Friday, July 1, 2022

अप्रकाशित महाभारत...

 

अज्ञातवासात असताना पांडवांनी एका रात्रीत बांधून पूर्ण केलेल्या त्या देवळाविषयी आम्हाला प्रचंड उत्सुकता होती. त्यापोटीच एकदा आम्ही तिरिमिरीत पाठीस सॅक लावली आणि रातराणी पकडून पहाटेच्या सुमारास त्या आडगावात पोहोचलो. सूर्योदय होण्यापूर्वी हे मंदिर पूर्ण झाले नाही तर पांडवांच्या अज्ञातवासातील ठावठिकाणा जगजाहीर होईल, असे गुरुदेवांनी सांगितलेले असल्याने भीम, अर्जुनासह सर्वांनीच आपली शक्ती पणाला लावली होती. कळसाचा शेवटचा दगड बसवून झाला, आणि सभागारातील दगडी परातीखाली एक वस्तू लपवून भीमाने हात झटकले, तेव्हा त्याच्या बंधूंना शंका आलीच होती. तर, त्या परातीखालचे गूढ शोधण्याचा अनेकांनी अनेकवार प्रयत्न केला होता अशी दंतकथा असल्याने आम्हालाही तीच उत्सुकता होती. पहाटेपूर्वीच तेथे पोहोचल्याने आज ते शक्य होणार होते. टीममधल्या एका भीमकाय सहकाऱ्याने त्या प्रचंड दगडी परातीस हात घातला, आणि आश्चर्य म्हणजे, पिंजऱ्यातून मुक्ती मिळताच, मोक्षाच्या प्रतीक्षेत असलेल्या पोपटाच्या रूपातील राक्षसाने सदाचारी मनुष्यरूप घेऊन स्वर्गात प्रयाण करावे, त्याप्रमाणे त्या महाकाय परातीने आपल्याला सहजपणे उचलू दिले.
आतील दृश्य अंगावर आनंदाचा शहारा आणणारे होते. एका पुराणकालीन फाईलसदृश आवरणामध्ये निगुतीने गुंडाळून ठेवलेली काही भूर्जपत्रे आम्हांस दिसली. आता ती बाहेर काढून त्यावरील अगम्य लिपीचा अर्थ लावण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. आम्ही अनेक भाषातज्ज्ञांचे उंबरठे झिजविले, काहींना स्क्रीनशॉटस पाठविले. देवीदेवतांना आवाहन केले, आणि अखेर एक देवी प्रसन्न झाली. तिने आम्हास त्या मजकुराचा अर्थ उलगडून सांगितला...
... ‘महाभारत’ म्हणून जे महाकाव्य आपण वाचतो, ऐकतो, सांगतो, त्याचाच एक अप्रकाशित भाग आमच्या हाती लागला होता.
“तिकडे कुरुक्षेत्रावर रणकंदन माजले असताना आता पराभव स्पष्ट दिसू लागल्याने धृतराष्ट्र उद्विग्न होऊन महाली बसला असताना त्याची मनोवस्था पाहून कळवळलेल्या संजयाने त्याचे मन रिझविण्याचा निर्णय घेतला. त्याची मानसिक अवस्था काहीशी खराब असल्याने त्याच्यासमोर काही गीतमाला सादर करण्याचे त्याने ठरविले, आणि राजगायकांना त्यांच्या वाद्यांसह निमंत्रण धाडले. धृतराष्ट्राचे तिकडे लक्षच नव्हते. आपल्या आसनाशेजारच्या रिकाम्या सिंहासनाकडे पाहताना त्याच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. जणू आषाढाच्या पहिल्या दिवशीच मेघांनी धरतीवर समरसून बरसावे तसे त्याच्या डोळ्यातून भरभरून वाहणारे अश्रू पाहून संजयास भडभडून आले आणि त्याने काही केविलवाणी गाणी ऐकविण्याची सूचना राजगायकास केली. तबला, तंबोऱ्याने सूर जुळवून घेतले, आणि राजगायकाने संवादिनीवर हलकेच बोटे फिरविली...”
(आज आपण काही गीते समकालीन कवींची असल्याचे मानतो, पण त्याला धृतराष्ट्रकालीन पुराणकथांचा आधार आहे, हे आम्हास ती अगम्य लिपी उलगडताना जाणवले.)
तर, राजगायकाने सूर धरला, आणि पहिलेच गाणे आळविण्यास सुरुवात केली...
“भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...”
राजगायक गाणे गात होता, आणि धृतराष्ट्राच्या मिटल्या डोळ्यातून अश्रुधारा पाझरत होत्या. बाजूला बसलेली राणीही त्या क्षणी हळवी होऊन केविलवाणी झाली. मग धृतराष्ट्राने हलकेच चाचपडत अंदाज घेऊन तिचा हात हाती घेतला, आणि तिच्या दिशेने चेहरा फिरवून तो कुजबुजला, “मी पाहू शकत नसलो, तरी मला तुझी भाषा समजते आहे. माझ्या नशिबासोबतच तुझ्या या कोमल हातावरील भविष्यरेषा बोलणार हे विधिलिखितच आहे...”
राणीने हलकेच धृतराष्ट्राचा हात थोपटला. तिच्या पट्टी बांधलेल्या डोळ्यांतूनही अश्रुधारा वाहू लागल्या...
गायक गातच होता... “उद्या पहाटे कुठल्या वाटा, दुज्या गावचा वारा...”
धृतराष्ट्र पुन्हा कळवळला. त्याने बाजूच्या रिकाम्या, वंशपरंपरेने राजवाड्यात असलेल्या रिकाम्या सिंहासनाकडे पाहिले, आणि तो पुन्हा राणीच्या कानाशी कुजबुजला, “आपण हे जीव असे का जोडले?... आणि तरीही फुलण्याआधीच हे फूल दैवाने असे का बरे तोडले?...”
या प्रश्नाला राणीकडे उत्तर नव्हते. ती अधिकच केविलवाणी झाली होती.
गाणे संपत आले होते. राजगायकाने शेवटचे कडवे आळविण्यास सुरुवात केली, आणि अखेरची ओळ पुन्हा उच्चारली...
“वाऱ्यावरती विरून गेली, एक उदास विराणी...”
धृतराष्ट्राचे डोळे पाझरतच होते, आणि बाहेर आषाढाचा पाऊस अधिकच जोमाने बरसू लागला होता.
...त्या अगम्य लिपीवरील अनोळखी मजकुराचे शब्द जसेच्या तसे असेच नव्हते, पण त्यामागील भाव याच आशयाचे होते हे आम्हांस जाणवले, आणि हे भूर्जपत्र भीमाने का लपवून ठेवले असावे ही शंका आम्हास छळू लागली.
कदाचित, धृतराष्ट्राच्या हळव्या व्यक्तिमत्वाचा हा पदर त्याला भविष्यातील जगासमोर यावा अशी त्याची इच्छा नसावी, असा तात्पुरता निष्कर्ष आम्ही काढला, आणि महाभारतातील अप्रकाशित भाग हाती लागल्याच्या आनंदाने आरोळी ठोकून आम्ही त्याचे स्क्रीनशॉट पेपरवाल्यांना पाठवून दिले.
आज सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू असल्याचे टीव्हीवर पाहात आम्ही त्या आडगावातल्या मंदिराशेजारच्या चहाच्या टपरीवर वाफाळता चहा घेत बसलो आहोत...
पुण्य नगरी ०१/०७

सत्ता-संघटनेच्या अस्तित्वाचा संघर्ष

 

शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या वाटचालीचे सक्रीय साक्षीदार असलेले माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या पहिल्या चार दशकांच्या वाटचालीवर एक प्रदीर्घ प्रबंध लिहिला. ‘शिवसेनाः काल, आज आणि उद्या’ या नावाने लिहिलेल्या सुमारे एक हजार पानांच्या या प्रबंधात, शिवसेनेचा भूतकाळ आणि सन २००७ पर्यंतचा सखोल तपशील मांडणाऱ्या जोशी यांनी शिवसेनेच्या भविष्यकाळावरचे भाष्य मात्र खुबीने टाळले. त्यावर त्यांनी समकालीन मान्यवरांची मते मांडली. जोशी यांनी २००७ नंतरच्या, म्हणजे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे सक्रिय झाल्यानंतरच्या भविष्याचे भाकित जाणीवपूर्वक टाळले असावे, असे दिसते. त्या प्रबंधग्रंथातील संदर्भ पाहता, आजची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना यांमध्ये मोठे अंतर असल्याचे आजच्या घडामोडींवरून पडताळता येते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू झालेली एक ज्वलंत चळवळ, गतिमान संघटना, आणि प्रभावी राजकीय पक्ष अशा विविध रूपांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटविणारा हा पक्ष सध्या एका वैचारिक संभ्रमावस्थेत सापडला असून सत्ता हेच या संभ्रमाचे कारण आहे, यात कोणाचेही दुमत असणार नाही. ‘हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे’, असे सांगत, १९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रखरतेने हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यानंतरच्या कायदेशीर कारवाईला प्रचंड विश्वासाने तोंड देऊन हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात रुजविला आणि नंतरच्या राजकारणात हाच मुद्दा राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी राहण्याकरिता महत्वाची भूमिका बजावली, त्याच हिंदुत्वावरून आज शिवसेनेत उभी फूट पडण्याची वेळ आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे हिंदू खोमेनी आहेत’, अशी टीका तेव्हा करणारे शरद पवार हे आजच्या शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत संकटमोचक बनले आहेत, आणि पवार यांच्या राजनीतीतूनच सत्ता आणि संघटना वाचविता येईल, असा सूर शिवसेनेच्या पहिल्या फळीतून उमटू लागला आहे. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते हे खरे आहे. त्यामुळे २०१९ मध्ये निवडणुकीत केलेली भाजपसोबतची नैसर्गिक युती आणि या युतीला मिळालेला जनादेश धुडकावून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी अवैधानिक ठरली नाही, तरी ती अनैसर्गिक होती, हे स्पष्ट आहे. या आघाडीनंतर मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणातील उद्धव ठाकरे यांचा सूर आणि गेल्या काही महिन्यांत उमटू लागलेला हिंदुत्वाचा सूर पाहता, ही कसरतही स्पष्ट जाणवते. ‘धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ केली ही शिवसेनेची चूक होती’, अशी स्पष्ट कबुली विधिमंडळात उद्धव ठाकरे यांनी दिली, तेव्हाच खरे तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या कडवट विचारांशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांच्या मनात पक्षाच्या नव्या वाटचालीविषयी शंकेची पाल चुकचुकली होती. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या संघर्षावरच अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याची भीतीही त्यांच्या मनात उमटली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा वाद संपुष्टात आल्यानंतर पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी येत असल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेने सावधपणे हिंदुत्वाचा उच्चार करण्यास सुरुवात केली, पण सरकार या नात्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या असंख्य प्रसंगातील भूमिका मात्र काहीशी तटस्थतेचीच राहिली. शिवसैनिकांच्या मनात याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या, पण ते व्यक्त होत नव्हते. ‘आमचे हिंदुत्व गदाधारी हिंदुत्व आहे’, अशी टाळीबाज वाक्ये सभांमधून फेकली जात होती, पण पालघरमध्ये साधूंच्या हत्याकांडासारख्या घटना घडल्यानंतर, बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाचे संस्कार झालेल्या शिवसैनिकाच्या मनात सत्ताधारी शिवसेनेकडून ज्या कृतीची अपेक्षा होती, तसे घडलेच नाही. आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही भूमिकांशी तडजोड करावी लागते. मात्र, हिंदुत्व हा ज्यांचा श्वास आहे, त्या शिवसेनेने हिंदुत्वाच्या भूमिकेशीच तडजोड केल्याचे दिसू लागल्यावर अस्वस्थ शिवसैनिकांची चलबिचल सुरू झाली. गेल्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भरविल्या गेलेल्या अजान स्पर्धा, हिंदु सण साजरे करण्यावरील बंधने आणि अन्य धर्मांच्या सणांबाबत घेतली गेलेली भूमिका, राम मंदिराच्या उभारणीकाळात शिवसेनेने उपस्थित केलेल्या शंका, कोरोनाकाळात हिंदु प्रार्थनास्थळांवर घातलेल्या निर्बंधांमुळे त्यावर उपजिविका करणाऱ्या कुटुंबांवर ओढवलेली आर्थिक ओढाताण, अशा अनेक मुद्द्यांवर बाळासाहेबांचा शिवसैनिक ठाकरे सरकारकडे अपेक्षेने पाहात होता. सध्याचे बंड हा अशाच अस्वस्थतेचा उद्रेक असावा.
काही दिवसांपूर्वी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत या नाराजीचा स्पष्ट इशारा शिवसेनेला मिळाला होता. विधानसभेत भाजपकडे असलेल्या ११३ मतांपेक्षा दहा मते जास्त मिळवून भाजपने राज्यसभेचे तीनही उमेदवार निवडून आणले, तेव्हाच सत्ताधारी आघाडीत सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत तर शिवसेनेतील नाराजांनी नेतृत्वाला थेट फुटीचा इशारा दिला. भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकही जादा मत नसतानाही सेनेच्याच एका उमेदवाराला पराभूत करून भाजपने बंडाची बीजे रुजविली. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणावर विसंबून शिवसेनेच्या नेतृत्वाने तिकडेही दुर्लक्ष केले. विधानसभेतील बहुमताच्या संख्याबळाचा प्रचंड विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांना भोवला. या घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेसा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बंडाची आखणी पूर्ण झाली होती. त्याची पूर्वतयारी म्हणून २१ जूनला विधानसभा उपाध्यक्षांविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावातडेही पुरेशा गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. कदाचित यापुढे शिवसेनेचे खरे दावेदार कोण या मुद्द्यावरून जेव्हा एकनाथ शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष सुरू होईल, तेव्हा ठाकरे गटाच्या बेफिकीरीचे परिणाम समोर येऊ लागतील.
या काळात सरकार म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडून असलेली शिवसैनिकाची अपेक्षा यांत अंतर पडल्यामुळे सध्या शिवसेनेसमोर अस्तित्वाचा मोठा पेच उभा राहिला आहे. मुख्य म्हणजे, ज्यांनी बाळासाहेबांवर ‘हिंदू खोमेनी’ म्हणून टीका केली, त्या शरद पवार यांच्याकडेच आज शिवसेना संकटमोचक म्हणून पाहते आहे, हा काळाने घेतलेला विचित्र बदला असल्याची भावना आज बंडातून व्यक्त झाली आहे.

Friday, June 17, 2022

हिमालय आणि समुद्र

 

चि. मोरूस अनेक आशिर्वाद
मागे तुला पाठविलेल्या ई-पत्रावर तुझ्याकडून कोणतेच उत्तर आले नाही तेव्हाच तू त्यापेक्षा महत्त्वाच्या मोहिमेत व्यग्र असावास याचा मला अंदाज आला होता. म्हणून मीदेखील थोडे दिवस पत्रव्यवहाराला विश्रांती द्यावी असा विचार केला. मोरू, मला माहीत आहे की आजकाल पत्र वगैरे लिहिणे हा प्रकार तसा आऊटडेटेडच झाला असून व्हिडियो चॅट करून एकमेकांशी गप्पा मारून मन मोकळे करता येते. पण मला आपलं पत्र लिहिणं आवडत असल्याने मी काही माझी सवय मोडणार नाही. मध्यंतरी तू उत्तराखंडाच्या सहलीवर गेला होतास ते समजले. असे अधूनमधून देशातील इतर प्रांत पाहणे चांगलेच असते. त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते आणि विविधतेतील एकतेचेही दर्शन होते. तुला तसा काही अनुभव असल्यास प्रवास वर्णनाचे एखादे सविस्तर पत्र लिहून कळव. निसर्गाचे सौंदर्य अनुभवायलाही एक नजर असावी लागते. मागे एकदा आमच्या शेजारच्या नायगावकर काकांचा कुणीतरी मित्र निसर्ग पहायला कोकणात गेला होता, तर बसमधून जात असताना सगळीकडे दाट झाडी आडवी येत असल्याने निसर्ग नीट पाहाताच आला नाही असे त्याने काकांना सांगितल्यावर वाईट वाटले होते. तुला तिथला निसर्ग नीट पाहता आला असेल अशी आशा आहे. तिथे तू काढलेले फोटो मला आमच्या काशीने तुझ्या फेसबुक पेजवर उघडून दाखविले आणि खूप बरे वाटले. मोरू, काय गंमत आहे ना, की तिकडची माणसं हिमालयाच्या कुशीत राहातात, तर त्यांना इकडचा समुद्र पहायची ओढ लागते, आणि आपल्या लोकांना हिमालयाची भव्यता खुणावते. त्या निसर्गवेडापायी आपण तिकडे सहली काढतो, सफर करतो, आणि तिकडे कायम हिमालयाच्या सावलीत राहणाऱ्या लोकांना आपल्या समुद्राची गाज खुणावते. बाकी आपलं राज्य आणि उत्तराखंड सारखेच सुंदर आहेत असे आपले राज्यपाल परवा म्हणाले तेव्हा आपल्या राज्याच्या अभिमानाने माझा ऊर भरून आला होता. तरीही, उत्तराखंडासारखा हिमालय आपल्याकडे कुठे आहे असा विचार माझ्या मनात येत असतानाच राज्यपालांनीही तेव्हा तोच विचार बोलून दाखवला, आणि लगेच माझ्या मनात समुद्राच्या लाटा उचंबळून आल्या. पूर्वी असं म्हणायचे की, उंच हिमालय तुमचा अमुचा केवळ सह्यकडा… तर, तेव्हा हिमालयाच्या मदतीला नेहमी सह्याद्री धावून जायचा म्हणून तसे म्हणायची प्रथा पडली असली तरी आता हिमालयाच्या सौंदर्याची बरोबरी आपल्याकडच्या समुद्राच्या सौंदर्याशी झालेली पाहून बरे वाटले. तसेही अलीकडे आपल्या सह्याद्रीवर हिमालयाच्या मदतीला धावून जायची वेळ बऱ्याच वर्षात आलेली नसल्याने समुद्र आणि हिमालयाचीच तुलना योग्य असे मी मनाशी म्हणत असतानाच, आपल्या मनातील विचारच राज्यपालांनी बोलून दाखविल्याचा आनंदही वाटला. पण थोर लोकांचे विचार सारखेच असतात अशी काहीतरी इंग्रजी म्हण असल्याने त्या योगायोगाचे काही विशेष वाटले नाही. त्यामुळे असो… तुझ्या उत्तराखंडच्या फोटोवरून हे सगळे आठवले, एवढेच! तर मोरू, निसर्ग पाहाण्यासाठी आपण तिकडे जातो तसे तिकडची माणसंही निसर्ग पाहण्यासाठी इकडे येत असावीत. राज्यपालांची इकडे यायची फार इच्छा नव्हती असे त्यांनीच परवा सांगितले. पण हिमालयाच्या कुशीत वाढलेला माणूस आता समुद्राच्या सान्निध्यात राहातोय आणि इथल्या वातावरणात दूध साखरेसारखा विरघळून गेला हे पाहून बरे वाटले.
दूध साखरेवरून आठवले. हल्ली आम्ही अमूलचंच दूध आणतो. ते चांगलं असतं, असं म्हणतात. शिवाय पूरा इंडिया अमूल दूध पितो असंही जाहिरातीत ऐकलंय. परवा मी टीव्हीवर बातम्या पाहात बसलो होतो तेव्हाच आमच्या सौभाग्यवतीने समोर अमूलच्या दुधाचा ग्लास आणून ठेवला, आणि शेजारी साखरेचा डबा! ही साखर आपल्या राज्यातल्या कुठल्याशा सहकारी कारखान्यातच तयार झाली असली पाहिजे. ते मला का वाटतं ते मी नंतर कधीतरी सांगेन. तर, गुजरातमधल्या अमूलच्या दुधात आपल्याकडच्या कारखान्यात तयार झालेली साखर घालून मी चमच्याने ते ढवळले, तर अशी फक्कड चव लागली की सांगता सोय नाही. मी दूध पीत असतानाच समोर आपले मुख्यमंत्री गुजरात आणि महाराष्ट्राला दूधसाखरेची उपमा देत होते. तर हाही एक योगायोगच म्हणायचा. मोठी माणसं सारखाच विचार करतात हेच मला यावरून तुला सुचवावेसे वाटते. म्हणून, कधीतरी माझ्या पत्राला तू उत्तर द्यावेस, एवढीच अपेक्षा आहे.
कळावे, काय म्हणायचंय हे तुला कळलं असेलच!
तुझा
दादू
पुण्य नगरी १७-०६

Friday, May 6, 2022

वेताळ आणि वेताळ...

 

दरबारात तातडीची बैठक बोलावल्यामुळे विक्रमादित्यास स्मशानात जाण्यास वेळच नव्हता. तिकडे झाडावर लोंबकळणाऱ्या प्रेताच्या मानगुटीवर बसून विक्रमादित्याची वाट पाहाणारा वेताळ वैतागून गेला. काय करावे याचा विचार करत असतानाच शेजारच्या झाडावरच्या वेताळाने त्याला हाक मारली. “कसला विचार करतो आहेस वेताळा?” असे विचारत पलीकडच्या झाडावरचा वेताळ उगीचच हसला, आणि हा वेताळ ओशाळला. “काही नाही रे, विक्रमादित्य आला तर त्याच्या खांद्यावरून निसटण्याकरिता कोणती नवी गोष्ट सांगावी याचा विचार करतोय...” वेताळ म्हणाला, आणि दोघेही नव्या गोष्टीवर विचार करू लागले. पलीकडच्या झाडावरच्या वेताळाने लगेचच गुगलवर गोष्टीचा शोध सुरू केला. पण विक्रमादित्यास सांगण्याजोगी व अडचणीचा प्रश्न विचारता येण्याजोगी गोष्ट त्याला सापडलीच नाही. अखेर वैतागून मोबाईल बंद करत असतानाच त्याच्या नजरेस एक बातमी पडली. ताबडतोब त्याने ती या वेताळासमोर धरली, आणि वेताळ खुश झाला. “ठरलं... हीच गोष्ट विक्रमादित्याला सांगायची. म्हणजे त्याला उत्तर देता येणारच नाही, आणि माहीत असूनही त्याने त्तर दिले नाही, तर आता तरी त्याच्या डोक्याची शंभर शकले होऊन त्याच्या पायाशी लोंबकळतील...” खदाखदा हसत वेताळ म्हणाला, आणि झाडावरच्या प्रेताच्या मानगुटीस विळखा घालून तो निवांत पहुडला...

 इकडे विक्रमादित्याच्या राज्यात काही तातडीच्या समस्या निर्माण झाल्याने काय करावे हे न सुचून त्याने विचारविनिमयासाठी बोलाविलेली जाणत्यांची बैठक आटोपली होती. कठीण प्रसंगी सगळेच आपल्यावर निर्णय सोपवून नामानिराळे राहात असल्याचा विक्रमादित्यास अगोदरपासूनच संशय होता. या बैठकीतही तेच झाले. विक्रमादित्याच्या डोक्याचा पुरता भुगा झाला होता. अखेर तिरिमिरीतच त्याने चढावा चढविल्या, तलवार कमरेला लावली, आणि स्मशानाचा रस्ता पकडला. वेताळाच्या गोष्टीतून काही उत्तर सापडले तर समस्येशी पडताळून पाहू असा विचार करत त्याने स्मशान गाठले.  त्याला येताना पाहून वेताळाला आनंद झाला. आता पुढचा काही वेळ मजेत जाणार होता. विक्रमादित्याने चढावा झाडाखाली काढून ठेवल्या, तलवार सावरत तो झाडावर चढला, आणि प्रेत खांद्यावर टाकून तो पुन्हा स्मशानाच्या दिशेने चालू लागताच, प्रेताच्या मानगुटीवर बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. “विक्रमा, तुझ्या हट्टाचे मला कौतुकही वाटते, आणि आता तर गंमतही वाटू लागली आहे. तुझ्यासमोरचा कोणताच प्रश्न तुला सोडविता येत नसल्याने तू हा उद्योग चालविला आहेस व उत्तर शोधत आहेस हे मला माहीत आहे. म्हणून आता मी तुला जी गोष्ट सांगतो ती ऐक. तुला उत्तर देता आले नाही, तर काय होणार ते तुला ठाऊकच आहे...” असे म्हणून वेताळाने गोष्ट सुरू केली.

 “विक्रमादित्या, ही गोष्ट नाही, तर तीनचार वर्षांपूर्वीचीच एक बातमी आहे. पुणे नावाच्या शहरात, एका झोपडपट्टीतील एक कोंबडा भल्या पहाटे बांग देत असे. त्यामुळे त्याच्या गरीब मालकास पहाटे लवकर जाग येऊन तो कामासाठी बाहेर पडत असे. आयत्या गजराची सोय असल्यामुळे त्याचे त्या कोंबड्यावर प्रेमही होते. पण शेजारच्या इमारतीतील एका महिलेस पहाटे कोंबड्याची बांग ऐकून त्रास होऊ लागला. भल्या पहाटे कानावर पडणारी त्याची बांग आपली झोपमोड करते आणि दिवस खराब जातो, अशी तक्रार घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली, आणि बांग देऊन झोपमोड करणाऱ्या कोंबड्यावर कारवाई करा अशी मागणी करणारा अर्जच तिने पोलिसांना दिला. ही बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आली, आणि पोलिसांची पंचाईत झाली. कोंबड्यावर कोणत्या कलमाखाली कारवाई करावी हे त्यांना सुचेना. त्यामुळे पोलिस संभ्रमात पडले. तर विक्रमादित्या, आता सांग पाहू, भल्या पहाटे बांग देऊन मालकास कामासाठी लवकर उठविणारा कोंबडा आणि शेजऱ्याची झोपमोड करणारा कोंबडा यापैकी कोणास तू न्याय देशील?”

 गोष्ट ऐकून विक्रम गोंधळला. विचारात पडला. आता पुन्हा राज्यातील जाणत्यांची बैठक घेतली पाहिजे, असे त्याने मनाशी ठरविले. इकडे वेताळ मात्र उत्तराची वाट पाहात होता. विक्रमादित्यास या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही याची खात्री होताच वेताळाने खांद्यावरील प्रेतासह पुन्हा झाडाकडे झेप घेतली, आणि तो फांदीला लटकून विक्रमादित्याकडे पाहात खदाखदा हसू लागला.

Friday, April 29, 2022

भ्रमयुगाचे भविष्य...


चि. मोरूस 

अनेक आशीर्वाद

अलीकडे आपला पत्रव्यवहार सुरू झाल्यापासून माझ्या मनातील विचारांना भलतीच चालना मिळू लागली असली तरी परवा उदगीरला जे काही घडले तेव्हापासून मनाची काहीशी चलबिचलही सुरू झाली आहे. त्या साहित्य संमेलनात अध्यक्षांनी सांगितले की काळ मोठा कठीण आला आहे. खरे म्हणजे, लेखकाने प्रत्येक काळात तसे सांगायचे असते अशी प्रथा असल्याचे वाचल्यावर थोडे बरेही वाटले. पण काळ जर कठीण आला असेल तर त्यावर काही औषध शोधले पाहिजे असे मला वाटू लागले, आणि मी विचार करू लागलो. आता सल्ले देणे बंद करायचे मी ठरविले असून, कोणाचे सल्लेही न स्वीकारता आपले निर्णय आपणच घ्यावेत असा माझा मानस आहे. ते काहीसे कठीण आहे याची कल्पना असल्याने, त्यावर काय उपाय करावा असा विचार करताना मला जे काही सुचले ते तुला सांगावे असे वाटते.

मोरू, आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे ते आधीच जाणून घेऊन त्यानुसार पुढच्या दिवसाची घडी बसविण्याची सवय ठेवावी असे शेजारच्या अण्णांनी सांगितल्यावर, ते कसे करावे असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर हसून त्यांनी वर्तमानपत्राची घडी उलगडून एका कोपऱ्यावर बोट ठेवल्यानंतर मी बारकाईने तेथे पाहिले असता, राशीभविष्य असा मथळा दिसल्यावर मी उत्सुकतेने वाचून काढले. अर्थात मी कोणत्या राशीचा ते मला अजूनही नक्की ठाऊक नसल्याने मी काहीसा भ्रमितही झालो, आणि सध्या आपण सारे भ्रमयुगात वावरत आहोत, याची आठवण झाली. भ्रमयुगातून सावरण्यासाठी भविष्याची घडी अगोदरच नीट बसवावी असे मी ठरविले असून, त्याआधी भविष्याची पडताळणी करण्याचा प्रयोगही करून पाहिला. तो नेमका जमल्याने आता मी दररोज तसेच करावयाचे ठरविले आहे.

तर मोरू, पहिल्या दिवशी मलाकमी पडू नका, आपले काम साधून घ्या, त्यासाठी लेकी बोले सुने लागे करावे लागेल असा सल्ला मिळाला. पण त्या दिवशी उशीर झालेला असल्याने उरलेल्या दिवसाचा वेळच कमी पडला. त्यामुळे ते भविष्य फुकट गेले. दुसऱ्या दिवशी मात्र, सकाळीच भविष्य पाहिले, आणि वाद टाळा, कौटुंबिक कटकटींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा सल्ला मिळाला असता, दिवसभर मी घराबाहेर राहिलो. त्यामुळे वाद टाळता येतील असे वाटल्याने संध्याकाळी उशिरा घरी परतल्यावर दिवसभर बाहेर काय करत होता, म्हणून घरात आगपाखड झालीच, आणि वादही झाला. त्यामुळे भविष्य खरे ठरते असे लक्षात आले. मग भविष्य सकाळी न पाहता, रात्री निजायच्या वेळी वाचून दिवसभरात त्यानुसार काय काय घडले त्याची मी पडताळणी घेतली. बऱ्याचदा ते खरेच निघते असे लक्षात येऊ लागल्यावर पुन्हा सकाळी भविष्य पाहण्याचे ठरविले. भ्रमयुगातून स्वतःस सुरक्षित ठेवायचे असेल, तर भविष्याची नेमकी दिशा आपल्याला ठाऊक असली पाहिजे, असा निष्कर्ष मी काढला आहे. त्यामुळे, रोजचे राशिभविष्य सकाळीच वाचून घ्यावे असे आता माझे ठाम मत आहे. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजेभविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर आपले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्यविद्येवर आपला विश्वास बसतोआणि दुसरे म्हणजेआपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने त्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतातत्याचे वाईट वाटत नाही. उलटतसे घडणार हे भविष्यातच लिहिलेले असल्याने जे घडले ते तसे घडणारच असल्याने आपण त्या टाळूच शकलो नसतो ही भावना दृढ असल्याने परिणाम स्वीकारण्याचे धाडस प्राप्त होते, व जे घडले त्याविषयी संभ्रम रहात नाही.

