Sunday, November 8, 2009

ग्लोबल स्टेट` : महाराष्ट्र

मुंबई आणि राज्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन, महागाईवर नियंत्रण अशा विविध माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत आहे. अडचणी अनेक असल्या तरी महाराष्ट्र आजही गुंतवणुकदारांसाठी पहिल्या पसंतीचे स्थान आहे.
`ग्लोबल स्टेट` म्हणून महाराष्ट्र नजीकच्या भविष्यात लौकीक प्राप्त करील, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शपथविधीनंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी, कष्टकर्‍यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणार असून पाण्याचा प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य असेल, असे सांगितले.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राजभवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमानंतर मंत्रालयात येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि वीरमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाचा प्राधान्यक्रम सादर केला. तसेच राज्यातील जनतेच्या विकासासाठी शासन करणार असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

(‘महान्यूज’च्या सौजन्याने...)

No comments: