Friday, May 28, 2010

चिंतू-३

संध्याकाळी अंधेरीच्या रेल्वे स्टेशनावर उतरून जिना चढणार्‍या गर्दीत जिन्याच्या पायर्‍या दिसेनाश्या होतात, आणि एकेका पायरीने वर चढणार्‍या त्या गर्दीची डोकी, खालून, काळ्या लाटांसारखी हिंदकळताना दिसतात...
... मध्येच एका पायरीवर मात्र, या लाटा भोवयासारख्या दुभंगतात...
घाईघाईने जिने चढणारी ती पावले, मधल्याच एका पायरीशी थबकतात, आणि बाजूला होऊन पुढे सरकतात.
आपोआपच, त्या पायरीवर एक पोकळी तयार होते.
आणि लाटेतले प्रत्येक डोके खाली वळते...
... त्याला मात्र, त्या गर्दीचे, तिच्या दुभंगण्याचे आणि पुढे सरकण्याचे काहीही भान नसते.
हाताच्या तळव्यावर मावतील, एवढ्या लहान, खेळण्यातल्या दोनचार मोटारी त्याच्या पायांच्या चपळ हालचालींनी मिळणार्‍या वेगामुळे त्या मोकळ्या जागेतून इकडून तिकडे सरसरत असतात...
... आणि तो, त्या खेळात मस्त दंगलेला असतो.
गर्दीची पावलं क्षणभरासाठी थबकतात. कारण, त्या गर्दीची माणुसकी पायाशी असलेल्या त्या लहानग्याची काळजी घेत असते.
कुणीतरी खिशात हात घालून, त्या घाईतही, एखादं नाणं त्याच्यासमोर टाकतो, आणि पुढ्यातली पळती गाडी झटक्यात पायात पकडून थांबवत तो खाली वाकून तोंडानं ते नाणं उचलतो... खिशात टाकतो...
पुन्हा पायात गाड्या पकडून त्यांना वेगानं पळवण्याचा त्याचा खेळ सुरू होतो.
आपल्या पुढ्यात नाणं टाकणार्‍याकडे मान वर करून पाहाण्याचंही भान त्याला नसतं.
कदाचित, मान वर करेपर्यंत, गर्दीची दुसरी लाट आलेली असते, हे त्याला अनुभवानं माहीत झालेलं असावं.
तो पुन्हा आपल्या पुढ्यातल्या त्या गाड्या पळवायच्या खेळात रंगून जातो.
... अलीकडे तो रोज दिसत नाही.
तो जेमतेम साताआठ वर्षांचा असेल.
त्याला हात, म्हणजे, दंड, मनगटं, आणि पंजे नाहीत.
त्याचे पायच त्याचे हात आहेत.
उत्सुकता वाटावी, इतक्या सफाईनं तो आपल्या पायाच्या इवल्या तळव्यांनी पुढ्यातल्या खेळण्यातल्या मोटारी हाकत असतो.
... शरीराचा एखादा अवयव दुबळा किंवा निकामी असेल, तर काम करण्यास सक्षम असलेला दुसरा अवयव आणखी कार्यक्षमतेने काम करतो आणि दुबळ्या अवयवाची क्षमतेची उणीव भरून काढतो, असे म्हणतात. अपंगांना त्यांच्या दुबळेपणावर मात करण्याची शक्ती मिळावी, म्हणून कदाचित निसर्गच ही योजना करत असावा...
पायात पेन पकडून परीक्षेचे पेपर लिहिणार्‍या, तोडात ब्रश पकडून निसर्गाचे सुंदर रंग कागदावर उमटविणार्‍या, प्रकाशाच्या किरणांचे सौंदर्य कधीच न पाहू शकणार्‍या अनेक अपंगांच्या कर्तबगारीचं कौतुक धडधाकटांच्या दुनियेत होत असतं. अशा कौतुकामुळे त्या अपंगत्वालाही, जगण्याची नवी उमेद मिळते...
... आणि अपंगत्वावर मात करून कुणी एखादा एव्हरेस्टदेखील सर करून जातो...
----- ---------- ---------
पण धडधाकट, शरीराचे सगळे अवयव मजबूतपणे काम करण्याइतके ठाकठीक असतानाही, कधीकधी आपण अपंग, दुबळे होऊन जातो, तेव्हा निसर्ग आपल्याला ती सवलत देत नाही!!
... मग आपण कृत्रिम मदतनीसांचा सहारा घेतो.
आपल्या दुबळेपणावर मात करण्यासाठी, आजूबाजूला यंत्रांची दुनिया उभी करतो. आणि, ही दुनिया आपल्या सेवेसाठी हात जोडून उभी रहिली, की आपण आणखी दुबळे, परावलंबी, अपंग होऊन जातो...
... दहाबारा वर्षांपूर्वी, जेव्हा मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज नव्हती, तेव्हा सगळे फोन नंबर पटापट आठवायचे. गरजेपुरती फोन डिरेक्टरी मेंदूत सहज स्टोअर झालेली असायची.
आता मोबाईलमुळे, मेंदूतल्या डिरेक्टरीची पानं पिवळी पडलीत...
मेंदू वापरायची सवय यंत्रांमुळे कमी झाली, आणि आपणच यंत्र झालो.
यंत्र हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग झालाय.
... माझा एक मित्र, समोर बसून अगदी सहज बोलू लागला, तरी त्याचा डावा तळवा नकळत डाव्या कानावर जातो...
मध्येच कधीतरी तो भानावर येतो, आणि आपण मोबाईलवर बोलत नाहीये, हे लक्षात येऊन ओशाळून जातो...
आपण `यंत्रावलंबी' झालोय.
म्हणजे, अपंग होतोय?
... आपल्याला निसर्गानं दिलेलं शरीर, आपल्या कामाच्या गरजा भागवण्याकरता अपुरं पडतंय?
... माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात, नको असलेले, गरज नसलेले अवयव गळून पडत गेले, असं म्हणतात.
नाहीतर, आज आपल्यालाही शेपूट असती!!...
... आणि ज्या अवयवांची गरज वाढू लागली, ते आणखी ताकदवान होत गेले...
.. म्हणून माणसाचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा तल्लख होत गेला!!
... आता, पुढे काय होणार???...
आता मेंदूचा, हातांचा वापर कमी झालाय. यंत्रे आलीत...
शरीराकडून करून घ्याव्या लागणार्‍या अनेक कामांसाठी आपण यंत्रे तयार केलीत.
---- --------- --------
आत्ताच वाचलेल्या एका बातमीमुळे, हे सहज आठवून गेलं.
लंडनमधल्या, युनिवर्सिटी ऒफ रीडिंगमधल्या डॊ. मार्क गॆसन नावाच्या सायबरनेटिक्स एक्स्पर्टला कॊम्पुटर व्हायरसचा संसर्ग झालाय....!!!
संगणक विषाणूचा संसर्ग माणसाला होण्याचा जगातला हा पहिलाच प्रकार आहे! मार्क गॆसन हा संगणक विषाणूचा संसर्ग झालेला जगातला पहिला मानव ठरला आहे.
प्रयोगशाळेचे दरवाजे उघडण्याची सिक्युरिटी सिस्टीम असलेला प्रोग्राम सेट केलेली चिप मार्कने मनगटात बसवून घेतली होती. मोबाईल फोन त्याच्याव्यतिरिक्त दुसरा कुणीच चालू किंवा बंद करू शकणार नाही, असा प्रोग्रामही त्यात सेट केलेला होता.
एका नव्या प्रयोगाच्या हव्यासापोटी मार्कने म्हणे, या चिपमध्ये जाणूनबुजून व्हायरस घुसवला. नंतर त्यामुळे आपोआपच प्रयोगशाळेच्या सिक्युरिटी सिस्टीमवरही परिणाम झालाय.
कॊम्प्युटरच्या विषाणूचा संसर्ग माणसाला झाला...
(http://news.yahoo.com/s/livescience/20100526/sc_livescience/maninfectshimselfwithcomputervirus)
म्हणजे, कॊम्प्युटर हा माणसाच्या शरीराचा भाग होतोय??
बर्‍याच दिवसांनी,
.... पुन्हा ‘चिंतू’नं डोकं वर काढलंय...

---------------------------
http://zulelal.blogspot.com/search/?q=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82
---------------------

No comments: