Wednesday, July 9, 2008

क्या पांचवी पास `इतने' तेज है?

हा काथ्याकूट नाही... कथा, ललित, किंवा त्यातलं काहीच नाही... पण योग्य पर्याय न सापडल्यानं, `ललित'चा टिळा लावलाय... एक अचानकपणे ठुसठुसणारं, जनातलं, आणि मनातलं, काहीतरी सांगण्याचा एक घाईघाईचा प्रयत्न...

काही लिहावं असं आज खरं तर अजिबात मनात नव्हतं. टीव्हीवर बराच वेळ सर्फिंग केल्यावर झी वर निरागस सुरांचं सारेगमप पाहिल. ईश्वरानं गळ्यात मध ओतून जन्माला घातलेल्या त्या मुलांचं सुरांवरचं प्रेम मनात पाझरत असतानाच कार्यक्रम संपला. सुरेशच्या `सुरमयी श्याम'चे सूर मंचावर घुमत असतानाच चुकून रिमोट दाबला गेला, आणि डोकं भणभणून गेलं... सुन्न झालं... बालपण हे निरगसतेचं दुसरं नाव असल्याची साक्ष देणारे हे गोड, मधाळ सूर कानात घुमत असतानाच, अवधूतचं एक वाक्यही मनावर कोरलं जात होतं... त्या वाक्यात काव्य नव्हतं, पण कवितेचा गोडवा होता. हे गोड सूर कानात घुमतच राहाणार, असा विचार करत असतानाच अवधूत त्या `लिटल चाम्प’ला म्हणाला, `आता घरी गेल्यावर झोपण्याआधी जर कान धुतले नाहीत, तर कानांना मुंग्या येतील'...या एका वाक्याला दाद देत मी चॅनेल बदललं, आणि सगळा मूड किर्किरा झाला...

त्या दुसर्‍या चॅनेलनं माझ्या मनातल्या बालपणाच्या निरगसतेचं वास्तवात विसर्जन केलंय. बालपणाची जगभरातली असंख्य रूपं टेलिव्हिजनमुळे आजकाल आपल्याला अवतीभवती दिसतात. परवा एका रिऍलिटी शोच्या निमित्तानं एक रूप आपल्याला अस्वस्थ करून गेलं. शाहरूखच्या `क्या आप पांचवी पास से तेज है?' शो मधून निरगस बालपणाचं दुसरं रूप डोकावत असावं... झी वरच्या `सारेगमप'मधले कोवळे, निष्पाप सूर कानात घुमत असतानाच इंडिया टीव्हीवर एक सनसनीखेज रिपोर्ट पेश होत होता, आणि या रिपोर्टनं निरागसतेचं बालपणाशी जोडलेलं नातं ताडकन तोडलं. `पाचवी पास प्रेग्नंट' असा काहीतरी मथळा असलेला हा `स्पेशल रिपोर्ट' इंडिया टीव्हीच्या ख्यातीला साजेसाच असेल असं आधी वाटलं, पण जोडीला काही मुलाखतीही दिसत होत्या... तेरा ते अठरा वरषाच्या मुलींमध्ये `प्रेग्नन्सी'चं प्रमाण वाढतंय, आणि, या `टीनएजर्स्'मध्ये गर्भपाताचं प्रमाण्ही वाधतंय, असा निष्कर्ष काढणारा हा रिपोर्ट काही वेळापूर्वी इंडिया टीव्हीवर अनेकांनी पाहिला असेल... या वयोगटातल्या मुली, आपल्या बॊयफ्रेंड्च्या बरोबर बिन्दिक्कत डोक्टरकडे जाऊन आपली `समस्या' सहजपणे माडतात, आणि त्यातून सोडवणूक करून घेतात, असं हा रिपोर्ट सांगतो. मुम्बई, लखनऊ आणि काही मोठ्या शहरांत केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाचा हवाला या रिपोर्टमध्ये दिला जात होता... लक्ष्मिपुत्रांच्या घरांत हे प्रमाण मोठं असल्याचा या सर्वेक्षणाचा दुसर निष्कर्श आहे, असं या रेपोर्टवरून वाटलं, आणि सुन्नसुन्न व्हायला झालं.

आपल्या देशातल्या `बालपणा'च्या अल्लड, लडिवाळ छटा आता `टीनएजर' पिढीमुळे अस्ताला चालल्यात... गर्भपातांचं प्रमाण अशा पिढीत वाढत असेल, तर त्याची नुसती चिंता करत बसणे पुरेसे आहे का, हे ठरवलं पाहिजे...स्त्री भ्रूणहत्या हा देशातला एक चिंतेचा विषय आहे. विवाहाचं कायदेशीर वय कमी करायला न्यायालयं अनुकूल असल्याच्या बातम्यांमुळे एक देशात मध्यंतरी एक वैचारिक मंथन झालं. आजही, मुलगी `वयात'- म्हणजे कायद्याच्या द्रुर्ष्टीनं विवाहयोग्य व्हायच्या आधीच,- आली, की लग्नं करून एका मोठ्ठ्या जबाबदारीतून मोकळं होण्याची मानसिकता अनेक आईबापांमध्ये दिसते. मात्र, समाजातल्या `कायद्याच्या बबतीत जागरूक असलेल्या' शहरी संस्क्रुतीतल्या धुमाकुळाचा नक्शा या सर्वेक्षणानं पार उतरवून टाकलाय...

समाजात काही चांगुलपणाची चिन्हं दिसताहेत, तोवर अशा समस्यांवर तोडगा निघू शकेल, असं मला वाटतं... या लेखनावर त्याच्या साहित्यिक गुणावगुणांची चर्चा होऊ नये. उलट, कदाचित, घाईघाईनं, एक `सणकी'मुळे लिहायला घेतल्यानं या समस्येचं भीषण रूप मांडण्यात मी कमीच पडलो असेन, असं मला वाटतय... महाजालाच्या रूपानं आपल्यासमोर आज वैश्विक व्यासपीठ तयार झालंय... थोडा वेळ अशा समस्या जगासमोर आणण्यासाठीही द्यावा, या भावनेतून हा प्रपंच!

2 comments:

Yogesh said...

सारेगमचा हा भाग फारच चांगला आहे. कधी नाही तो अवधूत गुप्ते सुद्धा कंट्रोल मध्ये आहे. ;)

कार्यक्रम पाहताना अंगावरून वर्षं ओघळून गेल्यासारखं वाटतं.

Anonymous said...

चिंताजनक !
आवांतर- आजानुकर्ण हे विशेषनाम असेल, असे वाटले नव्हते.