Sunday, August 18, 2019

... तरी कोल्हापुरी खंबीर!

...’लहानपणी आम्ही गाणं म्हणायचो. “शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?”... कोल्हापूर परिसरातील अनेक गावांमधील शाळांना पुराने वेढले आहे. शाळेभावती पाणीच पाणी साचले आहे. मुलांना सुट्टी आहे. पण शाळेभोवती साचलेल्या पाण्यामुळे मिळालेल्या सुट्टीला वेदनेची, आक्रोशाची किनार आहे... मुलांच्या शाळेभोवतीच नव्हे, घराभोवतीही पाणी साचलंय, आणि या सक्तीच्या सुट्टीत, जीव मुठीत धरून आपल्या केविलवाण्या, हतबल आईबापांच्या कुशीत लपवेली शेकडो मुलं भयभीत नजरेनं आयुष्यातला हा भयाण अनुभव झेलण्याची शिकस्त करताहेत...
उद्ध्वस्त घरे, रिकामे गोठे आणि भुईसपाट शेती, पाण्याचे विक्राळ लोट सभोवती... अशी अवस्था आजही कोल्हापूर-सांगलीच्या परिसरात आहे. एक खिन्न, उदास सावट इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दाटलंय... उद्ध्वस्त आयुष्याला पुन्हा उभारी मिळेल असे आशेचे किरण आज तरी अनेकांच्या उरल्यासुरल्या घरांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत...
#झी२४_तास च्या दीपक भातुसेने आज एका सहकाऱ्यासोबत राजापूरवाडी, अर्जुनवाडीच्या दैनावस्थेची कहाणी लोकांसमोर मांडली...
‘आता पुढे काय?’ हा प्रश्न त्याने विचारला, आणि संकटग्रस्तांच्या मनात रुतलेले तेच प्रश्नचिन्ह स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरही उमटले...
दिलाशाची बाब एवढीच, की, या प्रश्नाचं उत्तर अनेकजण शोधतायत... हातपाय गळाले नाहीयेत. उत्तर शोधण्याची उमेदही संपलेली नाहीये. म्हणूनच, या प्रश्नावर जवळपास प्रत्येकाचे उत्तर एकच आहे.
ते म्हणजे, “आता पहिल्यापासून सुरुवात!”...
कोल्हापूरवासींयांनी संकटाला धैर्याने तोंड दिले. त्यांच्या ‘पहिल्यापासून सुरुवात’ करण्याच्या प्रयत्नांसोबत प्रत्येक हाताची साथ असायला हवी. म्हणजे त्यांची उमेद आणखी ताकदवान होईल... मग, ‘प्रसंग गंभीर, तरी कोल्हापुरी खंबीर’ हा विश्वासही दृढ होईल!

No comments: