Sunday, August 18, 2019

विचार करा...

मोठी धरणे बांधण्याच्या धोरणाचा आता पुनर्विचार व्हायला हवा. मोठ्या धरणांचा फायदा नेमका काय याचाही अभ्यास व्हायला हवा. यासाठी करावा लागणारा प्रचंड खर्च, प्रचंड भूसंपादन, प्रचंड विस्थापन आणि पुनर्वसनाच्या नावाने शंख हीच परिस्थिती पहायला मिळते. अर्थात, प्रचंड प्रकल्पांचा मलिदाही प्रचंड असतो.
अशा प्रचंड प्रकल्पांचे फायदे नसतात असे नाही, पण एखाद्याच वेळी या प्रकल्पांमुळे बसणारा फटका हा त्याचे सर्व फायदे धुवून टाकणारा ठरतो. माणसे, जनावरे, घरे, गोठे, गावे, शहरे उद्ध्वस्त होतात. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी वा पश्चिम महाराष्ट्रात आज पुराच्या विळख्यात सापडलेली शहरे हा या मोठ्या धरणांच्या फटक्याचाच परिणाम आहे.
जगातील अनेक राष्ट्रे आज महाकाय धरणांचे धोरण गुंडाळून लहान धरणांची कास धरू लागली आहेत. एखाद्या नदीवर एकच महाकाय धरण बांधण्यापेक्षा, नदीच्या प्रवाहात ठरावीक टप्प्यांवर लहानलहान धरणे बांधल्यास खर्च कमी होईल, भूसंपादन मर्यादित होऊन विस्थापनाची व सहाजिकच पुनर्वसनाची परवडही कमी होईल व नदीच्या प्रवाहक्षेत्रात एकाच टप्प्यावर नव्हे तर टप्प्याटप्प्यावर सिंचनक्षमता निर्माण करता येईल.
शिवाय, पूरस्थितीच्या संकटाची टांगती तलवार काहीशी सौम्य करता येईल.
जीवन आश्वस्त होईल आणि संकटांची भयाणताही कमी होईल.
ती वेळ कधी येईल? कुणास ठाऊक !!

No comments: