Saturday, August 4, 2007

वासूचे ‘वस्तु’शास्त्र...
सकाळपासून घर नुसतं धुमसत होतं. कशावरून तरी बायकोचं बिनसलं होतं. पण वासु शांत होता. घरात नेहमी धुसफूस व्हायला लागल्यावर, काही वास्तुदोष तर नाही ना, हे पाहण्यासाठी वासुनं संजूबाबांना वर्तमानपत्रात पत्र लिहिलं, आणि संजूबाबाचं उत्तर आल्यावर ती पिशवी समोरच्या खुंटीवर अडकवून ठेवली.घरातल्या कटकटींना वैतागलेल्यांना संजूबाबा त्यांच्या वास्तुशास्त्राच्या सदरातून सल्ला देतात आणि एकदम जालीम उपाय सुचवतात असं ऑफिसातल्या कुणीतरी त्याला सांगितलं होतं.घरातल्या भांडणापासून मुक्ती हवी असेल, तर दोघांची मिळतीजुळती आठवण असलेली एखादी वस्तू समोरच्या खुंटीवर टांगून ठेवा, असं संजूबाबांनी सुचवलं, तेव्हा पहिल्यांदा अशी कोणतीच वस्तू वासूला आठवेना.विचार करताकरता अचानक वासूचं लक्ष कोपऱ्यातल्या खुंटीकडे गेलं...एक मळकट, जुनाट पिशवी तिथे धूळ खात पडली होती. त्या पिशवीचा इतिहास आठवून वासुचे डोळे अचानक चमकले आणि पिशवीवरची धूळ झटकून त्यानं ती समोरच्या खुंटीवर अडकवली.वासूचा हा उद्योग सुरू असताना पुन्हा बायको बाहेर आली, आणि फणकाऱ्यानं खुंटीवरच्या पिशवीकडे पाहून एक जोरदार हुंकार देत ती आत वळली.वासूनं पुन्हा त्या पिशवीकडं पाहीलं. बायकोलाही ती पिशवी चांगलीच लक्षात राहिली होती, हे त्यानं ओळखलं.बायकोच्या चिडण्यामुळे आपण आता अजिबात अस्वस्थ नाही, असा अनुभव वासूला लगेचच आला. त्यानं मनात संजूबाबाचे आभारही मानले.तेवढ्यात वासूचा मुलगा समोर येउन बसला आणि ठरल्यासारखं त्यानं मुलाला लाकूड्तोड्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली...जंगलातनं लाकडं घेऊन येताना एका लाकूडतोड्याला तहान लागली, म्हणून वाटेवरच्या विहीरीतून पाणी काढण्यासाठी तो हातातली कुऱ्हाड बाजूला ठेऊन वाकला, तेवढ्यात कुऱ्हाड विहिरीत पडली. लाकूडतोड्या रडायला लागला. तेवढ्यात प्रत्यक्ष देव विहिरीतून वर आला.समोर खुंटीवर लटकणाऱ्या पिशवीकडे पाहात वासू गोष्ट सांगत होता...देवाच्या हातात सोन्याची कुहाड होती. त्यानं लाकूड्तोड्याला विचारलं, ‘हीच का तुझी कुऱ्हाड?’लाकूड्तोड्यानं रडतच मानेनंच नाही म्हणून सांगितलं आणि तो पुन्हा रडायला लागला...मग देवानं चांदीची कुऱ्हाड आणली. लाकुड्तोड्या पुन्हा नाही म्हणाला, म्हणून त्यानं लोखंडाची कुऱ्हाड आणली.लाकूडतोड्या लगेच म्हणाला, ‘हीच माझी कुऱ्हाड’... लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणावर देव खुश झाला, आणि त्याला सोन्याची आणि चांदीचीपण कुऱ्हाड बक्षीस देऊन अंतर्धान पावला.... गोष्ट सांगून संपली तरी वासूचं मन गोष्टीतच अडकलं होतं. मधेच त्याची नजर खुंटीला टांगलेल्या पिशवीकडे वळत होती... विचार करताकरता त्याचा डोळा लागला..----------संध्याकाळची वेळ होती. बायकोबरोबर वासू गावाबाहेर फिरायला गेला होता, बायकोही खुशीत दिसत होती, म्हणून वासूनं सहज तिच्या माहेरचा विषय काढला. आणि अचानक काहीतरी बिनसलं. बायको थबकून रस्त्याकडेच्या विहिरीच्या कठड्यावर बसली.
वासू तिच्याजवळ गेला आणि तिची समजूत काढू लागला. पण तिनं मान फिरवली... आणि... अचानक तोल जाऊन ती विहिरीत पडली...वासू प्रचंड घाबरला. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. आकाशाकडे पाहात नकळत त्यानं हात जोडले...तेवढ्यात कडकडाट झाला. बायकोच वर आली, असे वाटून वासूनं विहिरीकडे पाहिलं.पण ती बायको नव्हती. प्रत्यक्ष देवच विहिरीतून वरती आला होता. वासू पुन्हा व्याकूळ झाला.ते पाहून देव पुन्हा विहिरीत गेला. वरती आला, तेव्हा त्याच्यासोबत एक रूपवान स्त्री होती. भारावल्यासारखा वासू तिच्याकडे पाहात राहिला.हीच का तुझी बायको?’ देवानं विचारलं आणि वासू भानावर आला. त्याला लाकूड्तोड्याची गोष्ट आठवली... बायकोचा रागानं फणफणलेला चेहेराही त्याच्या नजरेसमोर आला आणि क्षणभर त्याचा थरकाप झाला.त्यानं चटकन मान हलवून हो म्हटलं. आणी देवानं ती सुन्दरी त्याच्या हवाली केली...‘तू खोटं बोललास’.. अंतर्धान पावतापावता देव वासूला म्हणाला...‘देवा, मी जर हिला नाही म्हटलं असतं, तर तू अनेक सुंदऱ्यांची रांग लावली असतीस... त्यांना नाही म्हटलं असतं, तर माझ्या खऱ्या बायकोला वर आणलं असतस, आणि तिला हो म्हटल्याबरोबर, माझ्या बायकोसकट सगळ्या मला देऊन टाकल्या असत्यास.
देवा, खऱ्या बायकोसकट ही सगळी तुझी बक्षीसं मला पेलवली नसती रे...’ वासू काकुळतीनं म्हणाला आणि काहीच न बोलता देव अंतर्धान पावला......... त्या सुंदरीला घेऊन वासू घरी आला। त्यानं दरवाजा ठोठावला आणि तो मटकन खालीच बसला...बायको पदराला हात पुसत समोर उभी होती...उलट्या हातानं डोळे चोळत वासू भानावर आला, आणि ते स्वप्न होतं हे त्याच्या लक्षात आलं. तो सावरला... मानेभोवतीचा घाम पुसत त्यानं कसंबसं हसून बायकोकडे बघितलं॥ फणकारत तिनं मान फिरवली. वासूची नजर पुन्हा त्या पिशवीवर खिळली, आणि त्याला लग्नानंतरचे दिवस आठवले...------------------------म्युनिसीपाल्टीच्या लायसन खात्यात चिकटल्यावर लगेचच वासूचं लग्नं झालं. हळूहळू त्याचा नोकरीत जमपण बसला. अचानक येऊन भाज्यांची पोती उचलून नेणारी चोरगाडी रोखण्यासाठी गल्लीतल्या भाजीवाल्यांनी एकदा वासूचे हात दाबून त्याला साकडं घातलं आणि त्याना संरक्षण मिळालं. तेव्हापासून रोज संध्याकाळी घरी येताना तो भाजीबाजारात फेरी मारायचा. भाजीवाले वासुच्या पिशवीत निमूटपणे भाजी कोंबायचे. रोजचा भाजीचा खर्चही वाचला, म्हणून बायकोही खूष होती, ताज्या भाजीमुळे वासूच्या घरात सौख्य नांदत होतं....... त्या दिवशी वासु जरा लवकरच काम आटोपून घरी येतायेता बाजारात गेला. सगळे भाजीवाले जीव तोडून धंदा करत होते.

रोजची पिशवी भरून गेली, म्हणून एका फेरीवाल्याकडून वासूनं एक पिशवी विकत घेतली. आणि दोन पिशव्या भाजी घेऊन तो घरी आला.एवढी भाजी बघून बायको खुश होणार, अशा विचारानं वाटेवरच त्यानं स्वतच्या डोक्यावरून चंगला दोनचार वेळा हात फिरवला...झपझप चालत त्यानं घर गाठलं. भाजीच्या पिशव्या भिंतीजवळ ठेवुन तो खुर्चीत टेकला, तोच बायको बाहेर आली.
दोन पिशव्या बघून तिचे डोळे विस्फारले होते.‘ही दुसरी पिशवी कुणाची?’ तिच्या प्रश्नानं वासू चक्रावला.
‘अगं, भाजीच इतकी झाली, की दुसरी पिशवी विकत घ्यावी लागली.. कसंबसं तो म्हणाला, पण पिशवी विकत घेतल्यामुळे बायको चिडलीये, हे त्याच्या लक्षात आलं.
नंतर बरेच दिवस घरात धूसफूस सुरूच होती...
फुकटच्या भाजीमुळे घरात नांदणारं सौख्य विकतच्या एका पिशवीनं हिरावुन घेतलं होतं...
त्या रात्री जेवणं अबोल्यातच उरकली आणि वासु अंथरूणावर आडवा झाला...बायकोही स्वयंपाकघर आवरून आली, आणि पाठ करून झोपली
...वासूची बेचैनी वाढतच होती... त्याला राहवेना... बळेबळेच त्यानं बायकोला जवळ ओढलं, आणि चुकीची कबूली देऊन टाकली...
मग तीही त्याच्या कुशीत विसावली.
....... यथावकाश वासुला मुलगा झाला...
त्या विकतच्या पिशवीनं माजवलेल्या कुरुक्षेत्रामुळेच वासूचं घर भरलं होतं...
----- ------
अलीकडे वासूच्या घरात नेहमी दोघांची कडाक्याची भांडंणं होतात।
घरात काही दोष नाही ना, ते तपासून घे, असं त्याला सासूबाईंनीच सुचवलं होतं
॥घराला काहीतरी वेगळं नाव देऊन बघ, असंही कुणीतरी सुचवलं, पण त्यानं वास्तुशाराकडं वळायचं ठरवलं... आणि संजूबाबाचा सल्ला घेतला... दोघांनाही सुखद आठवणींनी बांधून ठेवणारी वस्तू म्हणजे ती एक पिशवीच होती॥तीच त्यानं समोरच्या खुंतीवर टांगून ठेवली आहे...गोष्ट सांगताना बाबा नेहमी त्या पिशवीकडं का पाहातात, असा प्रश्न मुलाच्या डोळ्यात वासूला नेहेमी दिसतो...घरात कितीही रणकंदन असलं, तरी मुलाला रोज गोष्ट सांगावीच लागते...त्याला एखदं भावंड हवं, असा विचार वासूच्या मनात आला, आणि तो चमकला...आज रात्री बायकोचा राग घालवायचा, असं त्यानं ठरवलं, आणि त्याला हलकंहलकं वाटलं... त्यानं हळूच पिशवीकडे बघितलं..
.पंख्याच्या वाऱ्यानं ती मस्तपैकी झुलत होती...

No comments: