Sunday, December 16, 2007

"इथे अग्निपंख फुलले होते'...

गावातल्या रस्त्याकडेचा मासळी बाजार फुलायला लागला आणि आसपासच्या झाडांवर पक्ष्यांचा वखवखलेला कलकलाट सुरू झाला. रात्रीच्या निवाऱ्यापुरती आणि पिलावळीच्या आसऱ्यासाठी काडीकाडी जोडून वाळल्या झाडांवर बांधलेली घरटी सोडून सगळे कावळे मासळी बाजाराकडे झेपावले. पलीकडच्या गल्लीतल्या अवाढव्य पसरलेल्या, जगण्याची आशा सोडलेल्या रुग्णाईत म्हाताऱ्यासारख्या चिंचेच्या झाडावरच्या बगळ्यांच्या थव्यांचे ध्यान मोडले आणि पांढुरके पंख पसरत घरट्यातल्या घरट्यात त्यांचा नाच सुरू झाला. नुकतीच जन्माला आलेली, भुकेली पिल्लं आपल्या आशाळभूत पारदर्शक चोची आयांच्या तोंडात खुपसून कलकलू लागली आणि बगळ्यांनी रात्रभराच्या मुक्कामात खालच्या रस्त्यावर घालून ठेवलेली "रांगोळी' पाहून रस्ता झाडणाऱ्या कचरावाल्यानं मान उंचावून वठलेल्या झाडावरच्या बगळ्यांच्या घरट्यांकडे पाहात नेहमीसारख्या दोनचार शिव्या हासडल्या. पुढच्याच मिनिटभरात आकाशात बगळ्यांची माळ फुलली आणि मासळी बाजाराच्या रस्त्यावर "पायउतार' झाली. बाजारातल्या फळकुटांवर खाऱ्या पाण्याचे फलकारे झेलत, जीव धरून तडफडणारे मासे बगळ्यांच्या लांबुडक्‍या चोचींकडे भयाण नजरेनं पाहात मृतप्राय झाले आणि नायलॉनच्या जाळीने बंद केलेल्या टोपलीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात एकमेकांना खाली खेचणारे खेकडे टोपलीच्या तळाशी जाऊन गपगार बसले...
आसपासच्या झाडांवर कधीपासून बसून तिरक्‍या नजरांनी बाजारातल्या ताज्या माशांचा वेध घेणाऱ्या कावळ्यांनी बगळ्यांचे थवे जमिनीवर उतरताच जोरदार कलकलाट केला आणि शेपट्या फुगवून उगीचच आसपास उंडारणाऱ्या मांजरांनी झाडांकडे पाहात नाके फुगवली. बगळे "ध्यानस्थ' झाले... कोळिणींच्या टोपल्यांमधली हत्यारे बाहेर आली आणि रेल्वे स्टेशनावर गाडी येताच फलाटावरच्या गर्दीची होते, तशी पळापळ करीत बगळे, कावळे आणि मांजरांनी कल्ला केला... माशांच्या "काटलेल्या' शेपट्यांचा एक ढिगारा रस्त्यावर फेकला गेला आणि कावळे, बगळे आणि मांजरे आपापसातले वैर विसरून त्यावर तुटून पडले. माशांच्या शेपट्या चोचीत पकडून मान उंचावत दुडदुडत पळणाऱ्या बगळ्यांचा आनंद पाहून कावळ्यांनीही झाडांवरूनच जोरदार "आवाज' दिला....
... उन्हं जमिनीवर उतरली आणि मासळी बाजारात माणसांचीही गर्दी सुरू झाली... भेदरलेल्या डोळ्यांनी मृत्यूची वाट पाहत फळकुटावरच्या फडफडणाऱ्या माशांकडे पाहाणाऱ्या जिभांना पाणी सुटले... आणि सृष्टीच्या अनादीकालापासून माणसाने रूढ केलेला "जीवो जीवस्य जीवनम' या "सिद्धान्ता'चा "सोहळा' सुरू झाला. कावळ्या-बगळ्यांची आणि मांजरांची गर्दी भेदरल्यागत बाजूला झाली आणि माणसांनी मासळी बाजाराचा ताबा घेतला...
--- ------------- --------------
ताज्या हवेसाठी फेरफटका मारून घरी परतताना रोजच स्पष्ट दिसणारा हा सकाळचा "सोहळा' पाहताना मी आज मात्र अंतर्मुख झालो.
खोल समुद्रात जाऊन रात्रभर मासेमारी करणारे आणि सकाळी पडाव भरून किनाऱ्यावर उतरल्यानंतर ताजे मासे विकण्यासाठी बाजाराकडे धावणारे कोळी, आयत्या अन्नाची सोय साधण्यासाठी आसपासच्या झाडांवरच मुक्काम ठोकून सकाळी बाजाराकडे धाव घेणारे हे कावळे-बगळे आणि बाजाराच्याच फळकुटांच्या आसऱ्याने जगणारी असंख्य मांजरे, ताज्या, फडफडत्या माशांच्या खरेदीसाठी उडणारी गिऱ्हाईकांची झुंबड...
पोटाची खळगी भरणे...
निसर्ग हा एक चमत्कार आहे. सृष्टीचा तोल सावरण्यासाठी त्यानेच जीवनाचा हा "सिद्धान्त' रचला आणि माणसाने आपल्या अचाट निरीक्षणशक्तीने त्यावर आपला "स्वामित्वहक्क' प्रस्थापित केला. आपणच सृष्टीचे नियंते आहोत, अशी माणसाची समजूत झाली तेव्हापासून तो "शिकारी'च्या "खेळा'त रमू लागला. जीवसृष्टीचा तोल राखण्यासाठी निसर्गाने प्राणीमात्रांचा आहार-व्यवहार आखून दिला. यासाठीच, वाघ-सिंहांसारखे मांसाहारी पशू हरीण-सशांसारख्या कोवळ्या जिवांची शिकार करतात, आणि जंगलाच्या कायद्यानुसार त्यांची "लोकसंख्या' नियंत्रणात राहते. याच शिकारीतून उरल्यासुरल्या "अन्ना'वर ताव मारून काही प्राणी उदरनिर्वाह करतात, आणि त्यांच्या जगण्याची निसर्गतःच सोय होते. उरलेसुरले सांगाडे साफ करण्याचे काम करण्यासाठी निसर्गाने "गिधाडे' नावाचे सफाई कर्मचारी नियुक्त केले आहेत. या रचनेमुळे जीवसृष्टीतील प्राणीमांत्रांच्या संख्येचे नियंत्रण होते, असे म्हणतात...
मग आता निसर्गाच्या या रचनेला धक्का कुणी दिला?
कधीकाळी सा सृष्टीत जगणारे असंख्य जीव नामशेष का झाले?
अनेक निरुपद्रवी जीवांचे अस्तित्व संकटात का सापडले?
ेजंगलात दिमाखाने मिरविणाऱ्या शक्तिमान वाघांच्या संरक्षणासाठी सरकारी योजना का सुरू झाल्या?
निसर्गाचे सफाई कर्मचारी असलेली गिधाडे कुठे गायब झाली?
आपल्या आनंदी चिवचिवाटाने माणसाची मने प्रसन्न करणारी चिऊताई आज शोधावी का लागते?
... सिमेंटच्या जंगलाने व्यापलेल्या मुंबईच्या एका कोपऱ्यात आजही हिवाळ्याच्या हंगामात "अग्निपंखी' परदेशी पाहुणे दाखल होतात, आणि निसर्गप्रेमींच्या आनंदाला उधाण येते. एवढ्या गजबजाटातदेखील, या परदेशी पाहुण्यांना मुंबईतली ही प्रदूषित दलदल पिढ्यापिढ्यांनंतरही आपलीशी वाटते... कारण, दर वर्षी दाखल होणाऱ्या या रोहित पक्ष्यांपैकी अनेकांचा जन्मच इथल्याच दलदलीत झालेला असतो.
या दलदलीतले किडेमुंग्या खाऊन पोट भरण्यासाठीच ते फक्त दर वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून इथे येत असतील? की त्यांच्या जन्मभूमीची ओढ त्यांना नावर करीत असेल?...
आपल्या वंशजांनीही इथेच, आपल्याच जन्मभूमीत जन्म घ्यावा, अशी तर त्यांची इच्छा नसेल?... जंगलातल्या पशुपक्ष्यांची भाषा जाणण्याचे शास्त्र कधीकाळी माणसाला अवगत होते असे म्हणतात. आता तो माणूस अस्तित्वात नाही.....
पण, निसर्गानं प्राणिमात्रांचा समतोल राखण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा का कोलमडली?
कधीकाळी तळ्यांमध्ये, नदीच्या पात्रात आणि समुद्राकाठच्या दलदलीत बकध्यान करून बसणाऱ्या या बगळ्यांना आता मासळी बाजारातल्या, फास्ट फूडची सवय का लागली?
कावळेदेखील या मासळीला का चटावले?
एखादा गलेलठ्ठ उंदीर शेजारून जात असला, तरी डोळे मिटून स्वस्थ बसणाऱ्या मांजरालाही सिंमेटच्या जंगलातल्या "नागरीकरणा'चे वारे कशाने शिवले?...
---- ---------- -------------
माणसांच्या जगात संगणकयुग अवतरले, तेव्हा कामगार कपातीची कुऱ्हाड अनेक कुटुंबांवर कोसळली. अनेक कर्तीसवरती माणसे अचानक आलेली सक्तीची "व्हीआरएस' घेऊन घरी बसली, आणि कधीकाळी फक्त माणसांनी गजबजलेल्या अनेक कार्यालयांत फक्त संगणकाच्या कळपट्ट्यांचे खडखडाट घुमू लागले.... अनेक कामे करणारी एकच व्यवस्था अस्तित्वात आली, की तीच कामे करणाऱ्या असंख्य व्यवस्था निरुपयोगी ठरतात.
हा माणसाच्या वर्चस्वाखालच्या जगाचा नियम आहे.
माणसाच्या पूर्वजाला कधीकाळी शेपूट होते, असे म्हणतात.
तेव्हा तो चार पायांवर चालायचा. पुढचे दोन पाय हातासारखे वापरता येतात हे लक्षात आल्यावर माणूस स्वतःच्या दोन पायांवर उभा राहू लागला, तेव्हा त्याचे शेपूटही निरुपयोगी ठरत चालले.
प्राणीमात्रांचे नियमन करणाऱ्या निसर्गाच्या हे लक्षात आले, आणि माणसाचे निरुपयोगी शेपूट हळूहळू कमी कमी होत गेले...कालांतराने नष्ट झाले...
मानवसृष्टी प्रगत झाली...
ज्या गोष्टींची गरज राहात नाही, त्या गोष्टी निसर्गतःच नामशेष होऊ लागतात, हा निसर्गाचाही एक नियम!
आज माणूस इतका प्रगत झालाय...
म्हणूनच तर गिधाडे नामशेष झाली असतील?
पण चिऊताईंचे काय?
कधाकाळी घराघरातल्या लहानग्यांना खाऊपिऊ घालताना, "चिऊचा घास' आठवणीने भरवला जायचा...
आणि "चिऊ-माऊ' आणि "काऊ'चा सुद्धा घास घेतच कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या व्हायच्या...
आज घरांमधल्या लहानग्यांना मऊमऊ दुधभाताचे घास भरवले जातात?...
चिऊताईचा घास घेताना लहानग्याच्या दूधभाताने माखलेल्या चेहऱ्यावरच्या मिस्किल हास्यरेषा आज कुठे दिसतात?
लहानग्यांना घास भरवण्याच्या वेळी तेव्हा समोरच्या अंगणात "चिऊताई' बागडत असायची...
"चिऊताईचा घास' इतिहासजमा झाला म्हणून तर अंगणात बागडणाऱ्या चिऊताईचा चिवचिवाटही संपला नसेल?
-------- --------------- ------------------
मुंबईच्या कुठल्या एका कोपऱ्यातल्या दलदलीत निर्धास्तपणे येणाऱ्या अग्निपंखी पाहुण्यांना माणसांच्या वर्चस्वाखालच्या कायद्याचा बडगा अगदी अलीकडे अनुभवायला मिळालाय...
कुठल्यातरी अनामिक आस्थेनं, आपला वंश वाढविण्याच्या नैसर्गिक ओढीनं इथं आलेल्या या रोहित पक्ष्यांवर अचानक माणसांच्या जगाच्या कायद्यामुळे वंशसंहार पाहण्याची वेळ आली. त्यांची भाषा जाणणारा माणूस आज अस्तित्वातच नाही.
उद्या याच दलदलीत सिमेंटची जंगले फोफावतील.
तेव्हा कधीतरी कुणी हताश निसर्गप्रेमी आठवणीत हरवून उद्विग्नपणे उद्‌गारेल,
"इथे अग्निपंख फुलले होते'...

Monday, December 3, 2007

निःश्‍वास

दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला. हवेतच हात झटकून तो ताजातवाना झाला, आणि त्याला भुकेची जाणीव झाली.
आईबाप आणि हरवलेल्या बहिणीची आठवण कायमची पुसून शंकर फलाटाकडे धावला आणि त्याने गर्दीसमोर हात पसरला. पुरसे पैसे जमताच स्टॉलवरून घेतलेल्या वडापावच्या चवीत तो हरवून गेला...
...त्या दिवसापासून शंकरला मुंबईच्या रेल्वे फलाटांचं वेड लागलं. फलाटावर उतरताच त्याच्याच वयाच्या एकदोन जणांशी शंकरनं दोस्तीचा हात पुढे केला आणि जगण्याच्या युक्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली. गर्दीसमोर हात पसरून झाले, की सात वर्षांचा शंकर रुळांवरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायच्या आणि त्या विकून येणाऱ्या पैशातून मित्रांबरोबर बिडी-सिगारेटच्या धुरात भूतकाळ विसरायचा. कधी भीक मिळाली नाही, तर पॉलिशच्या रिकाम्या डब्यांमधले "सोल्यूशन' ठसका लागेपर्यंत हुंगायचा आणि त्या नशेतच दिवसभर तहानभूक विसरायचा... कधी "व्हाईटनर' हुंगून त्यात बुडून जायचा... कधी हातात चार पैसे जास्त खुळखुळले, तर "गुटख्या'ची "पार्टी' करायचा, आणि रात्री पुलाखालच्या अड्ड्यावरची "हातभट्टी' झोकायचा...
"छत्रपती शिवाजी' टर्मिनस, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, दादर, वांद्रयाच्या फलाटावर देशाच्या चारी दिशांनी येणाऱ्या गाड्यांच्या गर्दीतून शंकरसारखी शेकडो मुलं रोज दाखल होतात, आणि मिनिटामिनिटाला उसळणारी बिनचेहऱ्याची गर्दी त्यांना सहज सामावून घेते... एवढ्या "मॅक्‍झिमम सिटी'ला रोज भर पडणाऱ्या अशा शे-दोनशे पोराटोरांच्या गर्दीनं काहीच फरक पडत नसतो. मुंबईच्या रस्त्यांवर, रेल्वे स्टेशनांवर, सिग्नलजवळ आणि फूटपाथवर असे हजारो शंकर वर्षानुवर्षे आपले अस्तित्वहीन आयुष्य ढकलताहेत. मुंबईच्या लोकसंख्येच्या आकडेवारीत त्यांना स्थान नाही. त्यांच्याजवळ "नागरिकत्वा'चा पुरावा नाही, आणि "माणूस' असल्याचाही दाखला नाही. "बाळाचा पहिला हक्क' असलेला "जन्माचा दाखला' नाही, आणि कोणत्याही मानवी संस्कृतीशी त्यांचं नातं नाही.
केवळ दोन पाय, दोन हात, कुठलीतरी भाषा, आणि मेलेलं, पण मानवी मन एवढीच "माणूसपणा'ची लक्षणं असलेली हजारो मुले "उद्याच्या अंधारा'त स्वतःला ढकलून देऊन वावरताहेत. मनच नसल्याने माणुसकी नाही आणि माणूसपणाशी संबंधच नसल्याने माणसाच्या सुखदुःखांशीही देणघेणं नाही, अशा या मुलांच्या व्यवहारांवर माणसांच्या जगानं गुन्हेगारीचा शिक्का मारला असला, तरी "गुन्हेगारी' या शब्दाचा अर्थ त्यांना मात्र माहीत नाही. कारण ते तर त्यांचं 'जगणं' आहे. हरपलेल्या भूतकाळासोबत अनेकांनी आपली नावंही पुसून टाकली आहेत, आणि "काळ्या धंद्यांचं भांडवल' म्हणून अनेकांनी नकळत आपल्या आयुष्य त्या दुनियेला निमूटपणे अर्पण केलं आहे. हातपाय तुटलेली, नजरा हरवलेली अपंग मुले म्हणजे कुणाच्या तरी "धंद्या'चं भांडवल असतं. जमलेला पैसा संध्याकाळी कुठल्यातरी भाईच्या हातात ठेवला तरच आपल्या पोटात काहीतरी पडेल या आशेनं ही मुलं गर्दीत "वळवळत' असतात. एखादा कुणीतरी "पाकीटमारी'चं "कसब' मिळवतो, आणि कधी पकडला गेला, तर तोंड बंद ठेवून अर्धमेला होईपर्यंत मारही खातो. कुणी फेरीवाल्यांच्या मालाला गिऱ्हाईक मिळवण्यासाठी जिवाच्या आकांतानं ओरडायचं काम पत्करतो, तर कुणी पाण्याचा धंदा करणाऱ्या टोळीत सामील होऊन रुळावरच्या बाटल्या स्टेशनवरच्या नळाखाली भरून गाडी सुटतासुटता गिऱ्हाईकाच्या गळ्यात मारून "गंडवायचा' धंदा स्वीकारतो. व्हाईटनर, सोल्यूशन आणि "पावडर'च्या नशेत बुडालेला कुणी नकळत स्वतःची किडनीदेखील गमावून बसतो आणि खंगत खंगत मरणाला कवटाळतो...
एखाद्या "नशीबवाना'स मात्र, अनपेक्षितपणे नव्या आयुष्याची, "माणसांच्या जगा'ची वाट सापडते...
सावत्र आईच्या माराच्या भीतीने आणि आपल्या हातून लहान बहीण हरवल्याच्या भयाने सातव्या वर्षीच रस्त्यावरच्या जगात दाखल झालेल्या शंकरला सुदैवाने पुन्हा "माणसांच्या जगा'ची वाट सापडली आहे. वाट चुकलेल्या मुलांना जगण्याचा अर्थ समजावून देणाऱ्या "समतोल फाऊंडेशन' नावाच्या एका संस्थेला आता सामाजिक जाणीवांची साथ मिळू लागली आहे. "भविष्य' आणि "आयुष्य' अशा शब्दांची ओळख व्हायच्या आधीच, कदाचित अपघातानेच रस्त्यांवर फेकल्या गेलेल्या मुलांच्या जीवनातील अंधार पुसण्यासाठी "समतोल'च्या मदतीला समाजातील "माणुसकी' अनेक हातांनी सरसावली आहे.
"समतोल फाऊंडेशन'च्या, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र रेल्वे स्टेशनांवर ठिय्या मारून बाहेरगावांतून पळून मुंबईत आलेल्या मुलांची विस्कटलेली आयुष्ये सावरण्याचा संकल्प सोडला आणि या मुलांसाठी आशेचा किरण उगवला. अशा शेकडो मुलांचे "समतोल'शी नाते जुळले आहे. "समतोल'च्या "मनपरिवर्तन शिबिरा'त अनेक मुलं नव्या आयुष्याला सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. नशेबाजी, चोरी, भीक मागणे हेच ज्यांचे जीवन, अशा अनेकांना आता त्यापासून मुक्ती मिळाली आहे, आणि त्यांनी पुसलेला भूतकाळही पुन्हा जागा झाला आहे. माणसांच्या जगाबाहेर, रस्त्यावर जगणाऱ्या या मुलांची मेलेली मने पुन्हा "जिवंत' होऊ लागली आहेत...

दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरचं "घर' सातव्या वर्षीच सोडलेल्या शंकरला आज चौदाव्या वर्षी पुन्हा घराची ओढ लागली आहे, पण आता त्याच्या आईबापांचाच ठावाठिकाणा लागत नाही... "समतोल'ने अलीकडेच अशा काही मुलांच्या आईबापांशी संपर्क साधला आणि मूल हरवल्यामुळे विस्कटलेल्या अनेक संसारांमध्ये नवा उत्साह संचारला. "स्पर्श' करणाऱ्या एका क्षणाने काही जणांची ताटातूट संपविली आणि "समतोल'च्या आधाराने पुन्हा उभे राहिलेल्या अनेकांना पुन्हा आपापल्या घराची ओढ लागली. "शिबिरात मला रोज आंघोळ करायला मिळायची'... हे कुणा "शाहरूख'चे, इवल्या आयुष्यात कधीच न मिळालेल्या आनंदाच्या कल्पनांना शब्दरूप देणारे उद्‌गार "माणसांच्या जगा'ला अंतर्मुख करून सोडणारे आहेत...
समाजातील माणुसकीच्या आधारामुळे "समतोल'च्या कामाला आज दिशा मिळाली असली, तरी हे काम सोपे नाही. कायद्याच्या कचाट्याबरोबरच, या कामात "समतोल'ला सुरुवातीला काळ्या धंद्याच्या दुनियेच्या धाकालाही सामोरे जावे लागले. पण चांगल्या कामाची खात्री झाली, की आधाराचे हातही भक्कम होतात, याचा अनुभव या काळात "समतोल'ने घेतला आहे. आता रेल्वे स्टेशनवरच्या "कायद्याच्या रक्षकां'चाही पाठिंबा "समतोल'ला मिळाला आहे. त्यामुळे अशा मुलांना पुन्हा माणसांच्या जगात आणण्याचे काम सोपे झाले आहे. अनेक मुलांना न कळत्या वयातच स्वीकारलेले रस्त्यावरचे आयुष्यच आवडू लागते, आणि माणसांच्या जगात यायला ती राजी होत नाहीत. अशा मुलांमधले मन "जागे' करण्याचे काम ही संस्था करते. रस्त्यावरच्या मुलांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी अनुदाने मिळवून काम करणाऱ्या बिगरशासकीय संस्थांची- "एनजीओ'ची- मुंबईत कमतरता नाही. "समतोल'ला मात्र फक्त समाजातील संवेदनशीलतेचा आधार मिळाला आहे. "माणुसकीची शक्ती' समतोलच्या पाठीशी उभी आहे. या शक्तीच्या आधारावर आजवर अनेक चुकलेल्या, हरवलेल्या जिवांना आपल्या हरवलेल्या मायेची पाखर पुन्हा मिळाली. या पुनर्भेटीचा प्रत्येक क्षण हाच "समतोल'ला आधार देणाऱ्या शक्तीला नवे खतपाणी घालत असतो.वर्षानुवर्षे व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या माणसांच्या जगापासून दुरावलेल्या या मुलांच्या भविष्याच्या दिशा आता उजळल्या आहेत... अशा अनेक कोमेजत्या कळ्या आश्‍वस्त भविष्याच्या जाणीवांनी निःश्‍वास टाकू लागल्या आहेत...
("समतोल'चा संपर्क क्र.- ०२२- २५४५२६४४, ९१-९८९२९ ६११२४)

Tuesday, November 20, 2007

बरसात

...बरसात बस स्टॉपवर येऊन थांबली, आणि घाईघाईनं रांगेतली गर्दी पुढंपुढं सरकू लागली. रांगेबाहेरच्या त्या काहीश्या वयस्कर इसमाशी बोलणार्‍या तिला बहुधा गर्दीची ही घाई कळलीच नव्हती. मागून दोनचार जणांनी आवाज दिल्यावर तिची पावलं जडपणे पुढं सरकली. तो इसमही तिच्याइतक्याच जडपणानं बाजूनं पुढेपुढे सरकत चालत होता. रांगेबरोबर तीदेखील एखाद्या यंत्रासारखी बसमध्ये चढली आणि रिकाम्या राहिलेल्या एकमेव बाकावर चक्क विंडो मिळाल्यानं तिचा चेहेरा खुलला. तो इसमही मग बसबाहेर विंडोजवळ येऊन उभा राहिला. आता बस जवळपास भरली होती. पुढचा सिग्नल बंद होता म्हणून ती स्टॉपवर उभी होती. तेवढ्यात त्या इसमाशी किती बोलू अन काय असं तिला झालं होतं... "आणि आईला सांगा, मी दिवाळीआधी येऊन जाईन एकदा घरी.... तुमची औषधं आताच घ्या जाताना... मी उद्या ऑफिसला गेल्यावर फोन करेन आईला... त्या दुकानात गूळ स्वस्त आहे... बाकीचे पण जिन्नस स्वस्त आहेत... कधीतरी जाऊन या तिकडे"... असं काहीबाही बोलत असतानाच बस सुरू झाली आणि तिचा आवाज जडावला... बाहेरच्या त्या इसमानंही हात लांब करून खिडकीतनं तिच्या हातावर थोपटल्यासारखं केलं आणि तिनं एकदम मान फिरवली... बाहेरचा तो माणूस जडपणे हात हलवत तिला निरोप देत होता... बस पुढे सरकली आणि तिनं मागे वळून बघितलं... तो इसमही अज्ञातात हरवल्यासारखा हात उंचावून उभा होता... आता बस रस्त्याला लागली होती... कंडक्टर समोर येताच तिनं तिकीट घेतलं आणि ती निर्धास्त झाल्यासारखी व्यवस्थित बसली. मांडीवरच्या प्लास्टिकच्या पिशवीतलं एक पॅकेट घाईघाईनं काढून आधाशासारखं तिनं दातांनीच फाडलं आणि आतला पदार्थ काढून तोंडात कोंबला... नंतर प्रत्येक पॅकेटमधला एकेक पदार्थ ती असाच तोंडात कोंबून भरत होती... बसच्या पॅसेजमधली दांडी नीट पकडून मी त्या सीटशेजारच्या खांबाला रेलून उभा होतो. अगदी तिच्यासमोरच असल्यानं त्यांचं सगळं बोलणंही मी नीट ऐकलं होतं, आणि म्हणूनच माझं कुतूहलही जागं झालं होतं. हा आपला आगाऊपणा आहे, हे लक्षात येऊनही माझे कान त्यांच्या संभाषणाकडे लागले होते. ते काही फार महत्त्वाचं आणि खाजगी बोलत नाहीयेत, हे कळूनही, कान देऊन ऐकावं असं त्या संभाषणात काय होतं ते माझं मलाच कळत नव्हतं. पण बस सुरू झाल्यावरही, माझं लक्ष तिच्या हालचालींकडे लागलं होतं, एवढं खरं... त्या पिशवीतलं पॅकेट आधाशासारखं दातांनी ओरबाडून खाणार्‍र्या तिला बघून मला कीव वाटू लागली. पण तिचं आजूबाजूला लक्ष नव्हतं. प्रत्येक पॅकेटमधला एकेक पदार्थ चाखून तिनं पिशवी नीट बांधली आणि ती खिडकीतून बाहेर पाहू लागली... तिच्या चेहेर्‍यावर काहीतरी अद्भूत भाव उमटले असावेत, असं मला उगीचच वाटलं. आता मात्र, आपण तिच्या हालचालींवर पाळत ठेवल्यासारखं वागणं बरं नाही, असं मला वाटायला लागलं, आणि मी तिच्यावरचं लक्ष वळवलं... गाडीत नेहेमीसारखीच गर्दी... नेहेमीसारखेच दमलेभागलेले, नोकरीवरून परतणारे प्रवासी शिणल्यासारखे उभे, बसलेले होते... नवीन काहीच नव्हतं. कुणी मोबाईलवरून गप्पा मारत होतं, कुणी ‘धंद्याच्या वार्ता’ करीत होतं. मी उभा असल्यानं उगीचच गाडीभर नजर फिरवत होतो. पुढच्याच स्टॉपला तिच्या शेजारचा प्रवासी उतरल्यानं मला बसायला जागा मिळाली. आता थोडा वेळ निवांतपणा होता. मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो. तितक्यात पुन्हा तिनं ती पिशवी उघडली. पुन्हा एकदोन पदार्थ तिनं तोंडात टाकले... पण आता मघाचा तो आधाशीपणा, उतावळेपणा नव्हता... उलट, तिच्या चेहेर्‍र्यावर, छानशी, समाधानाची छटा स्पष्टपणे उमटली होती. हळूच तिनं हातातली ती पिशवी कुरवाळली, आणि घट्ट धरली... तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो. तितक्यात तिनं पर्समधला मोबाईल काढला, आणि एक नंबर फिरवून कानाला लावला. आता पुन्हा तिचं मोबईलवरचं बोलणं मला स्पष्ट ऐकायला येणार होतं. पण मी माझं लक्ष जाणूनबुजून दुसरीकडं वळवलं. मला उगीचच अपराध्यासारखं वाटत होतं. ती फोनवर बोलत होती. तिचा आवाज अगदी मोकळा होता, आणि शब्दांतला आनंद ओसंडून वहात होता. लक्ष नसतानाही मला ते जाणवलं, आणि नकळत कान पुन्हा तिकडे वळलेच. "अगं आत्ता बाबा भेटले गं स्टॉपवर..." तिनं उकळ्या फुटल्यासारख्या उतावळेपणानं पलीकडच्या बहुधा तिच्या मैत्रिणीला सांगितलं, आणि मघापासूनच्या ताणलेल्या माझ्या आगाऊ उत्सुकतेला उत्तर मिळालं. तो जडपणे तिच्याशी बोलणारा वयस्क इसम, तिचे वडील होते... "केव्हापासनं येऊन थांबले होते गं बाबा स्टॉपवर. मी साधारण याच वेळेला येते ना, ते त्यांना माहीत होतं. किती दिवसांनी अशी अचानक भेट झाली गं... इतकं बरं वाटलं बघ बाबांना भेटून... मला एकदम रडूच आलं बघ..." ती आवाजातला ओलावा लपवत पलीकडचीला भरभरून सांगत होती. आगाऊपणानं का होईना, मी तिच्या त्या आनंदक्षणाचा साक्षीदार झालो होतो. तिच्या चेहेर्‍यावरल्या समाधानाचा अर्थ मला आत्ता उमगत होता. नकळत माझ्याही मनात तिच्या समाधानाचा वाटेकरी झाल्याचं समाधान उमटत होतं. नुकतंच लग्न होऊन बहुधा ती या उपनगरात राहायला आली असावी. तिचे आईवडीलही बहुधा मुंबईतच कुठे दुसर्‍या उपनगरात राहत असावेत. लग्न झाल्यापासून माहेरी जायला तिला बहुधा वेळ मिळाला नसावा. लग्नाची रजा संपल्यावर लगेचच दोघांचीही नोकरी सुरू झाली असणार... नवलाईचे काही दिवस संपल्यावर त्या दोघांनीही मुंबईच्या वास्तव जीवनाला वाहून घेतलं असणार. आपल्या आणि नवर्‍याच्या, दोघांच्याही नोकरीच्या व्यापात आणि कदाचित नव्या नवलाईत बुडालेल्या तिला माहेरी जायला उसंत मिळाली नसणार... फोनवर बोलूनच ती बहुदा आईच्या मायेची ऊब अनुभवत असणार.... मोबाईलवर ती बोलत असतानच मी एकेक तर्क लढवत होतो... मुंबईतल्या नोकरदार तरुणांच्या दगदगीच्या जीवनाचा एक अस्सल अनुभव माझ्या बरोबरीने प्रवास करत होता. या जीवनातल्या रोजच्या व्यापात, प्रेमाच्या माणसांच्या मायेच्या छायेसाठी आसुसलेला एक जीव आपल्या जन्मदात्याच्या इवल्याश्या सहवासातला आनंद जपून ठेवण्यासाठी धडपडत होता... त्या अनोख्या मायेच्या दर्शनानं मी भारावून गेलो होतो. त्या पिशवीतल्या पदार्थांचा गोडवा मलाही जाणवून गेला... त्या पदार्थांना आईच्या हातातल्या मायेचीच चव असणार, आणि कित्येक दिवसांपासूनची त्या मायेची भूक भागवण्यासाठीच ती नकळतपणे आधाशीपणा करत असणार, हे मला उमगलं... अजूनही ती भरभरून मैत्रिणीशी बोलतच होती. पुन्हा माझे कान तिकडे लागले. तिच्या आईनं, तिला आवडणारी खजुराची चिक्की, सुकामेवा, बेदाणे असं काहीकाही त्या पिशवीतून पाठवलं होतं, आणि ते देण्यासाठी तिचे वडील मुद्दाम स्टॉपवर येऊन ताटकळत थांबले होते... त्या पिशवीत त्यांची माया भरली होती आणि ती आधाशासारखी ती माया साठवून घेत होती... तिचं बोलणं संपलं आणि फोन बंद करून तिनं पर्समध्ये टाकला. आता ती त्या पिशवीकडे नुसतं पाहात होती... बसमधली गर्दी हळुहळू ओसरत होती. आता ती आजूबाजूला पाहात होती. मी मुद्दामच तिच्याकडे पाहात होतो. मला तिच्या डोळ्यातलं समाधान अनुभवायचं होतं. ते शोधण्यासाठी आता मी धडपडत होतो... त्याच वेळी तिची माझ्याशी नजरानजर झाली, आणि छानसं हसून तिनं हातातली पिशवी पुन्हा नीट धरली... मी तिचं सगळं संभाषण ऐकलं होतं, हे तिला माहीत असणार. मीही आपुलकीनं हसून तिच्या आनंदाला दाद दिली, आणि खूपखूप बरं वाटल्याचा भाव तिच्या चेहेर्‍यावर उमटला... आगांतुकपणे तिच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न करताकरता अनुभवलेल्या एका हृद्गताच्या समाधानानं माझं मन भारावलं होतं. ते भारावलेपण बहुधा माझ्या नजरेतूनही ओसंडून उतरलं होतं... बिनचेहेर्‍याच्या गर्दीत एकटेपणानं वावरताना नकळतपणे झालेल्या एका जिव्हाळ्याच्या, मायेच्या शिडकाव्यानं मी तृप्ततृप्त झालो होतो.. काही क्षणांच्या छोट्याश्या सहवासानं मोहोरलेल्या एका मनाच्या पाकळ्या उलगडताना मी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या... मुंबईतल्या गर्दीत आणि कोलाहलातही, कुठल्यातरी झाडातून उमटणारा कोकीळकंठी स्वर मला स्पष्टपणे ऐकू येत होता.. दिवसभराचा सगळा शीण मी विसरून गेलो होतो... माझ्या मनाच्या अंगणातच एका ‘माहेरच्या सुवासाची बरसात झाली', या आनंदात मी डुंबून गेलो होतो.

Wednesday, September 26, 2007

`मानव' आणि `माणूस'!

एका आईच्या कुशीत साकारला देह एक I
‘देई मजसी तो देवा’, म्हणे आत्मा एक नेक II

जाणुनिया संचिताला आत्मारामे रुकारिले I
देहामाजि येता आत्मा, तया सजीवत्व आले II

आले आत्म्याच्या मागोनि एक निरागस मन I
देहि आली संवेदना, मोहरले ते जीवन II

मानवाच्या जगी कधी जसा अंधार दाटला I
तळमळला तो आत्मा, झरा मनाचा आटला II

मन भुलले देहाला सुटे आत्म्याची संगत I
भौतिकाच्या जगातली, मना जडली रंगत II

मन देहापाशी जुळे आत्मा एकाकी पडला I
कोंडलेल्या देहामाजी, मग एकांती रडला II

शरमल्या आत्म्याने युद्ध छेडिले देहाशी I
मन गेले दूरदूर, स्वैर झुले मोहापाशी II

जर्जर तो देह अंती हात दोन्ही पसरूनी I
भीक मागतो मनाशी, घेई मज सावरूनि II

मन हासते मोकाट आत्मा जाहला उदास I
जाणुनिया देहस्थिति, म्हणे मग मानवास II

शेवटचा क्षण देहा तुझी संगत आत्म्याशी I
ठेवुनिया शस्त्र खाली, जाई शरण तयाशी II

मन आत्म्याशी सांधले आली देहाची कणव I
सारा प्रवास संपता, झाला `माणूस' मानव II

Wednesday, September 19, 2007

शहार!!

मनाच्या मैदानावरल्या
मोहोरलेल्या नंदनवनात
शब्दांचे ताटवे डोकावतायत
फुलून डोलायच्या तयारीत...

वा-याच्या ओंजळीतून
ओसंडत्या सुगंधासोबत
सांडलेले शब्द झेलायला
टपली कभिन्न कुत्री मोकाट...

केसाळलेल्या शेपट्या सावरत
डोळे लावून हिरवे हावरट
कवितांच्या रोपट्यांकडे
वखवखून लाळ घोटतायत...

लचके तोडायला कधीतरी
सापडतील दातात कोमेजलेल्या
शब्दांची लोंबकळती लक्तरं
समीक्षकाच्या हेकट थाटात...

कवींचा थवा आता शहारलाय
ताटव्यांचं चित्तपण
था-यावर नाही...
शब्दांचे ताटवेच कोमेजतायत!!

Saturday, September 8, 2007

सूर ( १ )

अष्टमीच्या अंधाऱ्या रात्री कारागृहात जन्मलेल्या बाळाला डोईवरल्या टोपलीत टाकून वसुदेवानं यमुना पार केली आणि गोकुळातल्या नंदाच्या राजवाड्यात यशोदेच्या झोळीत आपलं बाळ टाकून डोळे पुसत त्या बालिकेला घेऊन तो कारागृहात परतला.

...सारं काही ठरल्यासारखं पार पडताच काळोख मिटवून उगवलेल्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी कारागृहाच्या झरोक्‍यातून कोठडीतल्या त्या ‘देवकीच्या बाळा’चं पहिलं दर्शन घेतलं, आणि ‘अवतारकार्य’ सुरू करण्याचा इशारा केला. त्या किरणांकडे पाहात त्या नवजात बालिकेनं पहिलं "ट्यॅऽहां' केलं... पहारेकऱ्यांना जाग आली. देवकीला बाळ झाल्याची खबर देऊन कंसाच्या गळ्यातील कंठहाराचे बक्षिस मिळविण्यासाठी राक्षस पहारेकऱ्यांची पळापळ सुरू झाली. प्रत्यक्ष आपला मृत्यूच कारागृहात अवतरल्याच्या भयावह बातमीवर मात करण्यासाठी आसुसलेल्या निर्दयी कंसाची कर्दनकाळ पावलं कारागृहाच्या दिशेनं पडू लागताच, सूर्याची ती कोवळी किरणंही स्तब्ध झाली. सगळं काही आधीच ठरलंय, आणि सगळं काही ठरल्याप्रमाणंच होणार आहे, याची खात्री असतानादेखील आकाशात दाटलेले ढग उगीचच गडगडून गेले, आणि उगवत्या सूर्यादेखत विजेची एक किनारदेखील पश्चिमेकडल्या काळ्या ढगांमधून लखलखून गेली... नुकत्याच ओसरलेल्या पावसाच्या सरींनी तरारलेला वारा शहारल्यासारखा सरसरला आणि चिडीचूप होऊन पडला... कारागृहाबाहेरच्या वाटिकेतल्या वेली थरारल्या. अंगावर नुकत्याच फुललेल्या कळ्यांवर साचलेल्या पहाटबिंदूंचा ओलावादेखील त्यांना घामेजल्यासारखा खुपू लागला... हिरवाईनं टवटवलेल्या झाडाझुडुपांची पानं पहाटवाऱ्यासोबत झोपाळ्याचा खेळ खेळताखेळताच स्तब्ध झाली आणि भेदरलेल्या पक्ष्यांचं सकाळसंगीतही थिजलं... आसपासचं जग पुढच्या क्षणाकडे डोळे लावून बसलं. मृत्यूभयानं भेदरलेल्या कंसानं लाथेनंच कारागृहाचा दरवाजा ढकलला आणि जणू याच क्षणाची वाट पाहात स्तब्ध सूर्यकिरणे न्याहाळत पहुडलेल्या त्या बालिकेला देवकीच्या कुशीतून हिसकावत विक्राळ गडगडाट केला. थिजलेलं जग पुन्हा एकदा भयचकित होऊन शहारलं आणि कंसानं त्या बालिकेला हवेत गरागरा फिरवून आपटलं... सगळं ठरल्यासारखंच होतंय, याची खात्री असतानाही, वारा पुन्हा शहारला... वेली पुन्हा थरथरल्या... पक्षी पुन्हा भाबावले आणि सोनकिरणंही फिकट झाली...

ठरल्याप्रमाणं आपलं अवतारकार्य संपवतानाच कंसाला मृत्यूभयानं हादरवणारी आकाशवाणी करीत ती नवजात बालिका अदृश्‍य झाली. वारा पुन्हा खेळू लागला... पक्षी पुन्हा गाऊ लागले आणि झाडं-वेली पुन्हा तरारल्या. अवखळ वाऱ्यानं कारागृहाबाहेरच्या वाटिकेतल्याच वेलींवरल्या फुलांचा सुगंध ओंजळीत घेत आसमंताला वाटून टाकला... रात्री अंधारात दुथडी भरून वाहणारी यमुनाही जबाबदारी पार पाडल्याच्या समाधानानं निळ्याशार संथपणे वाहू लागली. आकाशातल्या ढगांनी एक सर आनंदानं धरतीवर बरसली आणि एकमेकांवर आदळत लडिवाळ गडगडाटही केला. नवा दिवस उगवत असतानाच, एका राक्षसी युगाचा अस्त सुरू झाल्याच्या जाणीवेनं अवघं जग आश्‍वस्त झालं... याच वाऱ्यांनी हा सुगंध यमुनेपारच्या "नंदन'वनात यशोदेच्या पलंगावरल्या त्या बाळापर्यंत पोहोचवला, आणि अंगठा चोखत याच वार्तेची वाट पाहात पहुडलेल्या कान्ह्याला सूर फुटताच नंदनवन मोहरून गेलं... यशोदेला बाळ झाल्याच्या वार्तेनं अवघं गोकुळ आणखीनच बहरलं...

... कारागृहात देवकीच्या पोटी जन्मलेल्या बालिकेची क्रूर कंसानं हत्या केल्याच्या बातमीसोबतच, गोकुळात नंद यशोदेला गोजिरं बाळ झाल्याची वार्ताही गंधभरल्या वाऱ्यांनी चहूकडे पसरवली आणि आनंदसुरांचा सुंदर साज आसमंतावर सजला... ठरल्यासारखं सारं काही सुरळित पार पडल्याच्या आनंदात अवघी सृष्टी बहरून, मोहरून गेली... गोपिकांच्या गर्दीनं नंदगृह ओसंडून गेलं... आणि कृष्णजन्माच्या आनंदसुरांचा वर्षाव सुरू झाला...

... त्या दिवसापासून आजपर्यंत आपल्या जगात कृष्ण्जन्माचा सोहळा साजरा होतोय... रोज उगवणाया नव्या दिवसासोबत जगाचं रूपही नवंनवं होत गेलं. कृष्णजन्माच्या आनंदावर नव्या जगाच्या बदलत्या छटा उमटू लागल्या, आणि भक्तीच्या धसमुसळ्या, ‘प्रायोजित’ प्रदर्शनात, कृष्ण्जन्माच्या आनंदस्वप्नात बहरणारी सृष्टी कोमेजत गेली.

Wednesday, August 29, 2007

करूणा!!

‘संभवामि युगेयुगे’... लाख वर्षांपूर्वी कधीतरी, अर्जुनाला दिलेला हा ‘कानमंत्र’ अठरा अक्षौहिणी़मधल्या कुणीतरी ऐकला आणि केवळ ‘कानोकानी’ होऊनच आजवर घुमत राहिला. द्वापार युगापासून आजपर्यंत आम्ही निर्धास्त आहोत, ते तुझ्या या आश्वस्त ग्वाहीमुळेच! खरं तर, ‘पब्लिक मेमरी इज शॊर्ट’ हा आमच्या युगाचा मंत्र आहे. म्हणून तर आमचे आजचे मायबाप वारेमाप आश्वासने देत सुटतात, आणि जनांच्या कानापर्यंत पोहोचायच्या आधीच, ती हवेत विरूनपण जातात. जे लक्षात ठेवायला हवे, ते आम्ही विसरतो, आणि जे विसरायला हवे, ते आम्ही युगानुयुगे लक्षात ठेवून बसतो... तू कधीकाळी सांगून ठेवलंस, म्हणूनच, ‘विनाशाय च दुष्कुताम’ तू इथे अवतरणार, अशी आमची खात्री असते. म्हणूनच, जेव्हाजेव्हा, आमच्यावर ‘धर्मसंकट’ येतं, तेव्हातेव्हा आम्ही तुझ्या आगमनाकडे डोळे लावून बसतो. तूच आम्हाला संकटातून तारशील, या खात्रीनं आम्ही पामरं, तुझी पूजा बांधतो, देवळादेवळात जपजाप्य करतो, यद्न्ययाग करतो... परवा आमची निरागस मुलं हसताखेळता कुणाच्या तरी ‘दुष्क्रुता’मुळे तुझ्या दारी आली. तेव्हा त्यांच्यापैकी कुणकुणाच्या घरात, तुझी बासरीधारी तसबीर, पुराणकथांमधला तुझा तो निरागसतेचा भाव चेहेयावर घेऊनच आश्वस्त हसत होती...

कघीकाळी तू अर्जुनाला सुनावलेले ते खडे बोल, हजारो वर्षापूर्वीच कधीतरी ‘व्यासांचं उष्टं’ चिवडताना आमच्या हाती लागले, आणि आम्हीही ते कपाळी लावून ‘धर्मवाक्य’ मानले. तुझ्या त्या आश्वासनामुळेच आम्ही ते सगळंच्या सगळं ‘व्यासोच्छिष्ट’ उचलून ‘देवघरा’त दडवलं... तेव्हापासूनच आम्ही तुझ्या त्या आश्वासनाच्या भरवशावर भविष्याकडे पावलं टाकतो आहोत. ‘धर्मसंस्थापना’आधी ‘विनाशाय च दुष्क्रुताम’ अवतरणार, असंही तू त्या अर्जुनाला सांगितलं होतस. आमची स्मरणशक्ती ‘तोकडी’ असेल, तरीही ते आम्ही आज, लाखो वर्षांनंतरही विसरलेलो नाही. कारण, त्या आश्वासनामुळेच तर तू आमचा ‘देव’ झाला आहेस. नाही तर, घराघरातल्या तुझ्या त्या हसया, बासरीधारी तसबिरी आता खूप वर्षांच्या झाल्यात. उदबत्त्यांच्या धुरानं त्या काळवंडल्या पण आहेत. तुझ्या त्या ‘भगवद्गीते’ला कधीपासून गुंडाळलेलं लाल, रेशमी वस्त्रंपण आता जुनाट झालंय.

पण, तीच तुझी गीता मात्र, आमच्या युगात दिमाखानं मिरवतेय एका जागी... कारण, तिच्यावर हात ठेवून आम्ही काहीही बोललो, तरी ते ‘सत्य’ असतं. म्हणूच्नच या गीतेचा महिमा आम्हाला पटला आहे, म्हणूनच तुझ्या ‘किमये’वरचा आमचा विश्वास आणखी घट्ट झाला आहे. कधीकाळी, शिशुपालाचे ‘शंभर अपराध’ होईपर्यंत तू त्याला मोकट सोडलं होतस. आता युग बदललंय, ते आम्हाला मान्य आहे. महागाईपण वाढली आहे. ‘शंभरा’ला आजकाल फार किंमतही राहिली नाहीये. पण आता नवं काहीतरी परिमाण तू ठरवलं असशीलच. दुष्क्रुतांच्या घड्यात नव्या ‘शिशुपाला’ची किती पापं भरली पाहिजेत?

गेल्या आठवड्यात, म्हणजे, तुझ्या जगातल्या, क्शणभरापूर्वी आमची मुलं तुझ्याकडे गेली आहेत. तुझ्या छायेत तिथेतरी ती सुखरूप असावीत, असं आम्ही मानतो... आमच्या जगातल्या ‘दुष्क्रुतां’चे पुरावे अशा असंख्य निरपराध, निरगसांच्या रूपानं तुला रोजच्या रोज घरबसल्याच मिळत असतील. तुझ्या नारदाला त्यासाठी आमच्या जगात फेरफटके मारायची आता गरज राहिलेली नाही. शभराच्या जागी आता, करोडोचा हिशेब केलास, तरी, आमच्या ‘शिशुपालां’चे ‘घडे’ भरलेत, असं तुला अजूनही वाटत नाही?... तुझ्या हिशेबांचा थांग आम्हा पामरांना लागत नाही. तू येशील, तोवर आमच्या ‘मायबाप’ सरकारनं, अशा ‘शिशुपालां’साठी, ‘निषेधाचे खलिते’ लिहून तयार ठेवलेलेच आहेत...
----

Monday, August 27, 2007

एक दिवस...

पूर्व लाजरी
सोनेरी पहाट
फुलला दिवस
निळा प्रकाश...

भारवले ढग
विजांच्या रेषा
काळे पक्षी
जग भकास...

कुंद हवा
सरला साज
निजला दिवस
सांज उदास...

हसरा चंद्र
लखलख चांदण्या
चमचम तारे
धुंद आकाश...

Tuesday, August 21, 2007

मराठी माणूस

`मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं?

घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो... वाढतावाढता मूल आपल्या घराचे संस्कार उचलत असतं.

... घरातलं मूल खाणाखुणा ओळखून प्रतिसाद द्यायला लागतं, तेव्हा अवघ्या घराला आनंदाचं भरतं येतं. बाळाच्या प्रत्येक ‘पहिल्या कृती'चं कौतुक कसं करू, अन काय, असं प्रत्येकाला होऊन जातं... बाळ पहिल्यांदा हासलं, बाळानं खेळणं उचललं, बाळ टाळ्या वाजवायला लागलं... सगळ्याचा एक आगळा आनंद घराच्या भिंती ओलांडून ओसंडत असतो... बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात.... ज्या घरात हे अजूनही सहजपणे होतं, ते मराठी माणसाचं घर... तिथली माणसं इंग्लिश मिडीयममधून शिकलेली असली तरी...

खूप वर्षं झाली... आमच्या कोकणातल्या गावात आमच्या वर्गात मुंबईच्या इंग्लिश शाळेत शिकलेला एक मुलगा दाखल झाला. तेव्हा आम्हाला इंग्लिशची भीती वाटायची. लहानश्या त्या गावात, इंग्लिश जाणणारा एखाददुसराच कुणीतरी असायचा. अशा गावात, मुंबईच्या शाळेत, इंग्लिश शिकलेला मुलगा वर्गात आल्यामुळे आम्हा मुलांमध्ये त्याचा भाव एकदम वधारलेला होत. त्याच्याशी दोस्ती करण्यासाठी आमची स्पर्धा असायची... तोही, मुंबैच्या शाळेतल्या गमती सांगायचा, तेव्हा आम्ही भारावल्यासारखे कान देत असू...

आमचे गणिताचे सर त्यांच्या तासाला फळ्यावर एक गणित लिहीत, आणि वर्गातल्या एखाद्या मुलाला बोलावून ते सोडवायला सांगत. बकासुराच्या भोजनासाठी जाण्याची पाळी असलेल्या माणसासारखी आम्हा प्रत्येकाची अवस्था असायची त्या तासाला... तर, एका दिवशी सरांनी फळ्यावर गणित लिहिलं आणि या मुंबईकराला खूण केली... तो दिमाखात उठलाही... पण जागेवरून हलला नाही. सरांनी खुणेनच ‘काय’ म्हणून विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘सर, मला हे गणित सोडवता येणार नाही. माझं इंग्लिश मीडियम होतं...’

सरांनी गणित पुसलं, आणि तो विजयी मुद्रेनं खाली बसला... आम्ही सगळेजण त्याच्याकडे पाहात होतो. सरांकडे आमचं लक्षच नव्हतं. काही वेळानं सरांनी त्याला पुन्हा उभं केलं, तेव्हा आम्ही भानावर आलो... फळ्यावर मघाच्याच गणिताचे आकडे आणि अक्शरं होती... फक्त रोमन लिपीत!... आता तो घामाघूम झाला होता. ‘नाही येत’... एवढच काहीतरी बोलून तो मटकन खाली बसला. आम्ही पुन्हा त्याच्याकडे पाहात होतो.. पण तोपर्यंत आम्हाला वाटणारी मराठीची लाज पळाली होती.

दुसरा किस्साहि असाच आठवणीत आहे. आमच्या गावात नव्यानच कॊलेज सुरु झालं होतं. कोकणात तेव्हा शिवाजी विद्यापीठ म्हणजे, ‘मराठमोळं’ विद्यापीठ होतं. आम्ही कॊलेज एन्जॊय करत होतो, अन अचानक सरकारी फतवा आला. आमचं कॊलेज मुबई विद्यापीठाला संलग्न झालं होतं. पुन्हा इंग्लिश मीडियमच्या भीतीनं आम्ही धास्तावलो. काही शिक्षकांचीही तीच अवस्था होती. पण आम्हाला चॊईस होता. ते एक बरं होतं. एका शिक्षकानं आम्हाला निवडीचा सल्ला दिला... ते म्हणाले, ‘ मी मराठी मीडियम घेऊन एम. कॊम झालोय. माझा एक मित्र इंग्लिश मीडियम घेऊन एम. कॊम झालाय. मी आज एका चांगल्या कॊलेजमध्ये लेक्चरर आहे, आणि तोही कुठेतरी लेक्चररच आहे.’... आम्हाला खूप बरं वाटलं, आणि सहाजिकच, आम्ही मराठी मीडियमचा पर्याय निवडला...

आता विचार करतो, तेव्हा वाटतं, आम्ही तेव्हा मराठी `जगवली'? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल.

टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे?

Monday, August 20, 2007

"आई'

लोकल गाडी मिनिटभरासाठी त्या स्टेशनावर थांबली आणि ती दोघं लगबगीनं गाडीत चढली.
हातातल्या ऊबदार दुपट्यातलं तान्हुलं सांभाळत गर्दीतून वाट काढत ती आत आली आणि भराभरा सीटवरच्या प्रवाशांना सरकायला सांगत स्वतःसाठी जागा करून घेत हातातलं तान्हुलं तिनं अलगद मांडीवर ठेवलं...
पुढच्याच स्टेशनवर शेजारचीच एक जागा रिकामी होताच, दरवाजाशीच लोंबकळणाऱ्या नवऱ्यालाही तिनं बोलावलं, आणि स्थिरावल्याचं समाधान दोघांच्याही चेहेऱ्यावर उमटलं. हलक्‍या हातांनी तिनं बाळाच्या अंगावरची दुलई सारखी केली, आणि बाळाच्या गालावरून मऊशार हात फिरवून ती नवऱ्याकडं पाहात मंद हसली.
नवराही बाळाकडे कौतुकानं पाहात होता. नुकताच बहुधा डिस्चार्ज मिळाला होता तिला. हातातल्या पिशवीतलं दुपटी, थर्मास, आणि असंच काहीसं सामान सावरत नवरा तिच्याकडे पाहून हसला, आणि पुन्हा तिच्या चेहेऱ्यावर हासू फुटलं... त्या हसण्यातून फुलणारा मातृत्वाचा आनंद गाडीतल्या त्या एवढ्याश्‍या डब्यात मावत नव्हता. झोपलेल्या बाळाचा मुखडा न्याहाळणाऱ्या तिच्या मजरेत अपार मायेचा महापूर लोटला होता... हास्यातून मातृत्वाच्या कृतकृत्यतेचा आनंद भरभरून ओसंडत होता...आसपासच्या जगावरही आपला हा अवर्णनीय आनंद उधळून टाकावा, अशा हसऱ्या नजरेनं आजूबाजूला पाहाणारी तिची नजर पुन्हापुन्हा मांडीवरल्या तान्ह्यावर स्थिरावत होती... आपल्या या तान्ह्याला, "कुठे ठेवू अन कुठे नको',असं तिला झालं असावं, हे तिच्या देहबोलीतूनच जाणवत होतं.
..."गगनात न मावणारा आनंद' कसा असतो, त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण मी समोरच्या बाकावरून अनुभवत, न्याहाळत होतो, आणि या आनंदाच्या क्षणाला अवघ्या जगानं भागीदार व्हावं, असं तिला वाटत होतं... जन्माला आल्यानंतर पहिलाच लोकल प्रवास करणारं मांडीवरच ते इवलं तान्हंही, शांतपणे आईच्या कुशीत विसावलं होतं. त्या प्रवासात अगदी सहजतेने साजऱ्या होणाऱ्या एका स्वर्गीय मातृसोहळ्याचा मी साक्षादार झालो होतो...
पुढच्या एका स्टेशनवर पुन्हा मिनिटभरासाठी गाडी थांबली, आणि गर्दी थोडीशी ओसरून गेली. आता डबा काहीसा ऐसपैस झाला होता... नवऱ्याच्या आधारानं ती बाकावर सावरून बसली, आणि त्या चिमुकल्यासाठी हाताचा झोका करू लागली.
आईच्या आश्‍वस्त आधाराखेरीज कशाचीही जाणीव नसलेलं ते बाळ मात्र शांत झोपलेलंच होतं आणि एका अपार मातृत्वाला उधाण आलं होतं...
मातृत्वाची माया उधळण्यासाठी ती "आई' आतुर झाली होती...
गाडी पुन्हा सुरू झाली, तेवढ्यात केस अस्ताव्यस्त विस्कटलेल्या, मळकट कपड्यांतल्या दोन लहानग्यांनी पळतपळतच येऊन डबा पकडला, आणि खिडकीतनं सहज बाहेर नजर लावलेल्या त्या आईच्या उरात बहुधा कालवाकालव झाली.. नकळतच आपल्या बाळाला उराशी घट्ट पकडत तिनं क्षणभरासाठी डोळे मिटून घेतले आणि विपरीताच्या खुणा सभोवती नसल्याची खात्री होताच मंदपणे डोळे उघडून ती बाहेर बघू लागली.
त्या दोघीजणी एव्हाना डब्याच्या दरवाज्याशी उभ्या होत्या. ‘आई’च्या डोळ्यातली भीतीची छटा पुसली गेली होती, आणि पुन्हा तेच मायेचं हास्य चेहेऱ्यावर फुललं होतं...
त्या दोघींमधल्या "मोठी'नं हातातल्या दगडाच्या खापऱ्या सावरत कसलासा विचित्र "ताल' धरला, अनं हिच्या डोळ्यात पुन्हा कारुण्य उतरलं.
‘....बचपन के दिन ये, घडी खेलने की...' ती ‘मोठी' आपल्या हातातल्या खापऱ्या एकमेकांवर बडवत अर्ध्यामुर्ध्या शब्दांच्या साथीनं काहीतरी गुणगुणत होती, आणि ‘छोटी'नं डब्यातल्या एकाच्या पायावर लोटांगण घातलं होतं... भीक मागण्यासाठी लहानपणीच‘कमावलेल्या' केविलवाण्या नजरेनं, तोंडाकडे हात नेत आणि मधूनच पोटावर हात फिरवत ती करुणा भाकत होती.
काहीशा अवघडलेल्या त्या प्रवाशानं पटकन खिशात हात घालून रुपयाचं नाणं त्या "छोटी'च्या हातावर ठेवलं, आणि तिच्या चेहेऱ्यावर आनंदाच्या असंख्य छटा उमटल्या... हातातलं नाणं न्याहाळत बराच वेळ ती तशीच उभी होती, आणि समोरची ‘आई' स्वमग्न होऊन तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद न्याहाळत होती...
अचानक ‘मोठी'च्या हातातल्या खापऱ्यांचा नाद थांबला, आणि एका हातानं ‘छोटी'च्या झिंज्या धरून तिनं छोटीला भानावर आणलं... हातातलं नाणं मोठीच्या हातात देत ‘छोटी'नं पुढच्या प्रवाशाचे पाय धरले... आता ही ‘आई' आणखीनच करुण झाली होती. चटकन तिनं पिशवीत हात घालून एक छोटीशी कापडी पर्स काढली, आणि हाताला येतील तितकी नाणी "छोटी'च्या हातात कोंबली. नवरा आपल्याकडे अचंब्यानं बघतोय, आणि त्याच्या नजरेत काहीसा रागही मिसळलाय, याचं तिला तिळाइतकंही भान नव्हतं... क्षणात त्या छोटीनं त्या आईचे पाय धरले, आणि पायावर डोकं ठेवून ती तशीच बसून राहिली. मघाशी रुपयाच्या नाण्याकडे पाहाताना भीक मागायचं विसरलेली ती छोटी, आता हातातल्या पैशांकडेही पाहात नव्हती... बाजूला उभ्या असलेल्या मोठीच्या हातातला ‘ताल'देखील काहीसा मंदावला होता, आणि बेसुऱ्या आवाजातलं ते गाणं संथसंथ झालं होतं...
मांडीवरल्या बाळाकडे भरभरून पाहात त्या ‘आई'नं एका हातानं छोटीला उठवलं, आणि आपलं हास्य तिच्या नजरेत मिसळून उधळू लागली... ती छोटीही, एव्हाना धीटावली होती... अचानक ती त्या बाळाच्या आईला बिलगली... हातातली चारपाच नाणी बाकड्यावर टाकून तिचे चिमुकले हात बाळाच्या अंगावरल्या मऊशार दुलईवरून फिरत होते. बराच वेळ भान विसरल्यागत ती बाळाच्या दुलईवरून हात फिरवत राहिली, आणि ‘आई' एकदम दचकली. बाळाला मांडीवरून उचलून तिनं खांद्याशी घट्ट धरलं. छोटीकडे पाहातानाच्या तिच्या नजरेतला आईचा ओलावा मात्र तिळाइतकाही कमी दिसत नव्हता... छोटीचा हात एकदम थबकला, आणि तिनं त्या आईकडे पाहिलं. तिच्या चेहेऱ्यावरलं हासू पाहून ती सावरली, आणि तिचा हात पुन्हा पुढं झाला... ही ‘आई' अजूनही स्वप्नाळू नजरेनं छोटीकडे पाहात होती. कापडी पिशवीतलं सामान सावरत नुकताच बाप झालेला तो पोरसवदा तरुण एकदा छोटीकडे आणि एकदा बायकोकडे पाहात आजूबाजूच्या प्रवाशांच्या नजरांचाही वेध घेत होता... कुठल्यातरी झोपडपट्टीतलं आपलं घर नव्याच्या स्वागतासाठी सजवण्याची हौस त्याच्या नजरेतही उमटली होती... ‘आई'च्या अंगावरचा नवा कोरा, रस्त्याकडेच्या फुटपाथवरल्या कुठल्याशा दुकानातून घेतलेल्या नव्या, रंगीबेरंगी टिकल्यांची ‘एम्ब्रॉयडरी' काढलेला लाल रंगाचा पंजाबी ड्रेस त्याच्या हौशीची साक्ष देत होता. ‘छोटी'चे चिमुकले हातही त्या ‘ड्रेस'वरून हळुवारपणे फिरत होते... आणि ती ‘आई', शांत नजरेनं छोटीकडे पाहात तिची नव्या कपड्यावरून हात फिरवायची इच्छा मनसोक्तपणे पूर्ण करीत होती... नजरेतली माया अव्यक्तपणे उधळत होती.
एकेक स्टेशन पार करत गाडी धावतच होती, आणि अचानक ‘तो' उठला. हातातली पिशवी सावरत त्यानं तिलाही उठण्याची खूण केली, आणि बाळाला खांद्याशी घट्ट पकडत जडपणे ती उठली... अंगावरल्या नव्या ड्रेसवरली एम्ब्रॉयडरी कुरवाळत भान विसरलेले छोटीचे हात तिनं हळुवारपणे बाजूला केले, आणि पुन्हा आपलं आईभरलं हास्य तिनं छोटीवर उधळलं....
स्टेशनवर गाडी थांबली, आणि ती मागंमागं पाहातच खाली उतरली.
फलाटावर उतरली, तेव्हा ती आपलाच ड्रेस कुरवाळत होती... ‘छोटी'च्या हाताचा हळुवारपणा मनात साठवत होती... सहजपणे घडलेल्या, एका ‘आई'च्या दर्शनानं माझं मन तृप्त झालं होतं.
गाडीत उधळल्या गेलेल्या मातृत्वाच्या मागी राहिलेल्या सुगंधानं मी भारावून गेलो होतो...
खिशात हात घालून मीही एक नाणं छोटीच्या चिमुकल्या हातावर ठेवलं, आणि पुढच्या स्टेशनावर उतरायच्या तयारीनं सावरून बसलो.
डब्यातली तुरळक गर्दी मात्र नेहेमीसारखीच ‘तटस्थ’ दिसत होती...

Sunday, August 19, 2007

आमच्या "शहरी' श्रावणखुणा!!

आमच्या "शहरी' श्रावणखुणा!!

'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनि ऊन पडे'
..."श्रावणा'च्या कवितेतल्या या ओळी सहजपणे आठवाव्यात, असा श्रावण सध्या इथेही, आमच्या शहरातही बरसतोय. पहाटेच्या निळ्याशार आकाशातल्या पूर्वेला तांबडं फुटत असतानाच अचानक माथ्यावरच्या आकाशावरला एखादा काळा ढग हातपाय पसरायला लागतो आणि बघताबघता चारी दिशा कवेत घेतो. पूर्वेची लाली पार काळवंडून जाते, आणि पहाटस्वप्नातून जागे हाऊन किलबिल करणाऱ्या चिमण्यापाखरांची पळापळ सुरू होते. सिमेंटच्या जंगलातल्या एखाद्या कोपऱ्याला पत्र्याच्या आडोशाखाली काडीकाडी जमवून बांधलेल्या घरातून बाहेर पडून आताआत्ता घुमायला लागलेली जंगली कबुतरं भेदरल्यागत फडफड करत बसतात, आणि बिल्डिंगच्या आडोश्‍याला विसावून मिटल्या डोळ्यांनी आकाशाकडे माना लावून बसतात. पिवल्या फुलांचा बहर ओसरलेल्या बाहव्याच्या एखाद्या फांदीवरच्या एखाद्या विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त दिसणाऱ्या घरट्यातली कावळ्याची पिल्लं उगीचच कलकलाट करायला लागतात, आणि चहूबाजूंनी कावळ्यांचा एकच कल्ला सुरू होतो. बिचाऱ्या चिमण्या त्या कलकलाटातच कुठेतरी हरवून गेल्यासारख्या चिडीचिप होऊन पाऊस झेलायच्या तयारीत पंख फुगवून बदामाच्या झाडावरल्या एखाद्या रुंद पानाखाली आसरा घेऊन दडी मारतात, आणि काळवंडलेलं आकाश एकदम ओथंबल्यागत होऊन सरसरा जमिनीवर बरसायला लागतं... एक सणसणीत सर मिनिटभरासाठी कोसळते आणि घराघरातला पंख्याचा वेग काहीसा मंदावतो... दमट, घामेजलेल्या हवेला एक थंडशी शिरशिरी येते आणि जराकुठे गारगार वाटायला लागतंय, तोवर ती सर गडप होऊन पुन्हा उन्हाचे कवडसे घराच्या खिडक्‍यांमधून आत दाखल होतात. पुन्हा तोच घामट उकाडा सुरू होतो, आणि पंख्यांच्या वेग वाढतो... श्रावणसरींचं सुख अनुभवू म्हणताम्हणता त्या सरीच गायब होऊन जातात, आणि झाडाच्या पानांआड, पत्र्याच्या आडोशाने आणि काटक्‍यांच्या घरट्यात घाबरून बसलेली तमाम पाखरं पुन्हा पंख पसरून बाहेर पडतात. क्षणभराच्या काळोखीनं केलेली फजिती लपविण्यासाठी, जणू काहीच झालंच नाही, अशा थाटात पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो. आपल्या कोवळ्या पिल्लांवर डाफरल्यागत आवाज काढत कावळीही पुन्हा पंख पसरते, आणि मानेभोवती चोची खुपसून उगीचच साफसफाई केल्याच्या ढोंगात कबुतरं बुडून जातात. एखादं कबुतर मस्तपैकी गिरकी मारून पुन्हा येऊन विसावतं आणि घुमतघुमत, सारंकाही "आलबेल' असल्याचा इशारा देतं... मग अवघी फौज आकाशात भरारी मारायला पंख पसरते... एक काळा ढगच जणू एखाद्या इमारतीच्या भिंतीआडून आकाशाकडे झेपावतो...

महिन्याभरापूर्वीच्या पावसानं गॅलरीतल्या कुंड्यांमधल्या रोपट्यांना चांगले कोंब फुटलेले असतात. त्यामुळे, सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा कुंड्यांना पाणी घालायचं घरधनीणीचं एक काम कमी झालेलं असतं. श्रावण सुरू झाल्यापासून कोसळणाऱ्या अशा अवचित सरी मात्र, कुंडीतल्या या रोपट्यांना हुलकावणी देऊनच गायब होतात, आणि पावसाचे चुकार तुषार अंगावर झेलण्यासाठी आतुर झालेली ती कुंडीतली रोपटी, हिरमुसली झाल्यागत कोमेजली होतात. त्यातच, उन्हाचे सपकारे आणखी भर घालतात, आणि पावसाळ्याच्या हिरवाईचा तजेला अंगावर असतानाही, बाथरूमच्या नळाचं, प्लास्टिकच्या "मगा'तून खिडकीबाहेर आलेल्या हातानं ओतलेलं पाणी पिऊन बिचाऱ्यांना पुन्हा तरारावं लागतं. दोनचार दिवसांपासून फुलूफुलू म्हणणारी एखादी कळीदेखील या तरतरीबरोबरच हळूच उमलून जाते, आणि "निसर्ग' बहरल्याच्या आनंदानं घरधन्याला उकळ्या फुटतात. श्रावण-श्रावण म्हणतात, तो हाच असला पाहिजे, असं समजत, चहाचा वाफाळलेला कप हातात धरून, सिगरेटचे मस्त झुरके मारत, आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांचे मथळे न्याहाळत खिडकीच्या चौकटीतून फ्लॅटबाहेरच्या दहा बाय बाराच्या मोकळ्या जागेवर माळ्यानं केलेल्या बगीच्याचा तुकडा मनात साठवत तोही लहानपणीच्या आठवणीत दंग होऊन जातो. खिडकीच्या "फ्रेम'मधून दिसणारं हे हिरवाईभरलं रूपदेखील त्याला आपलंआपलंसंस वाटू लागतं, आणि "निसर्ग-निसर्ग' म्हणतात, तोही हाच असला पाहिजे, याची त्याला खात्री पटते. घरासमोरच्या बागेतल्या कृत्रिम हिरवळीतच तो "नैसर्गिक निसर्गा'चा अनुभव धुंडाळत राहातो, आणि बघताबघता त्यातच रमूनदेखील जातो...

शहरातल्या श्रावणछटांमध्येही निसर्ग शोधताना त्याच्या मनालाही अभिमानाचे धुमारे फुटू लागतात... आपल्या इथे बहरलेल्या या निसर्गालाही सौंदर्याची छटा आहेच, या अभिमानाने त्याचा ऊर भरून जातो, आणि त्यात रमणाऱ्या या निसर्गवेड्याला आपल्या घराभोवतीच्या हिरवाईचं प्रचंड अप्रूप वाटू लागतं... इथंही श्रावण सुरू झाला, की पक्षी किलबिल करतातच... "हॉल'च्या खिडकीबाहेर कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या दोऱ्यांवर पावसाचे थेंब पडून कपड्यांवर काळे डाग पडू नयेत, म्हणून वर तयार केलेल्या पत्र्याच्या टीचभर छपरावर पावसाचा तडतडाट होतो, तेव्हाही, पावसाचा "ताशा' वाजल्याचा अनुभव घेत सुखावूनही जातो... घराबाहेरच्या कुंडीतल्या सदाफुलीच्या एखाद्या रोपट्याची कळी खुलली, आणि तिच्या सदाबहार फुलावर या पावसाचे चारदोन चुकार थेंब विसावले, तरी त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि घरासमोरच्या "कंपाऊंड वॉल'शी लगट करणाऱ्या गुलमोहर, बाहवा आणि बदामाच्या झाडांच्या वेगवेगळ्या हिरव्या छटांमधून याचा श्रावण खुणावू लागतो... हिरवाईच्या या वेगवेगळ्या छटा त्याचं मन तृप्ततृप्त करून सोडतात, आणि त्या धुंदीतच हातातला चहा कप रिता करून "शॉवर'खाली उभा राहून एखादं आवडतं गाणं गुणगुणत, तो "न्हाऊन' निघतो... आपल्या समोरच्या निसर्गाच्या सौंदर्याकडे पाठ फिरवून आपण उगीचच कधीकाळी अनुभवलेल्या श्रावणाच्या आठवणीत रमलो, या जाणीवेनं त्याचं मन खंतावतं, आणि शॉवरच्या धारांना भिजलेले डोक्‍यावरचे ओले केस खसाखसा पुसतानाच, त्या जुन्या आठवणीही मनाच्या कप्प्यात बंद करायला तो धडपडू लागतो. आपण आता "इथले' झालो आहोत, याचं त्याला भान येतं आणि तो घराबाहेर पडतो...

संध्याकाळी ऑफिसमधून घरी यायच्या आधी चार क्षण निवांतपणे घालवावेत, म्हणून त्याची पावलं जुहूच्या समुद्राकडे वळतात, आणि वाळूत पहिला पाय टाकताच, वाऱ्याबरोबर वाहात आलेल्या एका प्लास्टिकच्या पिशवीचा पायाला विळखा पडतो... अथांग पसरलेल्या गर्दीतून समुद्राची एखादी, कोवळी, अस्पर्श, अवखळ लाट आपल्यापर्यंत येईल आणि पायाशी लडिवाळपणे घोळवत जुन्या, लहानपणीच्या ओळखीचं हसेल, म्हणून उगीचच तो गर्दीतून वाट काढत लाटांपर्यंत पोहोचायचा एक प्रयत्न करूनही पाहातो. पण फेरीवाले, आणि चटयांवर बसून भेळपुरी चापणाऱ्यांच्या "पर्यटनाच्या आनंदा'वर आपले "विरजण' नको, असा साळसूद विचार करत रस्त्याकडेच्या सिमेंटच्या बांधावरच टेकतो. समुद्राची ती लहानपणी कधी ऐकलेली निवांत गाज कानात साठवण्यासाठी याचे कान पुन्हा एकदा त्या दिशेला लागतात, पण नंतर तो हट्ट सोडून पश्‍चिमेला मावळणाऱ्या सूर्यबिंबाकडे टक लावून बसून राहातो...

... समुद्ररेषा आकाशाला भिडते, तिथवर नजर लावून कितीतरी वेळ बसलेला तो आता फक्त वर्तमानातच जगत असतो... सवयीनंच कधीतरी त्याला सांजवेळेची चाहूल लागते, आणि रस्त्यावर उजळलेल्या दिव्यांमुळे, रात्र झाल्याची जाणीव होऊन तो उठू लागतो... मानेभोवतीचा घाम हातातल्या रुमालानं खसाखसा पुसत तो बससाठी स्टॉपकडे वळतो, तेव्हा पुन्हा एक अशीच श्रावणसर अंगावरून सरसरून पुढे सरकते आणि आळसावलेलं त्याचं मन ताजंतवानं होतं... आता अंधार पडला असेल, म्हणून तो लहानपणीच्या सवयीनं आकाशाकडे पाहातो. आकाशातलं चमचमतं तारकादळ न्याहाळावं, चारदोन तरी चांदण्या मोजाव्यात म्हणून तो आकाश शोधू लागतो, पण आपण आता "इथले' आहोत, याची जाणीव होऊन तो पुन्हा रस्त्याकडे पाहात चालू लागतो. रात्रीच्या वेळी कधीतरी इथली वीज गेली, म्हणजे इथेदेखील चांदण्या मोजता येतील आणि जमिनीवर ओसंडणारं चांदणंही अनुभवता येईल, अशी मनाची समजूत काढत तो घर गाठतो... सकाळी कपड्यावर मारलेल्या कुठल्यातरी "इम्पोर्टेड स्प्रे'मध्ये आता घामाचा दर्पही मिसळलेला असतो.

... इतका घाम येऊनही, "स्प्रे'च्या खाणाखुणा अजूनही आहेत, या समाधानातच तो कपडे हॅंगरला अडकवतो, आणि तडक शॉवरखाली जाऊन न्हाऊन निघत "ताजातवाना' होतो....

Wednesday, August 15, 2007

अद्भुत ‘मातृसोहळा’!!


अंधार पडायच्या आधीच आसपास असंख्य पाखरांच्या किलबिलीचं संगीत सुरु होतं आणि एखाद्या कोंबड्याची बांग त्यात ‘र्‍हिदम’ पेरते... गोठ्यातल्या गायि-म्हशीचं लांबलचक हंबरणं आणि घराच्या पडवीतला पाडसाचा प्रतिसाद आतुरतेचे सूर आळवतात... रेडिओवरची ‘मंगलप्रभात’ पहाटेचं वातावरण पवित्र करते आणि या भारावलेपणातच आपण अंथरुणावरून उठून बाहेर पडतो.. जांभ्या दगडांच्या ओबडधोबड तुकड्यांनी बांधलेल्या ‘गडग्यां’च्या मधल्या रस्त्यावरून चालताना, बांबूच्या बेड्यापलीकडल्या एखाड्या दुपाखी कौलारू घरातली जागती चाहूल सकाळ झाल्याची जाणीव करून देत असते... ... आणि एका ‘जादू’चा अनुभव सुरू होतो... मागल्या दारीच्या अंगणात्ल्या ‘पाणचुली’वर उकळणार्‍या पाण्याचा खमंग वास परमळत असतो... दुधाच्या कासंड्या घेऊन ‘वाड्या’कडे ये-जा करणार्या घरधन्याच्या हालचाली टिपताना पडवीतल्या पाडसाची धडपड वाढत जाते... गोठ्याकडून येणार्‍या प्रत्येक हंबरण्याबरोबर कान टवकारणारी पाडसं टपोर्‍या डोळ्यांनी मालकाची लगबग टिपत अस्वस्थ होतात, आणि ‘दावं’ सुटताच, वाकड्यातिकड्या उड्या मारत आईच्या ओढीनं गोठ्याकडे धाव घेतात...

.... मग सुरु होतो, एक अद्भुत ‘मातृसोहळा’!!

... कोवळी, सोनेरी उन्हं कौलारू घरांवर आणि केंबळी वाड्यांवर पसरतात आणि कोकणातलं ते खेडं जागं होतं... रात्रीच्या ‘पसार्‍या'ला गेलेली जनावरं टम्म फुगल्या पोटांचा जडपणा सावरत समाधानानं गोठ्याकडं परतत असतात... कमरेच्या कोयंड्याला कोयता अडकवून हिरव्या चारीचा भारा रानातून आणण्यासाठी बापये गडी तयार होत असतात आणि वाफाळलेला भात अन कुळदाच्या पिठीची गरमगरम न्ह्यारी स्वैपाक्घरात रटरटायला लागते... मागल्या पडवीवर पत्रावळी लावल्या जातात आणि परसभरात सगळीकडे कुळदाचा खमंग वास दरवळतो... विहीरीवरच्या रहाटाचे एकसुरी फेरेही एव्हाना सुरू झालेले असतात. कामावरची ‘बायामाणसं’ ‘चा’ पिऊन, ‘कोप’ धुवून परड्यातल्या फोपळींना पाणी ‘दाखवाला’ दाखल होतात आणि न्याहरी आटपून एक जथ्था रानाकडे रवाना होतो... इकडे लख्ख सारवलेल्या अंगणाचे केरवारे सुरू होतात, कुठे घरतल्या सारवणाची तयारी सुरू होते, कुणी सारवण झालेल्या अंगणात रांगोळी घालू लागते. देवघरातल्या घंटेचा किणकिणाट सकाळची प्रसन्नता आणकीनच खुलवतो...

उन्हं चढत जातात... पहाटे संगीत पेरणारा पाखरांचा कलकलाट मंदमंद होत कानाआड जातो आणि कोकणातलं ते अवघं गाव कामाधंद्याला लागतं... खाडीकिनारी तालुक्याला जाणार्‍याची गर्दी सुरू होते आणि तरीतून पलिकडे जाण्यासाठी नंबर लागतात... पलीकडची एस्टी भरते आणि त्याच किनार्‍याला ‘तर’ विसावते. गर्दी ओसरते आणि खाडीचे मंद, संथ पाणी विश्रांती घ्यायला लागते... सकाळपासून ताजीतवानी झालेली काठावरची माडंझाडं एकएक करून खाडीच्या आरश्यात स्वत:चं रूप न्याहाळत वार्‍याबरोबर डुलायला लागतात... बाजूच्या वेळूच्या बनाची सळसळ सुरू होते आणि त्या ‘आनंदसणा’त आंब्ये-फणसपण सामील होतात... पहाटेची तीच टवटवी, उन्हं डोक्यावर आली, तरी तशीच ताजीताजी असते... दुपारी जेवणं आटपली, की सगळीकडे चारदोन तासांची निजानीज होते, आणि गाव थोडासा सुस्तावतो... संध्याकाळी, तिन्हिसांजेला पुन्हा पहाटेचे सूर गावात घुमायला लागतात... रात्री मिणमिणत्या विजेत कुठे भजनं रंगतात, घराघरात देवाधर्माचे विधी सुरू होतात, चंदन-धुपाचा गंध अवघा गाव व्यापून ताकतो, ... आणि, काही वेळात, निजानीजही होते... पुन्हा गाव शांतशांत होऊन पहुडतो...

कोकणातल्या कुठल्याही गावात आजही हेच चित्र दिसतं म्हणूनच, कोकण ही आजही एक ‘अपूर्वाई’ आहे... सकाळी दरवज्याला भैयानं लटकावलेल्या ‘पिशवीच्या दुधा’चा वाफाळलेला कप तोंडला लावताना ‘कार्टून नेट्वर्क’वरचा स्कूबी शो बघणर्‍या मुलांसाठी, कोकणातलं खेडं हा एक जिवंत चमत्कार आहे. चारदोन दिवसाची सुट्टी घ्यावी आणि कोकणातल्या कुठल्यातरी गावी मुक्काम ठोकावा... तरीतून खाडी पार करण्याचा आणि बैलगाडीच्या सफरीचा आनंद काय असतो, गायीची ‘पाडी’, ‘लुचते’ कशी, आपण पिशवीतून पाहातो, ते दूध कोण देतं, ते काढतात कसं, मार्केटातल्या भैय्याच्या टोपलीतली हिरवीकंच भाजी कुठल्या झाडांना लागते, झाडावर लटकताना ती कशी दिसते, आंब्या-फणसाची झाडं कशी असतात, काजू कसा भाजावा, कसा फोडावा आणि कसा खावा... फणसाचे गरे कसे ‘गट्टम’ करावेत आणि आख्खा हापूस कसा चोखावा, शेत कसं नांगरावं, अनवाणी पायांनी डोंगरकपारी कशा तुडवाव्यात... सगळंसगळं, ‘याचि देहि’ अनुभवण्यासाठी, कोकणाला पर्याय नाही.... कोकण हे सगळ्या अनोख्या, आणि अनेक अननभूत आनंदाचं उत्तर आहे...

टीव्हीवरच्या एखाद्या कार्यक्रमात पाहिलेली अन ऐक्लेली समुद्राची निवांत गाज अनुभवायची असेल, तर कोकणाचा किनाराच गाठायला हवा.. रात्रीच्या वेळी, झाडाझुडुपांच्या गर्दीतून वाट काढत जामिनीवर सांडणारं चांदणं पाहायचं असेल, तरीदेखील कोकणालाच पसंती द्यावी, आणि आकाशातला चांदण्याचा पसारा मोजायचा असेल, तरी, कोकणच खरं...

आजकाल कोकणाचा कायापालट होतोय... निसर्गानं भरभरून दिलेलं हे दान, जगानं अनुभवावं, आणि जागाच्या समाधानासोबत आपल्या गाठीशी थोडी ‘माया’ही गोळा व्हावी,असा ‘व्यवहारी’ विचार आजकाल कोकणात सुरू झालाय. आता पहिल्यासारखं कुणाच्याही घरातला गुळपाण्याचा पाहुणचार कदाचित आपल्या वाट्याला येणार नाही. बाहेरच्या, पडवीवरच्या दुकानातलीच एखादी ‘बिस्लेरी’ विकत घेऊन आपल्याला तहान भागवावी लागेल... पाहुणचारासाठी पैसे मोजावे लागतील... कारण आता पाहुणचाराला व्यवसायाची आणि व्यवहाराची जोड मिळाली आहे... कोकणाचा कॆलिफोर्निया करायचं एक स्वप्नं कित्येक व्र्षांपासून कोकणानं उराशी जपलं होतं... आता कॆलिफोर्नियाचा अर्थ कोकणाला उमगलाय... कोकणात नुस्ताच कॆलिफोर्नियाच नव्हे, नंदनवन फुलवण्याचं एक स्वप्न साकारतंय...

कोकण आपली वाट पाहातय... येवा... कोकण आपलंच आसा!

तुम्हाला काय वाटतं?

...‘डेथली हॆलोज’ला जगभरातून मिळालेल्या अपेक्षित अशाच अभूतपूर्व प्रतिसादानंतर जे. के. रोलिंग यांनी लेखणी खाली ठेवली असली तरी फॆन्ट्सीच्या अद्भुतरम्य जगात रममाण होणाया बालविश्वावर हॆरी पॊटरच्या सातही आवृत्त्यांचे गारुड यापुढेही अनेक वर्षे कायम राहणार आहे. ‘हॆरी पॊटर’ हा साहित्याविश्वातला एक चमत्कार आहेच, आणि आजचे गतिमान ग्लोबलायझेशन आणि मार्केटिंगची जादू यांमुळेच हा चमत्कार साध्य झाला आहे. जग चारपाच दशकांपूर्वी आजच्यासारखे जवळ आले असते, तर ?....

तर त्या वेळी मराठी बालविश्वाला आपल्या जादूई करामतींनी भारावून टाकणाया ‘बनेश फेणे’ नावाच्या फुरसुंगीच्या ‘फास्टर’नेही मराठीच्या सीमेपारचे बालविश्व झपाटून टाकले असते... भा. रा. भागवत नावाच्या लेखकाच्या भन्नाट मेंदूतून जन्माला आलेला हा बनेश फेणे, म्हणजे ‘फास्टर फेणे’ ऊर्फ ‘फा-फे’, पुढे मुलांबरोबरच त्यांच्या आईवडिलांचाही हिरो झाला. आज पॊटरच्या जादूने मुलांच्या जगाला वेड लावलंय, तसं वेड तेव्हा ‘फा-फे’नं मराठी घराघरात लावलं होतं. साहित्याच्या विश्वसंचाराचे आजचे दिवस साठाच्या दशकातच उजाडले असते, मराठमोळ्या घरांच्या सीमा ओलांडून बाहेर पडायचे मार्ग तेव्हा सापडले असते, तर, कदाचित फुरसुंगीचा हा फा-फे देशाच्या सीमेपलीकडेही पराक्रम गाजवून आला असता...

बालविश्वात ‘फॆण्टसी’ला असलेलं स्थान ओळखून जगभरातल्या करमणूक अणि साहित्यक्षेत्रानं गेल्या काही वर्षात या विश्वाला पोषक अशी निर्मिती करायला सुरुवात केली. पण अशा अदभूताच्या दुनियेला साहित्यविश्वात आपल्याकडेही अगदी पुराणकाळापासून मानाचं स्थान होतं. इंग्रजी भाषांमधल्या ‘कॊमिक्स’चा मराठमोळ्या घरातही सहज संचार सुरू झाला आणि या कल्पना चित्रमय रूपात मराठी बालकांसमोर साकारू लागल्या. भारतात ‘इंद्रजाल कॊमिक्स’, ‘अमर चित्रकथा’ यांच्या सोबतच ‘चांदोबा’ची वेगबेगळी रूपे घरोघर दिसू लागली. इसापच्या कथा आणि सिंदबादच्या सफरींनीही बालकांना वेड लावलं. पण, काळानं त्यांच्या भराऱ्यांना लगाम घातला. नंतर मात्र, अमेरिकेत जन्माला आलेला हॆरी जसा मराठी घराघरात ‘घरच्यासारखा’ झाला, तसा प्रयत्न ‘चित्रकथां’च्या नायकांनीही केला... भारताच्या बालविश्वाला रमवणाऱ्या ‘चित्रकथां’नी आपल्या परंपरागत भाषांचा उंबरठा ओलांडला आणि जगाच्या भाषेला आपलंसं केलं.


मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषांमधे अदभुतरम्य साहित्याची कधीच वानवा नव्हती. पण संस्कृतीच्या बंधनांनी या साहित्याला ‘पुराणकथां’मध्ये बांधून ठेवलं. आज हनुमान आणि गणेशाचे ऍनिमेशनपट तयार झाले, आणि पुराणकथांमध्ये ‘बंदिस्त’ झालेले हे बालनायक फॆन्टसीच्या दुनियेतही लोकप्रिय झाले. त्याना देवांच्या जगातून बाहेर आणून मुलांच्या विश्वात बसवलं असतं तर?...

तुम्हाला काय वाटतं?

`हरवलेला' श्रावण!...

`हरवलेला' श्रावण!...

बसमधून उतरून रेल्वे स्टेशनातल्या फलाटावर पोहोचण्यासाठी रस्ता क्रॉस करायची वाट पाहात असतानाच अचानक पावसाची एक सर अंगावरनं सरसरत पुढे सरकली, आणि "श्रावणा'च्या जाणीवेनं मन क्षणभरासाठी सुखावून गेलं... मुंबईतल्या श्रावणाची छटा मुंबईवर आजूबाजूला उमटत नाही. श्रावणाचा पहिला दिवस काही फारसं वेगळं रूप घेऊन येतो, असं इथल्या सिमेंटच्या जंगलात आजवर कधी जाणवलेलंच नाही. नेहमीचाच दिवस, कामाची गडबड, ट्रेनची गर्दी, बसच्या रांगा आणि डबे-पिशव्या सावरत गाडी पकडण्यासाठीची धावपळ... बारा महिन्यांच्या या कसरतींनी श्रावणाच्या या सरीचं अवघं अप्रूप खरं म्हणजे कधीचंच धुवून टाकलेलं. पण आजच्या या अवचित सरीनं मात्र मन कधीकाळच्या "श्रावणभरल्या' आठवणींनी भिजून गेलं, आणि ओथंबतच ते कोकणातल्या हिरव्याकंच गावात पोहोचलं...
धावातधावत गाडी पकडल्यानंतर गर्दीभरल्या गाडीत स्वतःला कसंबसं कोंबून टाकलं, आणि पावसाच्या सरीनं भिजलेल्या कपाळावर साचलेले घामाचे तेवढे थेंब रुमालाच्या टोकानं टिपत त्या आठवणींचा चित्रपट उलगडू लागलो...
गावाकडच्या श्रावणी सोमवारला तेव्हा दिसणारी सोनेरी उन्हापावसाची लोभस किनार आठवत मी लहानपणीच्या त्या दिवसांत पोहोचलो, आणि पहाटस्वप्नासारखा "तो' श्रावण मनात झिम्मा खेळायलापण लागला... कुठूनतरी रानातल्या गुराख्याच्या वेळूचे गिरक्‍या घेणारे स्वर कानात घुमायला लागले आणि मधूनच मोरा-राव्यांच्या कलकलाटाची साथ डोक्‍यात झिरपायला लागली... पावसाच्या शिडकाव्यासोबत पत्र्याच्या छपरावर वाजणाऱ्या ताशाच्या तडतडाटाचे आवाजही स्पष्ट झाले आणि एका उत्कट "सणा'चा साज मनावर आपोआपच चढायला लागला...
त्या वेळी वर्षभरातल्या शनिवारची सकाळची शाळा श्रावणानं मात्र हवीहवीशी करून टाकली होती. "संपत शनिवार'च्या प्रतीक्षेत वेळी शुक्रवारची रात्र पहाटेची वाट पाहातच संपायची आणि पहाटेच्या मंद उजेडात पसरलेला पाणचुलीचा खमंग धूर एका वेगळ्याच आनंदाचा भागीदार करून घ्यायचा. शेजारच्या काकूंकडे अभ्यंगस्नान करून नंतरचे वाटीभर दूध-गूळपोहे रिचवत दक्षिणेपोटी मिळालेली पावली खिशात मिरवताना, आपल्या कमाईचा आनंद मी शाळाभेर उधळायचो, आणि शेजारच्या वाडीतल्या गण्या संध्याकाळच्या चण्या-फुटाण्यासाठी दिवसभर मागेमागे करताना माझा जणू रक्षणकर्ता होत इतरांवर डाफरायचा... श्रावणाच्या त्या दिवसांतच बहुधा ऑगस्टही उजाडलेला असायचा... पंधरा ऑगस्टच्या प्रभातफेरीची आणि झेंडावंदनाची तयारी आणि प्रत्येक दिवसाच्या व्रतवैकल्यामुळे घरात साजरा होणारा श्रावणसण सगळ्या घरावरच उत्साहाचा गालीचा पसरायचा. सोमवारी गावाबाहेरच्या डोंगरशिखरावरच्या महादेवाच्या दर्शनाला गावातल्या लहानथोरांची रीघ लागायची आणि तो हिरवाकंच डोंगर लहानथोरांच्या कोऱ्याकोऱ्या कपड्यांच्या रंगीवेरंगी ठिपक्‍यांनी सजून, नटून गेलेला गावातून दिसायचा... संध्याकाळी दिवेलागणीच्या आधीच घराघरात शिजलेल्या जेवणाला त्या दिवशी फक्त "प्रसादा'चीच चव असायची. शिखरावरच्या महादेवाच्या "पुजारीपणाचा' मान फक्त श्रावणी सोमवारीच दिमाखानं मिरवणाऱ्या लिंगायत किंवा गोसावी गुरवाची त्या संध्याकाळी घराघरात प्रतीक्षा व्हायची, आणि त्याच्या टोपलीत प्रसादाचं पान पडलं, की मगच घराघरातल्या पंगती व्हायच्या...
मंगळवारचा दिवस म्हणजे अवघ्या गावाचा सण... उत्साहाचं भरतं घेऊन उजाडणारा मंगळवार त्या दिवशी मावळायचाच नाही... एखाद्या घराच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून गृहप्रवेश केलेल्या नवागत विवाहितेला गावातल्या अवघ्या महिलावर्गाची ओळख घडविणारा आणि त्यांच्यात समावून घेणारा हा मंगळवार, संध्याकाळी खऱ्या अर्थानं सळसळून जायचा... एखाद्या घरातल्या मंगळागौरीच्या पूजेची धांदल सगळ्या गावातल्या घराघरात सुरू व्हायची आणि रात्र सुरू होताच माजघरातल्या फुगड्या उखाण्यांच्या आवाजानं आख्खं गाव जागं राहायचं. घराबाहेरच्या पत्र्याच्या मांडवाखाली पेट्रोमॅक्‍सच्या बत्तीच्या झगमगाटात पुरुषांचं पत्ते कुटणं सुरू व्हायचं आणि फराळाच्या रिकाम्या होणाऱ्या ताटांसोबत रात्र सरकत राहायची... अंधारालाही मग जाग यायची. झोपलेला अंधार लपेटून सुस्तावलेले गावातले रस्तेही मध्यरात्रीनंतरची लहानमोठ्यांची वर्दळ न्याहाळत ताजेतवाने व्हायचे, आणि बुधवारचा दिवऽसभर पेंगुळल्यासारखे सुस्त पडून राहायचे. मंगळागौरीच्या जागरणानं त्या दिवशी गावातल्या घराघरातले डोळेही पेंगत राहायचे...
. नागपंचमीला नागाच्या मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी घराघरातल्या तमाम बालकसृष्टीची नुसती चढाओढ व्हायची, वर्षभरातल्या एखाद्या दिवशी नुसत्या चाहुलीनंदेखील अवघ्या गावाला अस्वस्थ करणारा हा पाहुणा त्या दिवशी पूजेचा मान मिरवत देवघराजवळची जागा पटकावायचा... संध्याकाळी घरामागच्या परसदारातल्या अळूच्या बनात मग त्याचं समारंभपूर्वक प्रस्थान व्हायचं...
... त्या दिवसांत अवघ्या गावाला पावसाच्या नव्यानव्या लहरींची ओळख व्हायची... गावाबाहेरच्या रानालगतच्या शेतातली भाताची पिकं पावसानंतरच्या सोनेरी उन्हांसारखीच चमकदार छटा पांघरून वाऱ्याबरोबर लाटांसारखी झुलायची, आणि शेताच्या बांधावरच्या तिळाच्या पिवळ्या फुलांची रांग त्या झुल्याला गडद झालर लावून तो सजवायची. घराबाहेरच्या झेंडूंना आणि मखमलीच्या फुलांना पिवळा-सोनेरी बहर आलेला असायचा, आणि गावाबाहेरच्या शेतांमधल्या दूधभरल्या पोटरीतल्या भाताच्या दाण्यांचा खमंग वास घेऊन गावात गिरक्‍या मारणाऱ्या वाऱ्यानं अवघा गाव दरवळून, परमळून जायचा. झोडपून काढणाऱ्या पहिल्या पावसात संतापल्यासारख्या तांबड्यालाल रूपानं फणफणत वाहणाऱ्या झऱ्या-पऱ्ह्यांचे प्रवाह निळाईनं भरलेलं निळं रूप धारण करून शांतपणे वाहायचे, आणि गावाबाहेरच्या डोंगरावरच्या हिरव्याशार गवतांचे गालिचे गायीगुरांना तृप्त करून सोडायचे... रात्रीच्या चांदण्यात गाईगुरांना घेऊन गावाबाहेरच्या कुरणात "पसारा' घालण्याचा तरुणाईचा एक उद्योग तेव्हा भलतीच मजा आणायचा... आपल्या कुरणात रात्री भलताच कुणीतरी गायीगुरं घालतो, हे माहीत असूनसुद्धा कुणी कधी कुणाशी भांडायचा नाही...
श्रावणाआधीच्या दोन महिन्यांत धुवून चकचकीत झालेलं गाव, गावाबाहेरचे डोंगर, झाडंझुडपं आणि पक्षी-प्राणी श्रावणाच्या दिवसांत जणू नवी चमक घेऊन वावरायचे... गावाबाहेरच्या देवराईतल्या मोरांच्या आवाजातली एका नव्या आनंदाची, उत्साहाची झालर सहजपणे अनुभवायला मिळायची... पावसाच्या पहिल्या शिडकाव्यातच तरारलेले असंख्य कोंब एव्हाना वेलींच्या रूपानं झाडाझुडपांना विळखा घालत फुलाफळांनी लगडलेले असायचे, आणि काकड्या-पडवळांच्या मांडवांनी घराघरांची अंगणं सजून जायची. घराघरातल्या मुलामाणसांच्या बरोबरीनं, गावातला आणि गावाबाहेरचादेखील हिरवाकंच निसर्गदेखील श्रावणाचा प्रत्येक दिवस, "साजरा' करायचा...
------------- ----------------
गेले दोनतीन महिने मुंबईत पावसाच्या सरी कोसळतायत... एका पावसाळ्यानं मुंबईच्या काळजात भरवलेली धडकी अजूनही धडधडतेय. पावसाची एखादी सर जरा जास्त वेळ विसावली, की पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या होतात, आणि कधी एकदा ती सर थांबते, अशी अस्वस्थ, मनाला न पटणारी स्थिती मनात घर करते. गावाकडच्या लहानपणीच्या त्या पावसाच्या आठवणी अजूनही मनात सतत बसरत असताना, इथे मात्र, पाऊस थांबावा, असा विचित्र विचार मनाला पोखरत राहातो...
------ --------
...लहानपणी आईचं बोट धरून मी पहिल्यांदा आमच्या कोकणातल्या त्या नव्या गावात एस्टीतून उतरलो, तेव्हा असाच धुवांधार पाऊस कोसळत होता... देशावरच्या आमच्या गावातल्या पावसापेक्षा हे रूप खूपच वेगळं असल्यानं मी घाबरून गेलो होतो. हाताच्या पंज्यांनी डोक्‍यावर "छत्री' करून मी धावतच एस्टी स्टॅंडच्या बाजूला पत्र्याच्या शेडखाली उभा राहून हा नवखा पाऊस थांबायची वाट पाहात होतो, पण त्यानं आमच्या कंटाळल्या मनाला दादच दिली नाही, म्हणून तसाच चालत निघालो... तेवढ्या भिजण्यातच त्या पावसाशी माझी मैत्री झाली आणि नव्या घरात, सगळ स्थिरस्थावर होईपर्यंतच्या दिवसांत खिडकीच्या गजाबाहेर हात काढून तळव्यांवर पागोळ्यांच्या धारा झेलायच्या खेळानं मला वेड लावलं... दिवसदिवस चालणाऱ्या या खेळात, खेळकरपणे तळव्यांना गुदगुल्या करणाऱ्या पाऊसधारांनी मला इतकं आपलं केले, आणि तो पाऊस इतका "ओळखीचा' झाला, की घराबाहेर पडताना आकाशाकडे नुसतं बघूनच पावसाचा वेध घ्यायची खास कोकणी नजरदेखील मला सहज मिळून गेली...
त्या वेळी, पहिला पाऊस सुरू झाला की तो थांबेपर्यंतचा काळ, म्हणजे "पावसाळा' असायचा. कधी रिपरिप, कधी ठोंब, आणि कधी सरी अशा नव्यानव्या मुखड्यांना कोसळणाऱ्या त्या पावसात कधीतरी आपली "उघडीप' दिसली, तरी हवेत तरंगणारे भुरुभुरू कण अंगाशी लगट करीतच राहायचे. श्रावणात मात्र हा पाऊस जरासा खोडकर व्हायचा, आणि गावाबाहेरच्या माळावर उभं राहिल्यावर लांबवरनं येतानाच दिसायचा... अशी सळसळती सर धावतच अंगावर यायची आणि छत्री उघडूउघडू म्हणेपर्यंत अंगावरून सरसरत पुढेदेखील सरकायची... अंगावरच्या थेंबांचा ओलावा नंतरच्या उन्हात चमकत राहायचा... ओली माती आणि त्यावरची मोहोरलेली, फुलरंगांनी बहरलेली रोपटी, पुन्हा तरारून उठायची, आणि सहज चाळा म्हणून, एखाद्या काटकुळ्या काठीनं जमिनीत बोटभर उकरल्यानंतर एखादा लपलेला झरा हा हा म्हणता वर येऊन वाहायलादेखील लागायचा... सगळीकडे फक्त पावसाळ्याच्या, पावसाच्या जादूभरल्या करणीनं भारल्यासारखं वातावरण असायचं...
----- -------
.... आज बऱ्याच दिवसांनी, कोकणातल्या त्या गावातल्या श्रावणाच्या आठवणी, त्या मातीत लपलेल्या झऱ्यासारख्या वर आल्या आणि खळाळून वाहायला लागल्या...
....आता अवघा श्रावण मोहरलेलाच राहणार!

Saturday, August 4, 2007

वासूचे ‘वस्तु’शास्त्र...
सकाळपासून घर नुसतं धुमसत होतं. कशावरून तरी बायकोचं बिनसलं होतं. पण वासु शांत होता. घरात नेहमी धुसफूस व्हायला लागल्यावर, काही वास्तुदोष तर नाही ना, हे पाहण्यासाठी वासुनं संजूबाबांना वर्तमानपत्रात पत्र लिहिलं, आणि संजूबाबाचं उत्तर आल्यावर ती पिशवी समोरच्या खुंटीवर अडकवून ठेवली.घरातल्या कटकटींना वैतागलेल्यांना संजूबाबा त्यांच्या वास्तुशास्त्राच्या सदरातून सल्ला देतात आणि एकदम जालीम उपाय सुचवतात असं ऑफिसातल्या कुणीतरी त्याला सांगितलं होतं.घरातल्या भांडणापासून मुक्ती हवी असेल, तर दोघांची मिळतीजुळती आठवण असलेली एखादी वस्तू समोरच्या खुंटीवर टांगून ठेवा, असं संजूबाबांनी सुचवलं, तेव्हा पहिल्यांदा अशी कोणतीच वस्तू वासूला आठवेना.विचार करताकरता अचानक वासूचं लक्ष कोपऱ्यातल्या खुंटीकडे गेलं...एक मळकट, जुनाट पिशवी तिथे धूळ खात पडली होती. त्या पिशवीचा इतिहास आठवून वासुचे डोळे अचानक चमकले आणि पिशवीवरची धूळ झटकून त्यानं ती समोरच्या खुंटीवर अडकवली.वासूचा हा उद्योग सुरू असताना पुन्हा बायको बाहेर आली, आणि फणकाऱ्यानं खुंटीवरच्या पिशवीकडे पाहून एक जोरदार हुंकार देत ती आत वळली.वासूनं पुन्हा त्या पिशवीकडं पाहीलं. बायकोलाही ती पिशवी चांगलीच लक्षात राहिली होती, हे त्यानं ओळखलं.बायकोच्या चिडण्यामुळे आपण आता अजिबात अस्वस्थ नाही, असा अनुभव वासूला लगेचच आला. त्यानं मनात संजूबाबाचे आभारही मानले.तेवढ्यात वासूचा मुलगा समोर येउन बसला आणि ठरल्यासारखं त्यानं मुलाला लाकूड्तोड्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली...जंगलातनं लाकडं घेऊन येताना एका लाकूडतोड्याला तहान लागली, म्हणून वाटेवरच्या विहीरीतून पाणी काढण्यासाठी तो हातातली कुऱ्हाड बाजूला ठेऊन वाकला, तेवढ्यात कुऱ्हाड विहिरीत पडली. लाकूडतोड्या रडायला लागला. तेवढ्यात प्रत्यक्ष देव विहिरीतून वर आला.समोर खुंटीवर लटकणाऱ्या पिशवीकडे पाहात वासू गोष्ट सांगत होता...देवाच्या हातात सोन्याची कुहाड होती. त्यानं लाकूड्तोड्याला विचारलं, ‘हीच का तुझी कुऱ्हाड?’लाकूड्तोड्यानं रडतच मानेनंच नाही म्हणून सांगितलं आणि तो पुन्हा रडायला लागला...मग देवानं चांदीची कुऱ्हाड आणली. लाकुड्तोड्या पुन्हा नाही म्हणाला, म्हणून त्यानं लोखंडाची कुऱ्हाड आणली.लाकूडतोड्या लगेच म्हणाला, ‘हीच माझी कुऱ्हाड’... लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणावर देव खुश झाला, आणि त्याला सोन्याची आणि चांदीचीपण कुऱ्हाड बक्षीस देऊन अंतर्धान पावला.... गोष्ट सांगून संपली तरी वासूचं मन गोष्टीतच अडकलं होतं. मधेच त्याची नजर खुंटीला टांगलेल्या पिशवीकडे वळत होती... विचार करताकरता त्याचा डोळा लागला..----------संध्याकाळची वेळ होती. बायकोबरोबर वासू गावाबाहेर फिरायला गेला होता, बायकोही खुशीत दिसत होती, म्हणून वासूनं सहज तिच्या माहेरचा विषय काढला. आणि अचानक काहीतरी बिनसलं. बायको थबकून रस्त्याकडेच्या विहिरीच्या कठड्यावर बसली.
वासू तिच्याजवळ गेला आणि तिची समजूत काढू लागला. पण तिनं मान फिरवली... आणि... अचानक तोल जाऊन ती विहिरीत पडली...वासू प्रचंड घाबरला. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. आकाशाकडे पाहात नकळत त्यानं हात जोडले...तेवढ्यात कडकडाट झाला. बायकोच वर आली, असे वाटून वासूनं विहिरीकडे पाहिलं.पण ती बायको नव्हती. प्रत्यक्ष देवच विहिरीतून वरती आला होता. वासू पुन्हा व्याकूळ झाला.ते पाहून देव पुन्हा विहिरीत गेला. वरती आला, तेव्हा त्याच्यासोबत एक रूपवान स्त्री होती. भारावल्यासारखा वासू तिच्याकडे पाहात राहिला.हीच का तुझी बायको?’ देवानं विचारलं आणि वासू भानावर आला. त्याला लाकूड्तोड्याची गोष्ट आठवली... बायकोचा रागानं फणफणलेला चेहेराही त्याच्या नजरेसमोर आला आणि क्षणभर त्याचा थरकाप झाला.त्यानं चटकन मान हलवून हो म्हटलं. आणी देवानं ती सुन्दरी त्याच्या हवाली केली...‘तू खोटं बोललास’.. अंतर्धान पावतापावता देव वासूला म्हणाला...‘देवा, मी जर हिला नाही म्हटलं असतं, तर तू अनेक सुंदऱ्यांची रांग लावली असतीस... त्यांना नाही म्हटलं असतं, तर माझ्या खऱ्या बायकोला वर आणलं असतस, आणि तिला हो म्हटल्याबरोबर, माझ्या बायकोसकट सगळ्या मला देऊन टाकल्या असत्यास.
देवा, खऱ्या बायकोसकट ही सगळी तुझी बक्षीसं मला पेलवली नसती रे...’ वासू काकुळतीनं म्हणाला आणि काहीच न बोलता देव अंतर्धान पावला......... त्या सुंदरीला घेऊन वासू घरी आला। त्यानं दरवाजा ठोठावला आणि तो मटकन खालीच बसला...बायको पदराला हात पुसत समोर उभी होती...उलट्या हातानं डोळे चोळत वासू भानावर आला, आणि ते स्वप्न होतं हे त्याच्या लक्षात आलं. तो सावरला... मानेभोवतीचा घाम पुसत त्यानं कसंबसं हसून बायकोकडे बघितलं॥ फणकारत तिनं मान फिरवली. वासूची नजर पुन्हा त्या पिशवीवर खिळली, आणि त्याला लग्नानंतरचे दिवस आठवले...------------------------म्युनिसीपाल्टीच्या लायसन खात्यात चिकटल्यावर लगेचच वासूचं लग्नं झालं. हळूहळू त्याचा नोकरीत जमपण बसला. अचानक येऊन भाज्यांची पोती उचलून नेणारी चोरगाडी रोखण्यासाठी गल्लीतल्या भाजीवाल्यांनी एकदा वासूचे हात दाबून त्याला साकडं घातलं आणि त्याना संरक्षण मिळालं. तेव्हापासून रोज संध्याकाळी घरी येताना तो भाजीबाजारात फेरी मारायचा. भाजीवाले वासुच्या पिशवीत निमूटपणे भाजी कोंबायचे. रोजचा भाजीचा खर्चही वाचला, म्हणून बायकोही खूष होती, ताज्या भाजीमुळे वासूच्या घरात सौख्य नांदत होतं....... त्या दिवशी वासु जरा लवकरच काम आटोपून घरी येतायेता बाजारात गेला. सगळे भाजीवाले जीव तोडून धंदा करत होते.

रोजची पिशवी भरून गेली, म्हणून एका फेरीवाल्याकडून वासूनं एक पिशवी विकत घेतली. आणि दोन पिशव्या भाजी घेऊन तो घरी आला.एवढी भाजी बघून बायको खुश होणार, अशा विचारानं वाटेवरच त्यानं स्वतच्या डोक्यावरून चंगला दोनचार वेळा हात फिरवला...झपझप चालत त्यानं घर गाठलं. भाजीच्या पिशव्या भिंतीजवळ ठेवुन तो खुर्चीत टेकला, तोच बायको बाहेर आली.
दोन पिशव्या बघून तिचे डोळे विस्फारले होते.‘ही दुसरी पिशवी कुणाची?’ तिच्या प्रश्नानं वासू चक्रावला.
‘अगं, भाजीच इतकी झाली, की दुसरी पिशवी विकत घ्यावी लागली.. कसंबसं तो म्हणाला, पण पिशवी विकत घेतल्यामुळे बायको चिडलीये, हे त्याच्या लक्षात आलं.
नंतर बरेच दिवस घरात धूसफूस सुरूच होती...
फुकटच्या भाजीमुळे घरात नांदणारं सौख्य विकतच्या एका पिशवीनं हिरावुन घेतलं होतं...
त्या रात्री जेवणं अबोल्यातच उरकली आणि वासु अंथरूणावर आडवा झाला...बायकोही स्वयंपाकघर आवरून आली, आणि पाठ करून झोपली
...वासूची बेचैनी वाढतच होती... त्याला राहवेना... बळेबळेच त्यानं बायकोला जवळ ओढलं, आणि चुकीची कबूली देऊन टाकली...
मग तीही त्याच्या कुशीत विसावली.
....... यथावकाश वासुला मुलगा झाला...
त्या विकतच्या पिशवीनं माजवलेल्या कुरुक्षेत्रामुळेच वासूचं घर भरलं होतं...
----- ------
अलीकडे वासूच्या घरात नेहमी दोघांची कडाक्याची भांडंणं होतात।
घरात काही दोष नाही ना, ते तपासून घे, असं त्याला सासूबाईंनीच सुचवलं होतं
॥घराला काहीतरी वेगळं नाव देऊन बघ, असंही कुणीतरी सुचवलं, पण त्यानं वास्तुशाराकडं वळायचं ठरवलं... आणि संजूबाबाचा सल्ला घेतला... दोघांनाही सुखद आठवणींनी बांधून ठेवणारी वस्तू म्हणजे ती एक पिशवीच होती॥तीच त्यानं समोरच्या खुंतीवर टांगून ठेवली आहे...गोष्ट सांगताना बाबा नेहमी त्या पिशवीकडं का पाहातात, असा प्रश्न मुलाच्या डोळ्यात वासूला नेहेमी दिसतो...घरात कितीही रणकंदन असलं, तरी मुलाला रोज गोष्ट सांगावीच लागते...त्याला एखदं भावंड हवं, असा विचार वासूच्या मनात आला, आणि तो चमकला...आज रात्री बायकोचा राग घालवायचा, असं त्यानं ठरवलं, आणि त्याला हलकंहलकं वाटलं... त्यानं हळूच पिशवीकडे बघितलं..
.पंख्याच्या वाऱ्यानं ती मस्तपैकी झुलत होती...

Wednesday, August 1, 2007

भक्तीची शक्ती...

भक्तीची शक्ती...
मुंबईच्या लोकल ट्रेनमधून सकाळ्च्या वेळी प्रवास करायचे मी टाळतो. पण त्या दिवशी नाईलाजच होता. सकाळी दहा वाजता नरीमन पॉईंटला पोहोचायचंच होतं. मी नाखुषीनंच स्टेशनवर आलो आणि गर्दीचा अंदाज घेण्यासाठी पाचदहा मिनिटं ब्रीजवरच उभा राहिलो. चर्चगेटकडे जाणारी एखादी गाडी येताना दिसली, की जिन्यावरच्या गर्दीची पळापळ व्हायची. हे मी अगोदरपण बघितलेलं होतं. पण माझ्यावर तशी वेळ येणार नाही, असं मला नेहमी वाटायचं.
त्या दिवशी मात्र मी पराभूतासारखी शरणागती पत्करली. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं, हे मला त्या दिवशी उमगलं. माझी देवावर गाढ श्रद्धा वगैरे नाही. पण समोर देऊळ वगैरे दिसलंच, तर हात नकळत जोडले जातात. म्हणजे, त्या वेळी मनात अगदी भक्तीचा महापूर वगैरे असतो असंही नाही. एकदा असाच एका देवळासमोरून जाताना हात जोडले, आणि लक्ष गाभाऱ्याकडे गेलं, तर जीन्स पहेनलेल्या चारपाचजणांनी देवापुढे गुडघे टेकलेले. भक्तीच्या त्या अफाट पुरात गटांगळ्या खातानाच माझ्या मनात विचारांचं चक्र फिरायला लागलं. आजकाल मुंबईत कानाकोपर्यावर देवाचं अस्तित्व दिसतं. रस्त्याकडेला झाडाच्या एखाद्या फांदीला लटकणाऱ्या देव्हाऱ्यात साईबाबाची जुनाट मूर्ती हमखास आढळते. कुठे झाडाला ठोकलेल्या खिळ्यात गणपतीचा नाहीतर मारूतीचा फोटो लटकताना दिसतो, आणि त्याच्या शेजारीच दानपेटी नक्कीच असते. रेल्वे स्टेशनांच्या जिन्याजवळची झाडं म्हण्जे या देवांचं हमखास वस्तीस्थान. सकाळच्या गर्दीच्या वेळी या मळकटलेल्या, उदबत्तीच्या धुरानं काळवंडलेल्या देवांच्या तसबिरींसमोर फुलांचे आणि हारांचे ढीग साचतात.
पंधरा वर्षांपूर्वी मुंबईत दंगली झाल्या. बाँबस्फोटांनी मुंबईच्या धीराच्या काळजावर कायमच्या जखमा उमटवल्या. नंतर बाँबस्फोट नित्याचेच झाले. अतिवृष्टी, महापूर हेपण पाठोपाठ आले. बुजुर्गांच्या भाषेत, मरण सोपे झाले. सकाळी घराबाहेर पडणारा माणूस संध्याकाळी घरी परत आला, की दिवस साजरा झाला असं मानायचं. प्रवासात मस्तपैकी पत्ते खेळतानाच, मोबाईलवरून घरच्यांशी गप्पा मारताना अचानक बाँबस्फोट झाले, तर? अशी भीती प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलीये.
म्हणून इथे देव जागोजागी येऊन बसले.
रेल्वे स्टेशनात फलाटावर पाय ठेवायच्या आधी, जिन्याच्या पहिल्या पायरीच्या शेजारी देवांनी जागा पटकावलीये.
आपणसुद्धा, प्रवास सुरू करायच्या आधी, क्षणभर या काळवंडलेल्या तसबिरीतल्या देवांच्या समोर डोळे मिटून क्षणभर झुकतो.
या भक्तीचा कुणीतरी धंदा करीत असेल, हे माहीत असतानादेखील.
खिशातल्ल्या चिल्लरला हात घालून हाताला येईल ते नाणे दानपेटीत टाकतो,
आणि निर्धास्त होऊन फलाटावर येणाऱ्या ट्रेनकडे जिवाच्या आकांतानं झेपावतो.
चवथी जागा मिळवण्याकरीता, नाहीतर
किमान वरच्या दांडीचा हूक हाताशी येईल अशी जागा मिळावी म्हणून.
एवढं जमलं, की आपण त्या देवाचे आभार मानतो.
गाडीत चढण्याआधी केलेल्या नमस्कारामुळेच आपण सुरक्षितपणे चढलो, आणि उभं राहायला जागा मिळाली, अशी आपली खात्री झालेली असते.
दुसऱ्या दिवशी आपण घराबाहेर पडतो, पुन्हा जिन्याजवळच्या त्या कळकट तसबिरीतल्या देवापुढे हात जोडतो, आणि अंगात गर्दीचा सामना करायचं बळ घेऊन फलाटावर झेपावतो.
इथे एक लयबद्ध गती आहे. ती अशीच तयार झालीये.
आपण इथे निर्मम झालोत.
असुरक्षिततेच्या भावनेनं पछाडल्यानंतर देवापुढे नाक घासायला,
देवापुढं खिसा ओतायलापण आपल्याला काहीच वाटत नाही.
या मजबूरीनं माणसाला माणुसकी तरी शिकवलीये.
याच मजबूरीच्या भांडवलावर करीत असेल कुणी कसला धंदा.
कमावत असेल दानपेटीतली चिल्लर आणि ओतत असेल कुणा आंटीच्या गल्ल्यात संध्याकाळी
आपल्या घशाची जळजळती चटक भागवण्यासाठी..
जाड घोंगड्याआड बसून सिगारेटच्या चांदीवरच्या पावडरीचे झुरके मारण्यासाठी,
नाहीतर एखाद्या दवाखान्याबाहेर फेकून दिलेल्या सिरींजमधून मनगटावरच्या शिरेत नशा भिनवण्यासाठी.
आपण मात्र, न चुकता देवापुढे पैसे टाकून नतमस्तक होणारच असतो.
या भक्तीचा धंदा करणारे तो करोत, पण या भक्तीनंच माणसामाणसाला जवळ आणलंय.--
----- ----
...तर, त्या दिवशी जिन्यावरून धावतच मी ट्रेनच्या दरवाजाजवळची मोकळी जागा हेरली आणि गाडी फलाटावर यायच्या आत गाठायची असा निर्धार करून खाली धाव घेतली.
ठरवल्यासारखा तोच डबा, तोच दरवाजा आणि तीच जागा मिळवून मी हुश्श झालो.
बांद्रा गेल्यावर मीठीच्या पुलावरून जाताना माझ्यासकट सगळ्यांनी ब्यागा पिशव्या सावरत नमस्कारासाठी हात जोडले.
गाडी सुरक्षितपणे पार झाली.
दादरच्या फलाटावर गाडी थांबली, तेव्हा आतल्यापेक्षाही जास्त गर्दी बाहेर उभी होती. जमेल तेवढ्यांना पोटात घेऊन गाडी सुटली आणि मुंबई सेन्ट्रलनंतर हळूहळू रिती होत गेली.
चर्चगेटच्या आधीच्या स्टेशनवर समोरच्या सीटवरचा एक माणूस उठला आणि वरची बॅग खांद्याला लावून गाडी थांबायच्या आतच उडी मारून त्यानं जिना गाठला.
चर्चगेट स्टेशन समोर दिसत होतं, आणि माझ्या शेजारच्याला जाग आली.
उठून त्यानं वरची बॅग काढली आणि तो चपापला. ती त्याची नव्हती. पण अगदी त्याच्या बॅगेसारखीच होती.
आधीच्या स्टेशनावर उतरलेल्यानं त्याची बॅग नेली होती.
आता ती मिळणं जवळपास मुश्कील आहे, हे त्यालाही कळून चुकलं होतं. तरीही डब्यातल्या लोकांची सल्लामसलत सुरु झालीच.
`काही होतं का तुमच्या बैगेत?', कुणीतरी विचारलं आणि यानं पैसे, पाकीट, सर्टिफिकेटस, विमा पॉलिसी, असा सगळा तपशील सांगून टाकला.
`या बॅगेत बघा जरा, त्या माणसाचा काही पत्ता, फोन नंबर मिळतोय का?', कुणीतरी सुचवलं म्हणून त्यानं ती बॅग उपसली.
पण पैसे तर नव्हतेच, हाती आली ती कुणा बापूंची एक जीर्ण पोथी, एक तसबीर, एक कॅसेट आणि साखरफुटाण्याची एक पुडी.
`आता एवढ्यावरनं त्या माणसाचा माग कसा काढणार, गेलंच ते सगळं आता..’ निराश होत तो म्हणाला.
पलीकडच्या बाकावरून हे सगळं पाहाणारा एकजण अचानक पुढे आला आणि त्यानं त्या बॅगला हात लावून नमस्कार केला.
सगळे अचंबित होऊन बघत होते.
‘घाबरू नका. तुमच्या त्या बॅगेत तुमचा पत्ता, फोन नंबर आहे ना?' त्यानं विचारलं, आणि त्या निराश माणसानं होकारार्थी मान हलवली.
‘मग उद्या तुम्हाला तुमची बॅग परत मिळेल. फक्त ही बॅग जशीच्या तशी जपून घरी न्या.’ तो म्हणाला.
सगळेजण अविश्वासानं त्याच्याकडे बघत असतानाच तो बोलत होता.
‘हे बघा, तुमच्या त्या बॅगेत कदाचित हजारो रुपये असतील. पण त्या माणसाची बॅग मागं राहिल्यानं त्यानं जे गमावलंय, ते त्याला त्या पैशापेक्षा मोलाचं आहे. ही पोथी, ही तसबीर आणि ही कॅसेट त्याला तुमच्या पैशापेक्षा मौल्यवान आहे. तो उद्याच तुम्हाला फोन करील आणि तुमची बॅग देऊन ही बॅग घेऊन जाईल. विश्वास ठेवा माझ्यावर’ तो माणूस प्रचंड आत्मविश्वासानं बोलत होता.
चर्चगेटला गाडी थांबली, तेव्हा मी पुढं होऊन माझं कार्ड त्या बॅग हरवलेल्या माणसाच्या हातावर ठेवलं.
`उद्या खरंच असं झालं, तर मला प्लीज कळवा’ मी त्याला म्हणालो.
त्यानंही मान डोलावली.
आम्ही दोघंही एका भक्तीची कसोटी घेणार होतो.
--- --- ----

दिवशी रात्री माझा फोन वाजला.
डब्यातल्या त्या तिऱ्हाईताचा विश्वास खरा ठरला होता.
मी त्या भक्तीला नमस्कार केला.
त्या भक्तीचं भांडवल करून कुणी धंदा का करेना, माणसाला त्या भक्तीनं सन्मार्ग दाखवलाय, माणुसकी शिकवलीये, हा माझा मुद्दा मलाच पटला होता.
-----------------