Friday, October 24, 2008

सहज सुचलं म्हणून...!

"...या उद्यानात उन्मळून पडलेल्या, वठलेल्या वृक्षांचे पुनर्वसन होईल. इथे ते नव्या पालवीने बहरतील'...
मुंबई महापालिकेच्या महापौर दालनात पत्रकारांशी बोलताना "राजकीय भाष्यकारा'च्या मिश्‍किल शैलीत, चेहऱ्यावरची मिश्‍किल हास्यरेषा न लपविता छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते... शिवसेनेची "मुलुखमैदान तोफ' असलेल्या छगन भुजबळ यांना महापौरपदी असताना अंधेरीच्या डी. एन. नगरमध्ये एका पडीक भूखंडावर एक अनोखे उद्यान उभारण्याचा ध्यास लागला होता. त्यासाठी ते अहोरात्र झटत होते. या उद्यानात बहरलेली झाडे, वेली असतील, संधिप्रकाशाला संगीताची साथ असेल, आणि मुख्य म्हणजे, मुंबईतील ज्या कलावंतांना महागड्या कलादालनांमध्ये प्रदर्शने भरविणे परवडत नाही, त्यांच्यासाठी एक खुले कलादालनही असेल, असा ध्यास त्यांनी घेतला होता... उद्यानाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी ते जातीने दिवसागणिक तेथे जात होते. उद्यानातीलच एका कृत्रिम टेकडीवर खास मागवून घेतलेले एक विशाल स्वयंभू "पाषाणशिल्प' त्यांनी उभे केले होते. अमिताभ बच्चनही ते शिल्प पाहून भारावला, असे भुजबळ तेव्हा प्रत्येकाला कौतुकाने सांगत असत...

सुमारे 18 वर्षांपूर्वीची ही हकीकत! छगन भुजबळ यांची 1989-90 मध्ये दुसऱ्यांदा मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती. या कालावधीत हे "कला प्रदर्शनी उद्यान' उभारण्याचे त्यांनी ठरविले. या उद्यानामुळे भुजबळांची महापौरपदाची कारकिर्द त्यांच्या रसिकतेचा पुरावा देत अधोरेखित होणार होती. सर्वत्र कला प्रदर्शनी उद्यानाचा बोलबाला होता. सारे काही गोड गोड होते.
... आणि याच गोडीमध्ये उद्यानातील टेकडीवरच्या त्या "पाषाणशिल्पा'ने मिठाचा खडा टाकला. "दर्शनी जागी बसविलेले दगडदेखील प्रेक्षणीय होतात', असा कडवट सूर सेनेतूनच उमटू लागला आणि उद्यानाच्या उद्‌घाटन समारंभात बाळासाहेबांच्या तशाच आशयाच्या वक्तव्यानंतर सारे वातावरण "कडवट' झाले. शिवसेनेतील भुजबळांचे वजन कमी झाल्याचे संकेत मिळू लागले. कला प्रदर्शनी उद्यानात जुन्या वृक्षांचे पुनर्वसन करण्याचे स्वप्न पूर्ण झालेच नाहीष उलट नंतर ते उद्यानच करपून गेले. राजकारणाबाहेर गेलेल्या एखाद्या जुन्या नेत्यासारखे दुर्लक्षित, एकाकी झाले. संगीताचे सूर तिथे घुमलेच नाहीत, आणि कलाकारांची कलाही तेथे फुललीच नाही.
त्यानंतर काही दिवसांतच नाट्यमय "जय महाराष्ट्र' करून भुजबळांनी शिवसेनेलाच दणका दिला आणि ते "कॉंग्रेसवासी' झाले. त्या काळात शिवसेनेशी "गद्दारी' करणे हे सामान्य शिवसैनिकाचे काम नव्हते. भुजबळांच्या या अचाट धाडसामुळे राज्याच्या सत्ताकारणातही छगन भुजबळ हे नाव आघाडीवर आले. त्या वेळी शिवसेनेत भुजबळांविषयी प्रचंड असंतोष माजलेला होता. "लखोबा लोखंडे' या नावाचा शिक्का भुजबळांच्या माथी बसला. पण त्याला प्रतिआव्हान देत, शिवसेनाप्रमुखांवरच राजकीय प्रत्याघात करण्याची हिमत दाखवून, खुद्द बाळासाहेबांचा "टी. बाळू' असा उल्लेख करीत सेनेच्याच मुशीत तयार झालेल्या भुजबळांनी सेनेचे आक्रमण परतवून लावले.
सेनेतील कटुता अशी शिगेला पोहोचलेली असतानाच, भुजबळांच्या मनात "सेनाप्रेमा'चा एक हळवा कोपरा सतत जपलेला होता. राज्यात प्रथमच शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली, तेव्हा भुजबळ विरोधी पक्षात होते. "वर्षा'वरच्या एका चहापानास हजेरी लावताना, काही आवडीचे पदार्थ दिसताच, "हवा हवाई' हा "परवली'चा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडला, आणि तो हळवा कोपरा आणखी नाजूक झाला... राज्यातील आणि देशातीलही मानाचे पद भूषविलेला शिवसेनेचा एक नेता नंतर कितीतरी वेळा त्या आठवणीने हळवा झालेला अनेकांनी पाहिला होता. भुजबळांविषयीच्या कटुतेतही, शिवसेनेमध्ये कुठेतरी एक "गोडवा' जपला जात होता. राजकीय अपरिहार्यतेपोटी त्यांनी बाळासाहेबांवर कारवाई करण्याचेही धाडस दाखविले. बाळासाहेबांवर टीका करतानादेखील, त्यांच्याविषयीचा भुजबळांचा आदर अनेक प्रसंगांतून व्यक्त झाला होता. सत्ताधारी पक्षाचे वजनदार नेते असताना, तेलगी प्रकरणात त्यांना मनस्ताप सोसावा लागला. डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातही त्यांना लक्ष्य केले गेले. उपमुख्यमंत्रीपदाची कारकिर्द संपल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा सातत्याने राजकीय क्षेत्रात होत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीआधीही, भुजबळ पक्षबाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहूनच महाराष्ट्रातील आणि देशभरातील "ओबीसी' ताकद एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
बरोब्बर एक वर्षापूर्वी, भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथे एका समारंभात गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, सुरूपसिंग नाईक आदी नेते एका व्यासपीठावर आले आणि राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याचे संकेत गडद झाले. ओबीसी नेत्यांची एक आघाडी आकार घेणार असे आडाखे बांधले जाऊ लागले. अलीकडेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बंडाच्या पवित्र्यानंतर पुन्हा भुजबळ, मुंडे आणि काही असंतुष्ट नेते एकत्र आले. राष्ट्रवादीच्या तंबूत आपण समाधानी नाही, हे दाखविण्याची संधी त्यांनी कधी सोडली नाही. भुजबळ नव्या पक्षाची स्थापना करणार, की एखाद्या प्रस्थापित पक्षाला बळ देणार, एवढाच मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे. राजकारणात उपेक्षा सहन करतानाही, आपण "बाप माणूस' आहोत, हे दाखविण्याची संधी मात्र वेगवेगळ्या शक्तिप्रदर्शनांतून ते साधत राहिले.
मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मुद्‌द्‌यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा भुजबळांच्या राजकारणाने "नाट्यमय वळण' घेतले आहे. बरोब्बर एक वर्षापूर्वी, ऑक्‍टोबर महिन्यातच, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून भुजबळांना दिलासा दिला होता. भुजबळांना आकाशापर्यंत उचलून धरणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आता मात्र त्यांची गरज संपली असून त्यांची उपेक्षा होत असल्याचे ठाकरे यांनी संपादकीय लिखाणात म्हटले होते. राजकारण गाजविणारी शिवसेनेची "मुलुखमैदान तोफ' अशी प्रशंसाही ठाकरे यांनी केली होती. भुजबळ सेनेत असते, तर त्यांची अशी उपेक्षा झाली नसती, असा "दिलासा'ही त्यांनी दिला होता...
...पुन्हा "हवा हवाई'चा परवलीचा शब्द सेनेच्या पहिल्या फळीत घुमेल?

No comments: