Friday, May 6, 2022

वेताळ आणि वेताळ...

 

दरबारात तातडीची बैठक बोलावल्यामुळे विक्रमादित्यास स्मशानात जाण्यास वेळच नव्हता. तिकडे झाडावर लोंबकळणाऱ्या प्रेताच्या मानगुटीवर बसून विक्रमादित्याची वाट पाहाणारा वेताळ वैतागून गेला. काय करावे याचा विचार करत असतानाच शेजारच्या झाडावरच्या वेताळाने त्याला हाक मारली. “कसला विचार करतो आहेस वेताळा?” असे विचारत पलीकडच्या झाडावरचा वेताळ उगीचच हसला, आणि हा वेताळ ओशाळला. “काही नाही रे, विक्रमादित्य आला तर त्याच्या खांद्यावरून निसटण्याकरिता कोणती नवी गोष्ट सांगावी याचा विचार करतोय...” वेताळ म्हणाला, आणि दोघेही नव्या गोष्टीवर विचार करू लागले. पलीकडच्या झाडावरच्या वेताळाने लगेचच गुगलवर गोष्टीचा शोध सुरू केला. पण विक्रमादित्यास सांगण्याजोगी व अडचणीचा प्रश्न विचारता येण्याजोगी गोष्ट त्याला सापडलीच नाही. अखेर वैतागून मोबाईल बंद करत असतानाच त्याच्या नजरेस एक बातमी पडली. ताबडतोब त्याने ती या वेताळासमोर धरली, आणि वेताळ खुश झाला. “ठरलं... हीच गोष्ट विक्रमादित्याला सांगायची. म्हणजे त्याला उत्तर देता येणारच नाही, आणि माहीत असूनही त्याने त्तर दिले नाही, तर आता तरी त्याच्या डोक्याची शंभर शकले होऊन त्याच्या पायाशी लोंबकळतील...” खदाखदा हसत वेताळ म्हणाला, आणि झाडावरच्या प्रेताच्या मानगुटीस विळखा घालून तो निवांत पहुडला...

 इकडे विक्रमादित्याच्या राज्यात काही तातडीच्या समस्या निर्माण झाल्याने काय करावे हे न सुचून त्याने विचारविनिमयासाठी बोलाविलेली जाणत्यांची बैठक आटोपली होती. कठीण प्रसंगी सगळेच आपल्यावर निर्णय सोपवून नामानिराळे राहात असल्याचा विक्रमादित्यास अगोदरपासूनच संशय होता. या बैठकीतही तेच झाले. विक्रमादित्याच्या डोक्याचा पुरता भुगा झाला होता. अखेर तिरिमिरीतच त्याने चढावा चढविल्या, तलवार कमरेला लावली, आणि स्मशानाचा रस्ता पकडला. वेताळाच्या गोष्टीतून काही उत्तर सापडले तर समस्येशी पडताळून पाहू असा विचार करत त्याने स्मशान गाठले.  त्याला येताना पाहून वेताळाला आनंद झाला. आता पुढचा काही वेळ मजेत जाणार होता. विक्रमादित्याने चढावा झाडाखाली काढून ठेवल्या, तलवार सावरत तो झाडावर चढला, आणि प्रेत खांद्यावर टाकून तो पुन्हा स्मशानाच्या दिशेने चालू लागताच, प्रेताच्या मानगुटीवर बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. “विक्रमा, तुझ्या हट्टाचे मला कौतुकही वाटते, आणि आता तर गंमतही वाटू लागली आहे. तुझ्यासमोरचा कोणताच प्रश्न तुला सोडविता येत नसल्याने तू हा उद्योग चालविला आहेस व उत्तर शोधत आहेस हे मला माहीत आहे. म्हणून आता मी तुला जी गोष्ट सांगतो ती ऐक. तुला उत्तर देता आले नाही, तर काय होणार ते तुला ठाऊकच आहे...” असे म्हणून वेताळाने गोष्ट सुरू केली.

 “विक्रमादित्या, ही गोष्ट नाही, तर तीनचार वर्षांपूर्वीचीच एक बातमी आहे. पुणे नावाच्या शहरात, एका झोपडपट्टीतील एक कोंबडा भल्या पहाटे बांग देत असे. त्यामुळे त्याच्या गरीब मालकास पहाटे लवकर जाग येऊन तो कामासाठी बाहेर पडत असे. आयत्या गजराची सोय असल्यामुळे त्याचे त्या कोंबड्यावर प्रेमही होते. पण शेजारच्या इमारतीतील एका महिलेस पहाटे कोंबड्याची बांग ऐकून त्रास होऊ लागला. भल्या पहाटे कानावर पडणारी त्याची बांग आपली झोपमोड करते आणि दिवस खराब जातो, अशी तक्रार घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली, आणि बांग देऊन झोपमोड करणाऱ्या कोंबड्यावर कारवाई करा अशी मागणी करणारा अर्जच तिने पोलिसांना दिला. ही बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आली, आणि पोलिसांची पंचाईत झाली. कोंबड्यावर कोणत्या कलमाखाली कारवाई करावी हे त्यांना सुचेना. त्यामुळे पोलिस संभ्रमात पडले. तर विक्रमादित्या, आता सांग पाहू, भल्या पहाटे बांग देऊन मालकास कामासाठी लवकर उठविणारा कोंबडा आणि शेजऱ्याची झोपमोड करणारा कोंबडा यापैकी कोणास तू न्याय देशील?”

 गोष्ट ऐकून विक्रम गोंधळला. विचारात पडला. आता पुन्हा राज्यातील जाणत्यांची बैठक घेतली पाहिजे, असे त्याने मनाशी ठरविले. इकडे वेताळ मात्र उत्तराची वाट पाहात होता. विक्रमादित्यास या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही याची खात्री होताच वेताळाने खांद्यावरील प्रेतासह पुन्हा झाडाकडे झेप घेतली, आणि तो फांदीला लटकून विक्रमादित्याकडे पाहात खदाखदा हसू लागला.

Friday, April 29, 2022

भ्रमयुगाचे भविष्य...


चि. मोरूस 

अनेक आशीर्वाद

अलीकडे आपला पत्रव्यवहार सुरू झाल्यापासून माझ्या मनातील विचारांना भलतीच चालना मिळू लागली असली तरी परवा उदगीरला जे काही घडले तेव्हापासून मनाची काहीशी चलबिचलही सुरू झाली आहे. त्या साहित्य संमेलनात अध्यक्षांनी सांगितले की काळ मोठा कठीण आला आहे. खरे म्हणजे, लेखकाने प्रत्येक काळात तसे सांगायचे असते अशी प्रथा असल्याचे वाचल्यावर थोडे बरेही वाटले. पण काळ जर कठीण आला असेल तर त्यावर काही औषध शोधले पाहिजे असे मला वाटू लागले, आणि मी विचार करू लागलो. आता सल्ले देणे बंद करायचे मी ठरविले असून, कोणाचे सल्लेही न स्वीकारता आपले निर्णय आपणच घ्यावेत असा माझा मानस आहे. ते काहीसे कठीण आहे याची कल्पना असल्याने, त्यावर काय उपाय करावा असा विचार करताना मला जे काही सुचले ते तुला सांगावे असे वाटते.

मोरू, आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे ते आधीच जाणून घेऊन त्यानुसार पुढच्या दिवसाची घडी बसविण्याची सवय ठेवावी असे शेजारच्या अण्णांनी सांगितल्यावर, ते कसे करावे असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर हसून त्यांनी वर्तमानपत्राची घडी उलगडून एका कोपऱ्यावर बोट ठेवल्यानंतर मी बारकाईने तेथे पाहिले असता, राशीभविष्य असा मथळा दिसल्यावर मी उत्सुकतेने वाचून काढले. अर्थात मी कोणत्या राशीचा ते मला अजूनही नक्की ठाऊक नसल्याने मी काहीसा भ्रमितही झालो, आणि सध्या आपण सारे भ्रमयुगात वावरत आहोत, याची आठवण झाली. भ्रमयुगातून सावरण्यासाठी भविष्याची घडी अगोदरच नीट बसवावी असे मी ठरविले असून, त्याआधी भविष्याची पडताळणी करण्याचा प्रयोगही करून पाहिला. तो नेमका जमल्याने आता मी दररोज तसेच करावयाचे ठरविले आहे.

तर मोरू, पहिल्या दिवशी मलाकमी पडू नका, आपले काम साधून घ्या, त्यासाठी लेकी बोले सुने लागे करावे लागेल असा सल्ला मिळाला. पण त्या दिवशी उशीर झालेला असल्याने उरलेल्या दिवसाचा वेळच कमी पडला. त्यामुळे ते भविष्य फुकट गेले. दुसऱ्या दिवशी मात्र, सकाळीच भविष्य पाहिले, आणि वाद टाळा, कौटुंबिक कटकटींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा सल्ला मिळाला असता, दिवसभर मी घराबाहेर राहिलो. त्यामुळे वाद टाळता येतील असे वाटल्याने संध्याकाळी उशिरा घरी परतल्यावर दिवसभर बाहेर काय करत होता, म्हणून घरात आगपाखड झालीच, आणि वादही झाला. त्यामुळे भविष्य खरे ठरते असे लक्षात आले. मग भविष्य सकाळी न पाहता, रात्री निजायच्या वेळी वाचून दिवसभरात त्यानुसार काय काय घडले त्याची मी पडताळणी घेतली. बऱ्याचदा ते खरेच निघते असे लक्षात येऊ लागल्यावर पुन्हा सकाळी भविष्य पाहण्याचे ठरविले. भ्रमयुगातून स्वतःस सुरक्षित ठेवायचे असेल, तर भविष्याची नेमकी दिशा आपल्याला ठाऊक असली पाहिजे, असा निष्कर्ष मी काढला आहे. त्यामुळे, रोजचे राशिभविष्य सकाळीच वाचून घ्यावे असे आता माझे ठाम मत आहे. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजेभविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर आपले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्यविद्येवर आपला विश्वास बसतोआणि दुसरे म्हणजेआपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने त्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतातत्याचे वाईट वाटत नाही. उलटतसे घडणार हे भविष्यातच लिहिलेले असल्याने जे घडले ते तसे घडणारच असल्याने आपण त्या टाळूच शकलो नसतो ही भावना दृढ असल्याने परिणाम स्वीकारण्याचे धाडस प्राप्त होते, व जे घडले त्याविषयी संभ्रम रहात नाही.

मोरू, तरीही, सावधगिरी बाळगण्याचे मी ठरविले आहे. वैद्यकीय उपचाराबाबत आपण सेकंड ओपीनियन घेतो, त्याप्रमाणे अन्य वर्तमानपत्रातील आपल्या राशीचे भविष्यही समोर ठेवून दिवसाच्या वागण्याची त्या भविष्यानुसार आखणी करणे आणखी चांगले असे माझे स्वत:चे मत आहे. पण माझ्या मते भ्रमयुगातून बाहेर पडावयाचे असेल, तर एकमेकांच्या हातात हात घालूनच भविष्याची वाटचाल करणे चांगले. या पत्रात तुला कोणताच सल्ला दिला नसल्याबद्दल तुला बरे वाटले असेल याची खात्री वाटते. पण तुझे ‘सेकंड ओपीनियन’ विचारात घ्यावे असा विचार आहे, हे लक्षात घे.

सल्ला न देता तुझे मत कळवशील याची खात्री आहे. कळावे,

तुझा

दादू 

 


Wednesday, April 27, 2022

प्रभू आले मंदिरी...

 

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. अमावस्येच्या रात्री किर्र अंधारातून चाचपडत तो स्मशानाजवळ पोहोचला. अंधारातूनच त्याला एक विचित्र घुत्कार ऐकू आला. क्षणभरच त्याच्या अंगावर भीतीचा शहारा आला. पण काहीही झाले तरी आज काम तडीस न्यायचेच असा निर्धार करून तो पाचोळ्याने भरलेल्या पायवाटेवरून पुढे चालू लागला. ‘या ठिकाणी विजेची व्यवस्था करावयास हवी होती’ असा विचारही त्याच्या मनात आला. ‘वीज असती तर रात्र एवढी भयाण भासली नसती’, असेही तो मनाशी बोलला. पण नुसत्या तारा आणि खांब टाकून वीज मिळत नाही, हे त्याला लक्षात आले, आणि ‘अंधाराची सवय करून घ्यायला हवी’ असे स्वतःस बजावत त्याने स्मशानाबाहेरचे ते झाड गाठून वर पाहिले. ते प्रेत फांदीवर तसेच लटकत होते. काही क्षणातच खदाखदा हसण्याचा आवाज आला, आणि विक्रमादित्य संतापला. कमरेची तलवार सावरत त्याने चाचपडत झाडावर चढण्यास सुरुवात केली. फांदीजवळ पोहोचून त्याने प्रेताच्या मानेभोवतीचा फास सैल केला, आणि प्रेत खांद्यावर टाकून तो खाली उतरला. तितक्यात खांद्यावरच्या प्रेताच्या मुखातून वेताळ बोलू लागला. “विक्रमा, तुझ्या हट्टाचे मला कौतुक वाटते. पण तुझा हेतू साध्य व्हावा असे वाटत असेल, तर मी तुला एक गोष्ट सांगून प्रश्न विचारेन. त्याचे योग्य उत्तर दिलेस तर मी तुझ्यासोबत येईन. आणि उत्तर माहीत असूनही तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्या पायाशी लोळू लागतील.”
विक्रमादित्य काहीच बोलला नाही. डोक्याची शकले होण्यापेक्षा उत्तर देण्याचा प्रयत्न करणे चांगले असा विचार करून त्याने वेताळास संमती दिली, आणि वेताळाने गोष्ट सुरू केली...
“आटपाट नगरीत एका दिवशी मोठी धामधूम सुरू होती. प्रधानाने सेवकांस सांगितले, “करा रे हाकारे, पिटा रे नगारे...” मग सेवक बुचकळ्यात पडले. आज अचानक नगारे पिटण्यासारखे काय झाले, त्यांना काहीच समजेना. मग प्रधान काहीसा संतापला. “तुम्हास ठाऊक नाही? आज महाराज राजवाड्यात परतणार आहेत. त्यांचा विजनवास संपुष्टात येत असून आता ते पुन्हा एकदा नव्या जोमाने राज्यकारभार सुरू करणार आहेत.”
ते ऐकताच काहीसे नाराज झाले. आता आपल्याला काम करावे लागणार की काय अशी भीती त्यांच्या मनात दाटली. प्रधानाच्याही मनात तीच भीती होती, पण शिष्टाचारामुळे विजनवासातून परतणाऱ्या राजाचे स्वागत करणे अपरिहार्यच होते. अखेर सेवकांनी राजवाड्याच्या चहुबाजूंना दवंडी पिटण्यास सुरुवात केली. कॅमेरेवाले बाहेर वाटच पाहात होते. त्यांनी राजवाड्यात गर्दी केली. सेवकांनी दवंडी पिटताच राजवाड्याच्या आसपास वेळ घालविण्यासाठी भटकणारे कर्मचारी जागेवर येऊन बसले. मोठ्या विजनवासानंतर परतणाऱ्या महाराजांस आपण काम करत आहोत असे भासविण्याची तयारी पूर्ण झाली. नगरजनांनी घराबाहेर गुढ्या तोरणे उभारली. चौकाचौकात नगारे वाजत होते. काही सैनिकांनी तर शोभायात्रांचेही आयोजन केले. सर्वत्र उत्सवी वातावरण पसरले होते. ते पाहून प्रधान खुश झाला. तयारी पूर्ण झाल्याची खात्री होताच त्याने महाराजांना निरोप पाठविला. तेव्हा महाराज अंतःपुरात विश्रांती घेत होते. प्रधानाचा निरोप पोहोचताच राजांनी निघण्याची तयारी केली. सेविकेने औक्षण केले, आणि प्रसन्न हसून महाराजांनी राजवाड्याकडे प्रस्थान ठेवले. पुन्हा नगारे धडधडू लागले. तुताऱ्या वाजू लागल्या. उत्सवी वातावरण आणखीनच मोहरून गेले. आणि महाराजांचा यंत्ररथ राजवाड्याच्या प्रवेशद्वारी पोहोचताच प्रसन्न वदनाने हात जोडून महाराज पायउतार झाले. त्यांनी राजवाड्याबाहेरील कुलदैवतास नम्रपणे झुकून प्रणाम केला, आणि राजवाड्याचा फेरफटकाही मारला. नोकरजनांची आस्थेने चौकशी केली. हा दुर्मीळ क्षण टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचा लखलखाट सुरू होता. महाराज प्रसन्न झाले. एका सेवकाशी त्यांनी कामकाजाबाबत जुजबी चर्चा करून कामाची माहीतीही घेतली. ते पाहून सेवकाचा धीर चेपला, आणि त्याने विचारले, “महाराज आपण इतके दिवस कोठे होता. तुमच्या पादुका सिंहासनावर ठेवून इथे राज्यकारभार सुरू होता...” महाराज हसले. “आम्ही विजनवासात होतो”, असे जुजबी उत्तर देऊन ते आपल्या दालनी परतले...”
विक्रमादित्य ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होता. आता वेताळ कोणता प्रश्न विचारणार याचाही त्याला अंदाज आला होता. उत्तर तयारच होते. अपेक्षेप्रमाणे वेताळाने मान वाकडी करून विचारले, “विक्रमा, आता सांग बरे, ही कोणत्या नगरीतील कोणत्या राजाची गोष्ट आहे?” विक्रम हसला. क्षणाचाही विलंब न लावता तो उत्तरला, ‘अरे वेताळा, ही गोष्ट तर आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तुझ्याकडच्या साठा संपला असेल, तर अशा फालतू गोष्टी न विचारता निमूटपणे माझ्यासोबत ये... ही रामचंद्र नावाच्या राजाची गोष्ट आहे...”
वेताळ पुन्हा खदाखदा हसला. “राजा, तुझे उत्तर चुकले”, असे म्हणून त्याने विक्रमाच्या खांद्यावरून पुन्हा झेप घेतली, आणि प्रेतासह तो झाडाच्या फांदीवर लटकू लागला...
-- शीर्षासन. पुण्यनगरी, १५-०४-२२

डिस्क्लेमर!

मराठी सिनेमा, नाटकं किंवा मालिका पहायला सगळ्यांना आवडतात. त्यातील पतीपत्नी एकमेकांशी खूप प्रेमाने वागतात. एकमेकांच्या मताचा आदर करतात. पतीच्या शब्दाबाहेर असलेली पत्नी (सहसा) कथानकात दाखवत नाहीत. एखाद्या गंभीर कौटुंबिक समस्येवर दोघे मिळून विचार करतात, परस्परांची मते जाणून घेतात.
काही प्रसंगांत, पत्नीला पतीचे मत पटल्याचेही दाखवितात.
काही वेळा, आपली चूक पत्नी पतीसमोर मान्यदेखील करताना दाखवितात.
एका सीरियलमध्ये तर, नवऱ्याचा डायलॉग पूर्ण होईपर्यंत शांतपणे व सुहास्य मुद्रेने तो ऐकणारी बायको दाखवली होती. नवऱ्याने बोलताबोलता केलेल्या विनोदावर ती खळखळून हसते आहे असेदेखील एक दृश्य होते...
साधारणपणे वास्तव आयुष्यातील हरवलेल्या गोष्टी पडद्यावर का होईना, पहायला मिळाल्याने हरवलेल्या क्षणांचे साक्षीदार झाल्याचा आभासी आनंद पडद्यावरच्या कथानकात सापडत असतो. आणि मन भरून येते!
या आनंदाचा मसाला ज्या कथानकात अधिकाधिक, ते नाटक, सिनेमा, मालिका अधिक लोकप्रिय होते.
हे आभासी आहे, वास्तवात असे नसते हे प्रेक्षकांनाही माहीत असते.
तरीही, प्रयोगाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर दाखवतात. 'या कथेतील पात्रे, प्रसंग व कथानकही काल्पनिक आहे, त्याचा वास्तवाशी संबंध नाही, आढळल्यास तो योगायोग मानावा!'
हे डिस्क्लेमर दाखवले नाही तर ते वास्तवाशी संबंधित आहे असे कुणाला वाटेल तरी का?
मग ते दाखविण्याची गरजच काय?

Sunday, December 19, 2021

'उंच' आणि 'मोठा'!

 मला डोंगर, पर्वत आवडतात. लहानपणी, तरुणपणी आमच्या गावाच्या आसपासच्या कित्येक डोंगरांवर मी पायपीट केली आहे. ते नुसते डोंगर नाहीत. पर्वत आहेत. एका बाजूला निळाशार, अथांग पसरलेल्या समुद्राच्या लाटा छाताडावर झेलणारा पर्वत. कोकणातल्या सह्याद्रीच्या कडेकपारी आणि दऱ्याखोरी पायाखालून घालत पार शिखर गाठलं, की खाली चारही बाजूंना दिसणाऱ्या घनदाट जंगलातून जमिनीचा तांबडा तुकडा शोधावा लागायचा तेव्हा! ज्या जमिनीवरून चालताना डोक्यावरचं जे झाड महावृक्ष वाटायचं, ते झाड पर्वताच्या शिखरावरून न्याहाळताना हिरवळीतल्या गवताच्या पात्याएवढं दिसलं की उगीचच, शिखरावर उभे राहिलेले आपण खूप ग्रेट, भारी वगैरे आहोत असं वाटायला लागायचं, आणि पर्वत उतरून पाय रोजच्या जमिनीवर आले की मन भानावर यायचं. म्हणून, मला पर्वताच्या शिखरांवर चढायचा कंटाळा यायला लागला. मग मी पर्वताचे पायथे शोधू लागलो. आख्ख्या पर्वतावरून रोरावत उतरत, दगडाधोंड्यांवर वेड्यागत आदळत, धसमुसळेपणा करत पायथ्याकडे झेपावण्याचं वेड प्रपातांना का असतं ते उमगू लागलं.

कारण, पर्वताचा भव्यपणा पायथ्यावरूनच जाणवतो. शिखरावर उभं राहून खालच कस्पटासमान दिसणारं दृश्य न्याहाळताना, आपणास आपलं वाटणारं आभासी मोठेपण पायथ्यावर उभे राहून मान वर करताच गळून पडतं, आणि भव्यतेच्या पायाशी उभे राहिल्याने, आपण किती ‘कस्पट’ आहोत हे लक्षात येतं.आमच्या देवरुखजवळ बामणोली, मार्लेश्वर, अशा जागी गेलं, की भिंतीसारखे सरळसोट, आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे काळे पहाडी कडे आपल्याला आपली ओळख करून देतात, आणि या व्यापक विश्वातल्या किड्यामुंगीएवढीच आपली उंची आहे याची जाणीव जिवंत होऊन त्या पर्वतापुढे विनम्रपणे मान झुकते.

… म्हणून मला पर्वत आवडतात!!
Vijayk