Thursday, September 3, 2009

आज महाजन असते तर?

आणीबाणी संपली आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पहिले बिगर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले. आणीबाणीआधीचा जनसंघ भाजपच्या रूपाने नव्या दमासह राजकारणात उतरला होता. पंचवीस वर्षे सत्तेच्या जवळपासदेखील नसलेला हा पक्ष केंद्रातील जनता सरकारमध्ये आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये सहज सामावून गेला. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्‌द्‌यावरून उठलेल्या वादळात, संघ परिवाराशी असलेले नाते जपत सत्तेवरून पायउतारही झाला. त्याच काळात भाजपच्या आणि राष्ट्रीय राजकारणात प्रमोद महाजन नावाच्या एका उमद्या नेतृत्वाचा उदय होत होता. डॉ. विश्‍वनाथप्रताप सिंह हे आमचे नेते आहेत, असे निःसंदिग्धपणे सांगत महाजनांनी देशाच्या सत्ताकारणात पक्ष रुजवायला सुरवात केली, तेव्हा वीस वर्षांनंतरचे भविष्य त्यांच्या मनात डोकावत असेल, याचा अंदाज फारच थोड्यांना आला असावा. ...मुंबईत नायगावच्या "चंचल स्मृती'मध्ये तेव्हा भाजपचे कार्यालय होते. वसंतराव भागवतांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा मुंबईतील मुक्काम याच कार्यालयात असायचा. महाजनदेखील अनेकदा येथे असत. राजकारणातील भविष्याची स्वप्ने पाहणारा हा तरुण तेव्हा पक्षाचे नेतृत्व करण्याचा आत्मविश्‍वास उराशी बाळगूनच वावरायचा. केंद्रीय राजकारणाशी फारशी जवळीक नसली, तरी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार आदर होता. तो त्या वेळी त्यांच्या वाक्‍यावाक्‍यातून प्रकट व्हायचा. वाजपेयींच्या वक्तृत्वाची मोहिनी महाजनांच्या मनावर अंतर्बाह्य पसरलेली होती. वाजपेयी यांच्या अमोघ वक्तृत्वशैलीमुळेच त्यांनी देशवासीयांच्या मनात स्थान मिळविले आहे, हेही त्यांनी हेरले होते. आणि म्हणूनच महाजनांनी राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याआधी वक्तृत्वशैली विकसित करण्याचा ध्यास घेतला. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले आणि त्यांच्या यशाची कमान चढत गेली. १९९५ पासून भाजप आणि महाजन राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. जेव्हा मोबाईल ही सर्वसामान्यांसाठी "जादुई' चीज होती, त्या काळात महाजनांच्या हातात मोबाईल आला. तिथूनच भाजपला "पंचतारांकित संस्कृती'ची बाधा झाल्याची ओरड सुरू झाली. संघ परिवारातील अनेकांनीही या कुजबुजीत भाग घेतला होता; पण काळाची पुढची पावले ओळखणाऱ्या महाजनांनी आपल्या हातातला मोबाईल प्रत्येक नागरिकाच्या हातात यावा, यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मात्र फारसे कौतुक झाले नाही. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे गोडवे गातो. या क्रांतीच्या शिल्पकारांच्या मालिकेत महाजनांचे नाव वरचे होते, तरी खुद्द महाजनांनी मात्र दिलखुलासपणे या क्रांतीचे सारे श्रेय राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना दिले होते. कारण राजकारणात राहूनदेखील मध्यमवर्गीय मनमोकळेपणा त्यांच्या स्वभावात दडलेला होताच. म्हणूनच श्रेयासाठी कधीही धडपड त्यांनी केली नाही. त्या त्या क्षणीचे नेमके आडाखे महाजनांकडे पक्के बांधलेले होते. म्हणूनच तणावाच्या असंख्य प्रसंगांनंतरही शिवसेनेसोबतची युती टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनाही काही कटू अनुभवांना सामोरे जावे लागले; पण ते अनुभव मनाच्या एका कप्प्यात कुलूपबंद करून "युतीचा धर्म' ते जपत राहिले. म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंनी महाजनांवर प्रेम केले. म्हणूनच, युतीमधील कटुता संपुष्टात आणण्यासाठी बाळासाहेब आणि लालकृष्ण अडवानी हे दिग्गज नेते केवळ महाजनांच्या शब्दाखातर समोरासमोर बसले. म्हणूनच कटुता असतानाही युतीचे सरकारही एकसंध राहिले. महाजनांच्या वैशिष्ट्यांची जाणीव त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला होती. म्हणूनच प्रसंगी कठोर आणि अनाकलनीय वाटणारे महाजनांच्या स्वभावातले अवघड कंगोरेदेखील अनेकांनी पचविले; त्याकडे दुर्लक्ष केले. महाजन नावाच्या एका वादळी व्यक्तिमत्त्वाचा दुर्दैवी शेवट झाला आणि पोकळीचे विज्ञान राजकारणातही लागू होते, याचे प्रत्यंतर सध्या भाजपला येत आहे. २००४ मधील निवडणुकांमध्ये भाजपची प्रचाराची रणनीती आखण्यात महाजनांचा सिंहाचा वाटा होता; पण त्यांची "इंडिया शायनिंग' योजना सपशेल फसली. त्या पराभवाची जबाबदारी दिलखुलासपणे स्वीकारणारे ते पहिले होते. ... महाजन गेले आणि भाजपमध्ये वादळे घोंघावू लागली. कदाचित पोकळीच्या विज्ञानाचाच हा परिणाम असावा. लोकसभेत दारुण पराभव झाला. निवडणूक रणनीती आखण्यापासूनच्या टप्प्यावरच पक्ष भरकटल्याचे जनतेलाही जाणवत होते. पराभवाचे सावट मात्र कोणालाच दिसले नव्हते. महाजन असते तर अगोदरच्या निवडणुकीतील पराभवाचा धडा ते विसरलेच नसते. पराभवाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, हा तर त्यांचा बाणा होता. पराभवानंतर भाजपने बांधलेली "रालोआ'ची मोटदेखील खिळखिळी होऊ लागली. पुन्हा "एकला चलो रे' सुरू होणार, अशी चिन्हे दिसू लागली. हिंदुत्व हा भाजपला संघ परिवाराशी जोडून ठेवणारा दुवा होता. महाजनांनी मोठ्या कसरतीने संघ परिवारासोबतचे नाते जपत राजकारणही केले होते. अलीकडे मात्र "हिंदुत्व' हाच भाजपच्या वैचारिक संभ्रमाचा मुद्दा झाला. पक्षाच्या- अगदी जनसंघाच्या स्थापनेपासून- सत्तेचे वारेदेखील जवळपास फिरकत नव्हते, तेव्हापासून पक्षाच्या राजकीय वाटचालीचे पाईक असलेल्या अडवानी आणि वाजपेयी यांच्याबद्दल महाजनांच्या मनात अतीव आदर होता. कारण ते सत्तेच्या राजकारणासाठी पक्षकार्यात उतरलेले नेते नव्हते. अडवानींच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील बराच मोठा काळ तर ते सत्तेबाहेरच होते. म्हणूनच, अडवानींच्या निरपेक्ष पक्षसेवेबद्दल प्रमोद महाजनांच्या मनात आदर होता. ... आज अडवानींच्या नेतृत्वगुणांवरूनही भाजपमध्ये वादळे उठली आहेत. अशा वेळी पक्षाला सावरण्याची कसरत करणारा मात्र कुणीही पक्षात दिसत नाही. कदाचित संघाच्या पडद्यामागच्या मार्गदर्शनातून भाजपमधील वादळे शमविली जातीलदेखील, पण महाजनांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळेच ही वादळे उमटली आहेत, हे आता सर्वांनाच जाणवत असेल. म्हणूनच, "आज महाजन असते तर?' असा प्रश्‍न सर्वसामान्य कार्यकर्त्याला केला तर क्षणभर तो अंतर्मुख होतोच. आज महाजन असते तर पक्षाची आणि "रालोआ'ची ही स्थिती झाली असती? म्हणूनच, "आज महाजन असते तर?' हा प्रश्‍न त्याला छळतो आहे...

2 comments:

Anonymous said...

"आणीबाणी संपली आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पहिले बिगर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले."

I am afraid these two events were wide apart. Congress lost Lok Sabha election in March 1977. Within next few days, several Indira loyalists among the chief ministers were replaced. In Maharashtra, Shankarrao Chavan was replaced by Vasantdada Patil. Congress govts in several (N Indian) states were dismissed in April 1977, but not in Maharashtra where the Congress had won only 20 out of 48 states, and lost 28 seats. In February 1978, assembly elections yielded about 98 seats to Janata Party, and 60-60 each to Indira Congress and Yeshwantrao Chavan's Congress. The two Congress factions joined hands and Vasantdada continued as CM, with Nasikrao Tirpude of Indira Congress becoming Deputy CM. In 1979, Sharad Pawar broke away from Vasantdada, and became CM with Janata Party's support. Strictly speaking, it was a rebel Cong + Janata coalition, not a non-Congress govt. Indira Gandhi swept back to power in Jan 1980, and dismissed several opposition governments, among them Sharad Pawar's.


"त्याच काळात भाजपच्या आणि राष्ट्रीय राजकारणात प्रमोद महाजन नावाच्या एका उमद्या नेतृत्वाचा उदय होत होता. डॉ. विश्‍वनाथप्रताप सिंह हे आमचे नेते आहेत, असे निःसंदिग्धपणे सांगत महाजनांनी देशाच्या सत्ताकारणात पक्ष रुजवायला सुरवात केली"

Huh? Advani convened a meeting of Jan Sangha loyalists in April 1980, and Vajpayee became President of the new party, which named itself BJP. Two months later, V P Singh became Congress CM in UP, and in 1985-86 he was a prominent minister in Rajiv Gandhi's ministry. There was no question of V P Singh being Pramod Mahajan's leader when BJP was formed, nor was Mahajan ever in position to make decisions of that magnitude at the national level.

Anonymous said...

the dual membership contraversy caused the fall of the Janata government led by morarji desai and formed with the support of jansangh. (1979-80)
bjp was also a part of of the government (KADABOLE) formed under the leadership of v.p. singh. The Ram janmabhoomi issue resulted in fall of singh govt. (1989)