Friday, September 27, 2019

धोबीपछाड

भविष्यात काय असेल माहीत नाही. पण काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची पुरती पडझड झाली आहे, आणि आता ‘कात्रजच्या घाटा’तून दोन्ही पक्षांचा प्रवास सुरू आहे, हे मान्य करावेच लागेल.
या राजकारणातील सगळ्या घडामोडी काही योगायोगाने घडत असतील असे समजणे हा दुधखुळेपणा ठरेल.
मग कोण असेल त्यामागचा मेंदू??
आज सकाळपासून शरद पवार यांनी ईडी चौकशीच्या निमित्ताने धोबीपछाड देऊन बाजी मारल्याचे चित्र तयार झाले आणि मरगळलेल्या राष्ट्रवादीमध्ये चैतन्य सळसळू लागले. या मुद्द्यावर पवारांनी आपली पाॅवर दाखवून देऊन ते पुण्यात पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी दाखल होतात तोच इकडे मुंबईत अनपेक्षितपणे प्रकटलेल्या अजितदादांनी विधान भवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला, आणि बातमीचे केंद्रस्थानच बदलून गेले. ईडी आणि चौकशीच्या माध्यमांतील चर्चा संपल्या आणि अजितदादांच्या धक्कादायक खेळीची चर्चा सुरू झाली. थोरल्या पवारांवरील प्रसिद्धीचा झोत काही क्षणांतच धाकट्या पवारांवर स्थिरावला... तेव्हा मुख्यमंत्री मात्र, वर्षावर विश्रांती घेत होते. ही बातमी त्यांना देणारा फोन वाजला आणि ते झोपेतून खडबडून जागे झाले असे म्हणतात. त्यांनी डोळे चोळतच ही बातमी ऐकली आणि त्यांनाही धक्का बसला, असेही कळते.
राजीनाम्याची बातमी सर्वात आधी ज्यांना कळली ती एकमेव व्यक्ती म्हणजे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे. नंतर एकएक करून ती वार्ता पसरत पसरत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली...
सगळेच अंधारात?
या घटनांच्या योगायोगासही एक अनाकलनीय संगती आहे. राजकारणात ती असतेच! तरीही, राजीनाम्याची खेळी हा राजकारणातील धक्कादायक चमत्कार म्हणावा लागेल!! जर्जर राष्ट्रवादीला हा एक जबर धक्का आहे, यात शंका नाही.
आता एक नवा डाव सुरू झालेला दिसतो. दादांच्या मनात राजकीय निवृत्तीचे विचार सुरूच होते, हा शरदरावांचा दावा म्हणजे डावपेचाचे नवे संकेत ठरेल अशी चिन्हे आहेत.
आता ‘तो’ मेंदू काय खेळी करतो ते पहायलाच हवे!!
कारण, ‘सातारा’ अजून बाकी आहेच!

No comments: