Saturday, May 9, 2020

‘मातृदिन’ आणि ग्रेस’चे स्मरण...



एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची...
अशा समाधीस्थितीत बराच वेळ जायचा. सूर्य डोंगराआड कलू लागला की पक्षी भानावर यायचे आणि नाखुशीनेच घरट्याची वाट धरायचे. वाराही मलूल होऊन शांत डुलकी घ्यायचा, आणि कधीतरी हा वादक भानावर यायचा... वाद्य नीट गुंडाळून उठून वाट धरायचा.
... बाजूच्याच एका झाडाखाली एक कोवळं कोकरू बसलेलं त्याला दिसायचं. त्या वाद्याचा ताल कानात साठवत एकाग्र बसलेलं... तो निघाला की जाताना प्रेमानं त्या गोंडस कोकराच्या पाठीवरून हात फिरवायचा, आणि ते कोकरू त्याच्याकडे पाहायचं. डबडबलेल्या डोळ्यांनी!!
हे कोकरू त्याच्यासाठी कोडं होऊ लागलं. रोज न चुकतां झाडाखाली बसून त्या वाद्यातून निघणारा ताल एकाग्रतेने ऐकताना त्याचे डोळे पाण्यानी भरतात, ते आतून गदगदत असतं, हे त्या वादकाला जाणवू लागलं.
आपल्या वादनानं अवघं आसपास आनंदून मोहरत असताना हे कोकरू मात्र कळवळून आतल्या आत आक्रोश करते, या जाणीवेनं वादक अस्वस्थ होऊ लागला...
त्या संध्याकाळीही तो निघाला, नेहमीप्रमाणे कोकराला गोंजारलं, आणि बेचैन सुरात त्यानं त्या कोकराला विचारले, 'माझ्या वाद्याच्या तालाने सारी सृष्टी मोहरत असताना, तू मात्र दु:खानं झुरत असतोस... असं का?'
कोकरानं केविलवाण्या ओल्या नजरेनं वादकाकडे पाहिलं. एक हुंदका घशातूनच मागे परतवला, आणि लांबवर कुठेतरी नजर लावून ते बोलू लागलं...
'तुमची बोटं ज्या वाद्यातून स्वर्गीय सूर उमटवतात, त्या वाद्याचं कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही वाजवू लागता तेव्हा उमटणाऱ्या सुरातून मला माझ्या आईचा आवाज एेकू येतो, ती माझ्याशी बोलू लागते, आणि मी आईच्या आठवणीत बुडून तिच्या सहवासाचं सुख शोधू लागतो...'
वादक त्या कोकराच्या प्रत्येक शब्दागणिक अधिकच बेचैन होत होता.
त्यानं पुन्हा ते वाद्य उघडलं, थाप मारली, आणि ताल धरला.
आता फक्त त्या पिल्लासाठी आईचे बोल उमटत होते!!
दोघंही भान विसरले होते.
अचानक वारा वाहू लागला, ढग दाटले आणि अवघं आकाश बरसू लागलं!!

...आई या शब्दातच जादू असते!!

ही कथा दूरदर्शनच्या एका जुन्या मैफिलीत संवादकाने ऐकवली, अन् मला ग्रेस आठवला!
तेही एक कोडंच!
कधी सहज सुटणारं, कधी कधीच न आकळणारं!!

मग ग्रेसच्या लेखणीतून उमटलेले ते शब्दही आठवले, अन् आश्चर्य म्हणजे, त्या छोट्या पडद्यावर त्याच शब्दांना सुरांना साज चढत गेला...

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता !

....गाणं संपलं, आणि मला पुढचं, एक अव्यक्त कडवंही आठवलं..

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

... बाहेर पाऊस रिमझिम निनादतच होता!
_________________________________

Friday, May 8, 2020

कुपोषित आरोग्यसेवा!


नर्स हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे, हे या साथीने आज दाखवून दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्याा अहवालानुसार, आज जगभरात नर्सेसची संख्या केवळ दोन कोटी ८० लाख एवढी आहे. आणि प्रत्यक्षात  ६० लाख नर्सेसचा तुटवडा आहे. येत्या दशकभरात यापैकी दहा टक्के नर्सेस सेवानिवृत्त होतील, तेव्हा ही तफावत अधिकच जाणवेल. कारण नव्याने या क्षेत्रात दाखल होणाऱ्यांची संख्या खूपच संथ आहे.
विशेष म्हणजे, नर्सिंग हे क्षेत्र महिलांसाठीच असल्याचा जागतिक समज आहे. आज जगभरात या क्षेत्रात ९० टक्के महिलाच आहेत.भारतातही जेमतेम १२ टक्के पुरुष या व्यवसायात आहेत.
या पार्श्वभूमीवर, भारतातील या क्षेत्राची स्थिती काळजी वाटावी अशीच दिसते. १३६ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील परिचारिकांची संख्या केवळ २३ लाख ३६ हजार २०० एवढीच आहे. याचा अर्थ, प्रत्येक दहा हजार लोकसंख्येमागे, १७.३ एवढीच परिचारिकांची संख्या आहे.दर वर्षी देशात सुमारे ३ लाख २३ हजार परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात, आणि दहा टक्के परिचारिका निवृत्त होऊन व्यवसायाबाहेर जातात. या हिशेबाने, येत्या दहा वर्षांत भारतात परिचारिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेम ३० लाखांपर्यंत वाढलेली असेल, असा अंदाज आहे.
भारताच्या आरोग्य क्षेत्राचे एकूण आकारमान लोकसंख्येच्या प्रमाणात जेमतेमच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार आरोग्य क्षेत्रात परिचारिकांची संख्या या क्षेत्राच्या एकूण पसाऱ्यापैकी ४७ टक्के आहे, तर वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या जेमतेम २३.३० टक्के आहे. दंतवैद्यकांचे प्रमाण तर केवळ साडेपाच टक्के एवढेच आहे, आणि मिडवाईफ नावाचा प्रकार शोधावाच लागेल अशी स्थिती आहे.
करोना व्हायरसच्या फैलावामुळे संपूर्ण जगासमोरील एक मोठी समस्या अधोरेखित झाली आहे. यापुढे ही समस्या दुर्लक्षित राहिली, तर करोनाव्हायरसने मानवजातीला इशारा देऊनही आपण शहाणपण शिकलो नाही, असे होईल. जगभरातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे ही यापुढील काळाची गरज राहील.

नया है वह!

करोनाचे संकट अभूतपूर्व आहे. आजवरच्या पठडीबाज आपत्ती व्यवस्थापन धोरणानुसार आखणी करून यावर मात करणे शक्य नाही. त्यासाठी बदलत्या परिस्थितीनुसार धोरणे बदलावी लागतात. काल घेतलेला एखादा निर्णय एखाद्या ठिकाणी अधिक कठोर करावा लागतो, एखाद्या ठिकाणी शिथील करावा लागतो, तर एखाद्या ठिकाणी रद्द करावा लागतो. अशा वेळी स्थानिक परिस्थिती व कार्यवाही करणाऱ्या यंत्रणांच्या आकलनशक्तीनुसार कमीजास्त बदल होतात. त्याला धरसोड वृत्ती वगैरे म्हणणाऱ्याचा शोध लागलाच, तर सरकारने ताबडतोब त्याला ताब्यात घेऊन स्थायी स्वरूपाची निर्दोष आपत्ती निवारण योजना त्याच्याकडून आखून घ्यावी व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारीही -अधिकार नव्हे, जबाबदारी!- त्याच्यावरच सोपवावी.
आपणा सर्वांना एव्हाना हे माहीत झाले आहेच. की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पक्षसंघटना चालविण्याचा एकहाती अनुभव असला तरी प्रशासनाचा काहीही अनुभव नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांची ‘नया है वह’ अवस्था नेमकी जोखली असून, सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावयाची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार मात्र स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द केल्याने स्थानिक पातळीवर स्थानिक यंत्रणा हेच त्या त्या ठिकाणी सरकार म्हणून काम पाहात आहे. शिवाय, सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणीचे निर्णय घेण्याबाबतचे अधिकार सर्वांनाच समान रीतीने दिले असल्याने प्रशासनातील समानतेचा एक वेगळा प्रयत्न सरकार करू पाहात आहे. म्हणजे, समजा, एखादा निर्णय लागू करावयाचा असे समजून महसूल विभागाने तसा फतवा काढला तर पोलीसांना म्हणजे गृहखात्यास तो अयोग्य वाटून स्थानिक पातळीवर तो रद्द करण्याचे अधिकार वापरावेसे त्यांना वाटू लागते. आता यामध्ये पक्षीय राजकारण वगैरे असल्याचा वास विरोधकाना आलाच, तर ते राजकारण करताहेत हे नक्की समजावे. कारण, महसूल खाते काॅंगिरेसकडे तर गृह खाते राष्ट्रवादीकडे असल्याने शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले अंमलबजावणीचे अधिकार आपण गमावतां नयेत असे दोघांनाही वाटत असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ शकतो. मात्र, अशा कठीण काळात आम्ही राजकारण करणार नाही असे कालच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या व्हिडिओ काॅन्फरन्समधे सांगितले असल्याने बहुधा विरोधक तसे बोलण्याची शक्यता कमी आहे. कालच्या बैठकीस व्हिडिओ काॅन्फरन्स असे का म्हणायचे असा प्रश्नही काहींच्या मनात येऊ शकतो. तर त्याचे रोखठोक उत्तर असे, की विरोधक जरी जातीने मंत्रालयातच हजर झाले असले तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी स्वत:च्या घरातूनच व्हिडिओ संवाद साधला होता. पण तो मुद्दा महत्वाचा नाही. मुख्यमंत्री राज्यातील करोनास्थितीचा आढावा सातत्याने घरूनच घेत असताना, प्रशासकीय यंत्रणांनी दिलेली माहिती व बातम्या, टीव्ही चॅनेल वगैरे हेच त्यांचे माहितीचे स्रोत असल्याने, प्रशासकीय यंत्रणा जी माहिती देणार त्याचाच प्रभाव त्यांच्या निर्णयावर होणार हे सहाजिकच आहे. त्यामुळे, प्रशासनातील ढिसाळपणा किंवा बेबंदशाही वगैरे असेलच, तर त्याचे खापरमुख्यमंत्र्यांवर फोडता येणार नाही. संकटाचे गांभीर्य प्रशासनाने अधिक ओळखले पाहिजे. घरातून माहिती घेऊन त्यानुसार घरात राहूनच त्यावर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा कितीही प्रशासनकुशल नेत्याच्या निर्णयक्षमतेवर मर्यादा येऊ शकतात.
म्हणून, महाराष्ट्रात तरोनास्थिती हाताळण्यात अपयश येत असल्याची जर कोणाची भावना असेलच, तर त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर किंवा शासनावर नव्हे, प्रशासनावरच फोडावे लागेल. पण ही राजकारण करण्याची वेळ नाही, याचे भान ठेवावेच लागेल.
विरोधकांनी काल तसा शब्द मुख्यमंत्र्यांना दिला आहे, हे त्यांच्या तंबूतील सर्वांनी लक्षात ठेवायला हवे !!

Thursday, May 7, 2020

मोकळ्या वेळाचा समृद्ध पसारा...

आपण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हा काय करत असतो? सध्या करोनामुळे लॉकडाऊन अवस्थेत असलेल्या प्रत्येकासच, आपण सध्या काहीच करत नाही असेच वाटत असले पाहिजे. पण ते तसे नसते. आपण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हाही आपण काहीतरी करतच असतो. ते म्हणजे, विचार... उलट, जेव्हा आपण काहीतरी करत असतो, तेव्हा फक्त तेच काहीतरी करत असतो. पण जेव्हा काहीच करत नसतो, तेव्हा भरपूर काहीतरी करत असतो. काहीच न करण्याच्या काळात एकाच वेळी आपण असंख्य विचार करत असतो. विचारांचे जंजाळ डोक्यात असते. यामध्ये भूतकाळ असतो, वर्तमानकाळ असतो, आणि भविष्यकाळही असतो. त्यात आपण असतो, आसपासची माणसं असतात, प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, नद्या, नाले, डोंगर असतात. अशा असंख्य विचारांचा गुंता झाला, की काहीच न करण्याचा वेळ इतका व्यग्र होऊन जातो, की तो सोडवताना त्या सगळ्यातूनच काही ना काही नव्याने दिसायला लागतं. एवढ्या काळापासून हे सारं आपल्या आसपास आहे, तरी याआधी कधीच कसं दिसलं नाही, असं वाटायला लागतं. आपण अचंबित होतो, आणि काहीच न करण्याच्या काळातील विचार करण्याच्या काळामुळे आपल्याला नवं काहीतरी गवसल्याचा आनंदही मिळून जातो.
अलीकडे, बऱ्याच जणांशी फोनवर वगैरे बोलताना, एक गोष्ट समायिक असते. ती म्हणजे, जवळपास सगळ्यांनाच, पहाटे जाग येण्यासाठी पहिल्यासारखा मोबाईलचा अलार्म लावावा लागत नाही. एकच ठरावीक पक्षी, तुमच्या खिडकीच्या अगदी जवळ, अगदी ठरलेल्या वेळी अशी काही मंजुळ शीळ वाजवू लागतो, की त्या जादूई आवाजाने आपल्याला जाग येते. ती नुसती जाग नसते, तर प्रसन्न सकाळ उजाडल्याच्या अनुभवासोबत आलेली ती जाग असते. पूर्वी, जेव्हा अलार्म लावून सकाळी उठावे लागायचे, तेव्हा तो आवाज कानाशी वाडू लागला, की अर्धवट झोपेतही मूड जायचा. साखरझोपेचं खोबरं झालं, असं वाटून वैताग यायचा, आणि तशाच अवस्थेत चाचपडत अलार्म बंद करून लोळत पडावेसे वाटायचे. आता, त्या अलार्मच्या वेळेआधीच बाहेर पक्ष्यांची किलबिल सुरू होते, त्या आवाजने जाग येते, तेव्हा अलार्ममुळे वाटणाऱ्या कटकटीचा लवलेशही मनावर नसतो.
असे झाले, की दिवस नक्की प्रसन्न जातो, आणि काहीच न करण्याच्या वेळेत काहीतरी करण्यासाठी विचारांचे एक मोठ्ठे गाठोडेच आपण अगदी आनंदाने खांद्यावर घेतो.
अशाच, काहीच न करण्याच्या काळात, काही सन्मित्रांच्या फेसबुकवर फेरफटका मारण्याचा मस्त विरंगुळा मला सापडला. तेथूनच, त्यांच्या ब्लॉग्जच्या लिंक सापडल्या, आणि काहीच न करण्याच्या वेळात काहीतरी भरघोस वाचता येईल, असा खजिना सापडल्याचा आनंद झाला. मित्रवर्य प्रवीण बर्दापूरकर, समीर गायकवाड, रमेश झवंर, अशा अनेक दिग्गजांच्या ब्लॉगवर एक तरी चक्कर मारली नाही, तर काहीच न करण्यातला महत्वाचा वेळ वाया गेला असे मला वाटू लागले, आणि ब्लॉगवाचन हा जुना छंद जिवंत झाला.
त्यात मला आठवलं, आपणही एक ब्लॉग जवळपास बारातेरा वर्षाँपासून चालवतच आहोत. मग मी तो जिवंत केला. काहीच न करण्याच्या या कालात आपल्या ब्लॉगला खतपाणी घालायचं ठरवलं, आणि बघता बघता माझा, zulelal.blogspot.com हा ब्लॉग जिवंतच नव्हे, ताजातवानाही झाला.
तुम्हाला देखील, काहीच न करण्याच्या काळात काहीतरी करावेसे वाटत असेल, तर तुमचा जुना ब्लॉग जिवंत करा, नाहीतर नवा ब्लॉग सुरू करा.
त्यात नक्की मजा आहे.

