हे भाग्य आपल्याच घरात भंगारात कितीतरी वर्ष पडून राहिलं होतं, हेही त्यांनादेखील माहीतच नव्हतं...
तो भंगारवाला समोर दरवाजात उभा होता. काहीच न बोलता.
काही वेळानं पेंडसे सावरले. पिशवी घेऊन आत गेले, आणि पुन्हा बाहेर आले.
त्यांच्या हातात पाचशेची नोट होती. ती त्यांनी भंगारवाल्याच्या हातावर ठेवली.
तो जरासा कचरलाच. त्याचा हात पुढे झालाच नाही. मग पेंडशांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं!
'अरे, हे तुझ्या चांगुलपणाचं बक्षिस आहे! घे!' असं म्हणाले.
पाचशेची नोट घेऊन कपाळाला लावत त्यानं खिशात घातली आणि तो घरी आला.
त्या क्षणी त्याला अगदी हलकंहलकं, मोकळं वाटत होतं!
.... हा दुसरा प्रसंग.  
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ती बातमी वाचली, आणि मला ट्रेनमधला प्रसंग आठवला.
मोहाचे क्षण टाळणं, भल्याभल्यांना जमत नाही.
चांगुलपणाच्या गप्पा सगळेच मारतात. पण असा एखादा क्षण समोर आलाच, तर कितीजण तो प्रत्यक्षात जगतील हे सांगणं कठीण असतं.
.... या दोन प्रसंगांतून ही दोन्ही उत्तरं मिळाली!
पुण्याच्या त्या गरीब भंगारवाल्याच्या चांगुलपणाला आणि श्रीमंतीला सलाम केलाच पाहिजे. कारण,  चांगुलपणा आजकाल शोधावा लागतो, असे सगळेच म्हणतात. म्हणूनच, अशा चांगुलपणाची एखादीच घटना दुर्मीळ ठरते, आणि तिची बातमी होते. अशी बातमी कधीतरीच वर्तमानपत्राच्या एखाद्या कोपऱ्यात अवतरते, पण त्या दिवशी तीच सर्वाधिक वाचली जाते. कारण, चांगुलपणाविषयी समाजाच्या मनात आदर आहे. चांगुलपणाला गालबोट लावणाऱ्या घटनांबद्दल अजूनही तिटकारा व्यक्त होतो. म्हणूनच, सिनेमातल्या खलनायकाचाही प्रेक्षकांना राग येतो, आणि चांगुलपणाचा विजय झाला की हायसे वाटते...
चांगुलपणा ही मोठी वजनदार गोष्ट आहे. वाईटपणाच्या शेकडो गोष्टी आसपास सतत घडत असतानाही, चांगुलपणाची एखादीच गोष्ट त्या वाईट घटनांच्या दुःखावर फुंकर घालण्यास पुरेशी असते.
कारण चांगुपलणाचा कोपरा प्रत्येक मनामनात असतो. त्यावर एखाद्या घटनेची फुंकर बसली, की तो ताजा, टवटवीत होतो, आणि त्याचे झरे जिवंत होऊन पाझरू लागतात...
जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, जिथे माणसं वावरतात, तिथे हे झरे जिवंत झाल्याचा अनुभव नेहमी येत असतो. ते झरे एवढे प्रवाही होतात, की जगाच्या थेट दुसऱ्या टोकावरही त्याचा ओलावा पोहोचून जातो, आणि चांगुलपणाच्या एखाद्या तरी घटनेची प्रतीक्षा करणाऱ्या मनांवर त्याचा शिडकावाही होतो.
चारपाच वर्षांपूर्वीची एक बातमी अशीच जगाच्या त्या टोकाकडून इथपर्यंत पोहोचली.
कॅनडामधील ओटावामध्ये एका शॉपिंग मॉलच्या परिसरात पन्नाशी उलटलेला एक इसम- स्कॉट मरे त्याचं नाव!- अगतिकपणे बसला होता. समोर एक फलक होता, ‘मी कॅन्सरग्रस्त आहे, मला उपचारासाठी मदत करा!’ पुढच्या दीडदोन तासांतच स्कॉटच्या वाडग्यात सुमारे शंभर डॉलर्स गोळा झाले होते. स्कॉटला मदत करणाऱ्यामध्ये ओटावा सिटिझन नावाच्या वर्तमानपत्राचा बातमीदारही होता. त्याने स्कॉटशी संवाद साधला. त्याची कहाणी समजून घेतली. चांगली सरकारी नोकरी करत असताना अचानक कधीतरी स्कॉटला कर्करोगाचे निदान झाले, आणि त्याचा आजाराशी संघर्ष सुरू झाला. कॅनडामध्ये रुग्णोपचाराचा खर्च सरकार करत असले तरी याच्याजवळची पुंजी संपतच आली होती. आता आपण जगलो नाही तर आपण पाळलेल्या मांजरीचे काय होणार, या चिंतेने स्कॉट अधिकच खंगत चालला. आपल्याजवळच्या पैशातून त्याने मांजरीसाठीचे खाद्य साठवून ठेवले. अशा आजारपणात तिचा सांभाळ करणे शक्य नाही असे लक्षात आल्यावर त्याने आपल्या मांजरीला एका देखभाल केंद्रात दाखल केले, आणि तिच्या जगण्यासाठीचा खर्च उभा करण्याच्या चिंतेने आजारी स्कॉटला पछाडले. मग त्याने भिक्षा मागण्याचा मार्ग पत्करला, आणि माणसांमधल्या चांगुलपणाचे झरे स्कॉटसाठी जिवंत झाले.
त्या दिवशी ओटावा सिटिझनच्या त्या बातमीदाराने स्कॉटची ही कथा आपल्या वर्तमानपत्रातून जगासमोर मांडली, आणि चांगुलपणाच्या ओझ्याखाली आजारी स्कॉट अक्षरशः दबून गेला. त्याच्यावर चहूबाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला, आणि चांगुलपणा जिवंत आहे, याची प्रचीती जगाला आली...
अशा अनेक कथा जगाच्या कानाकोपऱ्यातून कधी ना कधी ऐकायला, पाहायला मिळतात.
केवळ माणसाने माणसांसाठीच नव्हे, तर ज्या माणसांच्या विश्वासावर अन्य सजीव प्राणी आश्वस्त असतात, त्यांच्यासाठीदेखील माणसाच्या मनातील चांगुलपणाचे झरे कळत नकळत जिवंत होतात, आणि तो स्पर्श असंख्य मनांना सुखावून जातो...
अशा चांगुलपणामुळेच माणुसकीला अजूनही धुगधुगी आहे. म्हणूनच ती जगविण्यासाठी हालचाल केली पाहिजे.
भर पावसाळ्यात ओलाव्याने जडावलेल्या झाडांच्या फांद्या तुटून कोसळतात, झाडेही उन्मळून पडतात. त्यामुळे होणारी हानी हा निसर्गाचा दोष नाही. पण ही हानी टाळण्यासाठी, माणसांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महापालिकेकडून पावसाळयात झाडे अमानुषपणे छाटली जातात. अशा झाडांच्या आश्रयाने राहणाऱ्या पक्ष्यांची घरटी उध्वस्त होतात, आणि स्वत:स वाचवू न शकणारी असंख्य पिल्ले आकाशात भरारी मारण्याआधीच देवाघरी जातात...
माणसाच्या डोक्यावरील संकटाची टांगती तलवार दूर करताना, जगण्याच्या आशेने केवळ चिमुकल्या व केवळ परावलंबी मातापित्यांवर निर्भर असलेल्या पक्ष्यांच्या पिल्लांचा बळी घेतला जातो, हे त्यांच्या गावीही नसते.
पुण्याच्या भंगारवाल्याच्या बातमीतून, ओटाव्यातील स्कॉट मरेच्या बातमीतून, चांगुलपणा पणाला लावणाऱ्या माणुसकीचे जे दर्शन घडते, तसेच दर्शन अधूनमधून राजकारणाच्या बजबजपुरीतही घडून जाते, आणि खात्री पटते, चांगुलपणा जिवंत आहे!
दोनतीन वर्षांपूर्वी एका पावसाळ्यात मुंबई महापालिकेत त्याचे दर्शन असेच घडून गेले... वृक्षछाटणीचे काम शास्त्रोक्त पद्धतीनेच झाले पाहिजे व छाटणीआधी फांद्यांवरील घरटी तपासावीत अशी मागणी एका नगरसेवक महिलेने सभागृहाच्या बैठकीत केली. पक्ष्याचे घरटे नसेल तरच फांद्या छाटाव्यात असा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.
महापालिका प्रशासनाचा यावर काय प्रतिसाद होता ते त्या बातमीतून स्पष्ट झाले नाही, पण राजकारणाने लडबडलेल्या क्षेत्राच्या एका कोपऱ्यात कुठेतरी चांगुलपणा जिवंत आहे, याचा दिलासा या बातमीने नक्कीच दिला.
पक्ष्यांना वाचता आले असते, तर झाडाझाडावर, फांदीफांदीवर किलबिलाट करून त्यांनी त्या दिवशी नक्कीच आनंदोत्सव साजरा केला असता !...

Sunday, March 29, 2020

आठवावा देव...

मी फारसा श्रद्धाळू नाही. पण श्रद्धाळूंच्या भावनांचा प्रामाणिक आदर करतो. कारण स्वत:स नास्तिक, अश्रद्ध वगैरे अभिमानाने म्हणविणाऱ्यांच्या मनातदेखील कुठेतरी अशाच कसल्याशा भावनांचा ओला कोपरा अस्तित्वात असतो, आणि एखाद्या हळव्या क्षणी त्या कोपऱ्याचा कप्पा उघडतो, हे मी अनुभवलेले आहे. त्यामुळे नास्तिकतेवर श्रद्धा ठेवून त्यानुसार आचरण करणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदर आहे.
मध्यंतरी, जेव्हा अंधश्रद्धांच्या विरोधातील चळवळ काहीशी जोरात होती, तेव्हा, अशा प्रसंगात नेमकी कोणाची बाजू घ्यायची या संभ्रमात राजकीय नेते सापडले होते. कारण अशा प्रश्नांवर भूमिका घेताना लोकांच्या भावनांचा विचार करावाच लागतो. ती राजकीय अपरिहार्यता असते. म्हणूनच, ‘गणपती दूध पितो’ अशी आवई उठली तेव्हा, ‘आमचा गणपतीही दूध प्याला’ असे तत्परतेने सांगून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आवईलाही अधिकृत करून टाकले होते, तर तेव्हाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मात्र ही आवई झुरळासारखी झटकून टाकली होती. त्या त्या वेळी त्यांनी घेतलेल्या दोन्ही भूमिकांमागील वास्तव मात्र, ‘लोकभावना जपणे’ हेच होते.
अशाच काळात, आणखी एका ‘राज’कीय नेत्याने अंधश्रद्धेच्या विरोधात भूमिका घेतली. नवग्रहांचे अंगठे, गंडेदोरे, अंगारेधुपारे ही अंधश्रद्धा असून ती झुगारली पाहिजे असे सांगत या नेत्याने आपल्या बोटांतील ‘ग्रहांच्या’ अंगठ्या समुद्रात ‘विसर्जित’ केल्या होत्या. त्या काढून ‘फेकून’ दिल्या नव्हत्या, हे विशेष होते.
तर, श्रद्धा, आस्तिकता हा बऱ्याचदा ‘भूमिका’ म्हणून जाहीरपणे मांडण्याचा मुद्दा असल्याने, कल बघून त्या मांडणे असाच अनेकदा कल असतो, असे वारंवार दिसले आहे. लोकांना कोणती भूमिका पटेल याचा विचार करून तशी भूमिका घेणे अनेक राजकारणी नेते श्रेयस्कर मानू लागले तेव्हाच मंदिर-मस्जिदचे मुद्दे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले होते.
आता राजकारणाने काहीशी कलाटणी घेतली आहे. तेव्हा ज्यांना लोकांच्या श्रद्धेच्या राजकारणात ‘राम’ वाटत होता, त्यांना आता मात्र, तेव्हा ती चूकच होती असे वाटू लागले आहे. ‘ती कामगिरी आमची असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे’ असे उजळपणे सांगणाऱ्यांच्या अनुयायांना, ‘संकटकाळी देवांनी देवळातून पळ काढला’ अशी भाषा करणे ही गरज ठरू लागली.
त्यावर प्रतिक्रिया उमटल्या. समाजाच्या भावनांचा मुद्दा असल्याने, चावडीचावडीवर, पारावर, अंगणात, ओटीवर आणि, माजघरातही त्याचे पडसाद उमटत आहेत.
अशीच एक प्रतिक्रिया कानावर आली. बोलकी वाटली.
‘देव आठवावा अशी स्थिती ओढवलेली नाही ही देवाचीच कृपा!’

Sunday, March 22, 2020

दिवस... पक्ष्यांचा आणि माणसांचा!

सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजुबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या सांभाळत सायकल चालविताना रस्त्यावरच्या खड्ड्यात सायकल आदळून होणारा किटल्यांचा आवाजही उजाडल्याची वर्दीच देत नव्हता. बसगाड्यांचा धूरदेखील हवेत मिसळला नसल्याने जाग येण्यासाठी सवयीचा झालेला वासही अजून नाकात शिरला नव्हता ...
हे सगळं अचानक चाललंय काय, या शंकेनं जाणत्या वयस्कर पक्ष्यांनी घरट्यातूनच माना उंचावून बाहेर पाहिले, आणि त्यांना धक्का बसला. चक्क कधीचंच उजाडलं होतं... उन्हाची किरणं अंगावर येऊ पाहात होती, आणि दिनरहाटी सुरू झाल्याचा सांगावा देणाऱ्या सूर्याचा सोनेरी रंग फिका होऊन चकचकीत घासलेल्या चांदीच्या भांड्यासारखा मुलामा त्यावर चढू लागला होता...
मग एकाने हळूच चोच उघडून शीळ घातली, आणि तो दचकला... आपला आवाज एवढा मोठा आहे हे त्याला कधी माहीतच झालं नव्हतं. या महानगरात जन्माला आल्यापासून आपल्या आवाजाचा गोडवाही त्याने स्वत: कधी अनुभवलाच नव्हता. आसपासच्या गोंगाट, कोलाहलात आवाज कधी हरवून जायचा तेही त्याला कळत नसे. कधीकधी तर त्याला स्वत:चीच भीती वाटायची. आपण चोच उघडून, घशाच्या स्वरयंत्राच्या तारा ताणून ओरडतोय खरं, पण आवाज फुटतोय ना, या शंकेनं तो घाबराघुबराही व्हायचा...
आज ती शंका फिटली होती. आपल्याला आवाज आहे, तो मंजुळ आहे आणि त्याला सूरदेखील आहे हे जाणवल्याने त्याने देवाचे आभार मानले आणि पंख फडफडवत पुन्हा एक नवी मंजुळ शीळ घातली. लगेच तो दचकला. लांबवर कुणीतरी तशीच शीळ घातली होती... चार गल्ल्यांपलीकडच्या झाडावरून तो आवाज येत होता... त्याला तो स्पष्ट ऐकूही येत होता. त्याला कमालीचा आनंद झाला आणि पंखावर झुलत त्याने किलबिलाट सुरू केला. आसमंतात तो आवाज घुमू लागला आणि उठूउठू म्हणत घरट्यात आळसावलेल्या पक्ष्यांनी भराभरा उठून आपापले सूरही त्या आवाजात मिसळले. आसमंतभर फक्त पसरलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचा हा अनोखा आनंद अनुभवत महानगरीही मोहरून गेली...
दिवसाची सुरुवात अशी अनपेक्षितपणे अनोखी झाली होती.
नंतर सगळीकडे वेगवेगळ्या पक्ष्यांच्या सुरांचेच संगीत घुमत होते, आणि चक्क दूरवरून एकमेकांना प्रतिसाद देत ते आकाशातही विहरत होते.
सकाळपासूनच्या शांततेत उमटणाऱ्या किलबिलाटाच्या आवाजांमुळे अनेक पक्ष्यांना आपल्या भाऊबंदांची नवी ओळख झाली. आपण एवढे जवळ असूनही एवढ्या वर्षांत एकमेकांचा आवाजही ऐकू शकलो नाही या जाणिवेने पहिल्यांदाच सारे पक्षीगण खंतावले, आणि आज पहिलयांदाच अनुभवाला आलेला शांत दिवस आपला आहे असे समजून त्यांनी दिवसावर सुरांचा साज चढविण्यास सुरुवात केली.
पक्ष्यांचे विश्व आज असे महानगरात मोहरून गेले...
दिवस चढत गेला तरी महानगरीत बाकी माणसांच्या अस्तित्वाचा आवाज कुठेच नव्हता. पक्षी आनंदले... आज आपले ऐक्य साजरे करायचे ठरवून आकाशात थव्यांनी विहार करू लागले...
दुपार टळली... आता सूर्य मावळतीला जाणार हे लांवलेल्या सावल्यांनी पक्षांना खुणावण्यास सुरुवातही केली. पण दिवस साजरा करण्याचा उत्साह अजूनही ओसरला नव्हता!
.... अशातच अचानक दणदणाट सुरू झाला. भांडी वाजू लागली. घंटांचा गजर सुरू झाला. दूरवरचा शंखध्वनी शांतता चिरून आवकाशात घुमला... थाळ्या बडवल्या जाऊ लागल्या, आणि टाळ्यांचा गरजरही त्यात मिसळून गेला... कुठेकुठे फटाक्यांच्या माळा फुटू लागल्या तर कुठे डीजेचा दणदणाट घुमू लाला... अनपेक्षित झालेल्या या आवाजी हल्ल्याने थवे थिजले. आकाशात उडतानाच त्यांची चिमुकली ह्रदये धडधडू लागली, आणि दिशा बदलून सगळ्या भेदरलेल्या पंखांनी घरट्यांची वाट धरली... भराभर घरी पोहोचून सगळ्या पक्षिणींनी भीतीने घरट्यातल्या पिल्लांवर पंखांची पाखर धरली...
नेहमी तिन्हीसांजेला घरी परतणारे आपले आईबाप आज लवकर का परतले याच्या आश्चर्यात बुडालेली पिल्ले आईला बिलगली!
दूरवरून कुठून तरी, माणसाची घोषणा घुमली...
“गो, करोना गो!”
आणि माणसांचाच दिवस असल्याचे ओळखून पक्षी पुन्हा चिडीचूप झाले!!

Wednesday, March 18, 2020

आकाशफुले!

आकाशफुले!

एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातोकी त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहाते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतोआणि नव्या दिवसावरही तो जुनासुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... 
अगदी अलीकडचा तो एक दिवस असाचमनाच्या कप्प्यात जाऊन बसला.  एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्यात गेलो होतो. थोडा मोकळा वेळ मिळालाम्हणून सहज चक्कर मारण्यासाठी बाहेर पडलोआणि गल्लीतल्या गुलमोहोरांच्या सावलीतून पुढे जात असताना अचानक एका बंगल्याच्या पाटीवर नजर स्थिरावली.  मन क्षणभर मोहरलं... 'प्रख्यात कथाकार जी. ए. कुलकर्णी येथे राहात होते', असा फलक बंगल्याच्या दर्शनी भिंतीवर दिसलाआणि आम्ही थबकलो. असं काही दिसलंकी फोटो काढून ठेवावासा वाटतोच! तसंच झालं. मोबाईल काढलात्या बंगल्याचा फोटो काढलातेवढ्यात, 'पुणे ऐतिहासिक वास्तु स्मृतीम्हणून जतन केलेल्या त्या बंगल्याच्या खिडकीतून कुणीतरी डोकावताना दिसलं. मग मात्रआपण आगाऊपणा करतोय असं वाटू लागलंआणि तीनचार फोटो काढून झाल्यावरसभ्यपणानं विचारलं, 'फोटो काढले तर चालतील ना?' त्यांनी मंद हसून परवानगी दिलीआणि पुढच्या काही मिनिटांतच बंगल्याचा दरवाजा उघडून त्या बाहेर आल्या. आम्ही गेटबाहेररस्त्यावर होतो. मग त्याच म्हणाल्या, 'आत याआणि फोटो काढा'!... पुन्हा एक पर्वणी चालून आल्यासारखं वाटलं. आत शिरलो. नवे फोटो काढले. जुजबी बोलणंही झालंआणि त्यांना काय वाटलं माहीत नाहीत्यांनी आम्हाला अगत्यानं घरात बोलावलं. मी आणि वीणा- माझी बायकोदोघं आत गेलोआणि गप्पा सुरू झाल्या... आता एक खजिना -आठवणींचा खजिना- आपल्यासमोर उलगडणार हे अलगद लक्षात यायला लागलंआणिपूर्वी झपाटल्यागत वाचून काढलेल्या जीएंची मी मनातल्या मनात उजळणी करू लागलो... 
जी. ए. कुलकर्णी नावाचं एक गूढसाक्षात त्यांच्या भगिनीच्यानंदा पैठणकरांच्या मुखातून उलगडू लागलंआणि आम्ही कानात प्राण आणून ते साठवून ठेवू लागलो... जीएंच्या कथांनी तरुणाईच्या उंबरठ्यावरच वेड लावलं असल्यानेमधल्याएवढ्या वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदाजीएंच्या घरात बसूनत्यांच्या भगिनीकडून जीए नव्याने ऐकू लागलो. जीए एकलकोंडे होतेमाणसांपासून अलिप्त रहायचेफारसं बोलत नसतत्यांच्या जगण्यातही त्यांच्या कथांसारखं काहीसं गूढ होतंवगैरे काही समजुती, -त्या वाचनकाळापासूनच- मनात घर करून होत्या. आज त्यांचा उलगडा होणारयाची खात्री झालीआणि गप्पा रंगत चालल्या. जीएंवरच्या प्रेमापोटीकुतूहलापोटी आणि आस्थेने कुणीतरी घरी आलंय याचा आनंद नंदाताईंना लपविता येत नव्हता. 
मग उलगडू लागलेजीएंच्या स्वभावाचे आणि त्या भावंडांचे भावबंध... जीएंचे मोजके सुहृदत्यांच्या मैत्रीचे रेशीमधागेआणि त्या गूढअबोलएकलकोंड्या माणसाच्या जीवनातील काही नाजूक धाग्यांचीही उकल होत गेली... जीए नव्याने समजले... जीए माणसांमध्ये मिसळत नसत हे खरे असलेतरी ते माणूसघाणे नव्हते. त्यांचा स्वतःचा एक अस्सल असा रेशीमकोश होताआणि त्या कोशात काही मोजक्या माणसांनाच प्रवेश होता. त्यांच्याशी ते समरसून गप्पा मारतहास्यविनोद होतयाच बंगल्याच्या गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून सिगरेटचे झुरके मारत जीएंच्या गप्पांच्या मैफिली सजतहे वेगळे जीए नंदाताईंकडून समजत गेले...  
कधीकधीएखाद्या अज्ञात समजुतीचं ओझं मनावर दाटून राहिलेलं असतं. इतकं नकळतकी आपण त्या ओझ्याखाली दबलेलो असतोहेही आपल्याला माहीत नसतं. नंदाताईंशी गप्पा मारल्यानंतर एकदम हलकंमोकळं वाटू लागलंआणि मनावर दीर्घकाळापासून दाटलेलं एक ओझं उतरल्याची जाणीव झाली. आपल्या मनावर त्या समजुतीचं ओझं होतंहेही तेव्हाच कळून गेलं...
जीएंच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचे अनेक प्रसंग आपल्या 'प्रिय बाबुआण्णाया पुस्तकात नंदाताईंनी रेखाटले आहेत. ते प्रसंग नंदाताईंकडून ऐकतानाते पुस्तक जिवंत होत गेलंआणि जीए नावाचं एक गूढ अधिकृतरीत्या आपल्यासमोर उकलतंययाचा आनंदही वाटू लागला. नंदाताईंच्या आठवणींचे पदर हळुवारपणे आमच्यामुळे उलगडू लागलेआणि सासरी आल्यानंतरचे ते, पहिले दिवस, त्यांच्या डोळ्यासमोर तरळताना आम्हालाही स्पष्ट दिसू लागले. सासरी आल्यानंतर दर आठवड्याला पत्र पाठवायचंहा जीएंनी नंदाताईंना घालून दिलेला दंडकआणि त्यात कसूर झाल्यावर जीएंचा व्यक्त होणारा लटका रागसारं सारं त्यात आमच्या डोळ्यासमोर नंदाताईंच्या आवाजातून उमटत होतं... 
नंदाताई आणि जीए ही मावसभावंडं... प्रभावतीनंदा आणि जीए अशा त्या कुटुंबातल्या तीन पक्ष्यांचं एक अनवट घरटं त्या काळात इतक्या नाजुक विणीने बांधलं गेलं होतंकी त्यातला नंदा नावाचा हा छोटा पक्षी त्या धाग्याशी समरसून गेलायहे लक्षात येत होतं. धारवाडच्या घरात जीएंच्या मायेच्या सावलीत सरलेलं आणि आईवडिलांचं नसलेपण चुकूनही जाणवणार नाही अशा आपुलकीनं सजलेलं बालपण नंदाताईंच्या आवाजातही स्पष्ट उमटलं होतं... पुढे अखेरच्या दिवसांत जीए पुण्याला या नंदाताईंच्या बंगल्यात आलेआणि नंदा पैठणकरांचं घर पुन्हा बालपणातील मायेच्या शिडकाव्यानं सुगंधी झालं. 
याच बंगल्याच्या गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून जीएंच्या मोजक्या मित्रांसोबत गप्पांच्या मैफिली रंगत असत... याच घरात जीएंचे सुनिताबाईंसोबतचंग्रेससोबतचं अनोखंनाजूक मैत्रीचं नातं मोहोरलंअसं सांगताना नंदाताईंचा क्षणभर कातरलेला आवाज त्या नात्याच्या वेगळेपणाला हलकासा स्पर्श करून गेला. जीए आणि सुनिताबाईंची पत्रमैत्री मोहोरत असताना त्या दोघांनीही स्वतःभोवती आखून घेतलेली मर्यादेची लक्ष्मणरेषा आणि ती न ओलांडण्याचा निश्चयपूर्वक प्रयत्न करून परस्परांविषयी जपलेला आदर... 
...जिवाचे कान करून हे सारं ऐकलं नसतंतर नंदाताईंच्या आवाजातला आणि त्या नात्यातला नाजूक अलवारपणा मनाला जाणवलाच नसता...
बोलताबोलता नंदाताईंनी एक लहानशी पुस्तिका समोर धरलीआणि आमचे डोळे विस्फारले. जीएंनी रेखाटलेल्या चित्रांचा खजिना त्या छापील पुस्तकाच्या रूपाने समोर उभा होता. जीए नावाचं गूढ त्या एकाएका चित्रातून उलगडतंय असा नवाच भास उगीचच होऊ लागला. खडकाळलालसर लाटांनीस्वच्छझगझगीत आकाशापर्यंत वर चढत गेलेली टेकडीतिच्यावरची ती किरकोळ हिरवी खुरटलेली पानं मिरवणारीटेकडीपलीकडेआकाशापर्यंत गेलेली बाभळीची झाडं... 'काजळमाया'मधला एक 'ठिपकासमोर चित्रातून उलगडलाआणि 'चित्रमय जीएपाहताना मन हरखून गेलं... जीएंच्या मनात रुतून बसलेल्याबेळगावातल्या रेसकोर्सवरून परतताना आकाशात आभासलेल्या आकारातून उमटलेला पाण्याचा निळाशार तुकडाही एका चित्रातून व्यक्त झालेला पाहायला मिळाला... मग नंदाताईएकएका चित्रावर बोट ठेवून त्याचं जणू जिवंत रसग्रहण करू लागल्या आणि आम्ही कानातले प्राण डोळ्यात आणून ती चित्र न्याहाळू लागलो...
बोलताबोलता नंदाताईंनी एक पान उघडायला सांगितलं... जीएंनी रेखाटलेलं तीन पक्ष्यांचं सुंदर चित्र... 
मग नंदाताईंनाकिती बोलू असं झालं असावं हे आम्हाला जाणवलं... 
"बाबुअण्णापबाक्का- प्रभावती आणि मी"... त्या स्वतःच म्हणाल्या... 
"यातले जीए कोणते असतीलओळखा बरं"... नंदाताईंनी मिश्किलपणे मला विचारलंआणि मी क्षणभरच विचार करूनफांदीवर एकट्याचदोघा पक्ष्यांपासून काहीसा दूर बसलेल्या पक्ष्याच्या चित्रावर बोट ठेवलं. तेच जीए असणारहे ओळखणं अवघड नव्हतंच... 
मग जीए आणि नंदाताईंमधील त्या चित्रासंबंधीच्या संवादाची उजळणी झाली... 
"जीएंनी ते चित्र पूर्ण केलंआणि मी गंमतीनं त्याला म्हणालेअरेहे तर तू आपलंच चित्र काढलंयस.. तो म्हणालाकशावरून?... मी म्हटलंहे बघ नातू असा अगदी एका बाजूला तटस्थआमच्याकडे लक्ष आहे पण,आणि नाही पणअशा अवस्थेत बसलायस... मग त्यानं मला विचारलंतू कुठली यातली?... मी म्हणालेतूच सांग... त्यात एक छोटासा पक्षी आहे नाती मी... आणि मधली ती प्रभावती... मी तिच्याकडे सारखी भुणभुण लावते नातेच चाललंय... असं मी म्हणालेआणि तो खळखळून हसला...''
"ते चित्र काढताना ते त्याच्या मनात नव्हतं... पण मी हे सांगितलंआणि तो खुश झाला... अरे वा, म्हणजे तुला डोकं आहे म्हणायचं... तो म्हणाला..." 
हे सांगताना नंदाताईंच्या नजरेसमोर तो प्रसंग पुन्हा जिवंत झालायहे आम्ही अनुभवलं आणि त्यांच्या त्या आनंदात आम्हीही खळखळून सामील झालो...
"आमचे खूप छानसुंदर संवाद असायचे... भरपूर गप्पा व्हायच्या... घरातला जीए आणि बाहेरचा जीए ही दोन वेगळीच रूपं होती... बाहेरच्यांमध्ये तो फारसा मिसळत नसे... सभासन्मानसमारंभांपासून तो लांबच राहायचा... फाय फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालातेव्हा तो घ्यायला जायचं की नाही यावरून त्याची थोडी कुरबुरच सुरू होती. कशाला जायचंअसंच म्हणत होता... पण मीआग्रह केला. तुला नाहीतर तुझ्या निमित्ताने आम्हाला तरी मिरवता येईलतुझ्या बहिणी म्हणून... तू हवंतर गप्प बस... आम्ही खूप आग्रह केला...."
...जीएंच्या कथांची पुस्तकं झाली त्याचं नंदाताई अगदी निगुतीनं कौतुक सांगतात.... जीएंच्या कथा दिवाळी अंकात वगैरे प्रसिद्ध व्हायच्या... हातकणंगलेकरांनी त्या वाचल्याआणि भटकळांना पत्र लिहिलं, "सोन्याचं अंडं देणारी एक कोंबडी मी तुमच्याकडे पाठवतोयतू ती पाहा" 
"मग भटकळांनी त्याचा कथासंग्रह काढला. नाहीतरबाबुआण्णा स्वतःहून कथा घेऊन प्रकाशकाकडे गेलाच नसता... ते त्याच्या स्वभावातच नव्हतं..."
कौतुकानंअपूर्वाईच्या आणि आपलेपणाच्या आनंदानं ओथंबलेले नंदाताईंचे शब्द मी त्या दिवशी कानात जसेच्या तसेअक्षरशः, 'टिपूनघेतले!
जीएंची ही सारी मूळ चित्रं आज नंदाताईंकडे आहेत. त्याच्यावरून तयार केलेल्या चित्रांचा एक आल्बम बेळगावातल्या लोकमान्य वाचनालयातील जीए दालनात आहे... 
जीए केवळ कथाकारसाहित्यिकचित्रकारच नव्हते. त्यांना शिल्पकलेचीही जाण होती. एकदा चालताचालता त्यांना रस्त्यावर एका गुलाबी रंगाचा दगड सापडला. त्यांनी तो घरी आणलाआणि जीएंचा हात त्यावरून फिरला... एक सुंदर बुद्धमूर्ती साकारली... एका दगडातून घोडा साकारला. धारवाडहून पुण्यास येताना ट्रकमधील सामानातील ती बुद्धमूर्ती काहीशी डॅमेज झाली. जीएंना खूप रुखरुख लागली. 
"पुण्यास गेल्यावर नव्याने नवी मूर्ती घडवून देईन असे तो म्हणालापण इकडे आल्यावर ते नाहीच जमलं...''  
नंदाताईंचा स्वर काहीसा कातर झाला...
त्या तासभराच्या गप्पांमध्ये नंदाताईंनी आमच्यासमोर त्यांचं 'प्रिय बाबुआण्णाहे पुस्तक आणि त्यातलाही काही अप्रकाशित भाग समरसून जणू वाचून दाखविला होता... 
गप्पांमधून उलगडणारे जीए मनात साठवत आम्ही नंदाताईंचे आभार मानून निघालो.
बंगल्याबाहेर पडल्यावर रस्त्यावरून पुन्हा मागे वळून पाहिलं.
गच्चीवरचा झोपाळा झुलतोयअसा उगीचच भास झाला. 
वाऱ्यासोबत कुठूनसा आलेला सिगरेटचा गंधही त्याच वेळी नाकात परमळून गेला...
जीए नावाचं गूढ थोडसं उकलल्याच्या आनंदाचा गंध त्यात मिसळून छातीभर श्वास घेत आम्ही परतलो...
त्या दिवसानं मनाच्या कोपऱ्यात आता स्वतःच आपला मखमली कप्पा तयार केला आहे !.. 


Sunday, March 1, 2020

शुभ सकाळ!

एक सुंदर सकाळ पुन्हा उगवल्याच्या आनंदाने असंख्य पक्ष्यांचा मंजुळ प्रभातराग वातावरणाला संगीतसाज चढवतो आहे. निरभ्र, निळ्याशार आभाळाच्या क्षितिजाशेजारच्या टोकावर धुक्याच्या पांढुरक्या रेघेने सीमारेख आखली आहे. पूर्वेकडचं तांबुडकं हळुहळू रुपेरी झाक घेऊ लागलंय, आणि डोंगरांच्या निळ्या रांगा आपल्या मूळ रंगानिशी जाग्या होऊ लागल्या आहेत...
ही वेळ मोठी वेगळीच असते. खरं तर ही जीवनासाठी घेऊन येणारा नवा दिवस साजरा करण्याची वेळ! पण त्या साजरेपणासाठी वेळ काढण्याएवढा निवांतपणा सगळ्यांकडे नसतो. आपण ज्याला ‘जागं होणं’ म्हणतो, ज्या किलबिलाटाला संगीत वगैरे म्हणतो, ते सारं, खरं म्हणजे नव्या दिवसासाठी जगण्याच्या धडपडीचीच एक सुरुवात असते. ती जाणीव मनाला शिवू न देता बाजूला ठेवून आपण त्याकडे पाहातो म्हणून तीदेखील आपल्याला सुरम्य वगैरे वाटत असते.
... म्हणूनच, जगण्यासाठीचं ‘जीवन’ शोधण्यासाठी अज्ञाताच्या भरंवशावर पिल्लांना फांदीवरच्या घरट्यात सोडून आकाशात भरारी घेणारी बगळ्यांची रांग पाहून आपल्याला आनंद होतो, कविताही सुचतात... पण या रांगेतल्या प्रत्येकाच्याच मनात, लवकरात लवकर अन्न शोधून पिल्लांच्या चोचीत घास भरविण्यासाठी घरी परतण्याचीच आस असते. झाडांच्या पानापानाआड किलबिलाट करून, मंजुळ स्वरात गाण्याचे आलाप आळवणारी चिमणी पाखरं, काही सदान कदा केवळ प्रणयगीतेच गात बागडत नसतात... या सुरांनी जेव्हा आपल्या कानांना सुखाची आणि आनंदाची अनुभूती येते, तेव्हा त्यांच्या नजरा आणि चोची मात्र, जगण्याचं आणि पिल्लांना जगविण्याचं साधन असलेल्या अन्नाच्या शोधातच भिरभिरत असतात!
... आत्ता, क्षणापूर्वी, आभाळातून, अशीच एक बगळ्यांची माळ फुलली, बघता बघता क्षितिजावरच्या त्या पांढुरक्या रेषेत विरघळून गेली.
तिथे बहुधा, पाणवठा असावा...
आता ती माळ जमिनीवर मात्र अस्ताव्यस्त विसावेल. बकध्यान सुरू होईल...
... आणि पाण्यातले मासे, भयभरल्या नजरांनी पाण्यापलीकडे पाहात, स्वत:स वाचविण्याची पळापळ सुरू करतील!
उजाडलेल्या नव्या दिवसाची संध्याकाळ पहावयास मिळेल की नाही या भयाने!...
सकाळ ही अशीच असते!
नेहमीच!
कुणी जगण्याचा आनंद साजरा करू लागतो, तेव्हा दुसरा कुणी जेमतेम जगण्याची धडपड सुरू करत असतो!
तरीही आपण मात्र, एकमेकांना म्हणतो, ‘शुभ सकाळ’!
कारण आपण नेहमीच पहिल्या वर्गात स्वत:ला पाहात असतो!
जगण्याचा आनंद साजरा करणाऱ्या वर्गात!...