Thursday, May 7, 2020

हीच ती वेळ!

महाराष्ट्रात भाजपने सरकार स्थापन केले असते तर आजचे करोनाचे आव्हान त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांच्या आघाडी सरकारएवढ्या कार्यक्षमतेने पेलले असते का?
आज महाराष्ट्र हे कोरोनाच्या फैलावाबाबत देशात एक नंबरचे राज्य ठरले आहे. फडणवीस सरकारची निवडणुकीआधीची ती, ‘सर्वात पुढे आहे, महाराष्ट्र माझा’ ही घोषणा आज आठवावी अशी ही स्थिती! पण असं झालंय, की, ठाकरे सरकार ज्या धैर्याने जनतेशी संवाद साधते, धीर देते, कौतुकाची थाप योद्ध्यांच्या पाठीवर मारते, परप्रांतीयांच्या मदतीसाठी धावून जाते अशा विविध कारणांमुळे दिवसेंदिवस सरकारची लोकप्रियता वाढतच असल्याने, विरोधी पक्षांची जबाबदारी म्हणून विचारावयाचा, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ हा प्रश्न उच्चारणेही फडणवीसांच्या विरोधी पक्षास अवघड झाले आहे.
आपले भविष्य हे राज्याच्या भविष्याशी बांधले गेलेले असते. म्हणजे, एखाद्या कठीण प्रसंगात, राज्याचे जे काही होईल, तेच आपलेही होणार हे नक्की आहे!
आपले सुदैव असे, की जनतेचा अपार विश्वास असलेले सरकार सत्तेवर आहे, आणि ते आपले भविष्य निश्चितच घडवेल याची जनतेला खात्री आहे.
योगायोग म्हणा, किंवा महाराष्ट्राची पुण्याई म्हणा, कठीण प्रसंगात जसे असायला हवे तसेच सरकार महाराष्ट्रास लाभलेले असल्याने, सरकारच्या शिल्पकारांस सलाम केलाच पाहिजे!
हीच ती वेळ आहे!!

No comments: