Thursday, April 1, 2010

एकदा ‘रान’ पेटलं...

एकदा एक कवी, म्हणाला, मलापण ‘पद्मश्री’ हवी... आणि ‘रान’ उठलं. वयोमानामुळे भान सुटलं, म्हणालं.
तू ‘जनस्थान’ मिळव, नाही तर ‘ज्ञानपीठ’ मिळव.
तुझा राजकारणाशी संबंध काय? ‘मातोश्री’चा शेजारी, एवढाच ना तुझा पत्ता? पावसाच्या नावानं धो-धो कविता पाडल्यास, म्हणून ‘रानाशी नातं’ नाही जुळत... त्यासाठी, रानकळा सोसाव्या लागतात.
रानातल्या एअर कंडिशन्ड घरात, हुरड्याची कणसं चाखवत, ‘जाणत्या राजा’ला रानाचं कवतिक ऐकवावं लागतं... राजकारणाचं बोट धरून रानातल्या कविता कॊंक्रीटच्या जंगलात दिमाखात फिरू लागल्या, की पद्मश्री मागून चालत येते...
तुझ्या इमारतीच्या टीचभर अंगणात, आहे असं, माझ्यासारखं रान?
खिडकीच्या चौकोनी तुकड्यातनं दिसणारं पानगळीचं एखादं पिवळट झाड, हा तुझा निसर्ग...
त्याच चौकटीतून पडणारा पाऊस न्याहाळत तू ओळी ‘पाड’ल्यास, तेव्हा रानातलं ‘गाव’ हसत होतं... ‘कर’ म्हणालं, हवं ते.
...रानाचा ‘पापड’ मोडला नाही तेव्हा !
... पण पद्मश्री हवी म्हणालास, तेव्हा रानानं तुझी बुल्गानी बोलती बंद केली.
आणि ‘पानकळा’ उजळून गेल्या. अगदी, फुकटात... या उजेडाला का पैसे पडतात ?
अरे, हे रान मातीनं माखलं, त्यानं जुंधळ्यावर चांदणं पेरलं... रानाची गाज राजाला ऐकवली...
... पण, अंधाराच्या दारी उजेड पाठवायचा निरोप
सूर्यदेवाला दिला, तेव्हा त्याला कुठे माहीत होतं, खरा सूर्यदेव कोण आहे?
दिवा लावून दादांनी हातात ‘मेणबत्ती’ दिली, तेव्हा रानाच्या पानकळा त्याच मिणमिणाटात कोमेजल्यागत निपचीत पडल्या...
तेव्हा जुंधळ्यावर पेरलेलं चांदणं, कुत्सितासारखं हसत होतं...
अंधारात चाचपडणार्‍या घरावर निसर्गाची निष्पर्ण सावली नाचत होती...
कुणी ‘फोडणी’च्या चारोळ्यांची पार्टी केली,
कुणी नुस्तेच ‘फुटाणे’ चापले...
‘पद्मश्री’चा फोटो अंधारात लटकायला लागला, तेव्हा खर्‍या सूर्यदेवाची ओळख रानाला पटली.
अंधार पडला, की तो आकाशातला सूर्यसुद्धा, लपूनच बसतो... तो कुठून पाठवणार अंधारलेल्या दारात उजेडाचा कवडसा?
... पण हे चालणार नाही.
रान आता पेटून उठलंय... आता चांदण्याचा मिणमिण उजेड नकोय... रानाला लखलखाट हवाय... तो तर त्याचा हक्कच आहे...
कारण, रानालाच ‘पद्मश्रीचं कुंपण’ आहे...
(१ एप्रिल!!!)
----------------------------

3 comments:

BinaryBandya™ said...

लय म्हणजे लयच भारी ....

अनिकेत वैद्य said...

भारी रे.
आवड्या मेरेकू.

Anonymous said...

भारी आहे पण लैच वंगाळ आहे ...आम्ही अडाणी मानस एवड वंगाळ नाही समजायचं