Thursday, November 19, 2009

तुझे निरंतर चित्र काढतो...

....महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रंगविलेले पाच वर्षांनंतरच्या महाराष्ट्राचे एक रम्य चित्र-
गरीबांसाठी दहा लाख घरे, गावागावाला डांबरी रस्ते, मुलामुलींना मोफत शिक्षण, जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे एफडी करून स्त्री भृणह्त्या रोखणार (?), ६५ वर्षावरील गरजू वृद्धाना आजीवन ६०० रुपये पेन्शन, गरीबांना ३ रुपय किलो दराने धान्य = सुजल महाराष्ट्र, सुफल महाराष्ट्र!!!
आहात कुठे???
या स्वप्नाचे कात्रण काढून ते जपून ठेवावे काय? तुम्हाला काय वाटते?

भुजबळांच्या स्वप्नातील तो महाराष्ट्र असा असेल...
-राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी हाती घेतलेल्या कायदा व सुव्यवस्थाविषयक कार्यक्रमांना अधिक गती देण्याबरोबरच नक्षलवाद व दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम करण्यात येईल.
(मागच्या सरकारचेही हेच स्वप्न होते...)
-राज्यातील सर्व प्रमुख शहरे किमान चारपदरी रस्त्यांनी जोडण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहेच. आता त्यापुढे जाऊन वाड्या, तांडे, पाडे यांसह ५०० लोकवस्तीपर्यंतची व त्यावरील सर्व गावे डांबरी रस्त्यांनी जोडण्याचे ठरविले आहे.
-गरीबांसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये किंमतीची २७५ चौ. फुटांची घरे बांधण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून येत्या पाच वर्षांत दहा लाख घरे बांधण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
-मुलींना पदवीपर्यंतचे, तर मुलांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार आहोत. ( तारखेकडे लक्ष द्या... )
मुलींची भ्रूणहत्या थांबावी म्हणून मुलगी जन्माला येताच तिच्या नावे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये रक्कम ठेवून ती उपवर होईल तेव्हा एक लाख २५ हजार रुपये मिळतील, अशी `माहेर योजना` आम्ही राबविणार आहोत.
-आज निराधारांसाठी, वृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना सुरू आहेत. त्यांची व्याप्ती वाढवून उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या ६५ वर्षांवरील प्रत्येक गरजू स्त्री-पुरूषाला आजीवन सहाशे रुपये पेन्शन दरमहा देण्याची योजना आमच्या विचाराधीन आहे.
-दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना आम्ही २५ किलो धान्य ३ रुपये प्रतिकिलो दराने देणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांना आरोग्यपत्रिकाही देणार आहोत. अशा आरोग्यपत्रिकाधारक नागरिकांना हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, ब्रेन ट्यूमर इत्यादी दुर्धर आजारांवरील उपचार व सर्व शस्त्रक्रिया विनामूल्य करण्याची तरतूद असणार आहे.
-राज्यातील शेतमजुरांना व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांचे तसेच विविध प्रकारच्या कारागीरांचेही बचतगट स्थापन करण्यात येतील. या बचतगटांना विविध उद्योगांसाठी ४ टक्के दराने कर्ज देण्याचे आम्ही ठरविले आहे.
-मागासवर्गीयांच्या उत्थान कार्यक्रमाचीही कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-`सुजल महाराष्ट्र, निर्मल महाराष्ट्र` अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात सर्वांना वैयक्तिक नळजोडण्या देण्याचा निर्धार आघाडी शासनाने केला आहे.
-परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी चैत्यभूमी स्मारक परिसरात जमीन उपलब्ध करून त्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी `चैत्यभूमी विकास प्राधिकरण` स्थापन करण्याचेही आम्ही ठरविले आहे.
(यापेक्षा आणखी काय हवे???)
(टीप : काहीतरी `विनोदी' लिहावे, असा विचार मनात आला, म्हणून सहज महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज‘ या पोर्टलवर चक्कर मारली. आणि, चक्क, किती कॊपी करू अन किती नको, एवढा ‘मसाला’ हाती आला... तोच चिकटवला आहे. त्यामुळे, यातील कोणताही विनोद माझा नाही... अधिक तपशीलासाठी किवा मनोरंजनासाठी तुम्हीही मधूनमधून तेथे चक्कर मारा... )

1 comment:

Anonymous said...

tumchyasarakhi manasa fakta shashanala dosh deu shaktat. mala tari yaat kahich ashakya disat nahi ahe. Je kahi sadhya aplyala milate ahe tyachich hee pudhachi payari ahe, itkach. Ani maharashtra he kahi dubala rajya nahi ahe , ki lagech tumhi lagle cheshta karayala. Marathi manasa jaaga ho, swatchich kimmat kami ka lekhta raje ?