Wednesday, August 28, 2019

माणुसकी



माणुसकीला अजूनही धुगधुगी आहे, तोवर ती जगविण्यासाठी हालचाल केली पाहिजे.
 भर पावसाळ्यात ओलाव्याने जडावलेल्या झाडांच्या फांद्या तुटून कोसळतात, झाडेही उन्मळून पडतात. त्यामुळे होणारी हानी हा निसर्गाचा दोष नाही. पण निसर्गाचे संतुलन राखणे हे माणसाचे कर्तव्य आहे. निसर्गाची कत्तल करून माणसाचे हित सांभाळणे ही माणुसकी नव्हे!
मुंबई महापालिकेकडून पावसाळयात माणसाच्या सुरक्षिततेसाठी झाडे अमानुषपणे छाटली जातात. त्यामुळे झाडांच्या आश्रयाने राहणाऱ्या पक्ष्यांची घरटी उध्वस्त होतात, आणि स्वत:स वाचवू न शकणारी असंख्य पिल्ले आकाशात भरारी मारण्याआधीच देवाघरी जातात...
माणसाच्या डोक्यावरील संकटाची टांगती तलवार दूर करताना, जगण्याच्या आशेने केवळ चिमुकल्या व केवळ परावलंबी मातापित्यांवर निर्भर असलेल्या पक्ष्यांच्या पिल्लांचा बळी घेतला जातो, हे त्यांच्या गावीही नसते.
महापालिका सभागृहाच्या बैठकीत शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर नावाच्या नगरसेविकेने या मुद्द्याला वाचा फोडून माणुसकीचे दर्शन घडविले. वृक्षछाटणीचे काम शास्त्रोक्त पद्धतीनेच झाले पाहिजे व छाटणीआधी फांद्यांवरील घरटी तपासावीत अशी मागणी त्यांनी केली. घरटे नसेल तरच फांद्या छाटाव्यात असा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.
महापालिका प्रशासनाचा यावर काय प्रतिसाद होता ते आज प्रसिद्ध झालेल्या बातमीतून स्पष्ट झाले नाही, पण राजकारणाने लडबडलेल्या क्षेत्राच्या एका कोपऱ्यात कुठेतरी माणुसकीही धुगधुगी धरून आहे, याचा दिलासा या बातमीने नक्कीच दिला.
पक्ष्यांना वाचता आले असते, तर आज झाडाझाडावर, फांदीफांदीवर किलबिलाट करून त्यांनी नक्कीच आनंदोत्सव साजरा केला असता.
पुढचं पुढे!!

1 comment:

Sanket kulkarni said...

खूपच छान, घोसाळकर साहेब उत्तम निर्णय घेतला. तुमच लिखाण छान आहे