Sunday, May 31, 2009

प्रस्ताव



.."त्यांनी प्रस्ताव आणलाय... माझ्या जिवाला धोका आहे.' त्याच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती.
गडचिरोलीच्या जंगलात बांबू तोडायला गेलेला तो कुणा नातेवाइकाच्या सांगण्यावरून नक्षलवादी टोळीत दाखल झाला आणि तिथल्या वास्तवाचे चटके नंतर त्याला असह्य होऊ लागले.
पण, परतीचे दोर कापले गेले होते. तो नक्षलवादी चळवळीत गुरफटला होता.
उदरनिर्वाहाचं काहीच साधन हातात नव्हतं. खस्ता खातच बायकोनं कधीतरी अंथरूण धरलं आणि खंगत जग सोडलं.
""दोन मुलांना मागं ठेवून ती निघून गेली. मुलं भुकेनं केविलवाणी झाली, की डोकं भणभणून जायचं आणि मुलांना उपाशी झोपवून मी घराबाहेर पडायचो... जंगलातून बांबू आणायचो आणि विकून कधीतरी हातात पडणाऱ्या पैशातून उपाशी मुलांची भूक भागवायचो... सात वर्षं झाली त्याला. एकदा असाच जंगलात बांबू तोडत होतो आणि अचानक ते माझ्याभोवती उभे राहिले. मी घाबरलो. तेवढ्यात एक जण पुढे आला. मी निरखून पाहिलं.
तो माझाच एक नातेवाईक होता. आम्ही झाडाखालीच गप्पा मारत बसलो. "मजेत आहे,' असं तो सांगत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर घरातलं दारिद्य्र, भुकेली मुलं दिसत होती.''
गडचिरोलीजवळच्या एका गावात, फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्याकडेच्या पानाच्या ठेल्याचा तो पोरगेलासा मालक माझ्यासमोर त्याच्या आयुष्यातील एक भयानक वळण उलगडत होता. मी थिजल्यासारखा त्याच्या डोळ्यांत पाहत ऐकत होतो.
आत्मसमर्पण केल्यानंतर सरकारी पुनर्वसन योजनेतून त्याला ते दुकान मिळालं होतं. घरकुल योजनेतून घरही मिळालं होतं. त्यानं पुन्हा लग्नही केलं होतं. त्याच्या पहिल्या दोन मुलांना आणखी एक भावंड मिळालं होतं. नक्षलवाद्यांच्या टोळीत वावरताना हरवलेला आनंद तो पुन्हा अनुभवत होता.
पण, मधूनच बोलताना त्याची नजर आसपास भिरभिरत होती आणि त्यानं आसपास पाहिलं, की मला त्याचं ते वाक्žय आठवत होतं,
"त्यांनी प्रस्ताव आणलाय...'
गडचिरोली मतदारसंघातल्या निवडणुकीच्या वाऱ्यांचा अंदाज घ्यायला मी त्या दिवशी शहरात फिरत होतो. फिरत-फिरत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचलो.
निवडणुकीच्या दृष्टीनं हा जिल्हा खूपच संवेदनशील. छत्तीसगडच्या निवडणुकीत गेल्या वर्षी नक्षलवाद्यांनी घातलेल्या धुमाकुळानंतर गडचिरोलीचं प्रशासन सावध झालंय. सीमेवरच्या प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी आणि काही घातपात झालाच, तर वेळच्या वेळी उपचार मिळावेत म्हणून एक व्यापक आरोग्य आराखडाही तयार आहे. अगदी ऑक्žसिजनच्या सिलिंडरपासून रक्žतगटाच्या यादीपर्यंतची सर्व तयारी प्रत्येक केंद्रावर राहणार आहे. नक्षलवादी कारवायांच्या धोक्žयाला तोंड द्यायची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालायचं आवाहन करणारी नक्षलवाद्यांची पत्रकं सापडल्यानं, तयारीत कोणतीही कसूर करायची नाही, असं जिल्हा प्रशासनानं ठरवलंय.
जिल्हाधिकारी कार्यालयातला एक अधिकारी मला ही माहिती देत असतानाच मला मात्र आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याला भेटायची इच्छा अनावर होत होती. तिथून बाहेर पडलो आणि कर्मचाऱ्याला गाठलं.
""सरेंडर झालेल्या एकाला तरी भेटायचंच आहे मला,'' मी त्याला विश्žवासात घेऊन बोललो आणि तो राजी झाला. त्यानं एका कागदावर नकाशा काढून दिला आणि त्याचा ठावठिकाणी सांगून तो घाईघाईनं खोलीत परतला.
मी बाहेर पडून रस्ता धरला. बऱ्याच प्रवासानंतर मी त्यानं सांगितलेल्या खाणाखुणांशी पोचलो. रस्त्याकडेच्या पानाच्या ठेल्याशी उभा राहिलो. तो आसपासच होता. दोन-चार मिनिटांनंतर तो आला आणि वाकून आत शिरत दुकानाच्या फळकुटावर बसला.
मी त्याला माझी ओळख करून दिली. तो सरेंडर झालेला नक्षलवादी आहे, हे मला माहीत आहे, हे सांगितलं. मला ते कसं कुठून कळलं, तेही त्याला सांगितलं आणि त्यानं विश्žवासानं माझ्याकडे बघितलं.
""कसा गेलास तू त्यांच्यात?'' मी त्याला थेट विचारलं आणि तो बोलता झाला...
""जंगलात बांबू तोडायला गेल्यावर पहिल्यांदा भेटलेला तो नंतरही काही वेळा भेटला. इथं खूप चांगलं आहे, असं नेहमी सांगायचा. मलाही चल म्हणायचा. हळूहळू मलाही तसं वाटू लागलं; पण मुलांची काळजी होती. त्यांना शाळेत घालायचं होतं. त्यांच्या पोटापाण्याची काळजी घेणारं कुणीच नव्हतं. ते त्याला सांगितलं, तेव्हा "आम्ही ते सगळं करू,' असं तो म्हणाला.''
""असं जवळपास दोन वर्षं सुरू होतं. माझा निर्णय होत नव्हता. एकदा मुलं उपाशी होती. त्या दिवशी मी जंगलात गेलो आणि सरळ त्यांच्यात सामील झालो. आपण नक्षलवादी झालो आहोत, हे मला माहीत होतं; पण ते मुलांसाठी..'' भिरभिरत्या नजरेनं इकडे तिकडे पाहत तो बोलत होता.
""नंतर मात्र त्यांनी मुलांकडे बघितलंच नाही. पैसेही दिले नाहीत. मला मुलांची काळजी वाटत होती. मी नेहमी कमांडरला विचारत होतो. पैसे पाठवायची आठवण करत होतो. आमची वादावादी व्हायची. मुलांना मदत करणार नसाल, तर मी परत जातो, असंही सांगून बघितलं; पण मला ते सोडणार नव्हते. उलट माझ्यावर पाळत सुरू झाली. मारून टाकायची धमकीही दिली. दलातून बाहेर पडणाऱ्यांचं काय होतं, ते तोपर्यंत मलाही माहीत झालं होतं. मी पुरता कोंडीत सापडलो होतो,'' त्याचे शब्द थरथरत होते.
""त्या दिवशीही बाचाबाची झाली आणि त्यानं एकदम बंदूकच उगारली. माझ्या डोक्žयावर नेम धरला. मी लाथ मारून त्याला पाडलं. झटापटीत त्याची बंदूक माझ्या हातात आली. अचानक गोळी सुटली आणि त्याच्या काखेखाली घुसली. तो पडला होता. मी पळालो आणि जंगलातून निसटून थेट पोलिसांकडे आलो. आत्मसमर्पण केलं. दुसऱ्या दिवशी पोलिसांना घेऊन गेलो आणि सगळे अड्डेही दाखवले. आता मी पुन्हा माणसांत आलोय; पण ते मला शोधतायत. त्यांच्या कमांडरला मी ठार मारलं, म्हणून मला मारायचा प्रस्ताव त्यांनी ठेवलाय. कुणीही कुठूनही येतील आणि मला मारतील.'' पुन्हा त्याच्या डोळ्यांत भीतीची रेषा चमकली.
""साहेब माझं नाव टाकू नका,'' काकुळतीनं तो म्हणाला. मी त्याच्या हातावर थोपटलं.
""मी फिरू शकत नाही, मजुरीही करू शकत नाही. आता मला "सर्व्हिस पोलिस'मध्ये घेणार आहेत. म्हणजे मी वाचेन आणि पगारही मिळेल. मुलांना शाळेत जाता येईल.'' कधीपासून उराशी जपलेलं स्वप्न त्यानं अजूनही जिवंत ठेवलंय.

Saturday, May 30, 2009

`डायरी`ची पाने...

सकाळ’चा प्रतिनिधी या नात्याने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये फिरून केलेले लिखाण सकाळमध्ये `फिरस्त्या बातमीदाराची डायरी' या स्तंभात प्रसिद्ध झाले. त्यापैकी काही निवडक पाने...
१)

नागपूर : 28 मार्च 2009

"सोशल इंजिनिअरिंग'

गडकरी असं नाव कुठंही वाचनात आलं, की मला नितीन गडकरी आठवतात. मग डोळ्यासमोर नागपूर दिसायला लागतं. आणि अचानक नाकात रॉकेलचा वास घुमायला लागतो..
गेली चारपाच वर्ष हे असं सुरू आहे.
नितीन गडकरी नागपूरचे आहेत, म्हणून नागपूरची आठवण येणं साहजिक आहे. पण रॉकेल..?
एकदा खूपच अस्वस्थ झालो आणि हे कोडं सोडवायला बसलो. शोधतशोधत चारपाच वर्ष मागं गेलो.
विरोधी बाकांवर बसलेल्या नितीन गडकरींनी तेव्हा विलासराव देशमुख सरकारच्या कारकिर्दीतले गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्याचा धडाका लावला होता. एक पुस्तिकाच त्यांनी छापली होती.
आखातातून आयात केलेल्या नाफ्त्याच्या आणि केरोसिनच्या विक्रीतून करोडोंच्या करचुकवेगिरीचा पर्दाफाश करून गडकरींना तेव्हा काही कोटींचं बक्षीसही मिळवलं होतं. गडकरी, नागपूर आणि केरोसिन यांची माझ्या मनातील रसायनाची उकल झाली आणि माझी अस्वस्थता संपली.
...गुढीपाडव्याच्या दिवशी मी नागपुरात आलो आणि रॉकेलचा वास नाकात भिनला. पुन्हा गडकरी आठवले. आजचा क्रम मात्र उलटा होता. आधी नागपूर, मग रॉकेल आणि शेवटी गडकरी....
सकाळी रेल्वेतून उतरलो, तेव्हा उन्हाच्या झळा चटके देत होत्या. पण शहरात फिरायचंच, असं ठरवलं. नागपुरात "भगव्या गुढ्या' घरोघरी उभारलेल्या असतील, ते शोधायचं ठरवून मी बाहेर पडलो होतो.
रस्त्याकडेला एक रिक्षावाला उभा होता. एका प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ऑइलच्या पिशव्या रित्या करत होता. आजूबाजूला रॉकेलचा वास घमघमत होता.
मी बाजूला उभा राहिल्यावर त्यानं डोळ्यांनीच मला बसायची खूण केली. कॅन बंद करून तो पुढे ठेवत रिक्षाचं हॅंडल खेचलं...
दहाबारा प्रयत्नांनंतर रिक्षा सुरू झाली आणि मिनिटभरात आमच्या भोवती धुराची वलयं दाटली... पुन्हा रॉकेलाचा वास घमघमला. आणि मला गडकरींची आठवण झाली. मी नाक दाबत रिक्षात बसलो.
सगळ्या अवयवांचा खडखडाट करत रिक्षा पुढे सरकू लागली होती.
"पेट्रोलमध्ये रॉकेल पण मिसळावं लागतं?'... मी रिक्षावाल्याला विचारलं.
"साहेब, आता तिचं आयुष्य संपलं.. ती चालेल तितकी चालेल. पण ऍव्हरेज देत नाही. मग नुसता पेट्रोल कसं परवडणार?..अर्ध पेट्रोल आणि अर्ध रॉकेल वापरतो. ऑइल थोडं जास्त टाकायचं'... तो सहजपणे उत्तरला.
"नागपुरातल्या रस्त्यांवर अशा कितीतरी रिक्षा धावतात.. नवी रिक्षा परवडत नाही आणि जुनी टाकून देता येत नाही. आमच्या पोटापाण्याचा हाच आधार आहे.' केविलवाण्या चेहऱ्यानं मागं बघत त्यानं उगीचच स्पष्टीकरण देऊन टाकलं.
"अरे पण प्रदूषण..? या धुरानं सगळी हवा खराब केली ना' मी शहरी थाटात बोललो.
""साहेब, ते प्रदूषण-बिदूषण आम्हाला माहीत नाही...असल्या कारणानं आमच्या रिक्षा बंद झाल्या, तर आमची उपासमार होईल. तुम्हाला जगवणारं, तुमचं ते प्रदूषण आम्हाला मारून टाकेल..' तो माझ्या डोळ्यात पाहत थेट उत्तरला आणि त्यानं गाडीची गती वाढवली..खडखडाट आणखीनच वाढवत रिक्षा पळाल्यासारखं करत होती.
मला काहीच बोलता आलं नाही. रॉकेलचा वास नाकात चांगलाच भिनला होते. मग मी उगाचच हवापाण्याच्या गप्पांवरून निवडणुकीवर उतरलो..
"काय होणार नागपुरात निवडणुकीचं?.. कोण जिंकणार?.. तू कुणाला मत देणार?'.. मी त्याला विचारलं.
"कसली निवडणूक साहेब.. बरीच मोठमोठी माणसं आहेत उभी. कुणीतरी निवडून येणार... नायतर, दोघांच्या लढाईत तिसराच कुणीतरी येईल. पुरोहित आहेत, मुत्तेमवार आहेत. हत्तीपण आहे.' तो समोर बघतच म्हणाला.
हत्तीच्या उमेदवाराचं नाव त्याला माहीत नव्हतं; पण तो "तिसरा' म्हणजे हत्तीच असं त्याला सुचवायचं होतं.
नागपुरातला हत्ती कॉंग्रेसची चाल रोखणार, असं इथं बोललं जातंय. हत्तीवाले वैद्य, भाजपच्या-संघाच्या गोटातले आहेत, असं म्हणतात. भाजपच्या पुरोहितांचा मार्ग मोकळा करण्यासाठीच हत्ती नागपुरात आलाय, असंही म्हणतात.
रिक्षावाल्याला हे राजकारण माहीत नाही. पण त्याला या वेळी हत्तीवर शिक्का मारायचाय.
"साहेब, महागाई वाढलीय. धंद्यातून दोन वेळच्या जेवणाची कमाई होत नाही. इथं आमचे दिवस वाईट आलेत, आणि तुमी निवडणुकीचं विचारताय.. गरिबाला कायपण देणंघेणं नाही तिचं. सगळे सारखेच. म्हणूनच आता हत्ती काय करतो बघायचं'... त्याच्या सुरातला कडवटपणा मला चांगलाच जाणवत होता.
अचानक रिक्षा घरघर करू लागली...आणि बंद पडली.. प्रयत्न करूनही ती चालू होत नव्हती..पण प्रत्येक प्रयत्नाबरोबर रॉकेलचा भपकारा मात्र दरवळत होता.
मी तिथंच उतरलो आणि बाजूच्या चहाच्या टपरीवर गेलो. अठरा-वीस वर्षांचे दोन तरुण टपरी चालवत होते. एक ग्लास चहा घेऊन मी त्यांना बोलतं केला. दोघांनीही अजूनपर्यंत मतदान केलंच नव्हतं. यंदाही नाव नोंदला नव्हतं.. "काय करायचंय मतदान करून?' .. त्यांच्यातल्याच एकानं मला प्रतिप्रश्žन केला.
चहा संपवून मी पुढे गेलो. "पंचशील चौका'त बजरंग दला'चा फलक दिसत होता. गेटातच उभ्या असलेल्या एकाशी गप्पा मारू लागलो.
"हत्ती यंदा तुम्हाला साथ देणार म्हणतात'... मी खडा टाकला. त्यानं चमकून बघितलं...आणि तो मंद हसला.
"सोशल इंजिनिअरिंगचा एक नवाच अर्थ नागपुरात जाणवतोय...

Friday, May 29, 2009

‘ध्यासपंथ’

‘ध्यासपंथ’ म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कामाची गाथा - मनोहर जोशी दिनेश गुणे लिखित ‘ध्यासपंथ’ हे पुस्तक म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थाच्या कामाची गाथा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी मंगळवारी प्रभादेवी येथे केले. परममित्र पब्लिकेशन्सतर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जोशी आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांच्या हस्ते ‘ध्यासपंथ’ यासह संतोष शिंत्रे (अरण्यरुदन), शैलेश माळोदे (अतिसूक्ष्म, महाप्रचंड), ज्ञानेश्वर भोसले (१४ महिने, १३ दिवस आणि) यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. याच वेळी परममित्र पुरस्कारांचेही वितरण जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक माणूस हा स्वत:पुरता जगतो, तर काही जण कुटुंबासाठी जगतात, मात्र समाजात अशीही काही मंडळी असतात की ती समाजासाठी जगत असतात. गुणे यांच्या या पुस्तकात समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी जगणाऱ्या माणसांचे चित्रण करण्यात आले आहे, असेही जोशी यांनी या वेळी सांगितले. जो संवेदनाक्षम माणूस आहे, तोच सामाजिक कामाचा पंथ अनुसरू शकेल, या पुस्तकातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने किमान एका तरी सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घ्यावे, असे आवाहनही जोशी यांनी या वेळी केले. डॉ. फोंडके या वेळी बोलताना म्हणाले की, आज प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमध्ये वस्तूनिष्ठ निरीक्षण, चिकित्सक विश्लेषण आणि संख्याशास्त्रीय विवेचन दिसून येते. आज आपल्या जीवनशैलीवर विज्ञान-तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असून कोणत्याही तंत्रज्ञानाचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. तो कसा करुन घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी विज्ञान समजून घेतले पाहिजे. आपल्या सर्वामध्ये विज्ञानविषयक जाणीव निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पुस्तकांचे लेखक माळोदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘नॅनो’ टेक्नॉलॉजी हा विषय युवकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. शिंत्रे यांनी सांगितले की, या पुस्तकामुळे आपल्या सर्वाना निसर्ग व पर्यावरण व त्याच्याशी निगडीत प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी मिळावी. या वेळी बोलताना गुणे म्हणाले की, विशिष्ट ध्येयाने आणि ध्यासाने समाजासाठी स्वार्थरहित काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय या पुस्तकात मी करून दिला आहे. तर भोसले यांनी आपण फासेपारधी कुटुंबात जन्म घेतला असून आपल्या समाजासाठी आपण काय केले, त्याची माहिती दिली. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी या चारही पुस्तकातील निवडक भागाचे वाचन केले. ‘ध्यासपंथ’ पुस्तकातील गिरीश प्रभुणे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर वालावलकर, संजय कांबळे, विजय जाधव यांचा या वेळी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल श्रुतिका शितोळे (मराठी), शकुंतला गावडे (संस्कृत), दिव्या रेवणकर (गणित), गिरिका भटेजा (तत्वज्ञान), अकबर पिंजारी (भौतिकशास्त्र) यांना जोशी यांच्या हस्ते परम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परममित्र प्रकाशनातर्फे घेण्यात आलेल्या गंगाधर गाडगीळ राज्यस्तरीय कथा स्पर्धेतील भरत गोडांबे व सीमा शिरोडकर या प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांचाही सत्कार करण्यात आला. संजय कांबळे यांना समाजविकास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांनी प्रास्ताविक तर अनुपमा उजगरे यांनी सूत्रसंचालन केले. परमविकास केंद्राच्या विश्वस्त संगीता पवार यांनी परममित्रच्या विविध पुरस्कारांची माहिती दिली.