हीच ती वेळ!

महाराष्ट्रात भाजपने सरकार स्थापन केले असते तर आजचे करोनाचे आव्हान त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांच्या आघाडी सरकारएवढ्या कार्यक्षमतेने पेलले असते का?
आज महाराष्ट्र हे कोरोनाच्या फैलावाबाबत देशात एक नंबरचे राज्य ठरले आहे. फडणवीस सरकारची निवडणुकीआधीची ती, ‘सर्वात पुढे आहे, महाराष्ट्र माझा’ ही घोषणा आज आठवावी अशी ही स्थिती! पण असं झालंय, की, ठाकरे सरकार ज्या धैर्याने जनतेशी संवाद साधते, धीर देते, कौतुकाची थाप योद्ध्यांच्या पाठीवर मारते, परप्रांतीयांच्या मदतीसाठी धावून जाते अशा विविध कारणांमुळे दिवसेंदिवस सरकारची लोकप्रियता वाढतच असल्याने, विरोधी पक्षांची जबाबदारी म्हणून विचारावयाचा, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ हा प्रश्न उच्चारणेही फडणवीसांच्या विरोधी पक्षास अवघड झाले आहे.
आपले भविष्य हे राज्याच्या भविष्याशी बांधले गेलेले असते. म्हणजे, एखाद्या कठीण प्रसंगात, राज्याचे जे काही होईल, तेच आपलेही होणार हे नक्की आहे!
आपले सुदैव असे, की जनतेचा अपार विश्वास असलेले सरकार सत्तेवर आहे, आणि ते आपले भविष्य निश्चितच घडवेल याची जनतेला खात्री आहे.
योगायोग म्हणा, किंवा महाराष्ट्राची पुण्याई म्हणा, कठीण प्रसंगात जसे असायला हवे तसेच सरकार महाराष्ट्रास लाभलेले असल्याने, सरकारच्या शिल्पकारांस सलाम केलाच पाहिजे!
हीच ती वेळ आहे!!

Wednesday, May 6, 2020

एक दिलासादायक बातमी-


तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेला इस्राईलने कोरोना विषाणूवर लस बनविल्याचा दावा केला आहे. इस्राईलचे संरक्षणमंत्री नैफताली बेन्नेट यांनी हा दावा केला आहे. इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चने (आयआयबीआर) कोरोना विषाणूवर अंटीबॉडी विकसित करण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती त्यांनी अलीकडेच दिली.
इस्राईलचे संरक्षणमंत्री नैफताली बेन्नेट यांनी सोमवारी दावा केला की, आयआयबीआर इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्राईलने कोरोना विषाणूची लस विकसित केली आहे. संस्थेने अंटीबॉडी बनवली आहे. आता वॅक्सीनच्या विकासाची पायरी पुर्ण झाली आहे. आता त्याचे पेटंट आणि मोठ्या प्रमाणात निर्मितीची तयारी सुरू झाली आहे.
आयआयबीआर ही इस्रायलमधील अत्यंत गुप्त संस्था आहे. बाहेरील जगाला येथे केलेल्या प्रयोगांविषयी फारशी माहिती मिळत नाही. पण नेस जिओना भागात असलेल्या या प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर नैफताली बेन्नेट यांनी जगभरातील लोकांना लस शोधल्याची बातमी दिली. टाइम्स ऑफ इस्राईलच्या वेबसाईटसह अनेक माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
नैफताली बेन्नेट यांनी सांगितले की, ही अँटीबॉडी मोनोक्‍लोनल पद्धतीने कोरोना विषाणूवर हल्ला करते. त्यामुळे कोरोनाचा विषाणू शरीराच्या इतर भागांमध्ये किंवा दुसर्‍या व्यक्तींमध्ये पसरत नाही.
इस्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. या लॅबने आता ही लस पेटंट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानंतर हे मोठ्या प्रमाणात तयार केले जाईल जेणेकरुन जगभरातील लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
बेन्नेट यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनासाठी आम्ही जगभरातील कंपन्यांशी बोलू. या लसीची मानवी चाचणी झाली आहे की नाही याबाबत बेन्नेट यांनी माहिती दिली नाही.

