Friday, December 20, 2019

कोई लौटा दे मेरे....


वेळ आली आहे. विचार करण्याची. प्राधान्य ठरवण्याची.
आजचं जगणं जपायचं, की इतिहासाच्या खऱ्याखोट्या दंतकथांच्या आवरणात लपेटून घेत जगायचं हे ठरवण्याची...
घडी विस्कटते आहे. वीण उसवते आहे. कोण कुणाला फसवते तेच समजेनासं झालंय.
कोण कुणाला खेळवतंय हेही कळेना झालंय. सगळीकडे संशय माजलाय. उद्याचा सूर्य उगवणार की नाही एवढं अनिश्चित, असंभव भासायला लागलंय!...
यात जगायचं कसं, जगलो तर तगायचं कसं हा प्रश्नच आहे.
त्यापेक्षा,
आमचे जुने दिवस आम्हाला द्या!
चालेल आम्हाला भ्रष्टाचार, लाचखोरी...
बलात्कार, खून, दरोडे, दंगेधोपे, हाणामाऱ्या...
त्या तेव्हाही होत होत्या, पण उभा देश होरपळत तरी नव्हता.
भ्रष्टाचार करणारे करत होते, पण साधा समाज त्यातही जगत होता. उलट, चिरीमिरीची पुरचुंडी देऊन सहज कामं करून घेत होता.
काळा पैसावाल्यांची घरं नोटा, संपत्ती, ऐश्वर्याने भरली होती, पण साध्या समाजात समाधान, शांतता होती.
आश्वर्यसंपन्न इमारतींच्या सावलीतल्या झोपडपट्ट्यांमध्ये कधी कुठे होत असतील राडे... पण इमारतींच्या आनंदावर कधी नव्हते त्यांनी उमटवले ओरखडे...
एकंदरीत
भ्रष्टाचार, काळा पैसा, लाचखोरी, मनी लाऊंड्रिंग, एनपीए, हे सगळे भ्रम आहेत.
वास्तव जीवनाशी त्याचा संबंध नाही.
आमच्या जगण्याचा त्या जगाशी संबंध नाही ...
ते जिथे चालतं तिथे खुशाल चालू द्या...
आम्हाला आमचा दिवस आणि आमची रात्र हवीय! हक्काची!
भ्रष्टाचार, काळा पैसा चिरडण्यासाठी आम्ही नाही होणार तुमच्या ढाली..
एवढ्या त्यागापायी आम्ही नाही चिरडून घेणार कुणाच्या पायाखाली...
ते जुने दिवस पुन्हा द्या!
समांतर अर्थव्यवस्थेचे आणि त्यामुळे तयार झालेल्या समांतर जगण्याचे!
समांतर जगण्याने दरी होती, पण दरी असली तरी विभाजन नसते हे महत्वाचे!!

No comments: