Wednesday, July 2, 2008

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले.

संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता. सान्फ्रान्सिस्कोत संमेलन भरले, तर कदाचित आता त्यांना बरे वाटेल. पण हे विषयांतर झाले. संमेलनाच्या निमित्ताने आपली बाजू कुठेतरी झुकती हवी, म्हणून आम्ही आतापासूनच कानोसा घ्यायला सुरुवात केलीये. सान्फ्रान्सिस्को संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुणीच उभे राहू नये, असाही एक नवा सूर ऐकू येतोय. परवा, अमेरीकन एम्बसीच्या बाहेरच्या रांगेत पहाटेपहाटेपास्नं थांबलेल्यांकडे मी संशयानं पाहात होतो. काहीजण अगदी साळसूद्पणानं हातातल्या प्लास्टिकच्या पिशव्या सांभाळत आपल्याला कुणी पाहात तर नाही ना, अशा भीतीनं माना वळवून ताटकळत उभे होते. एका अनिरुद्धबापूंसारख्या मिश्या असलेल्या कवीनं मला बघून मान फिरवली, तेव्हा सान्फ्रान्सिस्कोला जाण्यासाठीची पूर्वतयारी का,असं मी ओरडून विचारल्यावर कसचंकसचं म्हणत त्यानं विषय बदलला आणि तुम्ही इकडं कुठं म्हणत मलाच गुगली टाकल्यावर मलाही काही सुचेच ना. कुणीच अध्यक्षपदाला उभं राहात नसेल, तर आपला फॊर्म भरून टाकायला काय हरकत आहे, असा विचार आल्यावर मी पण आधी व्हिसाची तयारी करू या म्हणून धावाधाव सुरु केली होती. हो, नाहीतर, अध्यक्षपदावर बीनविरोध निवड झाली, तरी व्हिसा नाकारला गेला, तर खाली मान घालून रत्नांग्रीला जायची पाळी यायची. तसे नको म्हणून, आधी व्हिसाची तयारी करा, असं बायकोनं सांगितल्यावर मी तिच्यावर भलाताच खूश झालो होतो. पण अध्यक्ष व्हायचं तर काहीतरी साहित्यिक कामगिरी नको का, असं तिनं विचारल्यावर जरासा हिरमुसलो, तोवर तिनच माझ्यापुढं मुलीची गेल्या वर्शीची वही धरली आणि डोळ्यांनीच, ‘वाचा’ म्हणून खुणावलं. तर मी वही हातात घेउन पहिलच पान उघडलं तर मुलीच्या टीचरांनी मारलेला लालभडक शेरा डोळ्यापुढे नाचायला लगल्यानं जराशी अंधारी आल्यासारखं होऊन मी आंगठा ओठाशी नेत खुणेनंच पाणी आणायला सांगितल्यांवर बायको फणकारत आतच गेली. मग मात्र मी ओर्डून पाणी मागितल, तेव्हा हसत पुढे येउन तिनं वहीचं शेवटचं पान उघडल, तर एकेक ओळ मोकळी सोडून चारचार ओळींवर काहीतरी लिहिलेलं दिसलं. मी खुणेनंच ‘काय’, म्हणून बायकोला विचारल, तर, तुमच्या अध्यक्शपदाची तयारी, असं सांगत ती खदाखदा हसायलाच लागली. या चारोळ्या आहेत असं तिनं सांगितल्यावर मी भलताच खुश झालो, आणि कवतिकानं तिच्याकडं बघितल्यावर ती लाजून स्वैपाकघरातच पळाली. पण संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तुझ्या चारोळ्या चालतील का, असं विचारल्यावर, महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी चालतात ना बायकोच्या चारोळ्या, असा बिनतोड सवाल तिनंच मला केल्यावर मी गप्प बसलो, आणि व्हिसाच्या तयारीला लागलो. पण अजूनही, वाटतंय की, यंदा नकोच तसं. बायकोच्या चारोळ्यांच्या भांडवलावर आपण पुढच्या वर्शी महामंडळाच्या अध्यक्षपदाला उभं राहू, यंदा फक्त व्हिसा असला, तरी अध्यक्षपद मिळेल,..
सान्फ्रासिस्कोचं जमलं नाही, तर यंदा कुठल्या तरी संमेलनात आपली हजेरी लावायचीच असं मी पक्कं ठरवलंय. रत्नाग्रीत काय आपली डाळ शिजायची नाही. एवढ्या वादानंतर, बायकोच्या कवितांवर तिथे अढ्यक्षपद मिळेल, असं वाटत नसल्यामुळे, विद्वेषी संमेलनाचापण मी मागोवा घेतोय. यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय. महामंडळाची पुढची संमेलनंपण आता जगाच्या पाठीवर कुठेही होणार, हे नक्की झालंय. विंदांच्या सूचनेचा आदर राखण्यासाठी, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर संमेलन भरवता येईल किंवा कसे, याची पाहाणी करण्याकरता महामंडळाचा एक प्रतिनिधी तिकडे जाणार आहे, असंही कानावर आलंय.

पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे. अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे...

No comments: