Wednesday, August 29, 2007

करूणा!!

‘संभवामि युगेयुगे’... लाख वर्षांपूर्वी कधीतरी, अर्जुनाला दिलेला हा ‘कानमंत्र’ अठरा अक्षौहिणी़मधल्या कुणीतरी ऐकला आणि केवळ ‘कानोकानी’ होऊनच आजवर घुमत राहिला. द्वापार युगापासून आजपर्यंत आम्ही निर्धास्त आहोत, ते तुझ्या या आश्वस्त ग्वाहीमुळेच! खरं तर, ‘पब्लिक मेमरी इज शॊर्ट’ हा आमच्या युगाचा मंत्र आहे. म्हणून तर आमचे आजचे मायबाप वारेमाप आश्वासने देत सुटतात, आणि जनांच्या कानापर्यंत पोहोचायच्या आधीच, ती हवेत विरूनपण जातात. जे लक्षात ठेवायला हवे, ते आम्ही विसरतो, आणि जे विसरायला हवे, ते आम्ही युगानुयुगे लक्षात ठेवून बसतो... तू कधीकाळी सांगून ठेवलंस, म्हणूनच, ‘विनाशाय च दुष्कुताम’ तू इथे अवतरणार, अशी आमची खात्री असते. म्हणूनच, जेव्हाजेव्हा, आमच्यावर ‘धर्मसंकट’ येतं, तेव्हातेव्हा आम्ही तुझ्या आगमनाकडे डोळे लावून बसतो. तूच आम्हाला संकटातून तारशील, या खात्रीनं आम्ही पामरं, तुझी पूजा बांधतो, देवळादेवळात जपजाप्य करतो, यद्न्ययाग करतो... परवा आमची निरागस मुलं हसताखेळता कुणाच्या तरी ‘दुष्क्रुता’मुळे तुझ्या दारी आली. तेव्हा त्यांच्यापैकी कुणकुणाच्या घरात, तुझी बासरीधारी तसबीर, पुराणकथांमधला तुझा तो निरागसतेचा भाव चेहेयावर घेऊनच आश्वस्त हसत होती...

कघीकाळी तू अर्जुनाला सुनावलेले ते खडे बोल, हजारो वर्षापूर्वीच कधीतरी ‘व्यासांचं उष्टं’ चिवडताना आमच्या हाती लागले, आणि आम्हीही ते कपाळी लावून ‘धर्मवाक्य’ मानले. तुझ्या त्या आश्वासनामुळेच आम्ही ते सगळंच्या सगळं ‘व्यासोच्छिष्ट’ उचलून ‘देवघरा’त दडवलं... तेव्हापासूनच आम्ही तुझ्या त्या आश्वासनाच्या भरवशावर भविष्याकडे पावलं टाकतो आहोत. ‘धर्मसंस्थापना’आधी ‘विनाशाय च दुष्क्रुताम’ अवतरणार, असंही तू त्या अर्जुनाला सांगितलं होतस. आमची स्मरणशक्ती ‘तोकडी’ असेल, तरीही ते आम्ही आज, लाखो वर्षांनंतरही विसरलेलो नाही. कारण, त्या आश्वासनामुळेच तर तू आमचा ‘देव’ झाला आहेस. नाही तर, घराघरातल्या तुझ्या त्या हसया, बासरीधारी तसबिरी आता खूप वर्षांच्या झाल्यात. उदबत्त्यांच्या धुरानं त्या काळवंडल्या पण आहेत. तुझ्या त्या ‘भगवद्गीते’ला कधीपासून गुंडाळलेलं लाल, रेशमी वस्त्रंपण आता जुनाट झालंय.

पण, तीच तुझी गीता मात्र, आमच्या युगात दिमाखानं मिरवतेय एका जागी... कारण, तिच्यावर हात ठेवून आम्ही काहीही बोललो, तरी ते ‘सत्य’ असतं. म्हणूच्नच या गीतेचा महिमा आम्हाला पटला आहे, म्हणूनच तुझ्या ‘किमये’वरचा आमचा विश्वास आणखी घट्ट झाला आहे. कधीकाळी, शिशुपालाचे ‘शंभर अपराध’ होईपर्यंत तू त्याला मोकट सोडलं होतस. आता युग बदललंय, ते आम्हाला मान्य आहे. महागाईपण वाढली आहे. ‘शंभरा’ला आजकाल फार किंमतही राहिली नाहीये. पण आता नवं काहीतरी परिमाण तू ठरवलं असशीलच. दुष्क्रुतांच्या घड्यात नव्या ‘शिशुपाला’ची किती पापं भरली पाहिजेत?

गेल्या आठवड्यात, म्हणजे, तुझ्या जगातल्या, क्शणभरापूर्वी आमची मुलं तुझ्याकडे गेली आहेत. तुझ्या छायेत तिथेतरी ती सुखरूप असावीत, असं आम्ही मानतो... आमच्या जगातल्या ‘दुष्क्रुतां’चे पुरावे अशा असंख्य निरपराध, निरगसांच्या रूपानं तुला रोजच्या रोज घरबसल्याच मिळत असतील. तुझ्या नारदाला त्यासाठी आमच्या जगात फेरफटके मारायची आता गरज राहिलेली नाही. शभराच्या जागी आता, करोडोचा हिशेब केलास, तरी, आमच्या ‘शिशुपालां’चे ‘घडे’ भरलेत, असं तुला अजूनही वाटत नाही?... तुझ्या हिशेबांचा थांग आम्हा पामरांना लागत नाही. तू येशील, तोवर आमच्या ‘मायबाप’ सरकारनं, अशा ‘शिशुपालां’साठी, ‘निषेधाचे खलिते’ लिहून तयार ठेवलेलेच आहेत...
----

1 comment:

Anonymous said...

हैदराबादच्या बॊम्बस्फोटात संगमनेरच्या कॊलेजमधले विद्यार्थी मृत्यू पावले. त्यांना नम्र श्रध्दांजली...