Tuesday, May 5, 2020

करोनोत्तर काळ!

सुमारे पस्तीस वर्षांच्या ॲान फील्ड पत्रकारितेनंतर महिनाभरापूर्वी, मार्चमध्ये मी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर ‘किमान गरजे’पुरते हातपाय हलवून थोडी कमाई करावी व विचाराची सवय लागलेल्या मेंदूला गंज येऊ नये यासाठी मुक्त पत्रकारिता, लेखन, संपादन, व प्रकाशन क्षेत्रास पूरक असे काही करावे अशी ठोस आखणीही केली. नोकरीतून मुक्त होऊन काही दिवस मोकळा श्वास घ्यावा, बरेच दिवस रखडलेला प्रवास करावा, नव्या नियोजनाच्या दृष्टीने भेटीगाठी घ्याव्यात वगैरे विचार सुरू असतानाच लाॅकडाऊनमुळे घरात जखडून घ्यावे लागले, आणि सारी मनोरथे मनातच राहिली.
वर्किंग फ्राॅम होम ही संकल्पना करोनोत्तर काळात जगभर राबविली जाईल असे स्पष्ट दिसू लागले आहे. याचे फायदे आहेत असेही बोलले जातेय. ते नक्कीच आहेत. मुख्य म्हणजे, काम करणाऱ्या- विशेषत: बौद्धिक काम करणाऱ्यालाच हे फायदे मिळणार आहेत. प्रवासाकरिता वाया जाणारा वेळ व एनर्जी वाचवून अधिक क्षमतेने काम करण्यासाठी वापरता येईल, घराबाहेर वावरण्यामुळे होणारे, विशेषत: कपडे, हाॅटेलिंग, रिक्षा-टॅक्सी वगैरेचे खर्च वाचून गरजा कमी होणार असल्याने बचत वाढेल वगैरे महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा होत आहे. डिस्टन्सिंग हे जगण्याचे सूत्र राहणार असल्याने माणसामाणसांत थेट-प्रत्यक्ष संपर्क न राहताही व्हर्चुअल भेटीगाठीतून कामांची आखणी, विभागणी करता येईल असाही एक फायदा सांगितला जातो. थोडक्यात, आजवरची जगरहाटी किमान वेळात पूर्णपणे उलटी फिरवावी लागेल. ते संपूर्ण साध्य होईल तेव्हा हे फायदे थोडेफार पदरात पडण्यास सुरुवात होईल.
हा झाला बुद्धिजीवी वर्गाच्या भविष्यातील कार्यसंस्कृतीचा ढोबळ विचार. हे चित्र अगदीच निराशादायी नाही असे वाटून या वर्गाची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी काहीशी सकारात्मक राहील यात शंका नाही. याचे दुसरे कारण असे असेल, की, याच नवकार्यसंस्कृतीमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांचा विचार करण्याची सध्याच्या नकारात्मक काळात कोणाचीच तयारी नाही. ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’ हे आजपर्यंतच्या हजारो वर्षांचे वास्तव एका फटकाऱ्यात पुसून टाकावे लागेल अशी ही भविष्यातील स्थिती पचविणे मानसिकदृष्ट्या माणसाला किती सोपे राहील याचा विचार सध्या करणे योग्य नाही, त्यामुळे सध्या फायद्यांची चर्चा सहाजिक आहे. पण, बुद्धिजीवी वर्गापलीकडच्या, श्रमजीवी वर्गास नवसंस्कृतीच्या दडपणापोटी किंवा अपरिहार्यतेपोटी घरातच बंद करून घेणे परवडणारेही नाही, आणि ते शक्यही नाही. ‘हातावरचे पोट’ हीदेखील समाजाचीच कार्यसंस्कृती आहे. करोनोत्तर काळात, संचार आणि परस्परांतील थेट संपर्क व संवादावर कमालीचे निर्बंध येतील, तर श्रमजीवी वर्गाचे भविष्य काय असेल याचा विचार करून आखणीपूर्वक या वर्गाचे जगणे आश्वस्त करणे हे भीषण आव्हान असेल. बुद्धीजीवी वर्गाकडील संपत्तीचे व्यवहारात चलनवलन होते, त्यावर अर्थव्यवस्थेची गती बऱ्याचशा प्रमाणात स्थिर राहते. घरात बसून काम करणाऱ्या या वर्गाच्या गरजा मर्यादित झाल्या, तर मुख्यत्वे त्यांच्यासाठी निर्माण कराव्या सुविधांच्या गरजाही कमी होतील, आणि विकास म्हणून आज ज्या गोष्टींचे नियोजन केले जाते त्यांना प्रचंड प्रमाणात खीळ बसेल. उदाहरणार्थ, कोणत्याही कार्यालयांकरिता विशिष्ट परिसरांतील ऐसपैस जागांची गरज मर्यादित होईल. त्यांचे इंटिरीयर, कामाच्या सुविधांवर होणारा खर्च, आदी बाबी ‘गरजा’ राहणार नाहीत, आणि ‘मोक्याच्या जागा’ची किंमत कवडीमोल होऊन जाईल. कोट्यवधींची गुंतवणूक करोनोत्तर काळात केवळ निरुपयोगी होऊ शकेल. सहाजिकच, या गुंतवणुकीच्या अनुषंगाने हातावर पोट असणाऱ्या ज्या वर्गास रोजगार मिळत असतो, त्यालाच फटका बसेल. असंघटित श्रमिकासाठी तो वाईट काळ असेल.
पायाभूत सुविधांमध्ये दिवसागणिक भर टाकूनही त्या अपुऱ्या पडाव्यात अशी कालपर्यंतची स्थिती होती. मनोरंजन, प्रवास, पर्यटन, अशा क्षेत्रांशी संबंधित सुविधांचे व त्यावर थेट किंवा अप्रत्यक्ष  अवलंबून असणाऱ्यांचे भविष्य काय असेल याचाही विचार करावा लागेलच!
केवळ सेवाक्षेत्रे तग धरतील तर तेवढे पुरेसे नाही, असा याचा अर्थ आहे. करोनोत्तर काळातील मन:स्थिती हाही एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे माणसाचे जगणे आनंदी व समाधानी होत असते. भविष्यातील नवी जीवनशैली तो आनंद वा ते समाधान देण्यास व पर्यायाने जगण्यातील रस कायम ठेवण्यास पुरेशी पडणार नसेल, तर त्यासाठीच्या नव्या पर्यायांचाही व त्यातून निर्माण करावयाच्या उपजीविकेच्या संधींचाही विचार व्हायला हवा.
माझे भविष्यातील नियोजन आणि अचानक बदललेला वर्तमानकाळ यांवर विचार करत असताना भविष्यातील कार्यसंस्कृतीशी जुळवून घेण्याच्या शक्यता खडतर आहेत असे वाटू लागले. कारण, आज, आत्ताच बुद्धीजीवी वर्गात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांवरच अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे, आणि पर्यायी मार्ग देखील आक्रसत चालले आहेत.
पत्रकारितेच्या क्षेत्राचे भविष्यचक्र तर पुरते उलटे होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. अनेकांच्या हाती नारळ दिले गेले आहेत, तर अनेकजण, केव्हाही नारळ मिळेल या भीतीने धास्तावले आहेत. कदाचित या क्षेत्राचीही भविष्यातील सामाजिक मागणी कमी होईल, व इथल्या रोजगाराला त्याचा फटका बसेल. लिहित्या हातांची मागणी मर्यादित होईलच, पण या क्षेत्रातील श्रमिकांचीही गरज मर्यादित होईल.
अशा स्थितीत, ‘एकाच नावेतून प्रवास करणाऱ्या’ सर्वांनी, सुरक्षिततेचे नियम पाळून, एकमेकांना मदतीचा हात आणि साथ देत तरंगत राहण्याची माणुसकी जिवंत ठेवणे हाच एकमेव मार्ग राहील. तो अवलंबिणे हा ‘परमार्थ’!
भविष्यातील जीवनशैलीत, ‘परमार्थ’ हा परवलीचा शब्द व्हायला हवा!
ही अगदी ढोबळ मांडणी आहे, पण तसे होईल काय, या प्रश्नाचे ठामपणे होकारार्थी उत्तरच मिळेल असे वाटण्याजोगी परिस्थिती मात्र, अजूनही उगवलेली दिसत नाही!

Monday, May 4, 2020

तिजोरीच्या पोषणा’ची नशा!


अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनच गोष्टी जगण्यासाठी आवश्यक असतात हा समज जुना होऊनही आता जमाना लोटला. मोबाईल, इंटरनेट आदी गरजांची मूलभूत गरजांमध्ये भर पडली त्यालाही आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. जीवनावश्यक नाहीत अशा वस्तू शोधणेही कठीण होईल अशी परिस्थिती आता विकासाच्या वेगाने उदयास येत आहे. एके काळी, दारूबंदीच्या प्रचारसाठी गावोगावी मोहिमा सुरू व्हायच्यादारू हा सामाजिक प्रतिष्ठेचा नव्हे, तर तिरस्काराचा विषय होता. त्या काळी, गावोगावीच्या रिकाम्या भिंतींवर, दारूचा पाश, करी संसाराचा विनाशदारूची नशा, करी जीवनाची दुर्दशा वगैरे घोषणा रंगविलेल्या दिसत. कालांतराने, ती अक्षरे पुसली गेली आणि गावागावात दारूची दुकाने, देशी बार, दिसू लागले. यातून सरकारच्या तिजोरीस सर्वाधिक महसूल मिळतो, हे सिद्ध झाल्यावर, दारूविक्रीस प्रोत्साहन मिळेल असेच वातावरण तयार केले जाऊ लागले. वर्षारंभ, वर्षअखेर, गटारी, शिमगा, किंवा कोजागिरी असे सण साजरे करण्यासाठी दारू हा अपरिहार्य घटक बनला. दारूने घरादारांची, संसारांची, आयुष्याची दुर्दशा होऊ लागली, तरी सरकारी तिजोरीला मात्र, दारूमुळे बाळसे चढू लागले. संसाराची दुर्दशा करणारी ती दारू आपोआप प्रतिष्ठित झाली. दारूचे वेगवेगळे ब्रँड मिरविणाऱ्या बाटल्यांना शो केसमध्ये मानाची जागा मिळू लागली, आणि दारूने दैनंदिन जीवनावर पुरता कब्जाही मिळविलादारूच्या रंजक कहाण्यांना वर्तमानपत्रे, मासिकांमध्येही प्रतिष्ठेची जागा मिळू लागली.
दारू पिण्याच्या प्रथेस प्रतिष्ठितांच्या जगात मान मिळू लागल्यावर, दारू पिणाऱ्यांमध्येही सामाजिक स्तर तयार झाले. पहिल्या वर्गातील लोकांना मद्यशौकिन म्हणून गणले जाऊ लागले, तर दुसऱ्या वर्गातील लोकांची तळीरामदारुडेबेवडे अशा शेलक्या शब्दांत संभावना सुरू झाली. उंची मद्य पिणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असली, देशी-विदेशी बनावटीच्या उंची मद्याच्या खपाचे आकडे कोटींच्या घरात पोहोचू लागले असले, तरी तळागाळातला, देशी दारू रिचविणाऱ्यांचा वर्ग या देशात त्याहूनही मोठा आहे. दिवसभर श्रम करूनही समाधानापासून पारखेच राहणाऱ्या कष्टकऱ्यांना स्वस्तातला उपाय म्हणून सरकारी मान्यतेचा, देशी दारू नावाचा नवा प्रकार उदयास आलादेशी दारू पिणाऱ्या वर्गाची आर्थिक क्षमता फार नसली, तरी दारू सेवनाच्या एकंदर दैनंदिन प्रमाणात या वर्गाकडून मिळणारा महसूल सर्वाधिक आहे, असे दिसते.
देशावर आर्थिक मंदीचे सावट दाटल्यापासून उद्योग संकटात सापडले आहेत. बेरोजगारीची समस्या तीव्र होत आहे. अनेक क्षेत्रांना मंदीचा फटका बसला आहे. पण अशा परिस्थितीतही, दारूविक्रीचा आलेख मात्र, वाढतच आहे. २०१८-१९ या वर्षात दारूची विक्री त्याआधीच्या वर्षाहून दहा टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसते. गरीब, कष्टकरी समाजाच्या खिशास परवडणाऱ्या देशी दारूचा खपही आधीच्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी वाढला. सुमारे वीस वर्षांपूर्वी, २००० साली, राज्यातील देशी दारूचा खप सुमारे १४ लाख लिटर होता. २०१९ मध्ये देशी दारूचा खप, सर्वाधिक म्हणजे, २७ लाख १३ हजार लिटर एवढा झाला असावा, असे सागितले जाते. (लोकसभा, विधानसभा व विविध निवडणुकांमुळे ड्राय डेज वाढल्यामुळे हा खप कमीच होता, अशी चर्चा आहे.) देशी दारू पिणारा वर्ग मुख्यत्वे रोजच्या कमाईवर घर चालविणारा असल्याने, त्या कमाईतीलच मोठा हिस्सा दारू सेवनावर खर्च होऊ लागला. गरीब कुटुंबांतील उत्पन्नास असे अनावश्यक फाटे फुटू लागले, की त्याची सर्वात मोठी झळ पहिल्यांदा त्या कुटुंबांतील महिलांना आणि मुलांना बसते. कमावत्यांच्या हाती येणारा पैसा दारूवर उधळला जाऊ लागल्याने, मुले आणि महिलांवर उपासमार व कुपोषणाचे सावट पसरले. महिलांमध्ये अँनिमियासारखे आजार बळावत चालले, आणि श्रमजीवी कुटुंबाच्या पुढच्या पिढ्याची वाताहत सुरू झाली. वर्षागणिक वाढणाऱ्या दारूच्या किंमतीमुळे कमावत्या हातातील पैसा पुरेनासा झाला आणि कुटुंबांतील कलह वाढू लागले. श्रमिकांच्या घरात अशांतता माजली, की सामाजिक संस्कृतीचा समतोल पुरता बिघडतो. सरकारी तिजोरीत महसुलाच्या रूपाने मोठी भर घालणाऱ्या दारूमुळे श्रमिक, गरीबांच्या घराचे खिसे फाटके होऊ लागले, आणि असंख्य घरांवर उपासमारीची वेळ आलीदारूमुळे संसाराची वाताहत होते, ही पूर्वी भिंतींवर लिहिलेली वाक्य पुसली गेली असली, तरी ते वास्तव मात्र, दिवसागणिक गडद होत चालले आहे.
आता करोनाच्या संकटकाळात दारूची विक्री बंद झाल्यापासून दारू हा मुद्दा पुन्हापुन्हा चर्चेस येऊ लागला आहे. मद्यशौकिनांपासून बेवड्यांपर्यत अनेकजण दारूअभावी अस्वस्थ होऊ लागले असून, दारूविना जगणे असह्य होईल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. दारूसाठी तळमळणारे जीव दारूकरिता कोणतेही धाडस करतील अशी परिस्थिती आसपास दिसूही लागली आहे. त्यामुळे, करोना संकटात दारूविक्री सुरू करावी का यावर सरकारी पातळीवर चर्चा सुर झाली आहे. अशीच मागणी काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात अभिनेते ऋषी कपूर यांनी केली, तेव्हा त्यांची खिल्ली उडविली गेली होती. मात्र, महसुलाचे स्रोत आटू लागल्याचे कारण गंभीर होताच, वेगवेगळ्या क्षेत्रांतून जे उपाय सुचविले जाऊ लागले, त्यामध्ये मद्यविक्रीस मंजुरी देण्याचा सूर अधिक जोमदार झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट पत्र लिहूनच मद्यविक्री सुरू करून महसुलवाढीस चालना देण्याचा उपाय सुचविला. मद्यविक्री सुरू केल्यास तिजोरीच्या पोषणाची समस्या सुटेल, असे त्यांना वाटते. मात्र, करोनाकाळी मद्यविक्री सुरू केल्यास, गरीब, कष्टकरी समाजाचे काय हाल होतील, त्याचे सामाजिक परिणाम काय होतील, याचा विचार करून त्याच्या उपाययोजनांची आधी तयारी करावी लागेल.
करोनाच्या काळातील टाळेबंदीमुळे अनेकांचे उत्पन्नाचे स्रोत संपूर्णपणे बंद झाले आहेत. हातावर पोट असलेल्या श्रमिक वर्गास याचा सर्वाधिक फटका बसला असून, रोजची भूक भागविण्याचे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. हाताला काम नसल्याने पैसा नाही, आणि पैसा नसल्याने कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली असताना दारू विक्री पुन्हा खुली केल्यास या वर्गातील दारूच्या आहारी गेलेल्यांची हाताशी असलेली तुटपुंजी पुंजीदेखील दारूच्या नशेत वाहून जाईल, आणि त्यांच्या कुटुंबाच्या जगण्यापुढे नवे संकट उभे राहील, अशीच शक्यता अधिक आहे. शिवाय, अगोदरच नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबांत नवे कलह माजण्याचीही भीती व्यक्त केली जाते. दारूविना जगणे असह्य झाल्यावर मानसिक अवस्था काय होते, याची लहानमोठी उदाहरणे आता दिसू लागली आहेत. हाती पैसा नसलेल्या दारूबाजांमुळे राज्यातील कादा सुव्यवस्थेचे संकट उग्र होऊ शकते. आहे रे आणि नाही रे वर्गातील संघर्ष अशा संकटकाळात तीव्र होत असल्याची जगभरातील अनेक उदाहरणे समोर येऊ लागली असून, नाही रे वर्गाकडून आहे रे वर्गाकडील हिसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीला लागेल अशा भयापोटी असुरक्षिततेची भावना व्यक्त होऊ लागली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या व व्यसनावर नियंत्रण ठेवू न शकणाऱ्यांची मानसिक अवस्था अशा काही थरास गेली, तर कोणत्या अनावस्थांना तोंड द्यावे लागेल, याचाही विचार आवश्यक आहे. 
दारूविक्री खुली करताना केवळ सोशल डिन्स्टन्सिंगचा नियम पाळण्याची अट पुरेशी नाही. त्यामुळे उद्भवू शकणाऱ्या सामाजिक समस्यांचाही विचार करणे गरजेचे राहणार आहे. कारण, केवळ उंची मद्यपान करणाऱ्यांपुरता हा निर्णय मर्यादित राहणार नाही. अगोदरच, दारुमुळे ज्यांची आयुष्ये दुर्दशेच्या उंबरठ्यावर आहेत, त्या तळीरामांही दारू पिण्याची मुभा द्यावी लागेल. टाळेबंदीमुळे बेरोजगार झालेल्या तळीरामांच्या स्तरावरीललोकांना रोजगाराची व्यवस्था पुन्हा निर्माण होत नाही, तवर दारूविक्रीस परवानगी देण्याचे निर्णय घेणे म्हणजे संकटात भर घालण्यासारखे होईल. कारण प्रश्न केवळ महसूलवाढीचा नाही, तर सामाजिक सुरक्षिततेचा, कायदा सुव्यवस्थेचा आणि अगोदरच विस्कटलेल्या संसारांच्या भविष्याचाही हा प्रश्न आहे.