Tuesday, August 17, 2021

धर्म और राजधर्म

 "आज वोट की राजनीती के कारण हिंदू समाज को टुकडे में बांटने की कोशिश हो रही है. हम समता के पक्षधर है. जन्म और जाति के आधार पर कोई छोटा या बडा नही होना चाहिये. ईमानदारी से रोटी कमाना अच्छा है. प्रामाणिक तरीके से धन एकत्र करना अच्छा है. लेकिन ईमानदारी से रोटी कमाने का भाव तभी पैदा हो सकता है, जब ह्रदय मे विश्वास हो, कि मेरे स्वार्थ के अलावा भी कोई एक सत्ता है. मुझे उसमे विलीन होना है. यह शरीर तो नही रहेगा. सनातन की खोज का नाम धर्म है. अब वक्ता के नाते मेरा भी धर्म है की, मै अच्छी अच्छी बाते कहूँ और श्रोता के नाते आपका भी धर्म है कि आप मुझे शांति के साथ सुनें. लेकिन जिस देश मे लोकसभा मे सत्ता पक्ष के सदस्य अपने प्रधानमंत्री को सुनने से इन्कार कर दे, उसमे धर्म की कितनी रक्षा होगी यह कहना मुश्किल है."

-अटलबिहारी वाजपेयी, (संत रोहिदास चरित्र आणि वाड्मय ग्रंथ प्रकाशन समारंभप्रसंगीच्या भाषणातून, मुंबई)

Monday, August 16, 2021

लोकनेता!

 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य होते. त्याच्या भाषणात कधी काव्य दिसायचे, कधी राजकारण दिसायचे. कधी कनवाळू ममतेची झाक दिसायची तर कधी धारदार कठोरपणा दिसायचा. विद्वत्ता हा तर त्यांच्या वक्तृत्वाचा गाभाच होता. त्यांच्याही वक्तृत्वात शब्दांची सुंदर अनुप्रासयुक्त गुंफण असायची. ‘गंभीर’पणातही विश्वसनीय व आश्वस्त ‘खंबीर’पणा भरलेला असायचा. वाजपेयींच्या अशा बहुपेडी वक्तृत्वाला व्यासपीठाचे मात्र पुरेपूर भान असायचे. कोणत्या मंचावर वक्तृत्वाचा कोणता पदर अलगदपणे उलगडायचा याची त्यांना नेमकी जाण असायची. म्हणूनच, आपल्याला काय बोलायचे आहे यापेक्षा, काय बोलले म्हणजे श्रोत्यांना ते आपलेसे वाटेल हे ओळखून आपल्या भाषणास नेमकी वळणे देत आपले मत श्रोत्यांच्या गळी उतरविण्याचे कसब त्यांच्या शैलीत होते. म्हणूनच वाजपेयी हे यशस्वी व पक्षभेदांपलीकडचा ‘लोकनेता’ ठरले. त्यांच्या नेतृत्वाची कमान उंचावण्यात त्यांच्या विचारवंत वक्तृत्वाचा मोठा हिस्सा होता.

मात्र, ते पंतप्रधान झाले आणि त्यांच्या वक्तृत्वास प्रशासकीय शिष्टाचाराची बंधने आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी काय बोलायचे, आणि कितीही मनात असले, तरीही काय बोलायचे नाही, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयातील संबंधित यंत्रणेकडे गेला, आणि ‘पंतप्रधान वाजपेयी’ व ‘लोकनेता वाजपेयी’ यांच्यातील संघर्षात वाजपेयी नावाचा संवेदनशील कवीची, वक्त्याची आणि ‘माणसा’ची घुसमट होऊ लागली. एकदा अनौपचारिक गप्पांत त्यांची ही घुसमट त्यांनी बोलूनही दाखविली आहे.
पण पदाच्या जबाबदारीचे भान त्याहूनही कठोर आहे हे ओळखून वाजपेयींनी त्या जबाबदारीला महत्व दिले.
... म्हणून, अटलबिहारी वाजपेयी हे ‘लोकनेता’च राहिले!!
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
🙏

Tuesday, August 10, 2021

खाण्याची 'श्रावण'संहिता !

 
बऱ्याच दिवसांपासून राजेंच्या मनात एक विचार घोळत होता. पण त्यावर निर्णय घ्यावा की नाही यावर त्यांचा निर्णय होत नव्हता. त्यांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याशी विचारविनिमय केला, आपल्या मनातील विचार त्याच्याकडे बोलून दाखविला, आणि काय करावे हे सुचविण्यासही सुचविले. मग राजेंचा सहकारीही त्यावर विचार करू लागला. राजेंना कोणता सल्ला द्यावा हे त्यालाही कळत नव्हते. त्या रात्री, गटारीच्या निमित्ताने सारे मित्र एकत्र जमले असताना, त्याच्या मनातील त्या विचाराने उचल खाल्ली, आणि शेंगदाण्याचा बकाणा तोंडात कोंबून त्याने अडखळत बोलायला सुरुवात केली. सारे मित्र थबकले. आपले काम थांबवून त्यांनी मित्राचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न सुरू केला, आणि राजेंनी दिलेल्या अवघड कामगिरीचे वर्णन कसेबसे करून राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याने आपल्या मित्रांनाही निर्णयाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. मग गप्पांचा नूरच बदलून गेला. प्रत्येकजण उपाय शोधू लागला. विचारांच्या गोंधळात समोरचा सारा माल कधी फस्त झाला तेही कुणालाच कळले नाही. अखेर राजेंचा विश्वासू सहकारी गोंधळला. थोडेसे रागावूनच त्याने आपल्या मित्रांना फैलावर घेण्यास सुरुवात केली. एवढा साधा प्रश्नदेखील तुम्हाला सोडविता येत नसेल तर आपण मित्र म्हणून राहायच्या लायकीचे नाही, असेही त्याने अडखळत मित्रांना सुनावले, आणि अर्धवट डोळे मिटलेल्या अवस्थेत एका मित्राने बोट वर केले. तो आता काहीतरी बोलणार हे ओळखून राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याने सर्वांना हातानेच शांत राहण्याची खूण केली आणि डोळ्यांच्या इशाऱ्यानेच त्या मित्रास बोलण्याची परवानगी दिली. समोरच्या रिकाम्या प्लेटकडे पाहून उलट्या मनगटाने ओठ पुसत तो मित्र बोलू लागला, "उद्याच्या उद्या, सर्वांची बैठक बोलावून राजेंनी त्या विचाराची अंमलबजावणी केली पाहिजे. श्रावण सुरू होत असल्याने, खाण्यावर बंधने घातली पाहिजेत. खरे तर, श्रावण महिन्यात कडकडीत उपवास करायचे असतात, पण राजेंच्या सहकाऱ्यांना खाण्याची सवय असल्याने महिनाभर उपवास पाळणे शक्य होणार नाही. दुसरे म्हणजे, उपवास करणे हे काही धार्मिक व्रत वगैरे नसून, अति खाण्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींना आवर घालणे आवश्यक असते, हे राजेंनी साऱ्या सहकाऱ्यांस पटवून द्यायला हवे. अति खाण्याने अपचन होते, काही वेळा पित्त उसळते, आणि खाल्लेले पचविणे जड जाते. अशा वेळी, उपवास शक्य नसेल, तर, पचायला हलके व सहज जिरवता येईल एवढेच काही खावे. श्रावण महिन्यात सणासुदीच्या निमित्ताने, शक्यतो उपवासच करणे चांगले असते असे म्हणतात. आदल्या दिवशीपर्यंतची खाण्याची सवय मोडल्यास सहकारी नाराज होऊ शकतात. तसेच, अपचन झाल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नसल्याने, अपचन होईपर्यंत खाण्याची सवय सहजासहजी मोडताही येत नसते. अलीकडे राजेंच्या अनेक सहकाऱ्यांच्या खाण्याची मोठी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती, आणि कोण किती खातो याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. काही सहकाऱ्यांना तर उलटी करावयास लागल्याने, आता तरी खाण्याच्या सवयीवर बंधने घालणे गरजेचे आहे, हे राजेंनी सर्वांस समजावून सांगायला हवे. ज्यांनी भरपूर खाल्ले आहे, त्यांना खाऊ घालणारेच आता त्यांच्या भुकेचे वाभाडे काढू लागल्याने, खाऊ घालणाऱ्याकडे मागणी करताना संयम बाळगणेही गरजेचे झाले आहे. राजेंनी हे सारे आपल्या सहकाऱ्यांस समजावून सांगावे, व किमानपक्षी श्रावण महिन्यात तरी खाण्याची बंधने पाळण्याचे आवाहन करावे"...
मित्राने अर्धवट डोळे उघडून दिलेला हा कानमंत्र ऐकताच राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याचे डोळे खाडकन उघडले, आणि तो कसाबसा उठला. श्रावणात खाण्यासंबंधीची आचारसंहिता सहकाऱ्यांना आखून द्यावी, असा सल्ला राजेंना देण्यासाठी त्याने फोन उचलला. श्रावण सुरू होण्यास काही तासांचाच अवधी उरलेला असल्याने, गटारीचे औचित्य साधून उरलेला हात मारून घ्यावा आणि मगच सर्वांनी श्रावण पाळण्यास सुरुवात करावी, असा तोडगाही सुचविण्याचे त्याने ठरविले. राजेंनी फोन उचलला, आणि या विश्वासू सहकाऱ्याने आपला विचार राजेंसमोर मांडला. राजेंनी मान हलविली, आणि यावर काय निर्णय घ्यावा याचा विचार करत ते पलंगावर पहुडले...