मोरू, तरीही, सावधगिरी बाळगण्याचे मी ठरविले आहे. वैद्यकीय उपचाराबाबत आपण सेकंड ओपीनियन घेतो, त्याप्रमाणे अन्य वर्तमानपत्रातील आपल्या राशीचे भविष्यही समोर ठेवून दिवसाच्या वागण्याची त्या भविष्यानुसार आखणी करणे आणखी चांगले असे माझे स्वत:चे मत आहे. पण माझ्या मते भ्रमयुगातून बाहेर पडावयाचे असेल, तर एकमेकांच्या हातात हात घालूनच भविष्याची वाटचाल करणे चांगले. या पत्रात तुला कोणताच सल्ला दिला नसल्याबद्दल तुला बरे वाटले असेल याची खात्री वाटते. पण तुझे ‘सेकंड ओपीनियन’ विचारात घ्यावे असा विचार आहे, हे लक्षात घे.

सल्ला न देता तुझे मत कळवशील याची खात्री आहे. कळावे,

तुझा

दादू 

 


Wednesday, April 27, 2022

प्रभू आले मंदिरी...

 

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. अमावस्येच्या रात्री किर्र अंधारातून चाचपडत तो स्मशानाजवळ पोहोचला. अंधारातूनच त्याला एक विचित्र घुत्कार ऐकू आला. क्षणभरच त्याच्या अंगावर भीतीचा शहारा आला. पण काहीही झाले तरी आज काम तडीस न्यायचेच असा निर्धार करून तो पाचोळ्याने भरलेल्या पायवाटेवरून पुढे चालू लागला. ‘या ठिकाणी विजेची व्यवस्था करावयास हवी होती’ असा विचारही त्याच्या मनात आला. ‘वीज असती तर रात्र एवढी भयाण भासली नसती’, असेही तो मनाशी बोलला. पण नुसत्या तारा आणि खांब टाकून वीज मिळत नाही, हे त्याला लक्षात आले, आणि ‘अंधाराची सवय करून घ्यायला हवी’ असे स्वतःस बजावत त्याने स्मशानाबाहेरचे ते झाड गाठून वर पाहिले. ते प्रेत फांदीवर तसेच लटकत होते. काही क्षणातच खदाखदा हसण्याचा आवाज आला, आणि विक्रमादित्य संतापला. कमरेची तलवार सावरत त्याने चाचपडत झाडावर चढण्यास सुरुवात केली. फांदीजवळ पोहोचून त्याने प्रेताच्या मानेभोवतीचा फास सैल केला, आणि प्रेत खांद्यावर टाकून तो खाली उतरला. तितक्यात खांद्यावरच्या प्रेताच्या मुखातून वेताळ बोलू लागला. “विक्रमा, तुझ्या हट्टाचे मला कौतुक वाटते. पण तुझा हेतू साध्य व्हावा असे वाटत असेल, तर मी तुला एक गोष्ट सांगून प्रश्न विचारेन. त्याचे योग्य उत्तर दिलेस तर मी तुझ्यासोबत येईन. आणि उत्तर माहीत असूनही तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्या पायाशी लोळू लागतील.”
विक्रमादित्य काहीच बोलला नाही. डोक्याची शकले होण्यापेक्षा उत्तर देण्याचा प्रयत्न करणे चांगले असा विचार करून त्याने वेताळास संमती दिली, आणि वेताळाने गोष्ट सुरू केली...
“आटपाट नगरीत एका दिवशी मोठी धामधूम सुरू होती. प्रधानाने सेवकांस सांगितले, “करा रे हाकारे, पिटा रे नगारे...” मग सेवक बुचकळ्यात पडले. आज अचानक नगारे पिटण्यासारखे काय झाले, त्यांना काहीच समजेना. मग प्रधान काहीसा संतापला. “तुम्हास ठाऊक नाही? आज महाराज राजवाड्यात परतणार आहेत. त्यांचा विजनवास संपुष्टात येत असून आता ते पुन्हा एकदा नव्या जोमाने राज्यकारभार सुरू करणार आहेत.”
ते ऐकताच काहीसे नाराज झाले. आता आपल्याला काम करावे लागणार की काय अशी भीती त्यांच्या मनात दाटली. प्रधानाच्याही मनात तीच भीती होती, पण शिष्टाचारामुळे विजनवासातून परतणाऱ्या राजाचे स्वागत करणे अपरिहार्यच होते. अखेर सेवकांनी राजवाड्याच्या चहुबाजूंना दवंडी पिटण्यास सुरुवात केली. कॅमेरेवाले बाहेर वाटच पाहात होते. त्यांनी राजवाड्यात गर्दी केली. सेवकांनी दवंडी पिटताच राजवाड्याच्या आसपास वेळ घालविण्यासाठी भटकणारे कर्मचारी जागेवर येऊन बसले. मोठ्या विजनवासानंतर परतणाऱ्या महाराजांस आपण काम करत आहोत असे भासविण्याची तयारी पूर्ण झाली. नगरजनांनी घराबाहेर गुढ्या तोरणे उभारली. चौकाचौकात नगारे वाजत होते. काही सैनिकांनी तर शोभायात्रांचेही आयोजन केले. सर्वत्र उत्सवी वातावरण पसरले होते. ते पाहून प्रधान खुश झाला. तयारी पूर्ण झाल्याची खात्री होताच त्याने महाराजांना निरोप पाठविला. तेव्हा महाराज अंतःपुरात विश्रांती घेत होते. प्रधानाचा निरोप पोहोचताच राजांनी निघण्याची तयारी केली. सेविकेने औक्षण केले, आणि प्रसन्न हसून महाराजांनी राजवाड्याकडे प्रस्थान ठेवले. पुन्हा नगारे धडधडू लागले. तुताऱ्या वाजू लागल्या. उत्सवी वातावरण आणखीनच मोहरून गेले. आणि महाराजांचा यंत्ररथ राजवाड्याच्या प्रवेशद्वारी पोहोचताच प्रसन्न वदनाने हात जोडून महाराज पायउतार झाले. त्यांनी राजवाड्याबाहेरील कुलदैवतास नम्रपणे झुकून प्रणाम केला, आणि राजवाड्याचा फेरफटकाही मारला. नोकरजनांची आस्थेने चौकशी केली. हा दुर्मीळ क्षण टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचा लखलखाट सुरू होता. महाराज प्रसन्न झाले. एका सेवकाशी त्यांनी कामकाजाबाबत जुजबी चर्चा करून कामाची माहीतीही घेतली. ते पाहून सेवकाचा धीर चेपला, आणि त्याने विचारले, “महाराज आपण इतके दिवस कोठे होता. तुमच्या पादुका सिंहासनावर ठेवून इथे राज्यकारभार सुरू होता...” महाराज हसले. “आम्ही विजनवासात होतो”, असे जुजबी उत्तर देऊन ते आपल्या दालनी परतले...”
विक्रमादित्य ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होता. आता वेताळ कोणता प्रश्न विचारणार याचाही त्याला अंदाज आला होता. उत्तर तयारच होते. अपेक्षेप्रमाणे वेताळाने मान वाकडी करून विचारले, “विक्रमा, आता सांग बरे, ही कोणत्या नगरीतील कोणत्या राजाची गोष्ट आहे?” विक्रम हसला. क्षणाचाही विलंब न लावता तो उत्तरला, ‘अरे वेताळा, ही गोष्ट तर आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तुझ्याकडच्या साठा संपला असेल, तर अशा फालतू गोष्टी न विचारता निमूटपणे माझ्यासोबत ये... ही रामचंद्र नावाच्या राजाची गोष्ट आहे...”
वेताळ पुन्हा खदाखदा हसला. “राजा, तुझे उत्तर चुकले”, असे म्हणून त्याने विक्रमाच्या खांद्यावरून पुन्हा झेप घेतली, आणि प्रेतासह तो झाडाच्या फांदीवर लटकू लागला...
-- शीर्षासन. पुण्यनगरी, १५-०४-२२

डिस्क्लेमर!

मराठी सिनेमा, नाटकं किंवा मालिका पहायला सगळ्यांना आवडतात. त्यातील पतीपत्नी एकमेकांशी खूप प्रेमाने वागतात. एकमेकांच्या मताचा आदर करतात. पतीच्या शब्दाबाहेर असलेली पत्नी (सहसा) कथानकात दाखवत नाहीत. एखाद्या गंभीर कौटुंबिक समस्येवर दोघे मिळून विचार करतात, परस्परांची मते जाणून घेतात.
काही प्रसंगांत, पत्नीला पतीचे मत पटल्याचेही दाखवितात.
काही वेळा, आपली चूक पत्नी पतीसमोर मान्यदेखील करताना दाखवितात.
एका सीरियलमध्ये तर, नवऱ्याचा डायलॉग पूर्ण होईपर्यंत शांतपणे व सुहास्य मुद्रेने तो ऐकणारी बायको दाखवली होती. नवऱ्याने बोलताबोलता केलेल्या विनोदावर ती खळखळून हसते आहे असेदेखील एक दृश्य होते...
साधारणपणे वास्तव आयुष्यातील हरवलेल्या गोष्टी पडद्यावर का होईना, पहायला मिळाल्याने हरवलेल्या क्षणांचे साक्षीदार झाल्याचा आभासी आनंद पडद्यावरच्या कथानकात सापडत असतो. आणि मन भरून येते!
या आनंदाचा मसाला ज्या कथानकात अधिकाधिक, ते नाटक, सिनेमा, मालिका अधिक लोकप्रिय होते.
हे आभासी आहे, वास्तवात असे नसते हे प्रेक्षकांनाही माहीत असते.
तरीही, प्रयोगाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर दाखवतात. 'या कथेतील पात्रे, प्रसंग व कथानकही काल्पनिक आहे, त्याचा वास्तवाशी संबंध नाही, आढळल्यास तो योगायोग मानावा!'
हे डिस्क्लेमर दाखवले नाही तर ते वास्तवाशी संबंधित आहे असे कुणाला वाटेल तरी का?
मग ते दाखविण्याची गरजच काय?